सद्‍गुरू - जुलै १८

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे .


देहबुद्धी आहे तोवर , म्हणजे ‘ मी देही आहे ’ ही भावना आहे तोपर्यंत , काळजी राहाणारच . काळजी मनातून असते . जोवर संशय फिटत नाही , परमेश्वराचा आधार वाटत नाही , तोवर काळजीही मनाला सोडीत नाही . कुंडलीतल्या ग्रहांच्या अधिकाराची मर्यादा देहापर्यंतच आहे . पैसा किती मिळेल हे त्यावरुन सांगता येईल , भगवंताकडे किती कल आहे हे सांगता येईल , पण भगवंताची प्राप्ती होईल की नाही हे सांगता येणार नाही . मनुष्यजन्म येऊनही भगवंताची प्राप्ती झाली नाही , तर जिवाचे फार नुकसान आहे . भगवंताच्या प्राप्तीची मनापासून तळमळ लागायला पाहिजे . एकदा का अशी तळमळ लागली की मनुष्य वेडा बनतो , आणि कोणी संत भेटला की निवांत होतो . संत आपल्यावर येणारी संकटे नाहीशी करीत नाहीत , तर त्या संकटांची भीती नाहीशी करतात . संकटापेक्षा संकटाची भीतीच आपल्याला फार घाबरवून सोडते . ‘ आपल्याला जे कळले ते लोकांना कळून लोक सुखी होऊ द्या . ’ हा संतांचा एकच हेतू असतो . संत विषयावर मालकी गाजवितात . जगाला जिंकणे एक वेळ सोपे , पण स्वत :ला जिंकणे कठीण आहे . संत स्वत :ला जिंकून जगात वावरत असतात . संत साक्षित्वाने जगात राहतात , आणि साक्षित्वाने राहणार्‍याला दु :खाची बाधा होत नाही संतांच्या संगतीत राहून , त्यांच्या आज्ञेत राहून , आपण आपल्या मनातले सर्व संशय नाहीसे करावेत . वास्तविक , संतांच्या आज्ञेचे एकनिष्ठपणाने जो पालन करतो , त्याचे संशय आपोआप दूर होतात . जोवर संशय आहे तोवर असमाधान आहे . समाधान हे आपले आपल्यालाच घ्यायचे असते . म्हणून , ज्याला समाधानी राहायचे आहे , त्याने फार धडपड करु नये ; जशी स्थिती येईल त्या स्थितीत समाधानात राहावे .

कचेरीचे विचार आपल्याबरोबर घरी आणू नयेत ; ते तिथेच ठेवावेत . घरातले वातावरण शुद्ध आणि नि :संशयाचे असावे . भोळेपण एकप्रकारे चांगले ; ती भाग्याची गोष्ट आहे . जो योगभ्रष्ट असतो त्याच्या अंगी भोळेपण असते ; जसे कल्याणस्वामींच्या अंगी होते . झालेल्या गोष्टी विसरुन जाण्यातच खरा आनंद आहे ; पण ते विसरणे कृत्रिमपणे न आणता , भगवंताच्या स्मरणात राहिल्याने आले पाहिजे . म्हातारपणी मन आणि शरीर फार नाजूक बनते . त्या वेळी शरीरसुद्धा बरे राहायला , आनंद हे फार मोठे औषध आहे . हसावे , खेळावे , लहान मुलांत मिसळावे , थट्टा -विनोद करावा ; काहीही करावे , पण आनंदात राहावे . ज्याचा आनंद कायम टिकला , त्याच्याच जन्माचे सार्थक झाले .

N/A

References : N/A
Last Updated : August 31, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP