भगवंत - डिसेंबर १५

ब्रह्मचैतन्य महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.


श्रीकृष्ण परमात्म्यांनासद्धा देह ठेवावा लागलाच ना? निराकार असले, तरी साकार झाल्यावर त्याला सर्व काही आलेच की ! रुप आले, गुण आले, सर्व काही आले, आणि मग व्यवहारामध्ये सर्व करणे आले. तसेच, ते साकारात आले म्हणून त्यांना जाणे हेही आलेच. श्रीकृष्ण व्यवहाराप्रमाणे वागले. वास्तविक पाहता, ते आलेही नाहीत आणि गेलेही नाहीत. त्यांना येणे-जाणे नाहीच; ते कायमच आहेत. साकाराचे रुप पाहावेसे वाटते, पण तेच सर्व काही नव्हे हे समजून चालले पाहिजे. भगवंताला पाहायचे असेल तर त्याला देहात पाहून चालणार नाही, असे श्रीकृष्णांनी उद्धवाला सांगितले, आणि त्याला ज्ञानाने समजावले. उद्धवाला हे ज्ञान झाल्यावर, त्यांनी त्याला “ आता जाऊन गोपींचे समाधान कर ” असे सांगितले. त्याप्रमाणे गोकुळात जाऊन तो गोपींना सांगू लागला की, “ तुम्ही श्रीकृष्णाला देहात पाहून प्रेम केले, हे योग्य झाले नाही, तुमची चूक झाली. ” अशा रीतीने, देहाबद्दल त्याने तिरस्कार उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला. त्यावर गोपींनी त्याला म्हटले की, “ तू आपला वेदान्त जिथे कुणी नाही तिथे जाऊन सांग; श्रीकृष्णाला देहात पाहून आम्हाला जे मिळाले ते आमचे आम्हालाच ठाऊक. ते तुला मिळणे शक्य नाही. ” गोपींनी श्रीकृष्णावर जे प्रेम केले ते देहाला विसरुन केले, त्याच्यापुढे त्यांनी सर्वस्व तुच्छ मानले; आणि त्यामुळेच श्रीकृष्णालाही गोपींवर तसेच प्रेम करणे भाग पडले. गोपी त्याला अनन्यशरण होऊन राहिल्या. तसे प्रेम करावे.
जो नाम घेतो तोच खरा स्मरणात राहतो आणि त्यालाच खरे दर्शन होते, आणि ते रोज सतेज होत असते. देहाचे दर्शन हे विसरणारे असते. म्हणून नाम घेत राहा, म्हणजे खर्‍या दर्शनात राहाल. सगुणमूर्ती नेहमीच आपल्याजवळ राहणे शक्य नसते. पण तिची खूण भगवंताच्या नामात आहे. म्हणून आपण नाम घेतल्यावर, भगवंत आपल्याजवळ आल्यासारखा आहे. भगवंत सगुणामध्ये असताना रावणाची किंवा दुर्योधनाची बुद्धी पालटू शकले नाहीत. सगुण अवताराने वासना किंवा बुद्धी पालटण्याचे कार्य होऊ शकत नाही. सदबुद्धी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य फक्त भगवंताच्या नामातच आहे. व्यवहारामध्येसुद्धा आपण बघतो की रुप गेले तरी नाम शिल्लक राहते. म्हणूनच राम, कृष्ण, इत्यादि सर्वजण शेवटी नाहीसे होऊन, केवळ नाम तेवढे शिल्लक राहिले. नाम हे स्थिर आहे, रुप हे सारखे बदलणारे आहे. कलियुगात सगुण अवतार नसला तरी ‘ नामावतार ’ आहे, आणि तोच खरा तारक आहे. नामाकरितां नाम घ्या कीं त्यात राम आहे हे कळेल.

N/A

References : N/A
Last Updated : February 15, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP