मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|संत तुकडोजी महाराज|

संत तुकडोजी महाराज - भजन २६ ते ३०

सर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.


भजन - २६

क्षण एक धरीना धीर, कसे मन हे बावरे ।

करु काय सुचेना काहि, जरा तरि ना आवरे ॥धृ॥

(अंतरा)

जरि योग-याग बहु केले ।

मन-पवन समाधी नेले ।

वनि निर्जनि घर बांधियले ।

तरि व्यर्थ तयांची कास, खास विषयी हावरे ॥१॥

(अंतरा)

जगि तीर्थधामही नाना ।

दरिकंदरि ऋषिच्या स्थाना ।

जी मोहविती शरिरांना ।

ना राहि जरा टिकुनिया, कुसंगाने पाझरे ॥२॥

(अंतरा)

अति पंथ-मतांतर लोकी ।

परि आस पुरेना एकी ।

जळजळती एकामेकी ।

नच शांति वृत्तिला येइ, करी हृदया कावरे ॥३॥

(अंतरा)

सत्‍ संग सुगम यासाठी ।

व्हावया वृत्ति उफराटी ।

परि बोध पाहिजे गाठी ।

विश्वास असा तुकड्यास,'अनुभवा दे भाव' रे ! ॥४॥

भजन - २७

हरिभजनाची नुरली जागा, स्वतंत्रतेच्या परी ।

उलटली परवशता ही पुरी ॥

गुलामगिरिच्या कर्कशा बेड्या, पडल्या पायी करी ।

धडकले परधर्माचे अरी ॥

तन-मन-धन हे नेति हरुनिया, हसवुनि अस्वलिपरी ।

लावती आग घरीचे घरी ।

(अंतरा)

'हिंदु'चा नाश व्हावया चिंतिती मनी ।

अति दुर्बल केला देश चहुबाजुनी ।

वाटतो धाक हा गिळतिल कोण्या क्षणी ।

रक्षणकर्ता कोणिच नुरला, या पुढती कुणितरी ।

सखा हा भारत चिंता करी ॥१॥

गजांत-लक्ष्मी डुलली जेथे, सौभाग्याच्या गुणे ।

न होते काहि कुणाला उणे ।

सौख्य नांदले अखंड जेथे, 'रामराज्य' दणदणे ।

खेळले सैनिक निर्भयपणे ॥

तपोबलाच्या आत्मिय ऊर्मी, भक्त-उरी सणसणे ।

भोगिले वैभव भारत-भुने ।

(अंतरा)

उतरला राहु आणि केतू हा अवकली ।

अन्नान्नदशा ही भारतभू पावली ।

ही परवशतेच्या भरी दुःखि जाहली ।

असा हिंदुनो ! वीर तुम्ही, कुणि गर्जा या अवसरी ।

सखा हा भारत चिंता करी ॥२॥

काय वाचता पुराण पोथ्या, राम-रावणी कथा ।

त्यातुनी काय काय ऎकता ? ॥

गेला रावण निघुनी आता, सोय काय चिंतिता ? ।

दुसरा झाला हा मागुता ॥

सुर-असुरांचा झगडा नेहमी, चालतसे भोवता ।

रहावे सावध अपुल्या हिता ।

(अंतरा)

सांगतो राम हा उपासकांच्या प्रती ।

'व्हा उभे धर्मरक्षणा, त्यजा दुर्मती' ।

यश येइल तेव्हा हिंदूंच्या भोवती ।

करा करा तातडी मिळोनी, वेळ नसे ही बरी ।

सखा हा भारत चिंता करी ॥३॥

मारुतिच्या अंकिल्या मुलांनो ! आर्याच्या बंधुनो ! ।

सिंधुच्या मर्यादित बिंदुनो ! ॥

कंसारीच्या गोपाळांनो ! नंद-नंद-कंदुनो ! ।

लाडक्या देवांच्या हिंदुनो ! ॥

शूर वीर श्रीछत्रपती शिवरायाच्या बिंदुनो ! ।

उभी व्हा तरुणांनो ! बंधुनो ! ॥

(अंतरा)

हा धर्म-ध्वज घ्या करी, जपा मिळुनिया ।

कमवाच आपुला हक्क 'हक्क' म्हणुनिया ।

आळवा अंतरी देवदेवतासि या ।

तुकड्यादास म्हणे तोडा ही, गळफासाची सुरी ।

सखा हा भारत चिंता करी ॥४॥

भजन - २८

बोल बोल बा ! बोल भारता ! चिंतातुर का असा ?

हाल-बेहाल तुझी लालसा ॥धृ॥

स्वातंत्र्याच्या उन्नत शिखरी निर्भय सेना तुझी ।

सोडुनी आज दशा का अशी ? ॥

वेदांताची उंच गर्जना, भार ऋषींचे तसे ।

सोडुनी वन-वन का फिरतसे ? ॥

भारतमय श्रृंगार तुझा तो काय कुठे लोपला ?

बावरा फिरशी का एकला ? ॥

(अंतरा)

तव मुकुत भक्त-हिरकणे विखुरले कसे ? ।

तव हृदय-कवच पंडीतहि जागी नसे ।

कर-कमालीची तरवार वीर ना दिसे ।

धैर्य-तेज-विजयता लीपलो, प्रसंग दुर्दैवसा ।

सांग बा ! प्राप्त जाहला कसा ? ॥१॥

तुझ्या कीर्तीची ध्वजा पहाता आयुष्यही ना पुरे ।

गंज-अधिगंज पुराणे भरे ॥

रत्नजडित किति कनक रुप्याचे जडाव तव साजिरे ।

गजावर लक्ष्मि भरार्‍या करे ॥

सदा सुखी आनंदित जनता, वीर वृध्द-लेकुरे ।

खेळती सिंह जसे वनि फिरे ॥

(अंतरा)

श्रीमंत-संत आणि राव-रंक एकसे ।

नच भेद कुणाला तयी कधी गमतसे ।

अधिकारान्वघि ते आरुढले, समरसे ।

अघोर संकट दिसे अचानक, जशी उतरली नशा ।

नसातुनि रंग दिसे भलतिसा ॥२॥

कष्ट करीता ढोरासम ही पिके न शेती जरा ।

द्रव्य व्यसनात होतसे चुरा ॥

विषयांधासम फिरती तरुणहि, तरुणी दुसर्‍या घरा ।

शांति ना मना तयांच्या जरा ॥

ऋतु काळ ना बघे, कधी जल, उष्ण वाढती मधे ।

वाहती वेळ-अवेळी नदे ॥

(अंतरा)

काय ही दुर्दशा आली ग्रहणे जशी ।

निर्जली निर्फली दुर्बल झाली कृषी ।

ती गजांतलक्ष्मी पळे, गमे परकिसी ।

चिन्ह दिसेना बरे, ऊठ तरि सावध होई कसा ।

कळेना काय ? स्वस्थ तू असा ॥३॥

निरिक्षुनी पाहता तुजकडे दिसशी वेड्यापरी ।

कोण हे ओढिति तुज बाहेरी ? ॥

परिस्थितीच्या लाल धुरंधर ज्वाला भवतालुनी ।

पोहोचल्या पेट घेत आतुनी ॥

निसर्ग वन साजिरे, धैर्य-बलवीर वृक्ष कडकडे ।

अग्निने जागि जळोनी पडे ॥

(अंतरा)

कुणि शांतविता नाहीच तुझ्या बाजुला ।

हे पुत्र असुनिया करिती अरि-गलबला ।

ओढती आप आपुल्याकडॆ तुजला ।

काळ वेळ ही अशी पातली, पाहतो का प्रभु असा ? ।

पुढे तरि देइल का भरवसा ? ॥४॥

भयाण ऎशा कठिण प्रसंगी साथ कोण दे तुला ?

बोल हा आठवतो का खुला ? ॥

राहु-केतुच्या कचाटियातुनि बंध तोडुनी तुझे ।

कोण उचलतील बा ! हे वझे ? ॥

अर्धोन्मिलितापरी प्राण तव, छिन्न-भिन्न गमतसे ।

कोण तव यश घेइल सायसे ? ॥

(अंतरा)

दे हाक रामकृष्णासम व्हाया उभे ।

तुझि सत्य हाक ही कळेल त्यांच्या सभे

धावतील ओढाया असुरांच्या जिभे ।

तुकड्यादास म्हणे पाहवेना, अम्हा त्रास हा असा ।

मिळो स्वातंत्र्य पुन्हा जगदिशा ! ॥५॥

भजन - २९

राष्ट्र-सुखाची कळकळ निर्मळ वाहताना अंतरी ।

नसू दे स्वार्थ सख्या ! तिळभरी ॥धृ॥
पर सुखदुःखे मान आपुली, निष्कामी हो उनी ।

कार्य कर न्याय-नीती सेवुनी ॥

सद्‍ धर्माच्या तत्त्व-तंतुला तोडु नको धावुनी ।

रुढीला नाचु नको घेउनी ॥

(अंतरा)

राष्ट्रीय बंधु-भावना रमू दे जगी ।

वाढवी प्रेम आपुल्य-पराच्या मधी ।

जातिंचे कडक निर्बंध ढिले कर अधी ।

स्वैरपणे रंगु दे वीर स्वातंत्र्य धराया करी ।

लावि ही ध्वजा दिगंतावरी ॥१॥

तत्त्व शोधल्याविणा कुणाची करू नको खंडणा ।

अधिकसा मांडु नको फड दुणा ।

निसर्ग-जग हा बाग प्रभुचा, रमवी मनि भावना ।

दुःखवू नको कुणाच्या मना ।

फुले फळे ही सुंदर निघतिल, कोण जाणतो खुणा ?

सुगंधे रुंजू दे मन्मना ॥

(अंतरा)

वाहु दे लाट ही जोराची आतुनी ।

'कुणी उठा उठा हो ! या पुढती धाउनी ।

करु राष्ट्र-धर्म-हा जागा अपुल्यातुनी' ।

ऎक्यपणाचे बाहु उभारुनि करू गर्जना बरी ।

होउ दे तरुण-वृत्ति बावरी ॥२॥

वेळ अवेळहि पाहुनि वर्तन ठेवावे आपुले ।

कर्म आचरोनि समयी भले ॥

देश सुखी व्हावया पाहिजे कार्य-क्रम चांगले ।

पाहिजे सदा मनी शोधिले ॥

पूर्वज अमुचे कार्यप्रसंगी कसे कसे वर्तले ।

चलावे थोरांच्या पाउले ॥

(अंतरा)

ही याद असू दे, विसरु नको चालता ।

जरि काळ आडवा आला कर पालथा ।

सोड ही आता तरि भोळिव निर्जीवता ।

तुकड्यादास म्हणे घे कानी, तोड उरीची सुरी ।

पडु दे प्राण प्रसंगावरी ॥३॥

भजन - ३०

श्रीकृष्णाच्या मुखोग्दताचा आठव होता मना ।

उसळती वीर-बोध-भावना ॥धृ॥

सळसळता तै लाट वृत्तिची गीता-वाणीतुनी ।

निघाला ज्ञानांकुर गर्जुनी ॥

रणांगणावरि कठिण प्रसंगी, बोध करी वेधुनी ।

'उभा हो पार्थ सख्या !' म्हणउनी ॥

(अंतरा)

'हो जागा कर्तव्याला, घे गांडिवा ।

उजळवी जगी या विजयश्रीचा दिवा ।

दाखवी जगाला नीतिमार्ग हा नवा ।

धर्म-रक्षणा करावयासी तूच सख्या ! शाहणा ।

भिउ नको लढण्या समरांगणा'॥१॥

'अन्यायाला सहन करूनी जगणे नाही बरे ।

मरावे धर्म रक्षुनी खरे ॥

पूर्वजांचिया कुळा पहा हा, कलंक नाही बरा ।

करावा नाश लढोनि पुरा ॥

क्षत्रिय-धर्मा शोभे जैसी रीत धरावी उरा ।

फिरु नये रणांगणाहुनि घरा' ।

(अंतरा)

विश्वासुनि सांगे कृष्ण आपुल्यापरी ।

ठसविता शब्द हे विजय होय भुवरी ।

या करा तातडी वेळ नसे ही बरी ।

उभा ठाकला वीर कुरुक्षेत्रात, करी गर्जना ।

वाजती रण-वाद्ये दणदणा ॥२॥

भारतभूच्या तरुणासाठी बोध देउनी सखे ।

जाहले जय घेउनि पारखे ॥

सांभाळाया इतिहासासी नित्य जपा सारिखे ।

विरु नका होउनि हृदयी फिके ॥

कर्तव्याची ज्योत जागती सदा असु द्या मनी ।

बोध घ्या गीताजयंतीतुनी ॥

(अंतरा)

धन्य तो दिवस जै कृष्ण बोधि अर्जुना ।

थरथरा कापती शत्रुंच्या भावना ।

पुण्यात्मे करिती पुष्पवृष्टि त्या क्षणा ।

तोचि दिवस आजिचा गडे हो ! स्मरण व्हावया जना ।

धरा हृदयाशि नंद-नंदना ॥३॥

शरिरे कितिदा तरी गळाली, बोध गळेना कधी ।

नाहि त्या नाशक कुणि औषधि ।

धन वडिलांचे सांभाळाया अधिकारा घ्या अधी ।

बोध द्या तरुणा हृदयामधी ॥

उठ उठा रे गोपाळांनो ! करा संघ आपुला ।

प्रार्थुया परमेशा-पाउला ॥

(अंतरा)

हा सोडुनि पळता बोध व्हाल पातकी ।

पूर्वजा दुःख बहु, पाहुनिय घातकी ।

अनुभवा आणता सर्वचि होती सुखी ।

तुकड्यादास म्हणे जागे व्हा, विसरु नका हो खुणा ।

रंगवा रणांगणी जीवना ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 02, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP