श्रीनवनाथ भक्तिसार - अध्याय २३

श्रीनवनाथ भक्तिसार पोथीचे पारायण केल्याने घरातील अनिष्ट बाधा दूर होते.


मच्छिंद्र व गोरक्षनाथ सौराष्ट्र गावांहून निघाले ते मार्ग क्रमीत तैलंगणांत गेले. तेथें त्यांनीं गोदेचे संगमीं स्नान करुन श्रीशिवाचें पूजन केलें. पुढें आंवढयानागनाथ, परळीवैजनाथ आदिकरुन तीर्थे केल्यावर महारण्यांत गर्भागिरी पर्वतावर जे वाल्मीकिऋषीचें स्थान आहे, तेथें ते आले. तें अरण्य महाभयंकर, वाट देखील धड उमगेना; अशा त्या घोर अरण्यांतून प्रवास करण्याचा प्रसंग आल्यामुळें मच्छिंद्रनाथ भिऊन गेला. त्याचें कारण असें होते कीं, स्त्रीराज्यातून निघतांना त्यास मैनाकिनी राणीनें जी सोन्याची वीट दिली होती ती कोणास न समजूं देतां त्याने झोळींत ठेविली होती. ती वीट चोर नेतील या धास्तीनें त्याच्या जिवांत-जीव नव्हता. ही सर्व भीति गोरक्षनाथाच्या लोभाबद्दल परीक्षा पाहण्यासाठींच होती, नाहीं तर मच्छिंद्रनाथास भीति कशाची असणार ! तो मार्गात चालत असतां गोरक्षास विचारी कीं, ह्या घोर अरण्यांत चोरांची धास्ती तर नाहीं ना ? हें ऐकून गुरुला चोराचें भय कशासाठीं असावें, ही कल्पना गोरक्षनाथाच्या मनांत उत्पन्न झाली. गुरुजवळ कांहीं तरी वित्त असलें पाहिजे व तें चोर लुटून नेतील ही भीति त्यांना आहे, असा त्यानें तर्क केला व ते भय निरसन होण्याचा उपाय योजावा, असा मनांत विचार करुन तो कांहीं उत्तर न देतां तसाच मुकाटयानें चालत होता. इतक्यांत त्यांस एक पाण्याचें ठिकाण लागलें तेथें मच्छिंद्रनाथानें गोरक्षास अंमळ थांबावयास सांगितलें व आपली झोळी त्याच्याजवळ देऊन तो शौचास गेला. तेव्हां गोरक्षनाथानें गुरुच्या झोळींत पाहिलें तों सोन्याची वीट दिसली. तेव्हां हेंच भीतीचें मूळ असें जाणून त्यानें ती वीट फेंकून देऊन तितक्याच वजनाचा एक दगड तींत भरुन ठेविला व आपण चालूं लागला. मच्छिंद्रनाथहि मागून तांतडीनें शौचाहून आल्यानंतर चालूं लागला. गोरक्ष बराच लांब गेल्यावर गुरु मागून येत होता. त्याची वाट पहात विसांवा घेत बसला, इतक्यांत एक विहीर त्याचे नजरेस पडली. तींत त्यानें स्नान केलें, मीननाथास स्नान घातलें व नित्यकर्म उरकून घेत आहे तो मच्छिंद्रनाथ जवळ आला आणि पूर्ववत्‌ ’येथून पुढें कांहीं भय वगैरे नाहीं ना ?’ असें विचारुं लागला. त्यावर ’भय होतें तें मागें राहिलें, आतां काळजी न वाहतां स्वस्थ असावें’ असें गोरक्षनाथानें उत्तर दिलें.

अशा उडवाउडवीच्या गोष्टी जेव्हां गोरख सांगूं लागला तेव्हां मच्छिंद्रनाथ चकित झाला.मग त्यानें आपणांस वीट मिळाल्याची हकीकत सांगितली व तिला कोणी चोरटे येऊन लुटून नेतील, ही मोठी मला धास्ती आहे, म्हणून बोलला. तें ऐकून गोरक्ष म्हणाला, अशाश्वत वित्त आतां आपल्याजवळ नाहीं म्हणून भय देखील नाहीं ! हें ऐकून कांहीं तरी दगा झाल्याची कल्पना मच्छिंद्रनाथाच्या मनांत उद्भवली व त्यास तळमळ लागली. तेव्हां गोरक्षानें मच्छिंद्रनाथाचा हात धरला आणि उभयतांनीं आपापल्या झोळ्या घेऊन पर्वतावर जाण्याची तयारी केली. निघण्यापूर्वी झोळी तपासतां झोळींत वीट नाहीं असें पाहून मच्छिंद्र गोरक्षास पुष्कळ टाकून बोलला व रडून त्यानें एकच गोंधळ केला. त्या दुःखानें तो गडबडां लोळूं लागला व मोठमोठयानें रडून पिशाच्चासारखा चौफेर फिरुं लागला. त्यानें गोरक्षास नाहीं नाहीं तें बोलून शेवटीं निघून जा. तोंड दाखवूं नको, इतकें सुद्धां सांगितलें.

मच्छिंद्रनाथाचे तें काळजास झोंबणारे शब्द ऐकून देखील गोरक्ष उगाच राहिला व त्याचा हात धरुन त्यास पर्वतशिखरावर घेऊन गेला. जातांना पर्वतावर गोरक्षानें सिद्धयोगमंत्र जपून लघवी केली. त्यामुळें तो सर्व पर्वत सुवर्णमय होऊन गेला. मग लागेल तितकें सुवर्ण नेण्यास त्यानें गुरुस विनंति केली. तें अघटित कृत्य पाहून त्यानें गोरक्षाची वाहवा करुन त्यास शाबासकी दिली आणि त्यास आलिंगन देऊन पोटाशीं धरुन म्हटलें, बाळा गोरक्षा, तुझ्यासारखा परीस सोडून सोन्याला घेऊन काय करुं ? अशा प्रकारच्या अनेक उपमा देऊन मच्छिंद्रनाथानें त्याची पुष्कळ वाखाणणी केली.

गोरक्षानें गुरुच्या बोलण्याचा तो झोंक पाहिला, तेव्हां आजपर्यंत सुवर्णाची वीट कोणत्या कारणास्तव जपून ठेविली होती तें मला सांगावें, असा त्यानें आग्रह धरिला. तेव्हां मच्छिंद्रनाथ म्हणाला कीं, माझ्या मनांत अशी इच्छा होती कीं, आपल्या देशीं गेल्यावर साधुसंतांची पूजा करुन एक मोठी समाराधना घालावी. तें ऐकून तुमचा हा हेतु मी पुरवितों, म्हणून गोरक्षानें त्यास सांगितलें. मग गोरक्षानें गंधर्वास्त्रमंत्र म्हणून भस्माची एक चिमटी स्वर्गाकडे फेंकलीं; त्याबरोबर चित्रसेन गंधर्व येऊन नाथास वंदन करुन काय आज्ञा आहे म्हणून विचारुं लागला. तेव्हां गोरक्षानें सांगितलें कीं, आणखी कांहीं गंधर्वांस बोलाव आणि त्यांना चौफेर पाठवून बैरागी, संन्यासी, जपी, तपी, संतसाधु, देव, गंधर्व, दानव किन्नर या सर्वांस येथें आणावें. कां कीं, आम्हांस एक टोलेजंग जेवणावळ घालावयाची आहे. मग चित्रसेनानें शंभर गंधर्व आणून जिकडे तिकडे पाठविलें. ते गंधर्व पुष्कळांस आमंत्रण करुन त्यांस घेऊन आले. नवनाथ, शुक्राचार्य, दत्तात्रेय, याज्ञवलक्य, वसिष्ठ, वामदेव, कपिल, व्यास, पराशर, नारद, वाल्मिकि, आदिकरुन मुनिगण तेथें थोडक्याच वेळांत येऊन पोहोंचले.

नंतर गोरक्षनाथानें मच्छिंद्रनाथास सांगितलें कीं, भोजनसमारंभास पुष्कळ मंडळी जमली आहे; तरी तुमची मी मागें मार्गांत टाकून दिलेली सोन्याची वीट आणून देतों, ती घेऊन समारंभ साजरा करावा. यावर मच्छिंद्रनाथानें त्याचें समाधान केलें कीं, बाळा तुझ्यासारखा शिष्य असल्यावर मला यःकश्चित् सोन्याची वीट घेऊन काय करावयाची आहे ? मग गोरक्ष म्हणाला, सर्व यथासांग होईल; पण हा सर्व आपल्या कृपेचा प्रताप, मजकडे कांहीं नाहीं, असें बोलून त्यानें चरणांवर मस्तक ठेविलें व मी सर्व व्यवस्था लावून बंदोबस्त करितों, आपण कांहीं काळजी न करितां स्वस्थ असावें असे सांगितलें.

नंतर त्यानें अष्टसिद्धींस बोलावून त्यांच्याकडे स्वयंपाकाचें काम देऊन उंची उंची अनेक पक्वान्नें तयार करण्याची आज्ञा केली व बंदोवस्त नीट राहून कांहीं एक न्यून न पडूं देण्याची सक्त ताकीद दिली. मग त्यानें एकंदर कामाची व्यवस्था लाविली व उत्सवाचा बंदोवस्त उत्तम प्रकारचा ठेविला. त्या वेळेस सर्वांना अत्यानंद झाला.

या भोजनसमारंभांत गहिनीनाथ आले नव्हते. म्हणून गोरक्षनाथानें ही गोष्ट मच्छिंद्रनाथास सुचविली. तेव्हां मधुब्राह्मणाकडे एका गंधर्वास पाठवून पुत्रासह त्यास घेऊन येण्यास सांग, म्हणजे तो त्यास आणील, असें मच्छिंद्रनाथानें गोरक्षास सांगितलें. त्यावरुन गोरक्षनाथानें चित्रसेनगंधर्वास सर्व वृत्तांत कळविला व त्याच्या अनुमतीनें एक पत्र लिहविलें. तें त्यानें सुरोचन नामक गंधर्वाजवळ दिले. ते त्यानें कनकगिरीस जाऊन त्या मधुब्राह्मणास दिले व इकडील सविस्तर मजकूर सांगितला. मग तो ब्राह्मण मोठया आनंदानें मुलास आणि गहिनीनाथास घेऊन निघाला, तो मजल दरमजल करीत करीत गर्भाद्रिपर्वतीं येऊन पोहोंचल्यावर त्यानें गहिनीनाथास मच्छिंद्रनाथाच्या पायांवर घातले. त्या वेळेस त्याचे वय सात वर्षाचें होते. मच्छिंद्रनाथ मुलाचे मुके घेऊं लागला. त्या नंतर हा गहिनीनाथ करभजननारायणाचा अवतार असल्याचे त्यानें सर्वांस निवेदन केलें.

त्या वेळीं शंकरानें मच्छिंद्रनाथास सांगितलें कीं, आम्हास पुढें अवतार घ्यावयाचा आहे, त्या वेळीं मी निवृत्ति या नांवानें प्रसिद्धीस येईन व हा गहिनीनाथास अनुग्रह करील; यास्तव यास अनुग्रह देऊन सकल विद्यांमध्यें प्रवीण करावें. हें ऐकून मच्छिंद्रनाथानें गोरक्षनाथाकडून गहिनीनाथास लागलाच अनुग्रह देवविला. तसेंच संपूर्ण देवांच्या समक्ष त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेविला हा समराधनेचा समारंभ एक महिनाभर सतत चालला होता. मग गोरक्षानें कुबेरास सांगितलें कीं, तूं हा सुवर्णाचा पर्वत घेऊन जा आणि ह्याच्या मोबदला आम्हांस अमोल वस्त्रें-भूषणें दे; म्हणजे तीं सर्व मंडळीस देऊन रवाना करतां येईल. हें भाषण ऐकून कुबेरानें येथील धन येथेंच असूं द्या. आज्ञा कराल त्याप्रमाणें वस्त्रालंकार मी घेऊन येतों. मग त्यानें वस्त्रांचीं दिंडें व तर्‍हेतर्‍हेचे पुष्कळ अलंकार आणून दिले. तीं वस्त्रें भूषणें सर्वांना दिलीं; याचकांना द्रव्य देऊन त्या सर्वांच्या इच्छा तृप्त केल्या व मोठया सन्मानानें सर्वांची रवानगी करुन दिली.

समारंभ झाल्यावर उपरिक्ष वसूसमागमें मीननाथास सिंहलद्वीपास त्याच्या तिलोत्तमा मातोश्रीकडे पाठवून दिलें. त्यानें मीननाथास तिलोत्तमेच्या स्वाधीन केलें व मच्छिंद्रनाथाचा सारा वृत्तांत तिला सांगितला. तेव्हां मच्छिंद्रनाथाच्या भेटीची निराशा झाल्यामुळें तिच्या डोळ्यांस पाणी आले. तें पाहून एक वेळ तुला मच्छिंद्रनाथ भेटेल, तूं कांहीं चिंता करुं नको, असें सांगून उपरिक्षवासु आपल्या स्थानीं गेला. मग ती मुलावर प्रीति करुन आनंदानें राहिली.

इकडे गर्भाद्रिपर्वतावर गहिनीनाथास अभ्यास करविण्याकरितां गोरक्ष व मच्छिंद्रनाथ राहिले. उमाकांतहि तेथेंच होते. त्या सुवर्ण पर्वतावर अदृश्यास्त्राची योजना करुन कुबेर आपल्या स्थानीं गेला. अदृश्यास्त्राच्या योगानें सुवर्णाचा वर्ण झांकून गेला; परंतु त्या पर्वतावर शंकर राहिले. ते अद्यापि तेथेंच आहेत. त्यास ’म्हातारदेव’ असें म्हणतात. त्याच्या पश्चिमेस कानिफनाथ राहिला; त्यानें त्या गांवाचें नांव मढी असें ठेविलें. त्याच्या दक्षिणेस मच्छिंद्रनाथानें वसति स्थान केलें. त्याच्या पूर्वेस जालंदरनाथ राहिला. त्याच पर्वताच्या पलीकडे वडवानळ गांवीं नागनाथानें वस्ती केली. विटे गांवांत रेवणसिद्ध राहिला. गर्भाद्रिपर्वतावर वामतीर्थी गोरक्षनाथ राहिला. त्यानें तेथेंच गहिनीनाथाकडून विद्याभ्यास करविला. एका वर्षांत तो सर्व विद्येंत निपुण झाला. नंतर त्यास मधुब्राह्मणांकडे पाठवून दिलें. पुढें त्या ठिकाणीं बहुत दिवसपर्यंत राहून शके दहाशें या वर्षीं त्यांनीं समाधि घेतल्या.

कबरीच्या घाटाच्या समाधि बांधण्याचा मुख्य मुद्दा हाच होता कीं, पुढें यवनराजाकडून उपद्रव होऊं नये. एकदां औरंगजेबबादशहानें ह्या समाधि कोणाच्या आहेत म्हणून विचारल्यावरुन लोकांनीं त्यास सांगितलें कीं, तुमच्या पूर्वजांच्या आहेत. मठांत कान्होबा; पर्वती; मच्छिंद्र, त्याच्या पूर्वेस जालंदर, त्याच्या पलीकडे गहिनीनाथ असें ऐकून त्यानें तीं नांवें पालटून दुसरीं ठेविलीं, तीं अशीं : जानपीर असें नांव जालंदरास दिलें. गैरीपीर हें नांव गहिनीनाथास ठेविलें. मच्छिंद्राचें मायाबाबलेन व कानिफाचें कान्होबा अशी नांवें ठेवून तेथें यवन पुजारी ठेविले. कल्याण कलयुगीं बाबाचैतन्य यांची समाधि होती, पण तें नांव बदलून राववागशर असें नांव ठेविलें. गोरक्ष आपल्या आश्रमीं सटव्यांस ठेवून तीर्थयात्रेस गेला.

N/A

References : N/A
Last Updated : June 09, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP