मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|भक्त लीलामृत|

भक्त लीलामृत - अध्याय २४

महिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.


श्रीगणेशाय नमः ।

जय लीलाविग्रही पुरुषोत्तमा । सगुण मेघश्यामा ।

श्रीजगद्गुरु आत्मायारामा । नेणवेचि महिमा पैं तुझां ॥१॥

तुवां भानुदास वंशीं साचार । प्रतिष्ठानीं घेतला अवतार ।

प्रगट करोनि नाना चरित्र । खळांसि चमत्कार दाविला ॥२॥

आपणचि होऊनि देवभक्‍त । नाममहिमा वाढविला अद्भुत ।

द्वेषें अथवा निज भावार्थे । उद्धरिले बहुत जड जीव ॥३॥

तुझी अनुपम लीला निश्चिती । न वर्णवेचि वैकुंठपती ।

जेथें शेषाच्या जीवाचि रती । तेथें मी किती मशक ॥४॥

जैसी तैसीं आरुष उत्तरें । वदोनि ग्रंथीं लिहितो अक्षरें ।

हीं अंगीकारावीं करुणाकरें । निज कृपावरें आपुल्या ॥५॥

मी माझे वक्‍तृत्व म्हणतों आता । हाही अपराध पंढरीनाथा ।

बुद्धीचा चालक तूं तत्त्वतां । नसेचि सत्ता आणिकाची ॥६॥

किंचित चित्त होतां व्यग्र । तेव्हां न मिळेचि एक अक्षर ।

तूं आठवण देतोसि वारंवार । यास्तव विस्तार ग्रंथासी ॥७॥

मजवरी निमित्त देवोनि श्रीपती । तूं आपली प्रख्यात करिवतोसि कीर्ती ।

ऐसा निश्चय बाणला चित्तीं । अन्यथा मति हे नसे ॥८॥

सकल वक्तयां माजी देख । मी नेणता असें एक ।

ऐसें जाणती सकळ लोक । तूं करिसी कौतुक पांडुरंगा ॥९॥

तान्हें बालक बोबडया वचनीं । बोलतां कौतुक मानित जननी ।

तैशाच रीतीं कैवल्यदानी । मज आश्वासुनी गौरवावें ॥११०॥

मागिले अध्यायीं कथा अद्भुत । विद्याभिमानी हरीपंडित ।

श्रीनाथाचे पात्र काढित । तो सहस्त्रावत निघालीं ॥११॥

परमश्रमीं जाहला मग । धर्मे दाटलें सर्वांग ।

मग निरभिमानी होऊनि अंगें । घालीत साष्टांग नमस्कार ॥१२॥

नाथासि विनवी जोडोनि हात । म्हणे तुम्ही विष्णु अवतार साक्षात ।

जेथे असेल शुद्ध भावार्थ । भोजनासि तेथें जा स्वामी ॥१३॥

आणि तुम्ही आपुले स्वमतें करुनी । प्राकृत ग्रंथ वदला वाणी ।

तें वाचित जावे प्रतिदिनीं । म्हणोनि चरणीं लागला ॥१४॥

ऐसें बोलतां निज पुत्र । घरासि सत्वर पातले नाथ ।

दोघां वांचुनि तिसर्‍यासि निश्चित । चरित्र विदित हें नसे ॥१५॥

तों ब्राह्मणी जेविलीं निजमंदिरीं । मग उच्छिष्ट पात्रें सहस्त्रावरी ।

बांधोनि घेतसे आपुलें शिरीं । गंगातीरी मग आली ॥१६॥

ते स्थळीं लोक प्रतीष्ठानवासी । चरित्र निवेदन केलें त्यांसी ।

मग गंगाप्रवाही पत्रावळीसी । निज करेंसी सोडित ॥१७॥

भाविक भक्‍त जे त्याजकारणें । बहुत संतोष जाहला मनें ।

म्हणती आतां नाथाचें होईल पुराण । आणि ऐकावें कीर्तन धनवरीं ॥१८॥

ऐसें परस्परें लोक बोलत । मात प्रगटलीं नगरांत ।

हरि पंडित धरोनि भावार्थ । स्वयें पितृभक्त तो होय ॥१९॥

श्रीनाथमुखीचें पुराण । एकाग्र बैसोनि करीत श्रवण ।

बहुत मिळती भाविकजन । हरिकीर्तन ऐकावया ॥२०॥

जयजयकारें पिटोनि टाळी । आनंदली भक्त मंडळी ।

हरिबाचे नेत्रकमळीं । अश्रु तेवेळी येताती ॥२१॥

टाळ विणा मृदुंग घोषें । नादब्रह्माचि आलें मुसें ।

नाममहिमा वर्णिला विशेष । श्रवणेंचि मानस सुखावे ॥२२॥

हरि पंडित म्हणतसे मनीं । मागें चरित्रें जाहलीं पैठणीं ।

तेव्हां आज्ञान होतों बाळपणीं । परि कृपा स्वामींनीं आज केलीं ॥२३॥

श्रीनाथ ऐश्वर्य नेणोनि थोर । विद्याभिमानें भुललो फार ।

या जगद्‌गुरुसि टाकोनि साचार । काशीपुर वसविलें ॥२४॥

जैसा द्वापार युगीं अर्जुनभक्त । श्रीकृष्णासि सोयरा म्हणत ।

मग विश्वरुप दाखवितां त्यातें । चित्तीं भासत जगदात्मा ॥२५॥

हरिबासि तैसेंचि झालें तत्त्वतां । कीर्तनीं बैसत धरोनि आस्था ।

जाणोनि नाथाच्या मनोगता । सेवा स्वहितार्थ करीतसे ॥२६॥

आणिक चरित्रें रसाळ गहन । तीं सादर ऐका भाविकजन ।

गंगातीरीं एक कुग्राम जाण । ते स्थळीं ब्राह्मण एक होता ॥२७॥

ग्रामलेखक त्याची वृत्ती । दुर्बळ असे सर्वार्थी ।

पोटीं उदंड जाहली संतती । परी भक्षावया प्रती अन्न नाहीं ॥२८॥

शेवटीं कुमर जाहला देखा । तो तरी वेडा बागडा मुका ।

गावबा नाम ठेविती बायका । तरी चरित्र ऐका तयाचें ॥२९॥

तो दिवसेदिवस जाहला थोर । पोरांत खेळे निरंतर ।

आठा वर्षांत आला कुमर । परी स्पष्ट उत्तर बोलेना ॥३०॥

निदान जाणोनि पितयानें । तेव्हां व्रतबंध केला जाण ।

न म्हणे केशव नारायण । गायत्री उच्चारण मग कैंचें ॥३१॥

म्हणती पूर्व प्राक्‍तन साचार । शेवटील मुका जाहला पुत्र ।

अन्न जेवितो पोटभर । परी एकही उत्तर न बोले ॥३२॥

पदरीं दुरिताच्या होत्या कोटी । यास्तव समंध उपजला पोटीं ।

यासि कोण पोशील शेवटीं । चिंता पोटीं मायबापां ॥३३॥

पूर्व पापाचेनि योगें देख । पोटीं पुत्र होतसे मूर्ख ।

त्याचेनि वडिलांसि कैंचे सुख । दुःखदायक तो येणें ॥३४॥

तो कोणे एके दिवसीं जाण । ब्राह्मणे घरीं केला सण ।

घरीं घालोनियां पुरण । पोट भरोन जेविला ॥३५॥

दुसरें दिवसीं तये वेळीं । गावजी मातेसी मागें पोळी ।

तिणें ठेविली होती शिळी । काहाडोनि तत्काळीं देतसे ॥३६॥

तेही रात्र लोटलीयावर । गावजी न खाय भाजी-भाकर ।

खुणावोनि दाखवीत करें । म्हणे पोळी सत्वर मज देयीं ॥३७॥

माता झाली क्रोधायमान । पुत्रासि स्वहस्तें करी ताडण ।

म्हणे करंटया पोटासि येऊन । खावयासि मिष्टान्न मागतोसी ॥३८॥

गावजी रडत लोळे धरणीं । मागुती उठला तये क्षणीं ।

मग मातेपासीं सत्वर जाउनी । पोळी खुणावोनी मागतसे ॥३९॥

जननीसि करुणा आली पाहे । म्हणे याच्या छंदास करुं काये ।

बाळासि हातीं धरोनि पाहे । पैठणासि लवलाहें ते आली ॥४०॥

जावोनि एकनाथाचें घरीं । सद्भावें स्वामीस नमस्कार करी ।

गावजीस घातलें पायांवरी । म्हणे यासि अंगिकारी दयाळा ॥४१॥

हा नव वर्षांचा झाला पाहे । तरी एकही शब्द बोलतां न ये ।

खावयासि मिष्टान्न मागताहे । कोणता उपाय करावा ॥४२॥

आम्ही दुर्बळ अनाथ ब्राह्मण । कुग्राम वस्तीसि राहतों जाण ।

येथें नित्य होतसे संतर्पण । मिष्टान्न ब्राह्मण जेविती ॥४३॥

तुझें दयाळुपण ऐकोनि श्रवणीं । येथें आलें यासि घेउनी ।

श्रीनाथ बोलती अमृतवाणी । असोंदे सदनीं आमुच्या ॥४४॥

मग गिरिजाबाईस एकनाथ । स्वमुखें तेव्हां आज्ञा करित ।

याचा प्रतिपाळ करावा नित्य । लोभ चित्तांत धरोनि ॥४५॥

श्रीनाथ आज्ञेनें निश्चिती । गावजांस उदक दिधलें स्नानाप्रती ।

पात्र वाढोनि प्रीतीं। भोजनाप्रती बैसविला ॥४६॥

गावजीची माता ते समयीं । परम संतोष मानित जीवीं ।

श्रीनाथ श्रीनासि पुसोनि लवलाही । मग आपुले गांवीं तें आली ॥४७॥

भ्रतारासि सांगतसे देखा । नाथासि निरवूनी आलें मुका ।

आतां आपण ममता टाकूनि ऐका । लोभ लटका न करावा ॥४८॥

त्याचे चांगलें जन्मांतर । यास्तव उत्तम लाधलें घर ।

ऐशापरी मातापितर । संतोष थोर मानिती ॥४९॥

इकडे गावजीस एकनाथें । वस्त्रें दिधलीं आपुल्या हातें ।

तो दोहीं सांज भोजन करित । आणि मुलांत खेळत सर्वदा ॥५०॥

मायबापांचा न होय आठव । ये स्थळीं रमला त्याचा जीव ।

मिष्टान्न मिळतसे अपूर्व । यास्तव अवयव पोसले ॥५१॥

तंव एके दिवसीं एकनाथ । एकांतीं बैसले देवघरांत ।

गावजीस बोलावूनियां तेथ । जप सांगत रामाचा ॥५२॥

परी तो मुका मूढ फार । वदनीं एकही नये अक्षर ।

मग एकनाथ बोलती उत्तर । नाम साचार काय आमचें ॥५३॥

तों तत्काळ तयासि फुटली वाणी । एकनाथ ऐसें बोले वचनीं ।

तोचि जप सांगती त्याजलागोनी । कृपे करोनी आपुल्या ॥५४॥

मग सुतळी आणोनियां फार । तयासि गांठी दीधल्या करें ।

म्हणती हाचि जप त्वां साचार । निरंतर करावा ॥५५॥

गावजीस भेटला सद्गुरुसखा । तैहूनि तयासि लागला चुटका ।

खेळ खेळूं विसरला देख । सप्रेम सुखा तो भोगी ॥५६॥

आणिक शब्द न बोलेचि कांहीं । मुकाचि असे सर्वांविषयीं ।

परी एकनाथाचा त्यासि पाहीं । छंद जीवीं लागलासे ॥५७॥

रसनाविषय होता फार । तोही जिंतिला साचार ।

अल्पचि सेवेनियां आहार । दिवस रात्र भजन करीं ॥५८॥

ऐसी देखोनि त्याची स्थिती । गांवींचे लोक आश्चर्य करिती ।

म्हणती नाथकृपा होतांच निश्चिती । पालटली वृत्ती पैं याची ॥५९॥

गावजीची मातापिता । एक वेल समाचारासि येतां ।

परी त्यांची न धरीच लोभ-ममता । न पाहे सर्वथा त्यांजकडे ॥६०॥

ऐसे दिवस लोटतां कांहीं । तों चरित्र वर्तलें ते समयीं ।

एकनाथ आपुले देवगृहीं । ध्यानस्थ पाहीं असती ॥६१॥

तों श्रीराम प्रगट होवोनि तेथें । नाथासि स्वहस्तें सावध करित ।

मन नेत्र उघडोनि जंव पाहत । तों जानकीकांत देखिला ॥६२॥

अष्टभावें वोसंडत । प्रेमें चरणीं मिठी घालित ।

हृदयीं आलिंगिला रघुनाथ । प्रेमभरित तेधवां ॥६३॥

मग आज्ञा करीत रघुनंदन । श्रीवाल्मीकिकृत रामायण ।

त्यावरी करी प्राकृत लेखन । स्वमुखें करुन आपुल्या ॥६४॥

ऐसें सांगतां आयोध्यापती । एकनाथ तयासि करी विनंती ।

सप्तकांड तुमची सत्कीर्ती । माझिये मतीं आकळेना ॥६५॥

तथापि शब्द बोलीलों आर्ष । तरी आयुषय अवधी थोडीच असे ।

कैसा ग्रंथ जाईल सिद्धीस । संशय चित्तास वाटतो ॥६६॥

यावरी बोले रघुनंदन । स्नान संध्या नित्य नेम जाण ।

तावन्मात्र अल्पचि करुन । ल्याहावें रामायण सर्वदा ॥६७॥

तुझा सद्भाव प्रेमा अद्भुत । तीं मज वचनें आवडती सत्य ।

यास्तव भावार्थ रामायण त्यातें । नाम त्वरित ठेवावें ॥६८॥

तुझ्या हृदयीं बैसोनि घननीळ । आठवण देईन सर्वकाळ ।

तुझिये स्वाधीन कळिकाळ । चिंत्ता अळुमाळ न करावी ॥६९॥

ऐसें म्हणताचि रघुनंदन । मग एकनाथें वंदिले चरण ।

म्हणे तुझी आज्ञा मज प्रमाण । जोडया विण आन नसे ॥७०॥

इतुकें सांगोनि आयोध्यापती । अंतर्धान पावलें सत्वरगती ।

कीं एकनाथाचें हृदयीं निश्चिती । धरिली वस्ती रामचंद्रे ॥७१॥

यावरी सुमुहूर्त पाहूनि भला । रामायणासि आरंभ केला ।

भक्त भाविक प्रेमळांला । आनंद वाटला चित्तांत ॥७२॥

जितुका ग्रंथ होतसे नित्य । तितुका प्रत्यही श्रवण करित ।

अमृताहोनि रस उपजत । ऐकतां विसरत देहभान ॥७३॥

वाल्मिकिकृत श्लोक ग्रंथीं । त्यावरीं महाराष्ट्र टीका लिहिती ।

ऐकतांचि श्रोते तन्मय चित्तीं । सप्रेम होती जड मूढ ॥७४॥

प्रथमारंभी बाळकांड निश्चित । तें समातें केलें एकनाथें ।

यावरी अयोध्याकांड आरंभित । तेही सिद्धितें पावविलें ॥७५॥

त्यावरी अरण्यकांड जाण । वनवासा गेले रघुनंदन ।

किष्किंधाकांड पूर्ण । ग्रंथ संपूर्ण तो झाला ॥७६॥

त्यावरी सुंदरकांड निश्चिती । हनुमंतें अद्भुत केली ख्याती ।

सीता शुद्धी आणोनि निश्चिती । मग गेले रघुपती लंकापुरा ॥७७॥

मग युद्धकांडासि प्रारंभ निश्चित । स्वये केला श्रीएकनाथें ।

त्याचे चव्वेचाळीस अध्याय समाप्त होत । तों प्रयाणसमय सन्निध ये तेव्हां ॥७८॥

म्हणे आमुचा प्रयाण समयो तत्वता । संनिध पातलासे आतां ।

ऐसें एकनाथें सांगतां । भाविकांसि चिंता उद्भवली ॥७९॥

म्हणे स्वामीं मुखें करोन जाण । संपूर्ण व्हावें रामायण ।

युद्धकांडाची समाप्ति पूर्ण । झाली अजून नसे कीं ॥८०॥

यावरी उत्तरकांड राहिलें समूळ । यास्तव वाटते हळहळ ।

तरी ग्रंथ सिद्धीसि नेऊनि समूळ । मग प्रयाणकाळ नेमावा ॥८१॥

ऐसी सद्भक्‍त करितां विनंती । मग तयांसि श्रीनाथ उत्तर देती ।

जे देहीं काळें नेमिली वस्ती । तरी ते निश्चिती चुकेना ॥८२॥

तंव श्रोते देती प्रति वचन । कृष्णदास लोल्या येतां शरण ।

त्याचें अकरा दिवस तुम्हीं चुकवोनि मरण । युद्धकांड संपूर्ण करविलें ॥८३॥

तैशाच रीती थांबवूनि काळा । ग्रंथ सिद्धीची दाखविजे सोहळा ।

स्वामींची ऐकोनि प्रेमकळा । संतोष सकळां होईल ॥८४॥

श्रीनाथ म्हणती ऐका वचन । काळासि शिक्षा करोनि जाण ।

आपुलें कवित्व सिद्धीसि नेणें । हें अश्लाघ्य वाणें दिसतसे ॥८५॥

युद्धकांडाची पूर्णता । आणि उत्तरकांड तत्त्वतां ।

गावजी सिद्धीसि नेईल आतां । यासि अन्यथा असेना ॥८६॥

ऐसी श्रीनाथाची वैखरी । वदतां लोकांस आश्चर्य अंतरीं ।

म्हणती गावजी तो मुका जन्मवरी । कोणासि उत्तर न बोले ॥८७॥

तो कैसा वदेल रामायण । हे असत्य वाटे आम्हांकारणें ।

श्रीनाथें गावजीस बोलावून । कृपादान मग करिती ॥८८॥

मस्तकीं हस्त ठेवोनि प्रीतीं । आपुली लेखणी तयासि देती ।

म्हणती आमुचे देहीं कवित्वस्फूर्ती । ते तुजप्रती असो कीं ॥८९॥

ऐसा होतांचि कृपावर । त्याचे बुद्धीसि तत्काळ झाला विस्तार ।

गावजीनें हातीं घेऊनि पत्र । ग्रंथीं अक्षरें लिहितसे ॥९०॥

जैसें श्रीनाथाच्या ओवीचें मांडणें । तैसेंचि असे त्याचें बोलणें ।

एक अध्याय सिद्ध होतांचि जाण । भाविक जन ऐकती ॥९१॥

म्हणती नाथकृपेनें तत्काळ । मुकाही जाहला वाचाळ ।

बोलणेही वाटे अति रसाळ । तरी ग्रंथही सकळ करील हा ॥९२॥

एकनाथाच्या देखतां जाण । एक अध्याय केला असे त्याणें ।

वरकड ग्रंथ मागून । सिद्धीसि संपूर्ण तो नेला ॥९३॥

असो फाल्गुन वद्य पंचमीचे रातीं । श्रीनाथें कीर्तन केलें निगुती ।

मग लोकांसि वाटूनि खिरापती । म्हणती आमुची विनंती एक ऐका ॥९४॥

उदईक आमुचें प्रयाण । तुम्हीं समस्तीं यावें करोनि स्नान ।

गंगेपर्यंत बोळवून । मग पुढती येणें मंदिरांत ॥९५॥

ऐसी श्रीनाथाची वदंती । ऐकोनि भाविक खेद करिती ।

म्हणती अवतार होतसे समाप्ती । यास्तव चित्तीं उद्विग्न ॥९६॥

दुसरे दिवशीं प्रातःकाळीं । वाडियांत मिळाली सर्व मंडळी ।

श्रीनाथ व्याकुळ तये वेळीं । पडिले तत्काळीं मूर्च्छित ॥९७॥

ऐसी अवस्था देखोनि जाण । भाविकांसि खेद उपजला मनें ।

आसुवें भरलें त्यांचें नयन । श्रीनाथवदन विलोकिती ॥९८॥

निंदक कुटिळ ते दुर्मती । ते दुरुत्तर काय बोलती ।

म्हणती चरित्रें दाखविलीं नानारीतीं । परी मरण गती तों सारखींच ॥९९॥

मागें चमत्कार दाखविले फार । परी आतां प्राणांत ओढवला थोर ।

शेवटीं लोकांच्या खांद्यावर । नाथाचें शरीर जाईल कीं ॥१००॥

ऐसी निंदकाची वदंती । ऐकोनि भाविकांस खेद चित्तीं ।

मग एकनाथाची चरित्र ख्याती । जीवीं आठविती आपुल्या ॥१॥

म्हणती जगदुद्धार व्हावया कारणे । यास्तव तुझा अवतार सगुण ।

लोकां ऐसें तुज मरण । नसावें म्हणून हेत वाटे ॥२॥

ऐसें भाविकांचें मनोगत । ऐकोनि श्रीनाथ सावध होत ।

जैसा निद्रिस्त उठोनि बैसत । तैसीच रीत ते झाली ॥३॥

ऐसें देखोनि ते वेळी । जयजयकारें पिटिली टाळी ।

विठ्ठलनामें गर्जना केलीं । भाविक मंडळी उल्हासे ॥४॥

मग उद्धवासि आज्ञा करीत नाथ । स्नानासि उदक आणी त्वरित ।

स्नान करोनि प्रयोगयुक्‍त । धौत वस्त्रें नेसत स्वहस्तें ॥५॥

मग आसनीं बैसोनियां आपण । द्वादश टिळे गोपीचंदन ।

लावोनि गळां तुळसीभूषण । निज प्रीतीनें घातलें ॥६॥

जनार्दनाचें नामस्मरण । तारकमंत्र उच्चारण ।

मनोमय करिती आपण । मग विठ्ठलस्मरणें गर्जती ॥७॥

स्कंधीं विणा घेवोनि नाथ । श्रीहरीचे गुण वर्णित ।

नमस्कारोनि पांडुरंगातें । रुप ध्यानांत धरियेलें ॥८॥

नामस्मरणें गर्जोनि वाणी । वाडियांतूनि निघती तये क्षणीं ।

लोक पूजिती प्रीती करोनि । धन्य अवनी पवित्र ते ॥९॥

बुका सुमनें तुळसीहार । पदोपदीं पूजा उपचार ।

करीत असती नारीनर । आरत्या प्रकार नानाविध ॥११०॥

श्रीनाथस्वरुप आणोनि ध्यानीं । आसुवें येती त्यांचे नयनीं ।

पुन्हां दर्शन दुर्लभ म्हणोनी । आले दुरोनी लोक फार ॥११॥

दिंडया पताकांचे भार । क्षणक्षणां होत नामोच्चार ।

मार्गी दाटी जाहलीसे फार । नादें अंबर कोंदलें ॥१२॥

गांवाबाहेर वाडेकोडें । मिरवत येती निज निवाडे ।

मनुष्य दाटी मागें पुढें । दर्शनासि वाट असेना ॥१३॥

गंगेमाजीं लक्ष्मीतीर्थ । ते स्थळीं आले मिरवत ।

तंव देव विमानी बैसोनि येत । पुष्पें वर्षत नाथावरी ॥१४॥

नीलोत्पल पुष्पें ते वेळीं । असंख्यात पडलीं असती भूतळीं ।

तीं जन देखती नेत्रकमळीं । मग हरिनामें टाळीं वाजविती ॥१५॥

धन्य ते समयीचें लोक । दृष्टीसी पाहती कौतुक ।

गुप्तरुपें वृंदारक । पाहती कौतुक नेत्रकमळीं ॥१६॥

असो गंगेच्या वाळवंटी येतां जाण । श्रीनाथ आज्ञा करिती जनां ।

आतां स्वस्थ करुनियां मना । श्रीहरिगुणा ऐकिजे ॥१७॥

ऐसें श्रीनाथाचें उत्तर । ऐकोन संतोष वाटला थोर ।

सकळ बैसती नारीनर । रुप समोर लक्षूनियां ॥१८॥

विठ्ठलनामें करोनि गर्जना । आरंभिलें हरिकीर्तना ।

अद्भुत वर्णिलें भक्तिमहिमाना । आणि स्मरणा प्रतिवादी ॥१९॥

कलियुगीं तरणोपाय कांहीं । नामाविरहित आणिक नाहीं ।

सर्वाभूतीं दया असों द्यावी । हें वचन जीवीं धरा सर्व ॥१२०॥

तुमच्या हितास्तव जाण । मृत्युलोकीं आम्हांसि येणें ।

येर्‍हवीं मायातीत परिपूर्ण । चैतन्यघन मी असें ॥२१॥

ऐसें श्रीनाथाचें कीर्तन । ऐकतां सज्जनीं केला प्रश्न ।

आणिक आतां पुढती अवतार घेणें । स्वामीकारणें घडेल ॥२२॥

ऐसी आस्था सकळाप्रती । तरी तो सांगिजे करुणामूर्ती ।

ऐकोनि श्रोतयांची श्रोक्‍ती । मग अभंग बोलती श्रीनाथ ॥२३॥

तो ग्रंथी लिहितों ये अवसरीं । सादर ऐकिजे भक्तचतुरीं ।

जीं प्रासादिक वचनें निर्धारीं । ऐकतांचि अंतरीं बोध होय ॥२४॥

अभंग ॥ जैं धर्माची वाट मोडे । अधर्माची सीग चढे ।

तैं आम्हां येणें घडे । संसार स्थिती ॥१॥

नाना मतें आणि पाखंडे । कर्मठता अति बंडें ।

त्याची ठेंचावीं तोंडें । हरि भजनें करुनियां ॥२॥

जें जें हरिलीला चरित्र । तें तें माझेंचि स्वतंत्र ।

देव भक्‍त एकत्र । भेद नाहीं दोघांतें ॥३॥

जो जो अवतार हरी धरी । तो तो मीच अवधारी ।

हरिनामें करितों गजरी । जगदुद्धारा कारणें ॥४॥

सर्वांभूतीं भगवद्भावो । हा भक्‍तीचा निज निर्वाहो ।

धर्माचा अनुग्रहो । वाढवावा यालागीं ॥५॥

सर्वाभूतीं दयाशांती। प्रतिपाळावी वेदोक्‍ती ।

हेंचि एक निश्चिती । करणें आम्हां लागतें ॥६॥

लीलाविग्रही भगवंत । तया म्हणती नित्य मुक्‍त ।

ते दावी काय तेथ । वेगळेंची असोपां ॥७॥

विश्वरुपीं सृष्टी । अर्जुना ते दावी दिठी ।

भिन्न भेदाची गोष्टी । बोलों नये सर्वदा ॥८॥

वत्साहरणीच चरित्र । वत्स गोवळे स्वतंत्र ।

पावे पायतन कटिसूत्र । आपणची जाहला ॥९॥

एकाजनार्दनी । विश्वरुप गोविंदमानी ।

भेद धरितो मनीं । निंद्याहुनी अति निंद्य ॥१०॥

ओव्या ॥ हा श्रीनाथाचा अभंग जाण । प्रयाण समयींचें प्रसाद वचन ।

उद्धवें हातीं पत्र घेऊन । ठेविला लेहून ते समयीं ॥२५॥

मग विठ्ठलनामें हरिगजर मेळीं । सकळा हातीं वाजविलीं टाळी ।

आरती बोलिले तयेवेळीं । तेचि सकळीं ऐकिजे ॥२६॥

आरती ॥ अवलोकितां जन दिसे जनार्दन । भिन्नभिन्न तेथें दावी अभिन्न ।

अनेक एकत्वें दिसे परिपूर्ण । ठकली मन बुद्धी तेथें कैंचे गुणागुण ॥१॥

जयदेव जयदेव जय जनार्दना । परमार्थे आरती अभिनव भावना ।

॥धृपद०॥ ज्योतीची ही ज्योती उजळोनीयां दीप्ती । तेणें तेजें केली सतेज आरती ।

पाहतां पाहतेंपण पाहावया स्थिती । नुरेचि वेगळेपण देहभान स्फूर्ती ॥२॥

उजळी ते उजळण उजळाया लागीं । वेगळेपण कैंचें नुरेचि ते भोगी ।

अंगें अर्पीलें अंगीचे अंगीं । जीव शीवपण गेलें हरपोनि वेगीं ॥३॥

पाठी ना पोटीं अवघा निघोट । सर्वांचा देखणा सर्वांवरिष्ठ ।

इष्ट न अनिष्ट गुप्त ना प्रकट । अहंसोहं सगत भरिला घोट ॥४॥

सर्वदा दिसे परी ना कळे मना । जें जें दिसे तें तें दर्शना जाणा ।

अभाव भावेंसीं गिळिली भावना । अभिनव आरती एका जनार्दना ॥५॥

ओव्या ॥ ऐसी आरती तये क्षणीं । श्रीनाथें स्वयें गायिली वदनीं ।

नामघोषें गर्जोनि वाणी । नमस्कार धरणीं घातला ॥२७॥

श्रीनाथें घालोनि दंडवत । लोकांसि विनवी जोडोनि हात ।

आतां कृपा असोंद्या समस्त । केला प्रणिपात मग पुन्हा ॥२८॥

ऐसी ऐकतांचि वाणी । सकळांसि अश्रुपात आले नयनीं ।

जयनाथ एकनाथ म्हणोनी । नमस्कार तें क्षणीं घालिती ॥२९॥

मग गंगेच्या जळीं एकनाथ । गेले निजांगें चालत ।

नाभिस्थानीं जों उदक लागत । उभे तेथ राहिले ॥१३०॥

गिरागजरीं हरिस्मरण । सर्वांमुखीं करविलें जाण ।

मग कुडींतूनि सोडिले प्राण । देव सुमनें वर्षती ॥३१॥

जितुके पाहावया आले लोक । तेही निजप्रेमें करिती शोक ।

मग देहासि अग्नि दीधला देख । जैसा लौकिक या रीतीं ॥३२॥

ऐसें नाथाचें निर्वाण । पाहोनि घरासि गेले जन ।

शोकें करोनि विव्हळ जाण । ते समयीं सर्वत्र जायले ॥३३॥

पुत्रासहित दुसरे दिवसीं । पातले राखसावडावयासी ।

तों दहनात उगवली कृष्ण तुळसी । आणि अश्वत्थरोपासी देखिलें ॥३४॥

कोंवळा लसलसित हिरवा पाला । देखोनि जनांसि आनंद झाला ।

म्हणती अश्वत्थरुपेंचि प्रगटला । श्रीनाथ अवतरला पुढती ॥३५॥

मग मध्यें अश्वत्थ राखोनि जाण । ते स्थळीं बांधलें वृंदावन ।

देउळीं श्रीनाथ पादुका स्थापून । अद्यापि स्थान जागृत असे ॥३६॥

नरनारी क्षेत्रवासी बहुत । ते स्थळीं सर्वदा सेवा करीत ।

तयांच्या मनींचे मनोरथ । पुरवीत श्रीनाथ कृपाळू ॥३७॥

जयाच्या चित्तीं जैसा भाव । तैसाचि होय देवाधिदेव ।

होतसे षष्ठीचा उत्सव । अति अपूर्व पैठणीं ॥३८॥

अश्वत्थरुपें श्रीएकनाथ । जनासि प्रत्यक्ष दर्शन देत ।

तेथें आणिक चमत्कार अद्भुत । तो ऐका निज भक्त भाविकहो ॥३९॥

भग्न होईल वृंदावन । यास्तव अश्वत्थ तितुकाचि लहान ।

श्रीनाथाचें लाघवपूर्ण । नेणवेंचि जाण ब्रह्मादिकां ॥१४०॥

धन्य ते लोक क्षेत्रवासी । सर्वदा दर्शन होतसे त्यांसी ।

पादुका दर्शनें पतितांसि । असंख्य जीवासी उद्धार ॥४१॥

श्रीनाथ निर्याण ऐकतां जाणा । त्यासि अंतसमयीं न होती यातना ।

तयासि तुष्टोनि वैकुंठराणा । आपुल्या स्थाना पाववी ॥४२॥

श्रीपांडुरंग आज्ञेनें साचार । ग्रंथीं लिहिलीं अरुष उत्तरें ।

येर्‍हवी संत चरित्राचा पार । मी नेणेंचि पामर मूढमती ॥४३॥

पुढिले अध्यायीं कथा सुगम । वैष्णव भक्‍त तुकाराम ।

त्याचें चरित्र अति निःसीम । श्रोतीं संपूर्ण ऐकिजे ॥४४॥

जो दीनदयाळ रुक्मिणीवर । अनाथ बंधु कृपासागर ।

तो महीपतीसि देऊनि अभयवर । सद्गुण चरित्र वदवीतसे ॥४५॥

स्वस्ति श्रीभक्तलीलामृत ग्रंथ । श्रवणेंचि पुरती मनोरथ ।

प्रेमळ परिसोत भाविक भक्त । चोविसावा अध्याय रसाळ हा ॥१४६॥

अ० २४॥ओ० १४६॥ अभंग व आरती मिळून ॥१६॥ एवं संख्या ॥१६२॥

N/A

References : N/A
Last Updated : September 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP