मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री गणेश प्रताप|
क्रीडाखंड अध्याय २५

श्री गणेश प्रताप - क्रीडाखंड अध्याय २५

सर्व कीर्तीने युक्त, सर्व देवाधिदेवांमध्ये श्रेष्ठ अशा अत्यंत प्रिय असलेल्या श्रीगजाननाच्या स्तुतीपर हा ग्रंथ आहे.


श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । श्रीक्षेत्रपालाय नमः ।

जयजयाजी अनंतशक्ती । अप्रमेया मंगलमूर्ती ।

अंबात्मजा अनंतकीर्ती । भक्तपती दयोदधी ॥१॥

तुझे मंगलनाम गातां । त्याची निरसे सकल चिंता ।

ऐसें ब्रीद खरें आतां । करोनि अनंता दावी मज ॥२॥

तुझी कृपा होय गोमटी । त्याच्या नसती विघ्नकोटी ।

आहे शरण मी याचेसाठीं । कृपादृष्टी लावी मशी ॥३॥

पूर्वाध्यायीं अनुसंधान । केलें यमाचें गर्वमोचन ।

पंधरा वर्षांचा अंबानंदन । जगज्जीवन जाहला ॥४॥

एके दिवसीं हिमनग तनया । शंकराचे लागोन पायां ।

मधुरोक्तीनें बोले आर्या । करोनियां हास्यमुख ॥५॥

संसारीं देवा हेंचि सुख । स्त्रियांनीं पाहवे स्नुषामुख ।

वरमायेपणाचें दावी कौतुक । कृपा करोनी मजलागीं ॥६॥

सुशीला सुमुखी लावण्यराशी । नवरी शोधणें मत्पुत्राशी ।

करोनियां विवाह सिद्धीशी । सुखसोहळ्याशी मज भोगवी ॥७॥

आपणा जोगा पहा सोयिरा । त्रिभुवनामाजी शोध करा ।

वचन ऐकतां आल्हाद शंकरा । तेणें दारा आलंगिली ॥८॥

विवाहोद्देश आणोन चित्तीं । चिंतातुर आर्यापती ।

तव नारद आला सुमती । लग्न मध्यस्थी करावया ॥९॥

पाहतां शंभू नारदाशीं । आसन देउनी गौरवी त्याशी ।

कोणी कडोन तूं आलाशी । हें मजशीं सांग म्हणे ॥१०॥

येरु म्हणे गौरीरंजना । करीत फिरतों वरयोजना ।

पाहोनियां तव नंदना । तुमचें दर्शना पातलों ॥११॥

ब्रह्मतनया माझ्या स्वसा । अतीलावण्य आहेत डोळसा ।

उपवर जाहल्या त्या राजसा । वरचिंता विधीस असे ॥१२॥

अनुसूयाशवीर ती युवती । त्यांचें स्वरुप पाहोनी लाजती ।

वडवा जाहली सूर्यसती । रुप पाहोनी तयांचें ॥१३॥

द्यावया तयाशी उपमा । ललना नाहीं सर्वोत्तमा ।

सुना त्या सासू उमा । योग्य आह्मा वाटतसे ॥१४॥

कृपा करोनियां मन्मथारी । आम्हाशी घ्यावें आतां पदरीं ।

शंकर गिरिजेशी विचार करी । तुज सुंदरी मानतें हें ॥१५॥

हर्षें बोले तेव्हां गौरी । आहेत चतुर्मुखाच्या कुमरी ।

पंचमुखा तूं विचार करी । घ्यावें पदरीं नारद म्हणे ॥१६॥

घेऊनि गिरिसुतेचें मत । शिव तेव्हां तथास्तु म्हणत ।

पाहोनियां सुमुहूर्त । लग्ननिश्चय पैं केला ॥१७॥

सत्यलोकीं गेला मुनी । वृत्तांत सांगे विधीलागुनी ।

धाता आनंदोनीयां मनीं । म्हणे नंदिनी देवाच्या ॥१८॥

पाचारोनी वनितांशीं । सांगे वर योजिला गुणेशाशी ।

साहित्य करा वेगेंशी । असे नगजेशी वरमायपण ॥१९॥

त्या सर्व म्हणती विधिलागीं । विहीण आहे आह्माजोगी ।

उणें न करुं लग्नप्रसंगीं । तुम्ही चिंता करुं नये ॥२०॥

लिहोन सर्वांसी कुंकुमपत्रें । शिव पाठवी तेव्हां पवित्रें ।

वर्‍हाडी येती हर्षपात्रें । लग्नालागीं तेधवां ॥२१॥

इंद्रादि सर्व अमर । कश्यपादि ऋषेश्वर ।

वर्‍हाडी निघाले सदार । प्रमोदे निर्भर चालले ॥२२॥

वृषारुढ पार्वती घेउनी । वेगें निघाला शूळपाणी ।

वर मयूरावरी बसूनी । समारंभें निघाला ॥२३॥

वरी शोभती आतपत्रें । ऋषी गर्जती वेदमंत्रें ।

अपार वाजती वाजंत्रें । वेत्रपाणी धांवती पुढें ॥२४॥

ऐसा क्रमितां मार्ग अपार । जवळ आलें गंडकीपुर ।

मार्गीं सहस्त्रशा असुर । करिती घुरघुर तेधवां ॥२५॥

वर्‍हाडानी असुर पाहिले । भयाभीत तेव्हां जाहले ।

हें मयुरेशें देखिलें । आश्वासिलें तयांशी ॥२६॥

बाळांसी म्हणे विनायक । तुम्ही धांवा रे सकळिक ।

असुर वधोनियां देख । मग सन्मुख यावें तुम्ही ॥२७॥

ऐसें ऐकतां ऋषिकुमर । घेऊनि चालले दर्भभार ।

मंत्रोनि टांकिती राक्षसांवर । जाहला संहार असुरांचा ॥२८॥

मुलानी मारले पाहूनि असुर । सर्वांस वाटे चमत्कार ।

म्हणती परम हा ईश्वर । सर्वेश्वर काय न करी ॥२९॥

वर्णीत महिमा गुणेशाचा । भार चालला व्हाराडयांचा ।

दिसे कोट गंडकीचा । दोन कोशांवरुनियां ॥३०॥

मार्गीं पाहिलें रम्यवन । स्वच्छ शीतळ असे जीवन ।

तेथें उतरला गौरीनंदन । दिल्हें आसन सेवकानीं ॥३१॥

वनीं उतरला जगज्जीवन । तेथें आला त्रिलोचन ।

गौरी सकल स्त्रिया घेऊन । पातली तेथें समारंभें ॥३२॥

वर्‍हाडी चालतां बहु श्रमले । तेही येउनियां उतरले ।

सुहास्यमुखें गुणेश बोले । शंभूप्रती तेधवां ॥३३॥

सिंधुनामा बलाढय दानव । तेणें बंदी घातले देव ।

ते सोडउनियां सर्व । समारंभाशी नेणें असे ॥३४॥

बलाढय चतुर निती जाणतां । शिष्टाईसी पाठवा आतां ।

तो नायके सामकरितां । तरी त्याशीं युद्ध करुं ॥३५॥

पुरुषार्थें सोडवोनि देवांशीं । घेऊनि जाऊं मग लग्नाशीं ।

वचन ऐकतां शिवाशी । जाहला हर्ष बहुसाल ॥३६॥

साधू साधू सकल म्हणती । मग शिवासीं विचार करिती ।

शिष्टाईस पाठवणें कवणाप्रती । अंबापती विचार करा ॥३७॥

मयूरेश म्हणे पार्वतीधवा । शिष्टाईसी नंदी पाठवा ।

बलाढय चतुर आहे बरवा । वचन सर्वां मानवलें ॥३८॥

शिव पाचारोनियां नंदीस । म्हणे तूं जावें शिष्टाईस ।

तो करुनी नमनास । गंडकीस चालला ॥३९॥

उल्लंघोनि महाद्वार । सभेंत पावला नंदीश्वर ।

सिंहासनी सिंधू असुर । महोत्साहे बैसला असे ॥४०॥

भोंवत्या बैसल्या वीरश्रेणी । अप्सरा नाचती नृत्यांगणी ।

सभा घनवट ते क्षणीं । पाहिली नयनीं शिवदूतें ॥४१॥

जैसा उगवला दिनकर । तैसा दिसे नंदिनीकुमर ।

पुढें चालला तो बलाढय थोर । पाहतां असुर गजबजले ॥४२॥

शस्त्रें घेऊनि उभे राहिले । नंदी न भीतां पुढें चाले ।

येवोनि सिंधूस बोले । जगताधीश म्हणविशी तूं ॥४३॥

इतके बसले सभानायक । परी नितिज्ञ नाहीं एक ।

आलीयाचा अलोलिक । कांहीं न करिती शोध कसा ॥४४॥

ऐकुन नीतिज्ञ बुध भाषणें । सिंधू तयासी हासोन म्हणे ।

वृषा तुझे बुद्धीनें उणें । सुरगुरुसीं केलें वाटे ॥४५॥

कोठोनि आलास गा बैला । कायसें ठावकें शास्त्र तुला ।

ऐकोनियां नंदी हांसला । मदांधाला पाहूनियां ॥४६॥

अरे तूं मदांधपणें न जाणशी । नंदी ऐसें म्हणती मशी ।

शिवसुतें सांगितल्या निरोपासी । मी गा तुजशीं सांगों आलों ॥४७॥

आमचा आहे लग्न उत्सव । समारंभासी पाहिजेत देव ।

ते तूं स्ववश केले सर्व । करी मोकळे तयातें ॥४८॥

त्याचीं पदें त्यांस द्यावीं । संतोषें लग्नासीं यावें देवीं ।

मग तुवांही अवनी बरवी । वश ठेवावी राजसुता ॥४९॥

नाहीं तरीं करोन युद्ध । यमापासीं तूतें करोनि बद्ध ।

बळें सोडऊन देव सुबुद्ध । नेयीन दानवा लग्नासी ॥५०॥

ऐसें ऐकतां दानवेश । गदगदोनी हांसे त्यास ।

काय म्हणावें विरुपाक्ष सुतास । विचारास करीना ॥५१॥

मीं स्वामी त्रैलोक्याचा । निरोप ऐकोनियां मुलांचा ।

बंद खुला न करीन देवांचा । करील तुमचा धनी काय ॥५२॥

नंदी म्हणे तूं मदांध असा । न वोळखशी ईश्वरास कसा ।

जो करवोनी ब्रह्मांड ठसा । नाचवितो निजसत्ता ॥५३॥

अनंत ब्रह्मांडाचा नायक । पार्वतीतनय विनायक ।

ज्याचा शिव सर्वेश जनक । दावीतो कौतुक आजवरी ॥५४॥

करावया अपाय तयाशी । पाठविले तूं बलाढय असुरांशी ।

तेणें पाठविले यमसदनाशी । हें तुजशीं ठाऊक असे ॥५५॥

येरु करोन रक्तनयन । तयासी बोले सक्रोधवचन ।

नेऊन वृषा तुज बांधुन । आतां जुंपीन नांगरासी ॥५६॥

ऐकोन मुर्खाचे दुरोत्तर । तयासी बोले नंदी उत्तर ।

काळें भेदिलें तुझें शरीर । म्हणोनि पामरा बडबडशी तूं ॥५७॥

न ऐकोन अंगदाचें वचन । रावण गेला व्यर्थ मरुन ।

तैसा तूं कुळ संहारुन । निजकांता विधवा करिसील रे ॥५८॥

ऐसेम वदोनियां तत्काळ । आला मयूरेशा जवळ ।

वर्तमान सांगे सकळ । युद्ध तुंबळ करील तो ॥५९॥

ऐकोन मयुरेश गर्जे तेव्हां । मारा दुष्टाचा काय केवा ।

मारुनियां सिंधू दानवा । नेईन देवा मंगलासीं ॥६०॥

दुसरे दिवसीं मयूरावरी । आरुढतां भक्तकैवारी ।

वीरें केली युद्धतयारी । रणभेरी दुमदुमीत ॥६१॥

भूतराजा आणि पुष्पदंत । ते विनविती जोडोनि हात ।

आम्ही आज युद्ध अद्भुत । करोन जयवंत होऊन येऊं ॥६२॥

वरदपाणी ठेवोन शिरीं । मयूरेश त्यातें आज्ञा करी ।

असुर वधोनियां लौकरी । जयनवरी घेऊन या ॥६३॥

प्रळयकाळीं समुद्र वाढे । तैसें सैन्य बाहेर पडे ।

भूतराज पुष्पदंत वीर गाढे । निघती अमित क्रोधानळा ॥६४॥

विक्राळ गर्जे भूतसेना । वेगें पातले गंडकीभुवना ।

महाद्वारीं असुरपृतना दशकोटी गण राक्षसांची ॥६५॥

परचक्र पाहतां हडबडले । राक्षस युद्धासी सन्मुख जाहले ।

नानावाहनी आरुढले । गर्जूं लागले सिंहनादें ॥६६॥

भिंडीपालगदातोमर । कुंतअसीलताधनुष्यशर ।

घेऊनियां तरु डोंगर । गर्जत असुर निघाले ॥६७॥

दोहीं दळां पडली गांठ । वीरां पडलें प्राणसंकट ।

निकुरें भीडती तेव्हां भट । स्वामीकार्या कारणें ॥६८॥

मयूरेशबळें शिवगण । करिती तेव्हां अद्भुत रण ।

कोटिशा असुरांचे प्राण । मारोनि बाण घेती ते ॥६९॥

बहुतेक मारिले शिवगणीं । घायाळ जाहल्या वीरश्रेणी ।

कासावीस पळोनि ते क्षणीं । घायाळ गेले सभांतरीं ॥७०॥

सिंहासनीं दानवपती । तेथें घायाळ येऊनि सांगती ।

निश्चळ बसलास काय निगुती । घूर्णीतमती जाहली तुझी ॥७१॥

दशकोटी असुर द्वारपाळक । शिवगणीं विध्वंसिलें सकळिक ।

आरामें विध्वंसूनियां देख । नगर जाळिती सभोंवतें ॥७२॥

नगरांत असतां तूं नगरनाथ । भयें नागरिक पळती समस्त ।

ऐसें ऐकतां भुपती सुत । नयन करी आरक्त तेव्हां ॥७३॥

करुनियां विक्राळ गर्जना । क्षणें करोनि राहिला स्तब्धमना ।

ऐसें पाहतां वीर नाना । करुन प्रतिज्ञा बोलती ॥७४॥

आम्हांसी आज्ञा देशील जरीं । गुणेशातें संहारुं तरीं ।

दानवेश म्हणें करा तयारी । बाहेर झडकरी निघा कीं रे ॥७५॥

निशाणीं घातला घावो । अश्वावरी आरुढला रावो ।

गर्जना करीत वीरसमुदावो । नगराबाहेर निघाला ॥७६॥

जयवाद्यें वाजवोनी । शिवगण मयूरेशापाशीं येउनी ।

स्वामी आले जय घेउनी । गौरविले स्वामीनी तेधवा ॥७७॥

युद्धासी निघाला दैत्यपती । पायदळें पुढें गर्जत येती ।

त्यामागें तुरंग पंक्ती । गज धांवती अपरिमित ॥७८॥

त्याचे मागें रथाचे थाट । वरी गर्जती दानवभट ।

नेमी वाजती घडघडाट । वायूस वाट न मिळे तेथें ॥७९॥

शिवापाशीं सांगती च्यार । युद्धास पातले निशाचर ।

शिव नंदीवरी सत्वर । जाहला तयार तेधवां ॥८०॥
निलकंठ व गौरीसुत । बैसोनियां गर्जना करित ।

तेव्हां ब्रह्मांडगोळ कांपत । शेष सर्सावी निजशिरा ॥८१॥

निशाचराचा विक्राळ घोष । ऐकतां शिवगणास वाटे हर्ष ।

गुणेश तेव्हां पावोनि तोष । सेना अशेष घेत सवें ॥८२॥

वाजती रणवाद्यें भयंकर । गण गर्जती शब्द थोर ।

सिंव्हनाद करी मयुरेश्वर । तेणें चराचर कांपतसे ॥८३॥

दोन्ही दळांची पडली गांठी । शस्त्र घाव हाणोनि कंठीं ।

परस्परें प्राणहटी । वीर जगजेटी घेताती ॥८४॥

कुंतपरशूभिंडिपाळा । मारिती घालिती पाश गळां ।

अश्व खिजती वेळोवेळां । अवनीतळा कांपविती ॥८५॥

युद्ध मांडिले घोरांदर । गज लोटती महंतवीर ।

वीर सोडिती अपारशर । तेणें अंबर झांकूळले ॥८६॥

धुरोळा आच्छादी रविमंडळा । अधंकार रणीं तेव्हां दाटला ।

वीर न ओळखती परस्परांला । प्रळय वर्तला असुरांशीं ॥८७॥

महा मोठे मयुरेश वीर । त्याहीं माघारलें निशाचर ।

तव येऊनी नंदीवीर । करी नमस्कार गुणेशाशी ॥८८॥

गगनमार्गें तो उसळला । दानव सेनेमाजीं पडला ।

तेणें महाप्रळय केला । ध्वज पाडला असुरांचा ॥८९॥

शिंगें फिरवोनियां धेनुपुत्रें । दानवेशाची पाडिली छत्रें ।

दैत्य जाहले भयपात्रें । आणिलीं छत्रें गुणेशापाशीं ॥९०॥

पाहतां नंदीचें कर्म दुस्तर । भयचकित जाहले निशाचर ।

शिवगणासी आनंद थोर । गौरव फार केला त्याहीं ॥९१॥

असुराचें मानस जाहलें खिन्न । पाहतां बोलती त्याचे प्रधान ।

मित्र कौस्तुभ कर जोडुन । बोलती वचन रायासीं ॥९२॥

कांहो जाहला खिन्न स्वामी । युद्धास जातों आतां आम्हीं ।

शत्रु जिंकोनियां श्रमी । करुं त्यांच्या वनिताशीं ॥९३॥

शत्रूंस जिंकिल्यावांचुन । आम्हीं न दावूं तुला वदन ।

ऐशी दुस्तर प्रतिज्ञा करुन । रणकंदन करुं चालले ॥९४॥

महारथींची सहस्त्रशतें । योजिलीं त्याहीं धनुष्यशतें ।

आकर्ण ओढोनि गुणातें । अमुपम शरातें वर्षती ॥९५॥

भिंडिपाला गदा वोढणें । घेउनि हाणिती वीरराणें ।

कितीक मुकलें तेधें प्राणें । घायाळपणें लोळती ॥९६॥

कोणाचे तुटले चरण कर । कोणाचे फुटोन गेलें उदर ।

कोणाचें फाटलें अर्धशरीर । खटारे अपार पडले किती ॥९७॥

वाहती रक्ताचे तुंबळपूर । गजकलेवरें वाहती अपार ।

करिती शस्त्रांचे भडमार । निशाचर तेधवां ॥९८॥

माघारली देवसेना । क्रोध न साहे अंबानंदना ।

तंव करीत पातले गर्जना । वीरभद्र षडानन ॥९९॥

त्याहीं धनुष्यें वाहिलीं हातीं । स्वसेनेसी अभय देती ।

जैशा मेघधारा वर्षती । शर तेव्हां वीर ते ॥१००॥

तों अस्तास गेला दिनकर । दानव गर्जती भयंकर ।

जयवाद्यें वाजवोनियां सत्वर । निशाचर मागें गेलें ॥१॥

दुसरें दिवसीं सिंधुसेना । करीत पातली घोरगर्जना ।

क्रोध न साहे षडानना । वीरभद्रा समवेत ॥२॥

दोहीं सैन्या पडली गांठ । शर वर्षती अमुप भट ।

निशाचर वीर धीट । मारीत नीट चालले ॥३॥

त्यांहीं माघारली गुणेशसेना । म्हणोन धांवला करित गर्जना ।

वीरभद्र वीरराणा । अमुप बाण वर्षतसे ॥४॥

सिंहनाद करी जेव्हां । उर्वी थरथरोनी कांपे तेव्हां ।

धरल्या राक्षसानी हेवा । घालिती कावा त्याभोंवती ॥५॥

वीरभद्र जैसा रणभैरव । तेणें संहारिले दानव ।
शरजाळें गगन सर्व । आच्छादिलें तेधवां ॥६॥

युद्ध मांडिलें घोरांदर । गाढ पडला अंधकार ।

बाणीं खोंचलें सर्व असुर । जाहला संहार असुरांचा ॥७॥

वीरभद्र वीरराणा । रणीं दृष्टीस नाणी कोणा ।

संहारिलें दानवगणा । सोडुनी रणा पळती ते ॥८॥

राक्षस चमूंत हाहाःकार । दशदिशा पळती असुर ।

तेव्हां हाक देवोन घोर । प्रधान शूर धांवले पुढें ॥९॥

मित्र कौस्तुभ सक्रोध धांवती । शर तेव्हां अमुप वर्षती ।

मारिलें त्यांहीं वीर किती । त्याची गणती करील कोण ॥११०॥

माघारतां मयूरेश सेना । क्रोध न साहे षडानना ।

करित लोटला तेव्हां गर्जना । असुर सेना दचकली ॥११॥

सिंधू प्रधान दानव खळ । रणीं घालती पाहोन गोंधळ ।

कार्तिक उडाला तत्काळ । करित विक्राळ गर्जना ॥१२॥

मित्राचे हृदयीं अकस्मात । मारिला तेणें मुष्टीघात ।

दानव रथाखालीं पडत । वमीं शोणित भडभडां ॥१३॥

मित्रें सोडिला रणीं प्राण । कौस्तुभें पाहतां अतिदारुण ।

मुष्टिघातें षडानन । ताडोन पाडिला भूमीस पैं ॥१४॥

मूर्च्छा सांवरोनि गौरीकुमर । तीक्ष्ण सोडिता जाहला शर ।

कौस्तुभ तोडी ते अपार । अनिवार मार गौरीजाचा ॥१५॥

सर्वांगी भेदले सायक । विकल जाहला वीरनायक ।

फुलला जैसा वृक्ष किंशुक । पाहे षण्मुख तयातें ॥१६॥

धांवत गेला षडानन । कौस्तुभ पाडला आसुडोन ।

मुष्टिघातें मस्तक फोडुन । घेतला प्राण दानवाचा ॥१७॥

वीरभद्रें असुर वाहिनी । सकल टांकिली संव्हारुनी ।

जयवाद्यें वाजवुनी । आले परतोनि शिवगण ॥१८॥

कौस्तुभ मित्र पावले मरण । ऐकोन शोक करी अतिदारुण ।

वीरास म्हणे चक्रपाणी नंदन । शत्रू मारीन मीच आतां ॥१९॥

क्रोधें भृकुटी चढवोन । सांवरोनी अश्ववाहन ।

क्रोधें आरक्त जाहले नयन । सेना घेऊन निघाला ॥१२०॥

अगण्य सेना वीरराणे । युद्ध कळांनी पूर्ण शहाणे ।

तयांस सिंधू तेव्हां म्हणे । व्यूह करणें सात तुम्हीं ॥२१॥

धमण आणि गंधासूर । वीरध्वज कांतवीर ।

महाकाय शार्दुल दुर्धर । धुर्तासुर सातवा तो ॥२२॥

ऐसे सात दानव वीर । सेना करोन व्यूहाकार ।

सात व्यूहासेना दुर्धर । येतां पाहिलीं शिवगणीं ॥२३॥

मयुरेशें काय केलें । तयावरी वीर धाडिलें ।

रणचतुर सुयोध भले । गर्जत चालिले रणमदें ॥२४॥

नंदी आणि पुष्पदंत । महाबळ भूतराज विख्यात ।

विकट दशलक्ष सेनेसहित । संहार करीत उठावले ॥२५॥

चपल निघाला गणाग्रणी । अर्धलक्ष सेना सवें घेउनी ।

बाणें त्रासिलीं दानव वाहिनी । प्रेतें मेदिनी आच्छादली ॥२६॥

अमित सेना तेव्हां घेऊन । वीरभद्र आणि षडानन ।

अग्नीजाळी शुष्कवन । तैसें सैन्य जाळिती शरें ॥२७॥

षडाननाशी गंधासुर । हाका मारोनि करी स्थिर ।

उभा राहे माझेसमोर । धरी धीर षडानना ॥२८॥

वीरभद्र आणीक दानव । दाविती परस्परें युद्धवैभव ।

नंदी आणि वीरराज हांव । धरोनियां भिडती ॥२९॥

ध्वजासुर पुष्पदंत । भूतराज महाअद्भुत ।

वीरश्रीमदें अतिउन्मत्त । भिडताती अतिनिकुरें ॥१३०॥

विकट आणि धुर्तासुर । रणीं भिडती परस्पर ।

चपल आणि शाद्वल थोर । करिती मार परस्परें ॥३१॥

चपलें मारोन खड्‌गघात । शाद्वल पाडिला रणीं मूर्च्छित ।

तो मूर्च्छा सांवरोन उठत । शरें ताडिती चपलाशी ॥३२॥

शाद्वल आकर्ण वोढोन वोटी । चपलावरी शर सोडी ।

चपल शरें तयास तोडी । अर्धा पाडी अवनी तळीं ॥३३॥

अर्धा येऊनि हृदयीं खोचला । तेणें चपल मूर्च्छित जाहला ।

घोर संग्राम विस्तारला । नाश जाहला बहुत वीरां ॥३४॥

वीर गर्जती सिंहनादें । गज किंकाळती तेथें मदें ।

वीर भिडती वाद्यनादें । पाय मागें न ठेविती ॥३५॥

शिरकमळाचि लाखोली । भूलिंगावरी पडली ।

शोणित नदी वाहूं लागली । झाली दरडी प्रेतांचीं ॥३६॥

वीरमस्तकाचे केंश कुरळ । तेच शोणित नदींत सेवाळ ।

खड्‌ग वाहती ते मत्स्य तुंबळ । खेटक कमठें तळपती ॥३७॥

काष्ठें अशीं वाहती प्रेतें । चामरें तींच वाढलीं गवतें ।

गजकलेवर सुसर तें । मांसकर्दम पैं तेथें ॥३८॥

वीरप्रमोदें संव्हारणीं । घोरांदर भयविवर्धिनी ।

शोणित वाहे नदी रणीं । वीरतारणीं स्वर्गप्रदा ॥३९॥

वीर पडले रणांगणीं । त्यांस वरुनी अप्सरामानिनी ।

नेत्या जाहल्या स्वर्गभुवनीं । नंदनवनीं क्रीडताती ॥४०॥

तीन दिवस अहोरात । देवासुरां युद्ध जाहलें अद्भुत ।

वीर पडले त्यांचें अमित । नाहीं जाण मानवेंद्रा ॥४१॥
रात्रीं होतां घोरांदर । करावया मांसाहार ।

पातले तेथें वनचर। शृगालादी इतर बहू ॥४२॥

सेनानी आणि गंधार । युद्ध करिती घोरतर ।

परस्परें मारिती शर । दोघे वीर बलाढय पैं ॥४३॥

सरली शस्त्रास्त्र सामुग्री । गंधासुर उड्डाण करी ।

मुष्टिघातें हाणोनि उरीं । मूर्च्छित करीं षडानना ॥४४॥

वज्रहत महापर्वत । तैसा पडला अंबासुत ।

सांवरुनी मूर्च्छा अद्भुत । बसे त्वरित रथावरी ॥४५॥

तेथून उडे षडानन । शत्रुस्यंदनावरी जाऊन ।

द्वादशहस्तें करी ताडण । मूर्च्छा दाटोन असुर पडे ॥४६॥

सांवरोनियां मूर्च्छा थोर । रथावरी चढला असुर ।

घनदाट वर्षतसे शर । केला संव्हार शिवगणाचा ॥४७॥

पाहतां स्वचमूचा नाश । बाणजाळें भुलवीं असुरास ।

विकळ पाहतां तयास । धरला चरणास गंधासुर ॥४८॥

भोवंडोनियां गरगरां । षण्मुखें आपटिलें असुरा ।

त्याचे शरिराचा जाहला चुरा । प्राण पुरा गेला त्याचा ॥४९॥

पाहतां गंधासुराचें निधन । वीरसेन आणि क्रोधन ।

तैसा धांवला शतघ्न । रणकंदन करावया ॥१५०॥

त्यांहीं वेष्टोन अंबासुत । शर वर्षती अपरिमित ।

षडानन बाणजाळ तोडित । मांडिलें अद्भुत युद्ध तेणें ॥५१॥

तीनबाण चापी लाविले । षण्मुखानें आकर्ण वोढिलें ।

असुरांवरी त्याणें टांकिले । जाऊनि भरले त्यांचे उरीं ॥५२॥

त्यातें मूर्च्छा बहुत दाटली । असुर पडले रथाखालीं ।

षडाननें हाक दिधली । कांपूं लागली अवनी तेव्हां ॥५३॥

सावध होवोनियां दानव । धरोनि धांवती युद्धहाव ।

शर वर्षती अभिन्नव । करिती रव भयंकर ॥५४॥

तिघे वर्षती शरजाळ । तेणें षण्मुख जाहला विव्हळ ।

त्याचे कंठीं पाश तत्काल । घालोनियां वोढिला ॥५५॥

बांधोन नेला कार्तिकेय । त्याची सेना पावली भय ।

कोणी न ठेविती पुढें पाय । हाहाःकार करिती मुखें ॥५६॥

धरोनि नेतां षण्मुखाला । हिरण्यगर्भ तेव्हां धांवला ।

रक्तलोचन वेगें आला । शामल पावला लागवेगीं ॥५७॥

हाका मारोनी भयंकर । असुरउरी मुष्टी प्रहार ।

वोपोनि मारिले त्याहीं असुर । शिवकुमर सोडवीला ॥५८॥

गण गर्जती जयजयकारें । ते वाजविती जयतुरें ।

बाणें केले दैत्य घाबरे । पळती सारे दशदिशां ॥५९॥

असुर धावला मदनकांत । त्यावरी वीरभद्र लोटला त्वरित ।

वातवेगे ये धांवत । शर सोडित अपार पैं ॥६०॥

जाहली दोघांस झोडधरणी । अंबर आच्छादिलें त्यांहीं बाणीं ।

असुर गर्जोनियां रणीं । दावी करणी शूरत्वपणें ॥६१॥

मदनकांतें सोडोनि शर । मूर्च्छित पाडिला वीरभद्र ।

मूर्च्छा सांवरोनियां सत्वर । गर्जना थोर केली तेणें ॥६२॥

चापीं लाविला शर निर्वाण । असुरांचे हृदयीं भेदला बाण ।

मदनकांतें सोडिला प्राण । झोडिलें रण सैनिकांनीं ॥६३॥

मदनकांत रणीं पडतां । महासुर धांवे तेव्हां तत्वता ।

तेणें निर्वाण बाण सोडितां । भयविव्हलता शिवगणीं ॥६४॥

दानव पाहोनी धुरंधर । नंदी धांवला त्याचेसमोर ।

श्रृंगें लाऊनी त्याचा उर । करी चूर क्षणमात्रें ॥६५॥

महासुराचा नंदी प्राण । घेतां धावले असुर दारुण ।

त्याहीं माजवोनियां रण । पाडिले गण अनेक तेथें ॥६६॥

ध्वजासुर आणी महाकायधृत । तिघांजणाशीं नंदी भिडत ।

त्याही केला नंदी मूर्च्छित । भुमीशी पडत नंदिकेश्वर ॥६७॥

नंदी पावतां पराभव । विक्राळ गर्जती ते दानव ।

त्यांचें पाहोनियां लाघव । धरिली हांव शिवगणीं ॥६८॥

पुष्पदंत आणि विकट । भूतराज चवथा चपलभट ।

चार पर्वत घेऊनि सुभट । मारिती दाट असुरांवरी ॥६९॥

पर्वतांतळीं सांपडले । सेनेसहित असुर मेले ।

मग निशाचर पळूं लागले । घायाळ गेले सिंधूपाशीं ॥१७०॥

विजयी जाहले शिवगण । विक्राळ शब्द करिती दारुण ।

वंदिती येवोन गुणेशचरण । आनंदोनी तेधवां ॥७१॥

श्रोते पुढें करा श्रवण । सिंधू माजवील महारण ।

मयूरेशें त्याचे छेदिले कर्ण । संग्राम दारुण होईल हो ॥७२॥

जयजयाजी विश्वनाथा । पुढें बोलवी आपली कथा ।

विनायक कविचा सदां माथा । राहो आतां तव चरणीं ॥७३॥

स्वस्ति श्रीगणेशप्रतापग्रंथ । श्रीगणेशपुराण संमत ।

क्रीडाखंड रसभरित । पंचविंशत्यध्याय गोड हा ॥अध्याय २५॥ओव्या॥१७४॥

अध्याय पंचविसावा समाप्त

N/A

References : N/A
Last Updated : September 22, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP