भगवंत - डिसेंबर ९

ब्रह्मचैतन्य महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.


खरे पाहिले असता, देहबुद्धीचा जोर व्हायला कारण म्हणजे आमचा अभिमान होय. अभिमानाने सदगुण जाऊ लागले तर काय उपयोग? ज्ञानी आणि अज्ञानी यांच्यात मुख्य फरक म्हणजे, ज्ञानी अभिमान टाकतात तर अज्ञानी लोक तो वाढवतात. अभिमानासारखा मोठा शत्रू नाही. अंतरंगातल्या या शत्रूचा आपण शोध घ्यावा आणि त्याचा योग्य बंदोबस्त करावा. नुसत्या सत्कर्माने अभिमान जात नसतो. सापाला दूध घातले तरी त्याचे विषच होते, तसे अभिमानाला कोणतेही कृत्य घाला तो वाढतच जातो. आता याकरिता सत्कर्मे करायचे सोडावे असे नाही, परंतु अभिमान न बाळगता ती करावीत. ‘ मी कर्ता ’ ही भावना सोडावी. अभिमान हा बारशाला आपल्याबरोबर येतो, आणि बाराव्यापर्यंत आपल्याजवळच राहण्याचा प्रयत्न करतो. म्हणून नामरुपी अंकुशाच्या योगाने त्याला वेळीच हुसकून लावणे आवश्यक आहे.
आपल्या अंतःकरणामध्ये निंदेची घाण आहे; म्हणजे, आपल्या विहिरीमध्ये खारट पाणी आहे. समजा, वरचे खारट पाणी काढून टाकले आणि जास्त खोल खणले, तर एखादे वेळी गोड्या पाण्याचा झरा लागण्याचा संभव आहे. मग त्या विहिरीचे पाणी गोड होईल. तसे आपण जर अभिमान टाकला, निंदा बंद केली, आणि अंतर्मुख होऊन भगवंताला शोधला, तर त्याच्या प्रेमाचा झरा लागून आपले अंतःकरण त्या प्रेमाने भरुन जाईल. आपल्याकडे अशी म्हण आहे की, जे आडात आहे तेच पोहर्‍यात येते. विहिरीमध्ये जर खारट पाणी असेल तर तेच पोहर्‍यामध्ये येणार हे जसे खरे, त्याचप्रमाणे आपल्या मनात जे असते तेच बोलण्याच्या रुपाने बाहेर पडते. बोलण्यावरुन माणसाच्या अंतःकरणाची परीक्षा होते. ज्याला निंदा आवडते त्याच्या पोटात घाण असलीच पाहिजे. काही लोक दुसर्‍याचा उत्कर्ष सहन न झाल्यामुळे त्याची निंदा करतात; दुसर्‍याचे चांगले त्यांना पाहवत नाही. काही लोक दोष आपल्यावर येऊ नये म्हणून दुसर्‍यांची निंदा करतात. काही लोकांची दृष्टीच अशी वाईट असते की, दुसर्‍यामध्ये दोष असो वा नसो, त्यांना दुसर्‍यांत दोष दिसायचाच.
भगवंताच्या मार्गाने जाणार्‍याने, दुसर्‍याच्या ठिकाणी दिसणार्‍या दोषांचे बीज आपल्यामध्ये आहे हे ध्यानात ठेवून वागावे. त्याने दुसर्‍याची निंदा करु नये, आणि आपल्या सामर्थ्याचा वा गुणाचा अभिमानही बाळगू नये. लोकांनी जे करु नये असे आपल्याला वाटते, ते आपण स्वतः करु नये. प्रपंचाचा सहवास वरवरचा असावा; त्याचा वास आत नसावा, आत वास भगवंताचाच असावा. त्यामुळे आतल्या सर्व दोषांचे उच्चाटन होऊन मनाला शाश्वत शांतीचा आस्वाद घेता येईल.

N/A

References : N/A
Last Updated : November 07, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP