श्री गजानन विजय - अध्याय १२

भक्तांना व जनतेस श्री गजानन महाराजांच्या सहवासानें, मनःशांति मिळे व ईश्वरी लीला कळून येऊन उत्तम सदुपदेशाचा लाभ होई.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

हे गणाधीशा गणपती । मयुरेश्वरा विमलकीर्ति ।

माझ्या हृदयीं करून वस्ती । ग्रंथ कळसास नेई हा ॥१॥

तूं ज्ञानबुध्दीचा दाता । तूं भक्तमनोरथ पुरविता ।

विघ्ननगातें संहारिता । तूंच एक गणराया ॥२॥

तूं साक्षात् चिंतामणी । चिंतिलेलें देशी जाणी ।

आपुल्या भक्तांलागूनी । ऐसें पुराणें म्हणतात ॥३॥

माझ्या मनींची अवघी चिंता । लयास नेई एकदंता ।

लंबोदरा पार्वतीसुता । भालचंद्रा सिंदुरारे ॥४॥

असो बच्चुलाल अग्रवाला । होता एक आकोल्याला ।

धन-कनक- संपन्न भला । मनाचाही उदार जो ॥५॥

त्यानें हकिकत कारंज्याची । म्हणजे लक्ष्मण पंत धुड्याची ।

कर्णोपकर्णी ऐकली साची । तेणें साशंक जहाला ॥६॥

तें खरें खोटें पहाण्यास । विचार करी चित्तास ।

तों एके समयास । महाराज आले अकोल्याला ॥७॥

येऊन बच्चुलाला घरीं । बैसते झाले ओट्यावरी ।

कीं गजानन साक्षात्कारी । भक्त आपुला जाणून ॥८॥

बच्चुलाला आनंद झाला । तो समर्थांसी ऐसें वदला ।

आज गुरुराया वाटतें मला । आपली पूजा करावी ॥९॥

ऐसें ऐकतां भाषण । समर्थेम तुकविली मान ।

जें साक्षात् असें चिन्ह । श्रोते संमती दिल्याचें ॥१०॥

बच्चुलालानें तयारी । तात्काळ केली ओट्यावरी ।

षोडशोपचारेम अत्यादरीं । पूजन त्यानें आरंभिलें ॥११॥

प्रथमतः घातलें मंगलस्नान । नानाविध उटणीं लावून ।

मग करविलें परिधान । वस्त्र पीतांबर जरीचा ॥१२॥

शालजोडी अंगावरी । बहुमोल घातली काश्मीरी ।

एक जरीचा रुमाल शिरीं । अभ्रेस्मी आणून बांधिला ॥१३॥

गोफ घातिला गळ्यांत । सलकडीं तीं हातांत ।

कराच्या दाही बोटांत । मुद्रिका घातल्या नानापरी ॥१४॥

बहुमोल हिर्‍याची । वामकरीं घातिली पौची ।

रत्नजडित कंठ्याची । कंठीं शोभा विशेष ॥१५॥

जिलबी राघवदास पेढे । नैवेद्यास ठेविले पुढे ।

त्रयोदश गुणी ठेविले विडे । एक्या लहान तबकांत ॥१६॥

अष्टगंध अर्गजा अत्तर । सुवासिक लाविलें फार ।

त्यानें अवघ्या अंगभर । गुलाबपानी शिंपडीलें ॥१७॥

एका सुवर्णाच्या ताटीं । दक्षिणा ठेविली शेवटीं ।

ती होती फार मोठी । रुपये होन मोहोरांची ॥१८॥

बेरीज करतां दहा हजार । येईल ती साचार ।

ऐशी दक्षिणा होती थोर । किती करूं वर्णन तिचें ॥१९॥

श्रीफल पुढें ठेवून । विनयें केलें भाषण ।

महाराज माझें इच्छी मन । राममंदिर बांधावया ॥२०॥

या माझ्या ओट्यावरी । अडचण होतसे भारी ।

मंडप तो घातला जरी । उत्सवासी गुरुराया ॥२१॥

त्या माझ्या मनोरथा । पूर्ण करी ज्ञानवंता ।

ऐसें म्हणून ठेविला माथा । अनन्य भावें पायांवरी ॥२२॥

त्यावरी साधु गजानन । देते झाले आशीर्वचन ।

श्रीजानकीजीवन । तुझा करील पूर्ण हेतू ॥२३॥

असो आज तूं हें काय केलें ? । मला पोळ्याचा बैल बनविलें ।

हे अलंकार घालून भले । याचें काय कारण ? ॥२४॥

मी न बैल पोळ्याचा । अथवा घोडा दसर्‍याचा ।

मला या दागदागिन्यांचा । काय सांग उपयोग ? ॥२५॥

अरे हें अवघें विष । मला नको त्याचा स्पर्श ।

या नसत्या उपाधीस । माझ्या मागें लावूं नको ॥२६॥

अथवा तूं मोठा श्रीमान् । हें दाखवाया कारण ।

केलेंस कां हें प्रदर्शन । सांग मसी बच्चुलाला ? ॥२७॥

जें आवडतें जयासी । तेंच द्यावें तयासी ।

मी वेडापिसा संन्याशी । नागवा फिरतों गांवभर ॥२८॥

हें अवघें तुझें तुला । लखलाभ असो बच्चुलाला ।

तुम्हां प्रापंचिकाला । या द्रव्याची जरूर ॥२९॥

माझा यजमान भीमातटीं । उभा विटेसी जगजेठी ।

तो काय माझ्यासाठीं । हें वैभव द्याया तयार नसे ? ॥३०॥

ऐसें म्हणून काढिले । दागिने अंगावरचे भले ।

चहूं बाजूंस फेकियले । वस्त्रांचीही तीच गती ॥३१॥

दोन पेढे खाऊन । निघून गेले गजानन ।

हा प्रकार अवलोकून । केला शोक अकोल्यांत बहुतांनीं ॥३२॥

त्यांत कांहीं कारंज्याचे । लोक हजर होते साचे ।

ते म्हणती आपुल्या वाचें । अभागी आमुचा लक्ष्मण ॥३३॥

त्यानें बच्चुलालापरी । पुजन केलें आपुल्या घरीं ।

परी कचरला अंतरीं । मोह धनाचा धरून ॥३४॥

वरघडीचें भाषण । केलें विनय दाखवून ।

ते कां समर्थाकारण । समजणें अशक्य आहे हो ? ॥३५॥

जेवीं पूजा दांभिकांची । शब्दमयी असते साची ।

पूर्तता महावस्त्राची । होती त्यांची अक्षतेनें ॥३६॥

' शर्कराखंडखाद्यानि ' । ऐसें म्हणोनिया वदनीं ।

कुचका दाणा आणोनी । ठेवी पुढें भुईमुगाचा ! ॥३७॥

अशा दांभिक पूजनाचें । फलही त्याच स्वरूपाचें ।

वाटोळें लक्ष्मणाचें । याच कृतीनें झालें हो ॥३८॥

हा बच्चुलाल धन्य धन्य । जैसें केलें भाषण ।

तैसेंच ठेविलें वर्तन । जवाहून न आगळें ॥३९॥

आतां याच्या वैभवाला । ओहोट हा ना शब्द उरला ।

संतकृपा झाली ज्याला । तो सुखीच राहातसे ॥४०॥

बच्चुलालांनीं तपास । केला अवघ्या अकोल्यास ।

परी न लागला थांग त्यास । समर्थांचा कोठेंही ॥४१॥

असो एक पितांबर नांवाचा । शिष्य शिंपी जातीचा ।

होता गजानन महाराजांचा । शेगांवीं मठामध्यें ॥४२॥

त्यानें सेवा बहुत केली । तपश्चर्या फळा आली ।

एके दिनीं ऐसी झाली । गोष्ट ऐका मठांत ॥४३॥

फाटकें तुटकें धोतर । नेसला होता पितांबर ।

तें पाहून गुरूवर । ऐशा रीतीं बोलले ॥४४॥

अरे तुझें नांव पितांबर । नेसण्या न धडकें धोतर ।

ढुंगणास पाहाती नारीनर । तें तरी झांक वेड्या ! ॥४५॥

नांव म्हणे सोनुबाई । हातीं कथलाचाही वाळा नाहीं ।

नांव पाहतां गंगाबाई । आणि तडफडे तहानेनें ॥४६॥

तशांतलाच प्रकार । आहे तुझा साचार ।

हें फाटकें धोतर । पोतेर्‍यांच्या उपयोगी ॥४७॥

तेंच नेसून बैससी । ढुंगण जगाला दाविसी ।

हा घे दुपेटा देतों तुसी । नेसावयाकारणें ॥४८॥

तो न करितां अनमान । राहे बाळा नेसून ।

यासी नको सोडूं जाण । कोणी काहीं केलें तरी ॥४९॥

पितांबरा दुपेटा नेसला । हें असह्य झालें इतरांना ।

भाऊच घातकी भावाला । होतो स्वार्थ दृष्टीनीं ॥५०॥

तो वेडावांकडा प्रकार । कशास बोलूं साचार ।

गटाराचें उघडितां द्वार । घाण मात्र सुटते हो ॥५१॥

श्रीगजानन स्वामीप्रत । शिष्य होते असंख्यांत ।

परी अधिकारी तयांत । दोही हातांच्य बोटांइतके ॥५२॥

पाहा श्रोते कांतारीं । वृक्ष असती नानापरी ।

त्यांतून क्वचित् कोठें तरी । नजरेस पडती चंदनतरु ॥५३॥

त्यापरीच होते येथें । त्यांच्या शिष्यमंडळीतें ।

काहीं शिष्य पितांबरातें । टोचूं लागले निरर्थक ॥५४॥

हेंच कां तुझें शिष्यपण । वस्त्र करिसी परिधान ।

जें कां समर्थाकारण । ल्यावयाच्या उपयोगी ॥५५॥

तुझी भक्ति कळून आली । तूं खुशालचंद अससी मुळीं ।

तूं राहूं नको ये स्थळीं । अपमान करण्या सद्गुरुचा ॥५६॥

तैं पितांबर म्हणाला । मी न गुरूचा अपमान केला ।

उलट मान ठेविला । आज्ञा ऐकून तयांची ॥५७॥

वस्त्र हें मज त्यांनीं दिलें । नेसावया सांगितलें ।

तेंच मीं हो परिधान केलें । ही कां झाली अवज्ञा ? ॥५८॥

ऐसी भक्ती न भक्ती झाली । शिष्यांत तेढ माजली ।

ती मिटवाया माव केली । ऐशा रीतीं गजाननें ॥५९॥

पितांबरास म्हणती गुरुवर । तूं येथून जावें दूर ।

जाणतें मूल झाल्यावर । आई त्याला दूर ठेवी ॥६०॥

माझी कृपा आहे खरी । हे पितांबरा तुजवरी ।

जा हिंडून भूमीवरी । पदनतासी तारावें ॥६१॥

डोळ्यांत आसवें आणून । करूनिया साष्टांग नमन ।

मागें पाहे फिरफिरून । सोडून जातां मठासी ॥६२॥

पितांबर आला कोंडोलीसी । बसला वनांत आंब्यापासी ।

चिंतन चाललें मानसीं । निजगुरुचें सर्वदा ॥६३॥

तेथें होता रात्रभर । उदया येतां दिनकर ।

जाऊन बसला झाडावर । मुंगळ्यांचिया त्रासानें ॥६४॥

अवघ्या आम्रवृक्षावरी । मुंग्या मुंगळे होते भारी ।

लहान थोर फांद्यांवरी । आला पितांबर जाऊन ॥६५॥

परी निर्भय ऐसें सांपडेना । स्थान तयासी बसण्या जाणा ।

हेंच कृत्य गुराख्यांना । कौतुकास्पद वाटलें ॥६६॥

ते म्हणाले आपसांत । हा माकडापरि कां रे फिरत? ।

ह्या वृक्षावरी सत्य । हें कांहीं कळेना ॥६७॥

लहान सान फांदीला । हा निर्भयपणें फिरून आला ।

परी नाहीं खालीं पडला । हेंच आहे आश्चर्य ! ॥६८॥

दुसरा म्हणाला यांत कांहीं । आश्चर्य वाटण्याजोगें नाहीं ।

श्रीगजाननाच्या शिष्यांठायीं । ऐसें सामर्थ्य असतें रे ॥६९॥

यावरून हा त्यांचा । शिष्य असावा खचित साचा ।

चला हा येथ आल्याचा । वृतान्त सांगूं गांवांत ॥७०॥

गोपमुखें वृत्त कळलें । कोंडोलीचे लोक आले ।

आम्रवृक्षापासीं भले । कोण आले तें पहावया ॥७१॥

म्हणाले पौरवासी नर । हा ढोंगी असावा साचार ।

बळेंच करितो वेडेचार । गजाननाच्या शिष्यापरी ॥७२॥

शिष्य गजानन महाराजांचा । भास्कर पाटील होता साचा ।

झाला नुकताच अंत त्याचा । अडगांव नामें ग्रामांत ॥७३॥

समर्थांचे शिष्य । येथें येतील कशास ? ।

वळें करण्या उपवास । सोडून बर्फी पेढ्याला ॥७४॥

पुसून एकदां यास पहावें । तो काय म्हणतो तें ऐकावें ।

मग खरें खोटें ठरवावें । उगीच तर्क नाहीं बरा ॥७५॥

एक मनुष्य पुढें झाला । पितांबरासी पुसूं लागला ।

तूं कोण कोठील कशास आला ? । गुरू तुझा कोण असे ? ॥७६॥

पिंतांबर बोले त्यावर । मी शेगांवचा रहाणार ।

मी शिंपी पितांबर । शिष्य गजानन स्वामींचा ॥७७॥

त्यांची आज्ञा मजलागून । करण्या झाली पर्यटण ।

म्हणून येथें येऊन । वृक्षापासी बैसलों ॥७८॥

तों आंब्याच्या मुळाशीं । मुंगळे होते बहुवसी ।

म्हणून बसलों फांदीसी । वृक्षावरी जाऊन ॥७९॥

ऐसें ऐकतां तद्भाषण । लोक कोपले दारूण ।

अरे मोठ्याचें नांव सांगून । चेष्टा ऐशा करूं नको ॥८०॥

काय म्हणे मी राजाची । राणी आवडती आहे साची ।

खळगी भरण्या पोटाची । आले मजूरी करावया ॥८१॥

देशमुख त्या गांवींचा । शामराव नामें साचा ।

तो बोलला ऐसी वाचा । अरे सोंगाड्या ऐक हें ॥८२॥

स्वामी समर्थ गजानन । प्रत्यक्ष आहे भगवान ।

त्यांचें नांव सांगून । बट्टा त्यांना लावूं नको ॥८३॥

अरे वेड्या एक्या काळीं । त्यांनीं ऐसी कृति केली ।

ऋतु नसतां आणवलीं । फळें आम्र-वृक्षाला ॥८४॥

त्यांनीं फळें आणवलीं । तूं नुसतीं पाने आण भलीं ।

नाहीं तरी या स्थलीं । तुझी न धडगत लागेल ! ॥८५॥

हा बळीराम पाटलाचा । वृक्ष वठलेला आंब्याचा ।

तो पर्णयुक्त करी साचा । आमच्या देखत ये काळीं ॥८६॥

ऐसें न जरी करशील । तरी मार खाशील ।

खरा असल्यास होशील । वंद्य आम्हांकारणें ॥८७॥

कां कीं शिष्य सद्गुरुचे । कांहीं अंशीं निघती साचे ।

बापा त्यांच्याच तोडीचे । हा आहे न्याय जगीं ॥८८॥

नको करूं उशीर । हा आंबा करी हिरवागार ।

तें ऐकतां पितांबर । गेला असे घाबरून ॥८९॥

बोलला ऐसें नाडूं नका । माझी सारी कथा ऐका ।

एका खाणींत निघती देखा । हिरे आणि गारा हो ॥९०॥

तैसाच मी गार परी । गजानन शिष्यांभितरीं ।

बोललों नाहीं वैखरी । यत्किंचित खोटें हो ॥९१॥

गारेवरून खाणीस । नाहीं येत जगीं दोष ।

मी निज गुरूच्या नांवास । चोरून कैसें ठेवावें ? ॥९२॥

शामराव म्हणे त्यावर । नको करूं चरचर ।

संकट शिष्यांस पडतां थोर । ते धांवा करिती सद्गुरुंचा ॥९३॥

मग तो शिष्य त्यांचा जरी । नसला कृतीनें अधिकारी ।

तरी सद्गुरूचा प्रभाव करी । साह्य त्या आपुल्या शिष्यांस ॥९४॥

ऐसी झाली आड-विहीर । पितांबरासी साचार ।

झाला बिचारा चिंतातुर । कांहीं न सुचे तयासी ॥९५॥

त्या वठलेल्या झाडापासी । मिळाले अवघे पौरवासी ।

काय होतें तें पहावयासी । मुलें बायकांसमवेत ॥९६॥

निरुपाय होऊनी अखेर । पितांबरानें जोडिलें कर ।

स्तवन मांडिलें अपार । आपुल्या सद्गुरुरायाचें ॥९७॥

हे स्वामी समर्थ गजानना ! । ज्ञानांबरीच्या नारायणा ।

पदनताच्या रक्षणा । धांव आतां ये काळीं ॥९८॥

माझ्यामुळें दोष तुला । येऊं पहातो भक्तपाला ।

आपुल्या ब्रीदासाठीं पाला । आणीव आम्रवृक्षासी ॥९९॥

माझी भिस्त तुझ्यावरी । पाव मातें लवकरी ।

नातरी आली पाळी खरी । मजला येथें मरण्याची ॥१००॥

प्रल्हाद खरा करण्याला । स्तंभीं नरहरी प्रगटला ।

जनी चढवितां सुळाला । त्याचें पाणी जहालें ॥१॥

जनीचा भार देवावर । माझा आहे तुजवर ।

संतदेवांत अंतर । मुळींच नाहीं राहिलें ॥२॥

देव तेची असती संत । संत तेची देव साक्षात् ।

मला लोक म्हणतात । शिष्य गजाननाचा ॥३॥

माझें कांहीं महत्त्व नाहीं । तें अवघें तुझ्याठायीं ।

पुष्पामुळें किंमत येई । जगीं सूत्राकारणें ॥४॥

तूं पुष्प मी आहे सूत । तूं कस्तुरी मी माती सत्य ।

तुझ्यामुळें आलें येथ । संकट हें माझ्यावरी ॥५॥

आतां न माझा अंत पाही । गुरुराया ! धांव घेई ।

या वठलेल्या वृक्षाठायीं । आणि पर्णे कोमल ॥६॥

लोकांस म्हणे पीतांबर । करा सद्गुरूचा नामगजर ।

जय जय गजानन साधुवर । शेगांवच्या अवलिया ॥७॥

लोक अवघे गजर करती । तों पालवी फुटली वृक्षाप्रती ।

जन नयनीं पाहती । त्या अगाध कौतुकाला ॥८॥

कोणी म्हणती असेल स्वप्न । तें जें पडलें आपणांलागून ।

पहा चिमटा घेऊन । आपुल्याला करांनीं ॥९॥

चिमटे घेऊन पाहाती । तों निमाली स्वप्नभ्रांति ।

यावरी कोणी ऐसें म्हणती । ही नजरबंदी असेल ! ॥११०॥

गारुड्याच्या खेळांत । वाद्या होती सर्प सत्य ।

खापर्‍या असून दृष्टीप्रत । त्याचे रुपये दिसती कीं ॥११॥

तोही भ्रम निमाला । तोडून पहातां पर्णाला ।

फांदीवाटें तात्काळ आला । चीक शुभ्रसा बाहेर ॥१२॥

मग मात्र खात्री झाली । वाळल्या वृक्षा पालवी फुटली ।

श्रीगजानन माऊली । खरीच आहे महासंत ॥१३॥

आतां पितांबराविशीं । शंका न धरणें मानसीं ।

चला घेऊन गांवासी । हा त्यांचा शिष्य असे ॥१४॥

याच्यायोगें करून । कधीं तरी गजानन ।

येतील कोंडोलीकारण । वांसरासाठीं गाय जसी ॥१५॥

तें अवघ्यांस मानवले । पितांबरासी मिरवीत नेलें ।

ऐसें जेव्हां दिव्य झालें । तेव्हां भाव उदेला ॥१६॥

जैसा समर्थांनीं आपुला । शिष्य डोमगांवीं पाठविला ।

कल्याण नामें करून भला । कल्याण करण्या जगाचें ॥१७॥

तैसेंच केलें गुरुवरें । श्रीगजाननें साजिरें ।

उदेंलें हें भाग्य खरें । त्या कोंडोली गांवचें ॥१८॥

श्रोते अजूनपर्यंत । तो आंबा आहे कोंडोलीत ।

इतरांपेक्षां असंख्यांत । फळे येती तयाला ॥१९॥

त्या पितांबराचे भजनीं । कोंडोली गांव लागला जाणी ।

जेथें जाईल हिरकणी । तेथें ती मोल पावे ॥१२०॥

मठ पितांबराचा । कोंडोलींत झाला साचा ।

आणि अंतही तयाचा । ते ठायीं झाला हो ॥२१॥

आतां इकडे शेगांवांत । महाराज आपुल्या मठांत ।

एके दिनीं उद्विग्न चित्त । होऊनिया बैसले ॥२२॥

शिष्य त्याचें कारण । पुसूं लागले कर जोडून ।

महाराज आपुलें मन । कां हो अस्थिर जाहलें ? ॥२३॥

तैं महाराज वदले लोकांला । आमचा कृष्णा पाटील गेला ।

जो चिकणसुपारी आम्हांला । रोज आणून देत असे ॥२४॥

त्याची झाली आठवण । राम त्याचा मुलगा लहान ।

आतां सुपारी चिकण । कोण देतो या ठायां ? ॥२५॥

राम थोर झाल्यावरी । करील माझी चाकरी ।

म्हणून मी या मठांतरीं । आतां ना तयार राहावया ॥२६॥

ऐसें महाराज बोलतां । जनांलागीं लागली चिंता ।

महाराजांचा विचार आतां । दिसतो येथून जाण्याचा ॥२७॥

म्हणून कसेंही करून । जाऊं न द्यावें त्याकारण ।

चला आपण धरूं चरण । महाराजांचे येवेळां ॥२८॥

ऐसा विचार मिळून केला । मंडळी आली मठाला ।

श्रीपतराव बंकटलाला । ताराचंद मारुती ॥२९॥

मंडळींनीं धरिलें चरण । महाराज आम्हां सोडून ।

तुम्ही आपुलें ठिकाण । राहण्याचें अन्य करूं नये ॥१३०॥

तुमची इच्छा असेल जेथ । तेथेंच राहा शेगांवांत ।

परी सोडण्याचें मनांत । ग्राम हें आणूं नका ॥३१॥

तैं महाराजवाणी निघाली । तुमच्या गांवांत आहे दुफळी ।

मला कोणाची जागा मुळीं । नको येथें रहावया ॥३२॥

जी कोणाची नसेल । ऐसी जागा जरी द्याल ।

तरीच राहणें होईल । माझें या शेगांवीं ॥३३॥

ऐसी गोष्ट ऐकिली । तेव्हां मंडळीं चिंतावली ।

समर्थांनीं आज्ञा केली । मोठ्या पेंचाची आपणां ॥३४॥

कोणाच्या जागेंत । राहाण्या तयार नाहींत ।

सरकार यांच्या प्रीत्यर्थ । जागा ती देईल कशी ? ॥३५॥

भूषण आपल्या साधूचें । सरकारास नाहीं साचें ।

बंकटलाल बोलला वाचें । ऐसें संकट घालूं नका ॥३६॥

सरकार धार्मिक कृत्याला । जागा देईल हा न उरला ।

भरवंसा तो आम्हांला । हें राज्य परक्याचें ॥३७॥

म्हणून आम्हांपैकीं कोणाची । जागा घ्या मागून साची ।

आहे तयारी आमुची । ती तुम्हां द्यावयास ॥३८॥

समर्थें केलें भाषण । काय हें तुमचें अज्ञान ।

जमिनीची मालकी पूर्ण । आहे सच्चिदानंदाची ॥३९॥

राजे कित्येक भूमीवरी । आजवरी झाले तरी ।

जागा कशाची सरकारी । इचा मालक पांडुरंग ॥१४०॥

व्यवहारदृष्ट्या मालकपण । येतें राजालागून ।

त्याचें नाहीं भूषण । तुम्ही प्रयत्न करा जा ॥४१॥

जागा मिळेल प्रयत्न करितां । पुढें नका बोलूं आतां ।

हरी पाटलाच्या हातां । यश येईल निःसंशय ॥४२॥

हरी पाटलाकडे आली । मंडळी ती अवघी भली ।

त्याच्या सल्ल्यानें मागितली । जागा अर्ज करून ॥४३॥

बुलढाण्याचा सर्वाधिकारी । साहेब होता नामें ' करी ' ।

त्यानें एक एकर जागा खरी । अर्जावरून दिली असे ॥४४॥

आणि ऐसें म्हणाला । तुम्ही दोन एकरास्तव अर्ज केला ।

परी मी तुर्त तुम्हांला । एक एकर देतसे ॥४५॥

तुम्ही एक वर्षांत । जागा केल्या व्यवस्थित ।

तुमचा मी पुरवीन हेत । जागा आणिक देऊनिया ॥४६॥

तो ठराव सरकारचा । आहे दप्तरीं नमूद साचा ।

समर्थांच्या वाणीचा । प्रभाव खचित लोकोत्तर ॥४७॥

मग हरी पाटील बंकटलाला । निघते झाले वर्गणीला ।

द्रव्यनिधी क्षणांत जमला । आणि काम झाले सुरूं ॥४८॥

यापुढील अवघें वृत्त । येईल पुढल्या अध्यायांत ।

सत्पुरुषाचा पुरविण्या हेत । देव राहे तत्पर सदा ॥४९॥

विठू पाटील डोंगरगांवचा । लक्ष्मण पाटील वाडेगांवचा ।

जगु आबा शेगांवचा । हे पुढारी वर्गणीचे ॥१५०॥

श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ ।

ऐका श्रोते सावचित्त । निजकल्याण व्हावया ॥१५१॥

शुभं भवतु ॥

श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

॥ इति द्वादशोध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 12, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP