अध्याय वीसावा - श्लोक ५१ ते १००

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


म्हणे हे होय सीता सती ॥ पुराणपुरुषाची चिच्छक्ति ॥ सुटली कर्पूराची दीप्ती ॥ पाषाण स्मरती रामनाम ॥५१॥

मृगमदाहूनि विशेष ॥ सीतेच्या अंगींचा सुवास ॥ अशोकवन आसपास ॥ दुमदुमिलें तेणेंचि ॥५२॥

तेथें रक्षण असे त्रिजटा ॥ तिनें राघवी धरिली निष्ठा ॥ सत्संगाचा महिमा मोठा ॥ दुष्ट पापिष्ठा सद्भाव उपजे ॥५३॥

यावरी अंजनीहृदयरत्न ॥ गुप्तरूपें जवळ येऊन ॥ जानकीचे वंदोनि चरण ॥ मुद्रिका पुढें ठेविली ॥५४॥

ध्यानस्थ बैसली सीता सती ॥ मानसीं चिंती रघुपति ॥ पुढें उभा असे मारुति ॥ बद्धांजलि करूनियां ॥५५॥

इंदिरेपाशीं खगेंद्र ॥ कीं अपर्णेंसमीप नंदिकेश्र्वर ॥ कीं शचीपुढें जयंत पुत्र ॥ उभा ठाके प्रीतीनें ॥५६॥

असो कनकदंड पडे पृथ्वीवरी ॥ तैसा जानकीसी नमस्कारी ॥ मग अशोकवृक्षावरी ॥ राघवप्रिय ओळंघला ॥५७॥

इकडे तमालनीळ सांवळा ॥ ध्यानीं विलोकित जनकबाळा ॥ तों अवतारमुद्रिका ते वेळां ॥ सव्यकरांगुळीं दिसेना ॥५८॥

मुद्रिका न दिसे म्हणोन ॥ श्रावणारिस्नुषा उघडी नयन ॥ तों मुद्रिका पुढेंचि जाण ॥ दैदीप्यमान पडली असे ॥५९॥

मुद्रिका देखतां ते वेळीं ॥ हृदयीं आलिंगी जनकबाळी ॥ विमलांबुधारा नेत्रकमळीं ॥ जानकीच्या सूटल्या ॥६०॥

म्हणे सांडोनि रघुत्तमातें ॥ माये कैशी आलीस येथें ॥ राम आणि सौमित्रांतें ॥ त्यजोनि कोठें आलीस ॥६१॥

जगद्वंद्य तो श्रीराम ॥ जो चराचरफलांकितद्रुम ॥ त्याची वार्ता स्वस्तिक्षेम ॥ सांग मुद्रिके मजपाशीं ॥६२॥

तों त्या वनीं निशाचरी ॥ तेथें होत्या दुराचारी ॥ विक्राळरूपें ते अवसरीं ॥ सीतेजवळी धांविन्नल्या ॥६३॥

कां गे रडतीस म्हणोन ॥ पसरोनि आल्या विक्राळ वदन ॥ तुज आम्हीं भक्षूं तोडून ॥ कुटके करोन तिळप्राय ॥६४॥

कैंचा राम तमालनीळ ॥ तूं रावणासी घाली माळ ॥ राक्षसीणी करिती कोल्हाळ ॥ सीते भोंवत्या मिळोनियां ॥६५॥

बाबरझोटी भयंकर ॥ कपाळीं चर्चिला शेंदूर ॥ लंबस्तनें विशाळ उदर ॥ पर्वत माजीं सांठवती ॥६६॥

असो ऐसें देखोनि हनुमंत ॥ पुच्छ सोडी अकस्मात ॥ राक्षसिणी झोडिल्या समस्त ॥ प्राणांसी बहुत मुकल्या ॥६७॥

राक्षसिणी फिरविती डोळे ॥ पुच्छें आंवळिले दृढ गळे ॥ एक म्हणती जनकबाळे ॥ रक्षीं माते आम्हांसी ॥६८॥

निमाल्या बहु राक्षसिणी ॥ उरल्या लागती सीतेच्या चरणीं ॥ कित्येक गेल्या पळोनी ॥ दशकंठातें सांगावया ॥६९॥

हृदयीं बोध प्रगटतां जाणा ॥ भ्रांती भुली इच्छा वासना ॥ आशा मनशा तृष्णा कल्पना ॥ पळती जैशा क्षणार्धें ॥७०॥

तैशा पळाल्या निशाचरी ॥ जानकी मुद्रिकेतें विचारी ॥ शरयूतीरविहारी ॥ कोठें सांग मुद्रिके ॥७१॥

मज आलिंगितां श्रीरामचंद्र ॥ तेव्हां कंठीं न सोसेचि हार ॥ आतां गिरि कानन समुद्र ॥ दोघांमध्यें पडियेले ॥७२॥

वाल्मिकानें भाष्य कथिलें ॥ तें काय सर्व व्यर्थ गेलें ॥ एक कपि बलिया येऊन बळें ॥ लंकानगर जाळील ॥७३॥

मज देऊनि समाधान ॥ सवेंचि आणील रघुनंदन ॥ पाषाणीं समुद्र बुजवोन ॥ दशवदनासी मारील पैं ॥७४॥

तों मुद्रिका नेदी प्रतिवचन ॥ म्हणे मज कळली खूण ॥ माझ्या विरहेंकरून ॥ देह राघवें त्यागिला ॥७५॥

कीं योगियांचें ध्यानीं गुंतला ॥ कीं भक्त धांवण्या धांवला ॥ कीं सौमित्रें माघारा नेला ॥ म्यां छळिलें म्हणोनियां ॥७६॥

कृपा न करवे मजवरी ॥ तरी येऊन माझा वध करीं ॥ मी बुडाल्यें चिंतासमुद्रीं ॥ काढी बाहेरी त्वरेनें ॥७७॥

अहा रामा राजीवनेत्रा ॥ दशकंठरिपु विषकंठमित्रा ॥ पुढें पाठविली कां हे मुद्रा ॥ कोण्या विचारेंकरूनियां ॥७८॥

मृगत्वचेची कंचुकी इच्छिली ॥ हाच अन्याय घडला मुळीं ॥ म्यां पापिणीनें ते वेळीं ॥ सौमित्र वीर छळियेला ॥७९॥

म्यां साधुछळण केलें ॥ म्हणोन राक्षसां हातीं सांपडलें ॥ मजला वियोगदुःख घडलें ॥ त्याच दोषें करूनियां ॥८०॥

जे साधुछळण करिती ॥ ते मज ऐसें दुःख पावती ॥ अंती जाती अधोगती ॥ महाअनर्थी पडती ते ॥८१॥

इत्यादि भाव तये क्षणीं ॥ दावी त्रिभुवनपतीची राणी ॥ म्हणे हा देह ठेवूनि ॥ काय कारण पैं असे ॥८२॥

सीता देखोन विव्हळ ॥ वृक्षगर्भी अंजनीबाळ ॥ गायन आरंभी रसाळ ॥ राघवलीला निर्मळ जे ॥८३॥

तो साक्षात रुद्रावतार ॥ रुद्रवीणा जैसा सुस्वर ॥ तैसा कंठ अति मधुर ॥ कंपस्वर गातसे ॥८४॥

कपीचे गायन रसाळ ॥ तटस्थ जाहलें रविमंडळ ॥ पाताळ सांडोन फणिपाळ ॥ येऊ भावी तेथें पैं ॥८५॥

तटस्थ जाहला प्रभंजन ॥ वेधला चंद्राचा हरिण ॥ अशोकवनीचे द्विजगण ॥ चारा घेऊं विसरले ॥८६॥

अयोध्यापतीची राणी ॥ तल्लीन होऊन ऐके श्रवणीं ॥ अशोकवृक्षामधोनि ॥ मंजुळ ध्वनि उमटत ॥८७॥

जो अजअजित निर्गुण ॥ कमलमित्रकुळभूषण ॥ भक्तहृदयमिलिंद पूर्ण ॥ जलदवर्ण जलजाक्ष ॥८८॥

जो मंगलधाम मंगळकारक ॥ जो मंगलभगिनीप्राणनायक ॥ मंगलजननीउद्धारक ॥ प्रतापार्क श्रीराम ॥८९॥

जो द्विपंचमुखदर्पहरण ॥ जो चंडीशकोदंडप्रभंजन ॥ भवगजविदारण पंचानन ॥ नरवीरांतक जो ॥९०॥

जानकी जयाची चित्कळा ॥ रची अनंत ब्रह्मांडमाळा ॥ तो रघुवीर परब्रह्मपुतळा ॥ अतर्क्य लीला जयाची ॥९१॥

सच्चिदानंदतनु निष्कलंक ॥ पितृआज्ञाप्रतिपालक ॥ जो मायाचक्रचालक ॥ जगद्वंद्य जगद्रुरु ॥९२॥

जो पंचमहाभूतां वेगळा साचार ॥ तो पंचवटीवासी रघुवीर ॥ तेथें द्विपंचवदन सत्वर ॥ कपटमृग घेवोनि गेला ॥९३॥

तो द्विपंचवदन दुराचार ॥ पर्णकुटींत प्रवेशला तस्कर ॥ भूगर्मींचे रत्न सुंदर ॥ हरोनि नेलें क्षण न लागतां ॥९४॥

त्या तस्कराचा मार्ग काढीत ॥ किष्किंधेसी आला जनकजामात ॥ शक्रसुत वधोनि अकस्मात ॥ अर्कज राज्यीं स्थापिला ॥९५॥

त्या सीतावल्लभाचा किंकर ॥ दासानुदास एक वानर ॥ तेणें गांजोनि लंकानगर ॥ अशोकवना आला असे ॥९६॥

ऐसें ऐकतां गायन ॥ आनंदमय भूतनयेचें मन ॥ मग वृक्षाजवळीं उभी राहून ॥ करी नमन तयातें ॥९७॥

म्हणे धन्य धन्य तूं तरुवरा पूर्ण ॥ कोण करी तुजमाजी कीर्तन ॥ त्याचें पाहीन मी वदन ॥ धरीन चरण आदरें ॥९८॥

जो करितो तुजमाजी कीर्तन ॥ त्याची जननी धन्य धन्य ॥ त्यासी सदा असो कल्याण ॥ नलगे विघ्न कल्पांतीं ॥९९॥

ज्यासी रामकीर्तन आवडे ॥ त्यासी सांकडें कदा न पडे ॥ चारी मुक्ति तयापुढें ॥ दासी होऊनि राबती ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : April 10, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP