अध्याय सोळावा - श्लोक ५१ ते १००

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


ज्योतिर्लिंग जाणोन ॥ लत्ताप्रहारें केलें ताडण ॥ कामधेनु आली आपण ॥ डांगेवरी मारिली ॥५१॥

कल्पतरु दारीं उगवला ॥ तो देखतांचि अभाग्यें उपडिला ॥ परीस जाणोनि गोफणिला ॥ चिंतामणि घातला पायरीस ॥५२॥

अमृतकुंभ दैवें लाधला ॥ तो जाणोनि बळेंच उलंडिला ॥ जगद्वंद्य घरासि आला ॥ माघारा दवडिला समजोनि ॥५३॥

मग बोले रघुनंदन ॥ अगस्ति परम सज्ञान ॥ तो सीतेवीण माझें दर्शन ॥ सहसाहि न घेचि ॥५४॥

मी निर्विकार निर्गुण ॥ सीता सर्वांसी कारण ॥ तिणें मज जागें करून ॥ सगुणत्वासी आणिलें ॥५५॥

तिनें निर्मून पंचभूतें ॥ त्रिगुण आणि तत्त्वें समस्तें ॥ अवतारखेळ कौतुकें बहुतें ॥ दावी जनां तेचि पै। ॥५६॥

मी अरूप अनाम निश्र्चितीं ॥ हें सर्व जाणे अगस्ति ॥ तो ऋषीमाजी केवळ गभस्ती ॥ तपें ज्ञानें तेजस्वी जो ॥५७॥

असो श्रीराम जगजेठी ॥ परतोनि आला पंचवटीं ॥ वृक्ष गुल्मलता कवळी पोटीं ॥ सीता सीता म्हणोनियां ॥५८॥

पंचवटीचा त्याग करून ॥ तत्काळ चालिला रघुनंदन ॥ जैसी अहंदेहबुद्धि सांडोन ॥ योगी विचरे निरंजनीं ॥५९॥

कीं प्राण त्यागिलिया काया जैसी ॥ कीं कोपत्यागें जमदग्नि ऋषि ॥ कीं संसारमाया निश्र्चयेसीं ॥ विरक्त त्यागी मनींहूनि ॥६०॥

जीर्ण देह त्यागोनि उरग ॥ कीं तपोधन करी कामत्याग ॥ कीं पवित्र त्यागी कुमार्ग ॥ श्रेष्ठ कर्म जाणोनियां ॥६१॥

कीं परनिंदा सज्जन टाकिती ॥ आत्मस्तुति सांडिजे संती ॥ कीं अमंगळाची संगती ॥ न धरिती श्रोत्री कदाही ॥६२॥

कीं संसारदुःखें दारुण ॥ विवेकी त्यागी जैसें वमन ॥ तैसी पंचवटी त्यागोन ॥ राम-लक्ष्मण चालिले ॥६३॥

तों मग देखे रघुनंदन ॥ द्वादश हात लांब चरण ॥ चार हात रुंद पूर्ण ॥ राक्षसपाऊलें उमटलीं ॥६४॥

त्यांजवळी कुंकुमांकित जाण ॥ सीतेचे उमटले चरण ॥ मुक्तें विद्रुमें पडलीं गळोन ॥ लक्ष्मण पाहे विस्मित ॥६५॥

कमळिणीमित्रकुळभूषण ॥ शोधीत जात घोर विपिन ॥ तों जटायु देखिला दुरोन ॥ रक्तेंकरून बंबाळ ॥६६॥

किंशुक फुलला बहुत ॥ कीं दुरोन आरक्त दिसत ॥ तैसा जटायु पडला तेथ ॥ रामस्मरण करीतचि ॥६७॥

रघुनाथें भाते घेतले ॥ धनुष्य वेगीं चढविलें ॥ श्रीरामासी ऐसें भासलें ॥ कीं हा राक्षस बैसलासे ॥६८॥

भक्षोनियां जनकनंदिनी ॥ बैसलासे तृप्त होउनी ॥ रक्त वहात चहूंकडोनी ॥ पर्वतीं जैसा पाझर ॥६९॥

जवळी आला चापपाणि ॥ तों रामनामाची मधुर ध्वनी ॥ ती रघुत्तमें ऐकोनि श्रवणीं ॥ येत धांवोनि समीप ॥७०॥

तों डोळा उरलासे प्राण ॥ जटायु पडिला करीत स्मरण ॥ रघुनाथ तो भक्त देखोन ॥ हृदयीं पूर्ण गहिंवरला ॥७१॥

जटायूस पुढें घेऊन देख ॥ शोक करी अयोध्यानायक ॥ जैसें एकुलतें मरतां बाळक ॥ माता तळमळे ज्यापरी ॥७२॥

कीं परम मित्र बंधु रणीं ॥ पडलिया वाटे जेवीं हानी ॥ त्याचपरी चापपाणी ॥ हृदयीं धरोनि विलपत ॥७३॥

परम खेद करी सौमित्र ॥ म्हणे जटायु भक्त आणि मित्र ॥ जो मित्रसारथियाचा पुत्र ॥ ऐसा पवित्र नाढळे ॥७४॥

जटायूस म्हणे रघुवीर ॥ बारे काय जाहला समाचार ॥ तो मज सांग अणुमात्र ॥ जरी शक्ती असेल बोलावया ॥७५॥

श्रीरामाचे कर्णयुगलीं ॥ हळूच जटायु सांग ते वेळीं ॥ रावणें सीता लंकेसी नेली ॥ म्यां सोडविली होती येथें ॥७६॥

भोंवतें पाहे रघुनंदन ॥ तों अश्र्व सारथि आणि स्यंदन ॥ रावणाची वस्त्रें अलंकार पूर्ण ॥ चूर्ण होऊन पडियेलीं ॥७७॥

पाहतां जटायूचा पराक्रम ॥ पुढती गहिंवरे रघूत्तम ॥ सीताशोकाहून परम ॥ शोक वाटे जटायूचा ॥७८॥

जटायु बोले वचन ॥ रघुपती तुझी घालोनि आण ॥ राक्षसें घेतला माझा प्राण ॥ पक्ष उपडोनि टाकिले ॥७९॥

माझ्यानें आतां न बोलवे देख ॥ म्हणोनि पदीं ठेविला मस्तक ॥ श्रीरामाच्या नेत्रोदकें अभिषेक ॥ जाहला जटायूतें ॥८०॥

मग बोले रघुनंदन ॥ जटायु तुज मी उठवीन ॥ मज तूं साह्य होईं पूर्ण ॥ दशरथाऐसा सत्वर ॥८१॥

मग बोले अरुणनंदन ॥ ऐसें मज पुढें न ये मरण ॥ तुझे अंकावरी जाण ॥ सोडीन प्राण आतांचि ॥८२॥

जटायु विलोकी रामवदन ॥ हृदयीं रेखिलें तैसेंचि ध्यान ॥ मुखें करीत नामस्मरण ॥ चालिला प्राण ते काळीं ॥८३॥

श्रीरामें तेव्हां हृदयीं धरिला ॥ तेथेंच जटायूनें प्राण सोडिला ॥ ब्रह्मा हंसविमान घेऊन आला ॥ वरी बैसविला जटायु ॥८४॥

जटायूस म्हणे रघुनंदन ॥ तुज स्वर्गीं भेटले दशरथ जाण ॥ त्यासी सीता नेली हे वर्तमान ॥ सहसाही न सांगावें ॥८५॥

परम प्रतापी दशरथ पिता ॥ कर्मभूमीस येईल मागुता ॥ यालागीं न सांगावी वार्ता ॥ जाण तत्वतां जटायु ॥८६॥

मी रावणास वधोनी ॥ पाठवीन स्वर्गभुवनीं ॥ मग तो स्वमुखेंकरूनि ॥ वृत्तांत सर्व सांगेल ॥८७॥

असो जटायु स्वर्गा पावला ॥ रघुनाथ्ज्ञें तो पितृव्य मानिला ॥ दशरथें बंधु म्हणविला ॥ शक्राचिया युद्धकाळीं ॥८८॥

यालागीं जनकजामातें ॥ पितृव्य मानिला जटायूतें ॥त्याचेनि संगें सीताकांतें ॥ पंचवटिये काळ क्रमियेला ॥८९॥

घडीघडी येवोनि बैसे ॥ श्रीराम त्यासी गोष्ट पुसे ॥ जटायु भक्त विशेषें ॥ रघुपतीचा आवडता ॥९०॥

त्याची उत्तरक्रिया समस्त ॥ करिता जाहला कौसल्यासुत ॥ सौमित्रें काष्टें मेळवून बहुत ॥ अग्नि दीधला तयासी ॥९१॥

ऐसा भक्तकरुणाकर ॥ शरणांगतां वज्रपंजर ॥ पुढें चालिला राघवेंद्र ॥ सीता सुंदर शोधावया ॥९२॥

दक्षिणपंथें दंडकारण्यांत ॥ जेथें राहिला रघुनाथ ॥ शिवलिंग स्थापिलें तेथ ॥ बाणचिन्हांकित अद्यापि ॥९३॥

मयूरगिरी परम गहन ॥ तेथें आला अहल्योद्धारण ॥ हे सीते हे सीते म्हणोन ॥ वृक्षपाषाण आलिंगी ॥९४॥

तों कैलासीं वर्तलें नवल ॥ बैसला असतां जाश्र्वनीळ ॥ हातीं घेऊनि जपमाळ ॥ जपे कोमळ रामनाम ॥९५॥

जेणें शमलें हाळाहळ ॥ तें सहस्रनामांहूनि निर्मळ ॥ चंद्रापरीस अति शीतळ ॥ अमृताहूनि गोड पैं ॥९६॥

जें दिनकरापरिस तेजाळ ॥ जें आकाशापरी विशाळ ॥ जें सकळ आनंदाचें मूळ ॥ नाम केवळ परब्रह्म ॥९७॥

रूप सगुण नाम निर्गुण ॥ रूप मायामय आनंदघन ॥ रूप झांके नाम पूर्ण ॥ अनंतयुगीं ठसावें ॥९८॥

रूप सेवेंचि नाम निर्वच ॥ रूप क्षणिक नाम साच ॥ नामअर्थ करितां उगेच ॥ वेद तटस्थ राहिले ॥९९॥

असो तें नाम सर्वांत सार ॥ अखंड स्मरतां कर्पूरगौर ॥ तेथें हिमाद्रितनया जोडूनि कर ॥ विनवी सादर शिवातें ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP