नृसिंहाख्यान - अध्याय ७ वा

' नृसिंहाख्यान 'चा पाठ केल्याने श्रीनृसिंहपुराण वाचल्याचे पुण्य मिळते, तसेच कीर्तनकारही या आख्यानावर कीर्तन करतात.


नारद म्हणाला, - हे धर्मराजा, ह्याप्रमाणें महाभगवद्भक्त प्रल्हादाला दैत्यपुत्रांनी प्रश्न केला असतां, तो काय सांगतो याविषयी जिज्ञासा उत्पन्न झालेल्या दैत्यपुत्रांना माझ्या उपदेशाचें स्मरण करीत तो प्रल्हाद उत्तर देऊं लागला ॥१॥

प्रल्हाद म्हणाला, - हे दैत्यपुत्रहो आमचा पिता हिरण्यकशिपु तप करण्याकरितां मंदरपर्वतावर गेला असतां जशा मुंग्यांनी सर्पाचा देह भक्षण करावा त्याप्रमाणें त्याचाहि देह भक्षण केला. तेव्हां लोकांना अतिशय ताप देणार्‍या ह्या प्राण्याला त्याच्या पापानेंच भक्षण केलें हें फार चांगलें झालें, असें हर्षपूर्वक बोलून इंद्रादि देवांनी दानवांबरोबर युद्ध करण्याकरितां मोठा उद्योग आरंभिला ॥२॥॥३॥

तो त्यांचा अतिपराक्रमाचा उद्योग पाहून असुरांचे सर्व सेनापति भयभीत झाले आणि देव त्यांचा वध करुं लागले असतां, आपल्या स्त्रिया, पुत्र, मित्र, आप्त, गृहें, पशु आणि भोगसाधनभूत पदार्थ ह्यांच्याकडे लक्ष न देतां त्यांचा त्याग करुन, ते आपल्या प्राणांचे रक्षण करण्याकरितां दशदिशांकडे पळून गेले ॥४॥॥५॥

त्या वेळी विजयेच्छु देवांनी राजवाडा लुटून त्यांतींल सर्व द्रव्यांचा अपहार केला. इंद्र तर राजाची पट्टराणी व माझी माता जी कयाधू, तिला पकडून घेऊन चालला ॥६॥

तेव्हां ती मार्गामध्यें टिटवी पक्षिणीप्रमाणें भयानें उद्विग्न होऊन रोदन करुं लागली. तेव्हां अकस्मात् तेथें आलेल्या नारदानें तिला पाहून इंद्राला सांगितलें की, ‘ हे देवेन्द्रा, ह्या निरपराधि स्त्रीला घेऊन जाणें हें तुला योग्य नाही. हे भाग्यवंता, तूं हिला सोडून दे. कारण, ही परस्त्री असून पतिव्रता आहे ॥७॥॥८॥

इंद्र म्हणाला, - हे देवर्षे, हिच्या गर्भामध्यें देवद्वेषी हिरण्यकशिपूचें, सहन करण्यास दुर्धर असें वीर्य गर्भरुपानें वाढत आहे, ह्यास्तव ही प्रसूत होईपर्यंत हिला येथें असूं दे. नंतर तिला होणार्‍या पुत्राचा वध करुन माझे कार्य झाल्यावर मी हिला सोडून देईन ॥९॥

नारद म्हणाला, - हे इंद्रा, हा हिचा गर्भ, साक्षात् भगवान् अनंताचा सेवक, बलाढय, निर्दोष, केवळ आपल्या गुणांनींच मोठा झालेला आणि महाभगवद्भक्त असल्यामुळें तुझ्या हातून मरण पावणार नाहीं ॥१०॥

इंद्राने नारदाच्या त्या वचनाला मान देऊन तिला सोडून दिलें आणि तिच्या पोटी असणारा भगवद्भक्त जो मी त्या माझ्याविषयींच्या भक्तीमुळें तिला प्रदक्षिणा करुन तो स्वर्गी गेला ॥११॥

नंतर तो देवर्षि माझ्या मातेला आश्रमास घेऊन गेला आणि तिला आश्वासन देऊन, ‘ मुली, तुझा भर्ता तपश्चर्या करुन माघारा येईपर्यंत तूं ह्या आश्रमामध्यें खुशाल रहा ’ असें तिला म्हणाला ॥१२॥

तेव्हां तिनेंहि ‘ ठिक आहे ’ असें म्हटले व दैत्याधिपति हिरण्यकशिपु आपलें घोर तप संपवून परत येईपर्यंत ती नारदाच्या आश्रमांत निर्भयपणें राहिली ॥१३॥

मग त्या गर्भिणी पतिव्रतेनें आपली प्रसूति इच्छित वेळीं व्हावी व तोंपर्यंत आपल्या गर्भाचें संरक्षण व्हावें, यासाठी मोठया भक्तीनें त्या आश्रमामध्यें नारदऋषीची सेवा केली ॥१४॥

तेव्हां त्या दयाळू समर्थ ऋषीनें तिच्या शोकाची निवृत्ति व्हावी आणि मलाहि समजावें अशा उद्देशानें धर्माचें भक्तिरुप तत्त्व व आत्मानात्मविवेकरुप निर्मळ ज्ञान ह्या दोहोंचा तिला उपदेश केला ॥१५॥

परंतु पुष्काळ काळ लोटल्यामुळें व जात्या स्त्री असल्यामुळें, माझी माता तें ज्ञान विसरुन गेली. परंतु मजवर ऋषीचा अनुग्रह असल्यामुळें, अद्यापिसुद्धां मला त्याची विस्मृति पडत नाहीं ॥१६॥

आतां तुम्ही जर माझ्या भाषणावर विश्वास ठेवाल, तर तुम्हांलासुद्धां ती दोन्हीं प्राप्त होतील. कारण, श्रद्धेमुळें जशी मला अहंकाराचा नाश करणारी निपुण बुद्धि प्राप्त झाली, तशीच स्त्रिया व मुलें ह्यांनांहि ती प्राप्त होते ॥१७॥

हे मित्रहो, नानाप्रकारें विकार उत्पन्न करण्यास समर्थ अशा कालाच्या योगानें वृक्षाच्या फळांत जसें, उत्पन्न होणें, असणें, वाढणें, परिणाम पावणें, संकोचित होणें व नाश पावणें, हे सहा विकार घडून येतात; पण ते त्या वृक्षाला घडत नाहींत ॥१८॥

त्याप्रमाणें हे दैत्यपुत्रहो, आत्मा तर नित्य, अक्षय, शून्य, शुद्ध, अद्वितीय, शरीरादिकांचा ज्ञाता, सर्वांना आश्रयभूत, क्रियाशून्य, स्वयंप्रकाश, सर्वांचा उत्पादक, सर्वव्याधक, अलिप्त व आवरणरहित असा आहे ॥१९॥

ह्यास्तव आत्मानात्मविवेक उत्पन्न करण्यास समर्थ अशा ह्या आत्म्याच्या बारा लक्षणांनीं, तो देहातून भिन्न आहे असें जाणणार्‍या पुरुषानें, देहादिकांविषयी ‘ मी व माझे ’ अश्याप्रकारच्या असलेल्या मोहजन्य मिथ्याबुद्धीचा त्याग करावा ॥२०॥

हे असुरबालकहो, सुवर्णाच्या खाणीमध्यें चकचकणार्‍या सुवर्णांनी युक्त असलेल्या पाषाणांतून सुवर्ण काढण्याचे उपाय जाणणारा सोनार, भट्टी लावून जसें सुवर्ण काढून घेतो, त्याप्रमाणें देहरुप क्षेत्रांतून अध्यात्मज्ञानी पुरुष आत्मप्राप्तीच्या उपायांनी ब्रह्मत्व प्राप्त करुन घेतो ॥२१॥

मूलप्रकृति महतत्व, अहंकार, शब्द, स्पर्श, रुप, र्स आणि गंध ह्या आठ प्रकृति आहेत. सत्त्व, रज आणि तम हे तीन प्रकृतीचे गुण आहेत. श्रोत, त्वचा, नेत्र, जिव्हा, नासिका, वायु, उपस्थ, हस्त, पाद, वाणी आणि मन ही अकरा इंद्रिये व पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश हीं पंचमहाभूतें मिळून सोळा विकार आहेत. ह्या सर्वाच्या ठिकाणी साक्षिरुपानें व्यापून असणारा एक आत्मा आहे, असें कपिलप्रभृति आचार्यांनी सांगितलें आहे ॥२२॥

देह, प्रकृत्यादि सर्व समुदायात्मक असून स्थावर आणि जंगम असा दोन प्रकारचा आहे. ह्या देहामध्येंच अमुक द्रव्य आत्मा नव्हे, अशी परीक्षा करीत आत्मव्यतिरिक्त जें असेल त्याचा निरास करुन, त्यांहून निराळा असा जो अन्तर्यामी आत्मा, त्याचें शोधन करुन घ्यावें ॥२३॥

असा दोन प्रकारचा आहे. ह्या देहामध्येंच अमुक द्रव्य आत्मा नव्हे, अशी परीक्षा करीत आत्मव्यतिरिक्त जें असेल त्याचा निरास करुन, त्यांहून निराळा असा जो अन्तर्यामी आत्मा, त्याचें शोधन करुन घ्यावें ॥२३॥

जसें मण्यांच्या माळेमध्यें सूत्र, सर्व मण्यांना व्यापून असतें, तसा आत्माहि सर्व व्यापून आहे. आणि तें एकच सूत्र जसें प्रत्येक मण्याहून निराळें असतें तसा आत्माहि सर्व वस्तूंत असून निराळा आहे; असा हा अन्वयव्यतिरेक लक्षांत घेऊन सुद्ध झालेल्या मनाच्या योगानें जगाच्या उत्पत्तिस्थितिसंहारांच्या अनुसंघानानें एकाग्रपणें विचार करणार्‍या पुरुषांनीं, त्या परमात्म्याचा शोध केला असतां त्यांना त्याचें ज्ञान होतें ॥२४॥

आतां, हे दैत्यपुत्रहो, जागरण, स्वप्न आणि सुषुप्ति, अशा बुद्धीच्या तीन वृत्ति आहेत, त्यांचा अनुभव ज्याच्या योगानें येतो, तो अवस्थात्रयाचा साक्षी परमपुरुष होय ॥२५॥

ह्यास्तव, पुष्पधर्मरुप सुगंधाच्या योगानें, त्याला आश्रयभूत असलेला वायु जसा जाणतां येतो, त्याप्रमाणें आत्म्याचे धर्म नव्हत म्हणून त्याग केलेले, कर्मापासून उत्पन्न झालेले व त्रिगुणात्मक असे जे हे जाप्रदादिक बुद्धीचे परिणामरुप भेद, यांच्या योगानें आत्म्याचें स्वरुप जाणावें. म्हणजे आत्मा वस्तुतः बुद्धीच्या जाप्रदादिक अवस्थांहून निराळा असून त्यांना व्यापून असल्यामुळें त्या अवस्थांनी युक्त असल्यासारखा भासतो असें समजावें ॥२६॥

हे दैत्यपुत्रहो, संसार हा बुद्धीच्या गुणांनीं व कर्मानी बद्ध असल्यामुळें तो बुद्धीच्या द्वारानेंच पुरुषाला प्राप्त होतो; स्वतः प्राप्त होत नाही. तो अज्ञानमूलक असल्यामुळें तो असत्य असून स्वप्नाप्रमाणें मानिला आहे. ॥२७॥

यास्तव त्रिगुणात्मक कर्माच्या अंज्ञानरुप बीजाला जाळून टाकणारा, व बुद्धीच्या जाग्रदादि अवस्थारुप प्रवाहाचा नाश करणारा, असा भक्तियोगच तुम्हीं करा ॥२८॥

हे मित्रहो, देहादिकांच्या ठिकाणी आत्म्याचा होणारा अभास निवृत्त करण्याचे जे हजारों उपाय आहेत, त्यांमध्यें जेणेंकरुन व ज्या साधनांनी भगवान् ईश्वराच्या ठिकाणी सत्वर प्रीति उत्पन्न होईल अशीं साधनें नारदानें सांगितलीं आहेत ॥२९॥

तीं साधने म्हणजे गुरुची शुश्रुषा करणें, प्राप्त झालेल्या सर्व वस्तु भगवंताला किंवा भगवद्भक्तांना समर्पण करणें, निष्कपट भक्तांचा सहवास, ईश्वराराधन, भगवत्कथेच्या ठिकाणी श्रद्धा, भगवंताच्या गुणकर्मांचें कीर्तन, त्याच्या चरणकमलांचे ध्यान, त्याच्या मूर्तीचे दर्शन व पूजन, आणि सर्व भूतांच्या ठिकाणीं दुःखहर्ता भगवान् ईश्वर वास करीत आहे असें मनामध्यें आणून त्याला मान देणें, हीं होत ॥३०॥॥३१॥॥३२॥

ज्यांनी कामक्रोधादि षड्रिपु जिंकिले आहेत, ते लोक ईश्वराची अशी भक्ति करितात व तिच्यायोगानें भगवान् वासुदेवाच्या ठिकाणी पुरुषाला प्रीति उत्पन्न होत्ये ॥३३॥

हे दैत्यपुत्रहो, इतरांच्या ठिकाणी नसणारे असे श्रीभगवंताचे भक्तवात्सल्यादिक गुण, तशींच त्याने स्वेच्छेनें धारण केलेल्या रामकृष्णादिक रुपानें केलेली लौकिकदृष्टया चेष्टारुप कर्मे व रावणवधादिक पराक्रम, यांचें श्रवण करीत असतां अति हर्षानें शरीरावर रोमांच उठून, ज्याच्या नेत्रामध्यें आनंदाश्रु येतात व रामस्वरुपी तन्मय होऊन जो उच्चस्वरानें गायन करितो, रोदन करितो, नृत्य करितो, अथवा पिशाचानें झपाटल्यासारखा बेफाम होऊन कधीं हंसतो तर कधी विलाप करितो, केव्हां भगवंताचें ध्यान करितो र केव्हां लोकांना वंदन करितो आणि केव्हां भगवंताच्या ठिकानी बुद्धि लीन झाल्यामुळें निर्लज्ज होऊन वारंवार श्वास टाकीत, हे हरे, हे जगत्पते, हे नारायणा, अशा हाका मारितो ॥३४॥॥३५॥

तेव्हां अतिवेगवान् अशा त्या उत्कृष्ट भक्तीच्या योगानें त्या पुरुषाचें ठायी संसारास बीजभूत असलेलें असें अज्ञान आणि वासना, हीं जळून जातात. त्याचें मन व शरीर हीं भगवंताच्या लीलारुप चिंतनानें तन्मय होऊन जातात, व त्याची पुण्यपापादि सर्व बंधनें तुटून जाऊन तो भगवत्स्वरुपाला पावतो ॥३६॥

खर्‍या अंतः करणानें केलेला भगवंताचा स्पर्श तोच इहलोकीं अशुद्ध अंतः करणानें युक्त असलेल्या पुरुषाच्या संसार चक्राचा नाश करणारा होय, व तेंच ब्रह्माच्या ठिकाणीं मोक्षरुप सुख होय, असें ज्ञानी पुरुष म्हणतात. म्हणून तुम्ही आपल्या हदयांत असलेल्या अंतर्यामीं ईश्वराचें भजन करा ॥३७॥

हे असुरपुत्र हो, आपल्या स्वतः चा सखा व आकाशाप्रमाणें आपल्या हदयामध्यें वास करणारा असा जो श्रीहरि, त्याची उपासना करण्यांत कोणता मोठा आयास आहे ? असें असतां विषयसुख संपादन करुन काय मिळायाचे आहे ? कारण, सर्वच प्राणी विषयोत्सुक असल्यामुळे आपणहि जर विषयसुखाविषयी तत्पर झालों, तर त्यांच्या सारखेच आपण नव्हे काय ? ॥३८॥

द्रव्य, कलत्र, पशु, व पुत्रादिसंबंधि जन, गृहें, भूमि, गजशाळा, भोगसाधनभूत पदार्थांच्या समृद्धि आणि सर्व प्रकारचे अर्थ व काम हे नश्वर असल्यामुळें, ज्याचें आयुष्यच क्षणभङ्मुर आहे अशा मर्त्य पुरुषांचें ते कितीसें प्रिय करणार आहेत ? ॥३९॥

ह्याच प्रमाणें यज्ञयागादिकांनीं प्राप्त झालेले जे हे स्वर्गादि लोक, तेहि विनाशी व पुण्यादि तारतम्यानें श्रेष्ठ व कनिष्ठ असून सर्वथा निर्मळ नाहींत, म्हणून सर्वोत्कृष्त अशा ईश्वराचेंच तुम्ही आत्मप्राप्तीकरितां एकनिष्ठ भक्तीनें सेवन करा अशा ईश्वराचेंच तुम्ही आत्मप्राप्तीकरितां एकनिष्ठ भक्तीनें सेवन करा कारण तो सर्वथैव निर्दोष आहे. त्याच्यांत कोणीहि दोष पाहिलेला अथवा ऐकिलेला मुळींच नाहीं. ॥४०॥

आपणासच विद्वान् असें मानणारा पुरुष, जी वस्तु प्राप्त होण्याचा संकल्प करुन ह्या लोकीं कर्मे करितो, त्याला त्या संकल्पित कर्माचें फळ विपरीत असेंच बहुधा प्राप्त होतें ॥४१॥

संसारांत सुखाची प्राप्ति आणि दुःखाची निवृत्ति व्हावी यासाठीं कर्मे करण्याचा पुरुषाचा संकल्प असतो. परंतु, जो पूर्वी निरिच्छ असल्यामुळें सुखानें युक्त असतो, तोच इच्छा करुं लागला म्हणजे तिच्या योगानें सर्वदा दुःख पावतो ॥४२॥

या लोकीं काम्यकर्माच्या योगानें ज्याच्याकरितां म्हणून पुरुष भोगांची इच्छा करितो, तो देह पाहूं गेलें असतां, श्वानसूकरादिव नाशहि पावतो ॥४३॥

यास्तव ज्याअर्धी देहाचीच अशी स्थिति आहे, याअर्धी देहाहून निराळे असे माझे म्हणविले जाणारे जे पुत्र, कलत्र, गृह, द्रव्यादिक, राज्य, खजिना, हत्ती, अमात्य, भृत्य, आणि आप्त, हे सर्व नश्वर आहेत हें काय सांगावयास पाहिजे ? ॥४४॥

म्हणून नित्यानंदाचा केवळ समुद्रच अशा आत्म्याला, वस्तुतः अनर्थकारक असून बाह्यतः मात्र पुरुषार्थाप्रमाणें भासणार्‍या व देहासहित नाश पावणार्‍या अतितुच्छ अशा ह्या पुत्रादिकांनी काय साधणार आहे ? ॥४५॥

हे असुरहो, प्राण्याला या लोकीं कितीसा स्वार्थ साधतो तो सांगा बरें ! ॥४६॥

देहधारी प्राणी आत्म्याला अनुसरणार्‍या देहाच्या योगानें कर्मे करितो व कर्माच्या योगानें देह धारण करितो; पण त्या दोन्ही गोष्टी तो अज्ञानानेंच करितो ॥४७॥

म्हणून धर्म, अर्थ व काम, हे ज्याच्या स्वाधीन आहेत, त्या निरपेक्ष, सर्वसमर्थ व दुःखहर्त्या परमात्म्याचें तुम्ही निष्कामबुद्धीनें सेवन करा ॥४८॥

कारण, तो श्रीहरिच स्वतः निर्माण केलेल्या पंचमहाभूतांपासून उत्पन्न केलेल्या सर्व प्राण्यांचा आत्मा, प्रिय, नियंता आनि अन्तर्यामी आहे ॥४९॥

दैत्यपुत्रहो, जसे आम्हीं भगवंताचें भजन करुन सुखी झालों, तसा कोणीहि होईल; मग तो देव, असुर, मनुष्य, यक्ष अथवा गंधर्व कोणीहि असो ॥५०॥

हे असुरपुत्रहो, मुकुंदाला संतुष्ट करण्याकरितां द्विजपणा, देवपणा, ऋषिपणा सद्वर्तन, बहुश्रुतपणा, दान, तप, याग, शुद्ध आचरण आणि व्रतें, ही पुरी होत नसून तो श्रीहरि केवळ निष्काम भक्तीच्याच योगानें संतुष्ट होतो. भक्तीवांचून इतर सर्व साधनें केवळ सोंगे होत ॥५१॥॥५२॥

यास्तव हे दानवहो, आपल्याप्रमाणेंच सर्वांना सुख व दुःख होतें अशी बुद्धि धारण करुन सर्व भूतांचा आत्मा आणि ईश्वर असा जो भगवान् श्रीहरि त्याच्या ठिकाणीं भक्ति करा ॥५३॥

कारण, दैत्य, यक्ष, राक्षण, स्त्रिया, शुद्र गोकुळवासी लोक, पक्षी, मृग आणि इतरहि पातकी जीव, अच्युताच्या भक्तीनें खरोखर मोक्ष पावले आहेत ॥५४॥

असो. गोविंदाच्या ठिकाणीं एकनिष्ठ भक्ति आनि स्थावरजंगमात्मक सर्व भूतांच्या ठिकाणीं भगवान् आहे असें पहाणें, हाच काय तो या लोकीं पुरुषाला उत्कृष्ट स्वार्थ सांगितलेला आहे ॥५५॥

सातवा अध्याय समाप्त ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP