एकनाथी भागवत - श्लोक २८ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


पथ्यं पूतमनायस्तमाहार्यं सात्त्विकं स्मृतम् ।

राजसं चेन्द्रियप्रेष्ठं तामसं चार्तिदाशुचि ॥२८॥

पवित्र आणि हळुवार । सत्यवृद्धीसी हितकर ।

अप्रयासीं प्राप्ति साचार । सात्विक आहार या नांव ॥३७०॥

अल्पाहार या नांव पथ्य । पवित्र म्हणिजे धर्मार्जित ।

तेंही अप्रयासानें प्राप्त । तो जाण निश्चित सात्विकाहार ॥७१॥

गोड खरपूस आंबट । तळींव घोळींव तिखट ।

चिरींव चोळींव तुरट । वळींव वळिवट आळिलें ॥७२॥

रसीं रसांतरमिळणी । पन्हीं कालवणीं शिखरिणी ।

कुडकुडीं निर्पूस सणाणी । आहारभरणी राजस ॥७३॥

नाना परींच्या आवडी । सडिवा सोलिवा परवडी ।

रसनासुखाची अतिगोडी । तो आहार निरवडी राजस ॥७४॥

नाना परींचे आयास । करुनि अतिप्रयास ।

आहार सेविती राजस । ऐक तामस भोजन ॥७५॥

सेवितां दुर्गंधि उन्मादक । परिपाकें करी मूर्ख ।

अशुचि आणि दुःखदायक । हा आहार देख तामस ॥७६॥

भगवंताचा भुक्तप्रमाद । साधुसज्जनांचें शेष शुद्ध ।

हा निर्गुण आहार प्रसिद्ध । ’च’ कारें गोविंद बोलिला ॥७७॥

ग्रासोग्रासीं गोविंद । येणें स्मरणें अन्न शुद्ध ।

हा निर्गुण आहार प्रसिद्ध । ’च’ कारें गोविंद बोलिला ॥७८॥

’अन्नं ब्रह्म अहं च ब्रह्म’ । पंक्तीकर तोही ब्रह्म ।

ऐसा ज्याचा भोजनानुक्रम । तो आहार परम निर्गुणत्वें ॥७९॥

त्रिगुणांचें त्रिविध सुख । निर्गुण सुख अलोलिक ।

त्याही सुखाचा परिपाक । यदुनायक स्वयें सांगे ॥३८०॥;

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP