सद्‍गुरू - जुलै २१

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे . तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा , म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल .


शास्त्रामध्ये असे सांगून ठेवले आहे की , कृतयुगामध्ये ध्यानाने , त्रेतायुगामध्ये हवनाने , आणि द्वापारयुगामध्ये देवतार्चनाने भगवंताची प्राप्ती होते . परंतु कलियुगामध्ये त्यांपैकी काहीच साध्य होणे शक्य नसल्याने , भगवंताचे केवळ नाम घेतले असता मनुष्याला त्याचे दर्शन घडते . शास्त्राच्या या सिद्धांताचा संतांनी स्वतः अनुभव घेतला आणि लोकांना सांगितले की , साडेतीन कोटी जप केला असता चित्तशुद्धी होते ; आणि तेरा कोटी जप केला असता , भगवंताचे दर्शन होते . मला आपण महत्त्व देऊ नका ; पण ज्या थोर संतांच्या नावावर मी नामाविषयी सांगतो , ते ज्ञानेश्वरमहाराज , एकनाथमहाराज , तुकाराममहाराज , आणि समर्थ रामदासस्वामी , यांच्यासारखे संत कधी वेदबाह्य बोलतील , हे शक्यच नाही . वेदांना जे परमात्मस्वरुप अगोचर आहे ते स्वरुप संत तद्रूपत्वाने जाणतात . सध्याच्या परिस्थितीमध्ये संयमाची बंधने सुटत चालली आहेत , म्हणून संतांनी कळवळून ‘ नाम घ्या ’ असे सांगितले .

वेद भगवंताचे वर्णन करतात . नामदेखील भगवंताचेच अस्तित्व प्रकट करते . प्रत्येक वेदमंत्राच्या आरंभी ‘ हरिः ॐ ’ असते , ते नामच आहे . जसा वेद हा अनादि , तसे नाम हे अनादि . जसा वेद हा अपौरुषेय , तसे नाम हे अपौरुषेय . जसा वेद हा अनंत , तसे नाम हे अनंत आहे . प्रत्यक्ष शिवाने नाम घेतले , म्हणून ते अनादि साधन आहे . इतर साधनांना आणि वैदिक कर्मांना आहारविहाराची बंधने आहेत , भगवंताच्या नामाला ती नाहीत . नाम हे आगंतुक नाही . आदिनारायणाने वेद सांगण्याच्या वेळी जो ॐ चा ध्वनी केला तेच नाम होय . म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की , आपण नाम घेत जावे , किंबहुना , आपण नाम घेतले तरच वेदांचा खरा अर्थ आपल्याला कळेल अशी माझी खात्री आहे . वेद म्हणजे भगवंताची स्तुती होय . ती करीत असताना , म्हणजे वेद म्हणत असताना , आपले लक्ष शब्दांकडे नसावे , त्यांच्या अर्थाकडे असावे . अर्थ न समजला तरी लक्ष भगवंताकडे असावे . आपण नेमके तेवढेच विसरतो . नाम घेणार्‍या लोकांनी शास्त्राच्या विरुद्ध वर्तन करु नये . आपल्याला शक्य आहे तितके वैदिक कर्म करावे , परंतु चित्तशुद्धी होण्यासाठी त्यावर पूर्णपणे विसंबून न राहाता त्या कर्माच्या जोडीला भगवंताचे नाम घ्यावे . भगवंताला लबाडी खपत नाही . आपले मन स्वच्छ नसेल तर भगवंत हात आखडता घेतो , पण खरी अनन्यता असेल तर पोटभर पुरवितो . इतक्या तन्मयतेने नाम घ्या की , ‘ मी नाम घेतो आहे ’ हे सुद्धा विसरुन जा .

N/A

References : N/A
Last Updated : August 31, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP