एकनाथी भागवत - श्लोक २५ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


वनं तु सात्त्विको वासो ग्रामो राजस उच्यते ।

तामसं द्यूतसदनं मन्निकेतं तु निर्गुणम् ॥२५॥

पवित्र आणि तीर्थभूत । विजन वन एकान्त ।

ऐशिये वस्तीं सुखावे चित्त । ते वास निश्चित सात्विक ॥३४॥

वस्ती व्यवहारीं व्यापारीं । कां सदा सन्मानें राजद्वारीं ।

विवाहमंडपामाझारीं । ज्यासी प्रीति भारी वस्तीसी ॥३५॥

ज्यासी आवडे धनसंपदा । निकटवासें वसती प्रमदा ।

जो नगरीं ग्रामीं वसे सदा । हे वस्ती संपदा राजस ॥३६॥

जेथ सन्मान वांछी चित्त । सदा क्षोभे विषयासक्त ।

ऐसऐसी वस्ती जेथ । ते जाण निश्चित राजस ॥३७॥

जेथ साधुनिंदा जोडे । जेथ गुणदोषीं दृष्टि वाढे ।

ऐशिया ठायीं वस्ती आवडे । तें तामसाचें गाढें निवासस्थान ॥३८॥

जेथ कलहाचें कारण । जेथ अविवेकी होय मन ।

वेश्या द्यूत मद्यसदन । हें निवासस्थान तामस ॥३९॥

देवालयीं घवघविती । देखोनि माझी निजमूर्ती ।

साचार सुखावे चित्तवृत्ती । ते निर्गुण वस्ती उद्धवा ॥३४०॥

अभेदभक्तांचें निजमंदिर । तें मज निर्गुणाचें निजघर ।

तेथ सुखत्वें ज्याची वृत्ति स्थिर । ते वस्ती साचार निर्गुण ॥४१॥

विषयातीत निजस्थिती। सुखें सुखरुप राहे वृत्ती ।

ते निर्गुणाची निजवस्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥४३॥

सांडूनि आकाराचें ज्ञान । निराकारीं सुखसंपन्न ।

वृत्ति स्थिरावे परिपूर्ण। ते वस्ती निर्गुण जनीं विजनीं ॥४४॥

त्रिगुणसंगें त्रिविध कर्ता । निर्गुणलक्षणीं लक्षिजे चौथा ।

चतुर्विध कर्त्यांची व्यवस्था । ऐक आतां सांगेन ॥४५॥;

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP