एकनाथी भागवत - श्लोक २१ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


उपर्युपरि गच्छन्ति सत्त्वेन ब्राह्मणा जनाः ।

तमसाऽधोऽध आमुख्याद्रजसाऽन्तरचारिणः ॥२१॥

सत्वगुणाचें आयतन । मुख्यत्वें ब्राह्मण जन ।

ते न करुनि ब्रह्मार्पण । स्वधर्माचरण जे करिती ॥९२॥

त्यांसी स्वधर्माच्या कर्मशक्तीं । ऊर्ध्वलोकीं होय गती ।

लोकलोकांतरप्राप्ती । ब्राह्मण पावती ते ऐक ॥९३॥

स्वर्गलोक महर्लोक । क्रमूनि पावती जनलोक ।

उल्लंघोनियां तपोलोक । पावती सात्विक सत्यलोक पैं ॥९४॥

वाढलिया रजोगुण । शूद्रादि चांडाळपण ।

पुढती जन्म पुढती मरण । अविश्रम जाण भोगवी ॥९५॥

वाढलिया तमोगुण । पश्चादि योनि पावोन ।

दंश मशक वृक्ष पाषाण । योनि संपूर्ण भोगवी ॥९६॥

प्राण्यासी अंतकाळीं जाण । देहांतीं जो वाढे गुण ।

त्या मरणाचें फळ कोण । तेंही श्रीकृष्ण स्वयें सांगे ॥९७॥

अनन्य करितां माझी भक्ती । भक्तांसी अंतीं कोण गती ।

तेहीविखींची उपपत्ती । श्र्लोकार्थी हरि सांगे ॥९८॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP