भाद्रपद वद्य ६

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


"गीता-ज्ञानेश्वरी प्रति शुद्ध केली !"

शके १५०६ च्या भाद्रपद व. ६ रोजीं प्रसिद्ध संत एकनाथ यांनीं श्री. ज्ञानदेवांच्या सूचनेवरुन ‘ज्ञानेश्वरी’ ची प्रत शुद्ध करुन तिचा प्रसार सुलभ केला. पारमार्थिक ज्ञान अत्यंत सुलभ करुन तें लोकभाषेंत सांगण्यास ज्ञानदेवांनीं जेव्हां सुरुवात केली तेव्हां महाराष्ट्रांत एक क्रांतिच होऊं लागली. कृपण असणार्‍या वेदांचें सार मराठी भाषेंत आल्यामुळें आबालवृद्धांना आणि स्त्रीशूद्रादिकांनाहि परमार्थज्ञान होऊं लागलें. ‘ब्रह्मविद्येचा सुकाळ’ सर्व महाराष्ट्रात झाला. भागवत धर्माच्या संघटनेचा पाया याच ज्ञानदेवीच्या आधारें घालण्यांत आला. शके १२१२ मध्यें या ग्रंथाचा जन्म झाला. आणि या सारस्वताच्या झाडाखालीं अनेक जीवांनी विश्रांति घेतली. परंतु ज्ञानदेवांची अवतारसमाप्ति झाल्यानंतर थोड्याच दिवसांत महाराष्ट्राचें स्वराज्य नाहींसे होऊन जिकडे तिकडे इस्लामी संस्कृतीचा चांद झळकू लागला. बहुजनसमाजापासून ज्ञानदेवी ग्रंथ दूर झाल्यामुळें सौख्याचा ठेवाच हरपल्याप्रमाणें होऊन गेलें. सोळाव्या शतकांत एकनाथांचा प्रभाव महाराष्ट्रांत पडूं लागल्यावर ज्ञानदेवीचा उद्धार करण्याचें काम सहजच त्यांच्याकडे आलें. यासंबंधीं नाथ एका अभंगांत म्हणतात :- "श्रीज्ञानदेवें येऊनी स्वप्नांत । सांगीतली मात मजलागीं
अजान वृक्षाची मुळी कंठास लागली । येऊन आळंदी काढ वेगी ॥"

याप्रमाणें ज्ञानदेवांचा संदेश एकनाथांना मिळाला. ‘अजान वृक्ष’ म्हणजे रुपकानें अज्ञान-वृक्ष असण्याचा संभव आहे. आदेशाप्रमाणें एकनाथांनी आळंदीस येऊन समाधीचें दार उघडलें, आणि त्यांनीं ज्ञानदेवांपुढील प्रत घेतली व पैठणास आल्यावर तिचें शुद्धीकरण केलें. त्यासंबंधीच्या ओव्या म्हत्वाच्या आहेत :-
"श्री शके पंधराशें साहोत्तरीं । तारणनाम संवत्सरीं ॥
एकाजनार्दनें अत्यादरीं । गीता-ज्ञानेश्वरी प्रति शुद्ध केली ॥
बहुकाळ पर्वणी गोमटी । भाद्रपद मास कपिलाषष्ठी ।
प्रतिष्ठानीं गोदातटीं । लेखनकामाटी संपूर्ण जाली ॥"

- १५ सप्टेंबर १८५४

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP