एकनाथी भागवत - श्लोक १४ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


सेवतो वर्षपूगान्मे, उर्वश्या अधरासवम्‌ ।

न तृप्यत्यात्मभूः कामो, वन्हिराहुतिभिर्यथा ॥१४॥

सत्ययुगींचें आयुष्य माझें । ऐश्वर्य सार्वभौमराज्यें ।

उर्वशी स्वर्गमंडनकाजें । सर्वभोगसमाजें भोगितां ॥६७॥

भोगितां लोटल्या वर्षकोटी । परी विरक्तीची नाठवे गोठी ।

मा ’वैराग्य भोगाचे शेवटीं’ । हे मिथ्या चावटी मूर्खांची ॥६८॥

स्त्रियेचें म्हणती अधरामृत । तेही मूर्ख गा निश्चित ।

तें उन्मादमद्य यथार्थ । अधिकें चित्तभ्रामक ॥६९॥

वनिताअधरपानगोडी । त्यापुढें सकळ मद्यें बापुडीं ।

तत्काळ अनर्थी पाडी । निजस्वार्थकोडीनाशक ॥१७०॥

घालितां कोटि घृताहुती । अग्नीसी कदा नव्हे तृप्ती ।

तेवीं वनिताकामासक्ती । कदा विरक्ती उपजेना ॥७१॥

ऐसा आठ श्लोकीं अनुताप । स्वयें बोलोनियां नृप ।

हृदयीं उपजला विवेकदीप । जेणें झडे कंदर्प तें स्मरलें ॥७२॥

सकामासी विषय त्यागितां । वासना न त्यागे सर्वथा ।

कां आदरें विषय भोगितां । विरक्ति सर्वथा उपजेना ॥७३॥

ऐशिये अर्थींचा उपावो । विचारोनि बोले रावो ।

कामत्यागाचा अभिप्रावो । साचार पहा हो संबोधी ॥७४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP