मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|उपासना खंड|
अध्याय ५९

उपासना खंड - अध्याय ५९

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(दिंडी)

शूरसेनानें इंद्रास पूजियेलें ।

कसें अपुलें हो पूर वरी चाले ।

यत्‍न मजला सांगणें योग्य साचा ।

करिन लवलाहें यत्‍न वदे त्याचा ॥१॥

शूरसेनाला इंद्र वदे हें कीं ।

असो ब्राह्मण वा क्षात्रकुला जो कीं ।

करी संकष्टी नेम विधी सांग ।

तदिय पुण्याचें उदक तया माग ॥२॥

एक वर्षाचें पुण्य अम्हां लागे ।

पूर तेव्हां तें सहज चढूं लागे ।

असें ऐकुनियां शूरसेन बोले ।

ऐक व्यासा तें पुढति काय झालें ॥३॥

(गीति)

सुखकर मला अती हें, व्रत वदलां त्यास देवता कोण ।

हें व्रत कसें करावें, यापासुन पुनित जाहला कोण ॥४॥

इंद्र वदे भूपाला, पूर्वी नारद कथीत कृतवीर्या ।

केला असे तुला तो, सांगें इतिहास ऐक नृप-वर्या ॥५॥

या इतिहासें तुजला, संकष्टीचें महात्म्य समजेल ।

यास्तव तुजला कथितों, देईं अवधान कार्य करशील ॥६॥

पूर्वी जगतामाजी, नामें कृतवीर्य धर्मशील असा ।

भूपति पराक्रमी तो, होता, होता धनाढय सुज्ञ असा ॥७॥

त्याच्या सदनीं ब्राह्मण, भोजन चाले सदैव नियमानें ।

बारा हजार गणती, होते देई तयांस बहु दानें ॥८॥

त्याची कांता साध्वी, नाम सुगंधा तशीच प्रेमळ ती ।

कीर्ती जगांत गाजे, संतानाच्या सुखांत ये कमती ॥९॥

संतानसुखासाठी, दंपत्यांनीं बहूत ते यत्‍न ।

केले परंतु त्यांना, झालें नाहीं तयांस सुतरत्‍न ॥१०॥

पुष्कळ वर्षें झालीं, पुत्राविण भूपतीस ये वीट ।

यास्तव राज्य कराया, मंत्र्यांना दीधलीहि वहिवाट ॥११॥

दंपत्य तपासाठीं, कांतारीं जात वल्कलाधारी ।

तपसा करितीं झालीं, भक्षुनि पर्णे तसाच मेघ-अरी ॥१२॥

उभयें जर्जर झालीं, पाहे नारद तयांस त्या विपिनीं ।

स्वर्गी कृतवीर्याच्या, जनकाला विदित वृत्त तें करुनी ॥१३॥

सांगे पुत्रासाठीं, तीव्र तपा करुनियां स्नुषा-सूत ।

झाले मरणोन्मुख ते, जगतिल सूतास देखुनी खचित ॥१४॥

स्वर्गांतुन निघतांना, देखियलीं कुंभिपाकिं दंपत्यें ।

होतीं भ्रुशुंडि मुनिचीं, माता-पितरें कठीत दुःखातें ॥१५॥

पाहुन प्रकार सारा, नारद गेला भ्रुशुंडि मुनिपाशीं ।

वृत्तान्त तया सांगे, ऐकुन मुनि चकित होत त्यासरशीं ॥१६॥

क्षणैकदृष्टी झांकुन, अंतरदृष्टी बघून त्या मुनिनें ।

त्यांच्या उद्धारासी, योजियला तो उपाय मननानें ॥१७॥

त्यानें गजाननाचें, ध्यान करुनियां तयास आणविलें ।

प्रभुच्या हस्तावर तें, संकष्टीच्या व्रतोदका दिधलें ॥१८॥

बोले गजाननासी, भक्तीपूर्वक व्रतास कीं केलें ।

यास्तव या फलयोगें, उद्धारावें कुळास मुनि बोले ॥१९॥

पडतां गजाननाच्या, हस्तावर पुण्य-उदक तेव्हांच ।

झाले पुनीत सारे, नरकांतुन नेति दूत ते साच ॥२०॥

आणुन विमान पितरां, बसवुनि स्वर्गास नेति ते दूत ।

एक दिनाच्या पुण्यें, तरले सारे प्रकार अद्‌भूत ॥२१॥

इंद्र वदे भूपाला, केलें व्‍रत हें अजन्म कीं ज्यानें ।

उड्डाण करी भूपा, पुर त्याच्या तो बघेल पुण्यानें ॥२२॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP