मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय तीसावा|

एकनाथी भागवत - श्लोक ४६, ४७ व ४८ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


गच्छ द्वारवतीं सूत, ज्ञातीनां निधनं मिथः ।

सङकर्षणस्य निर्याणं, बन्धुभ्यो ब्रूहि मद्दशाम्‌ ॥४६॥

द्वारकायां च न स्थेयं, भवद्भिश्च स्वबन्धुभिः ।

मया त्यक्तां यदुपुरीं, समुद्रः प्लावयिष्यति ॥४७॥

स्वं स्वं परिग्रहं सर्वे, आदाय पितरौ च नः ।

अर्जुने नाविताः सर्व, इंद्रप्रस्थं गमिष्यथ ॥४८॥

तूं जाऊनि द्वारकेआंत । यादवांचा निधनवृत्तांत ।

परस्परें कलहयुक्त । निमाले समस्त हें सांग ॥३५०॥

बळिभद्रें निजात्मस्थितीं । देहो त्यजिला योगगतीं ।

माझीही दशा समस्तांप्रती । यथानिगुती सांगावी ॥५१॥

तुवां जाऊनियां त्यांपाशीं । शीघ्र सांगावें समस्तांशी ।

कोणीं न रहावें द्वारकेसी । निघावें वेगेंसीं ममाज्ञा ॥५२॥

द्वारका त्यागावयाचें कारण । तुज मी सांगेन आपण ।

दारुका तूं अतिसज्ञान । विश्वास पूर्ण मज तुझा ॥५३॥

यालागीं तुज राहवूनि एथ । अंतकाळींचें गुज सांगत ।

तुवां जाऊनि द्वारकेंत । बाहेर समस्त काढावे ॥५४॥

बाहेर काढावयाचें कारण । म्यां द्वारका त्यागिल्या जाण ।

समुद्र येऊनि आपण । नगर संपूर्ण बुडवील ॥५५॥

ठाव मागूनि समुद्रापाशीं । म्यां वसविलें द्वारकेसी ।

मज गेलिया निजधामासी । तो अवश्येंसीं बुडवील ॥५६॥

यालागीं सत्वर गमन । शीघ्र करावें आपण ।

माझीं माता पिता समस्त जन । द्वारकेहून काढावीं ॥५७॥

जंव समुद्र बुडविना तो ठावो । तंव आपुलाला समुदावो ।

घेऊनि सकळ परिग्रहो । शीघ्रतर पहा हो निघावें ॥५८॥

झालिया राज्यलोट । चोराकुळित होईल वाट ।

कोणीं नव जावें एकट । अवघीं एकवट करावीं ॥५९॥

अर्जुनाचेनि सांगातें । एकत्र मिळूनि समस्तें ।

शीघ्र जावें इंद्रप्रस्थातें । तो मार्गीं त्यांतें रक्षील ॥३६०॥;

ऐसें ऐकतां श्रीकृष्णवचन । दारुकासी आलें रुदन ।

न वचे सांडूं पाहे प्राण । जळेंवीण मीन जैसा ॥६१॥

निजकुळासी करुनि घात । गेला गेला रे श्रीकृष्णनाथ ।

मी काळमुखा द्वारकेआंत । जावों हा वृत्तांत सांगावया ॥६२॥

गिळूनि श्रीकृष्णनिजसुखा । म्हणती हा आला काळमुखा ।

सकळ जगाचिया दुःखा । सूचक देखा मी होईन ॥६३॥

ऐकतां माझिया वचनासी । प्राणान्त होईल सर्वांसी ।

एवढया द्यावया महादुःखासी । न वचें हृषीकेशी मी तेथें ॥६४॥

ज्यासी म्यां सांगावी हे वार्ता । त्यांच्या करावें जीवघाता ।

एवढी घोर निष्ठुरता । नव्हे कृष्णनाथा माझेनीं ॥६५॥

बहुतां मुंग्यांच्या विवरासी । जेवीं आगी लावावी हृषीकेशी ।

तेवीं हे वार्ता द्वारकेसी । म्यां सुहृदांपाशीं सांगावी ॥६६॥

जेवीं फळते फुलते वनीं । भडकोनि लावावा दावाग्नी ।

तैसा भडका हा सुहृदांचे कानीं । कृष्णनिधनाग्नी कोण लावी ॥६७॥

जेवीं बुडतयाचे माथां । पाषाण न देववे सर्वथा ।

तेवीं कृष्णसहित कुळाच्या घाता । मी नव्हें सांगता सुहृदांसी ॥६८॥

सुख द्यावें सुहृदांसी । तें राहिलें हृषीकेशी ।

घेऊनियां महादुःखांचिया राशी । सुहृदांपाशीं मी न वचें ॥६९॥

आशंका ॥ म्हणसी जन्मवरी अवज्ञा । तुवां नाहीं केली अतिप्रज्ञा ।

तो तूं अंतकाळींच्या वचना । कां अवज्ञा करितोसी ॥३७०॥

कृष्णा अंतकाळींचें तुझें श्रीमुख । पाहतां मज अत्यंत सुख ।

तें सांडूनि जनांसी दुःख । द्यावया देख मी न वचें ॥७१॥

कुळनिधनाचें घोर दुःख । कृष्णनिधनें संतापक ।

माझे वचनमात्रें हें विख । जगासी देख न देववे ॥७२॥

तुझे आज्ञेकरितां देख । जगासी द्यावें महादुःख ।

तुझे अवज्ञेचा उल्लेख । नरकदायक मज होय ॥७३॥

मा आपणचि घेऊनि विख । तुजपुढें मरतां देख ।

उत्तम गति अलोलिक । मी निजनिष्टंक पावेन ॥७४॥

ऐसें म्हणोनि आपण । दारुकें घातलें लोटांगण ।

मस्तकीं धरिले श्रीचरण । सर्वथा जाण सोडीना ॥७५॥

देखोनि दारुकाचा भावो । कृपें द्रवला देवाधिदेवो ।

जेणें निर्दळे शोकमोहो । तों वर्म पहा हो सांगत ॥७६॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP