नामस्मरण - सप्टेंबर २३

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे . तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा , म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल .


एकदा उद्धवाने श्रीकृष्णाला विचारले की , " तू आपल्या मुखानेच सांग की आम्हांला तुझी प्राप्ती कशी होईल . " तेव्हा परमात्मा म्हणाला , " भक्ती केल्यानेच माझी प्राप्ती होऊ शकते . " भक्तीची तीन साधने आहेत - शास्त्रवचन , थोरवचन आणि आत्मसंशोधन . आपले सध्या सगळेच विपरीत झाले आहे . शास्त्रवचन म्हणावे , तर आपण आता इतके सुधारक झालो आहोत की , हल्लीच्या ज्ञानाने आपल्याला पुराणावर विश्वास ठेवण्याची लाज वाटते . थोर वचन म्हणावे , तर मुलगा मोठा होऊन बापापेक्षा जरा जास्त शिकला की त्याला वाटते , ‘ मी या गांवढळ बापाचे कसे ऐकू ? त्यापासून माझा काय फायदा होणार ? ’ तसेच आत्मसंशोधनाचे . आपण शोधन करतो ते कसले , तर पांडव कुठे राहात होते ? रामाचा जन्म कोणत्या गावी झाला ? कौरव -पांडवांचे युद्ध कोणत्या ठिकाणी झाले ? मला सांगा , अशा संशोधनापासून आपला कसा फायदा होणार ? एक प्राध्यापक मला म्हणाले , " मी कृष्णाबद्दलचे पुष्कळ संशोधन केले आहे आणि कृष्णाचे जन्मस्थळ कोणते , निर्याणस्थळ कोणते , याची आता खात्री झाली . " मी म्हणतो की , ते करतात ते ठीक आहे . पण संतांना कृष्णप्राप्तीसाठी , कृष्णजन्म कुठे झाला या प्रश्नाच्या खात्रीची जरुरी वाटली नाही ; त्यांनी दृढ उपासना करुन कृष्णाला आपलेसे केले . खरे म्हणाल तर कृष्णाचा जन्म उपासनेने ह्रदयातच झाला पाहिजे आणि तेच खरे जन्मस्थान आहे .

आपण जर आपले वर्तन पाहिले , मनातले विचार बघितले , तर आपल्याला असे आढळून येईल की , लोकांना जर ते कळले तर लोक आपल्याकडे ढुंकूनही पाहणार नाहीत ; आणि असे असूनही आपण आपल्या संशोधनाचा आणि विचारांचा अभिमान बाळगतो , याला काय म्हणावे ? अशाने का आपल्याला भगवंताचे प्रेम लाभणार ? आपला परमार्थ कसा चालला आहे हे दुसर्‍या कुणी सांगण्याची गरजच नाही . आपल्याला तो पुरता ठाऊक असतो . अभिमान खोल गेलेला , विचारांवर ताबा नाही , साधनात आळशीपणा ; मग अशा परिस्थितीत आपल्याला परमात्म्याचे प्रेम कसे लाभणार ? साधुसंतांनी यावर एकच उपाय सांगितला आहे , आणि तो म्हणजे पूर्ण शरणागती . रामाला अगदी विनवणी करुन सांगा की , " रामा , आता मी तुझा झालो ; ह्यापुढे जे काही होईल ती तुझीच इच्छा मानून मी राहीन , आणि तुझे नाम घेण्याचा आटोकाट प्रयत्न करीन ; तू मला आपला म्हण . ’ देव खरोखरच किती दयाळू आहे ! लोकांचे शेकडो अपराध पोटात घालूनही , शरण आलेल्याला मदत करायला तो सदैव सिद्धच असतो .

N/A

References : N/A
Last Updated : October 12, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP