मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|द्वितीय परिच्छेद|
होळीचा पूजाविधि

धर्मसिंधु - होळीचा पूजाविधि

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयांत नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


देशकालादिकांचा उच्चार केल्यावर

'सकुटुम्बस्य मम ढुण्ढाराक्षसीप्रीत्यर्थं तत्पीडापरिहारार्थं होलिकापूजनमहं करिष्ये'

असा संकल्प करून, वाळलेली लाकडे व गोवर्‍या यांची रास करावी आणि ती विस्तवाने पेटल्यावर,

'अस्माभिर्मयसंत्रस्तैः कृता त्वं होलिके यतः ।

अतस्त्वां पूजयिष्यामि भूते भूतिप्रदाभव ॥

या पूजा मंत्राने 'श्रीहोलिकायैनमः श्रीहोलिकां आवाहयामि' असे आवाहन केल्यानंतर 'होलिकायैनमः' या वाक्याने आसन, पाद्य वगैरे षोडशोपचार देऊन, पेटलेल्या अग्नीला तीन प्रदक्षिणा घालाव्या. गायन, वादन, हास्य व मनःपूत बडबड ही सर्वांनी निःशंकपणे करावीत. या बाबतीत ज्योतिर्निबन्धग्रंथात असे सांगितले आहे की, शुद्ध पंचमीपासून वद्य पंचमीपर्यंतच्या ज्या तिथि पुण्यदायक आहेत, त्यातल्या दहा तिथि उत्तम असून, अनंत पुण्यकारक आहेत. या दिवसात लाकडाची चोरी करून, ती लाकडे पुनवेला चाण्डाळ अथवा बाळंतीण यांच्या घरातून बालकाकडून आणविलेल्या विस्तवाने पेटवावीत. होळी गावाबाहेर अथवा गावात करावी. राजाने वाद्ये वाजविल्यावर स्नान करून शुचिर्भूत व्हावे आणि पुण्याहवाचन केल्यावर पुष्कळ दाने देऊन होळी पेटवावी. नंतर दुधातुपाने ती विझवून, नारळ व महाळुंगे वाटावीत. ती रात्र-गायन, वादन नृत्य वगैरेत लोक घालवितात. पेटलेल्या होळीला तीन प्रदक्षिणा घालून, लोक शंखनाद (बोंब) करतात. बोंब मारणाराने ती दुष्टा राक्षसी तृप्त व्हावी असा लोकांचा त्यात उद्देश असतो. रात्री याप्रमाणे होळीचा उत्सव केल्यानंतर, प्रतिपदेच्या सकाळी चांडाळाला पाहून जो स्नान करतो, त्याचा पापनाश होऊन आधिव्याधींच्या पीदेपासून तो मुक्त होतो. रोजची अवश्यक कर्मे करून पितृतर्पण केल्यावर, होळीच्या राखेला सर्व दुष्फलांचा निरास होण्यासाठी जे वंदन करावे, त्याचा मंत्र असा-

'वन्दितासि सुरेंद्रेण ब्रह्मणा शंकरेणच ।

अतस्त्वं पाहिनो देवि भूते भूतिप्रदा भव॥'

होळीचा दिवस आणि तिच्या पुढचा करि नावाचा दिवस हे शुभकार्याला वर्ज्य करावेत. कारण होळी, ग्रहण, भावुका (वैशाखी अमावास्या) अयनसंक्रांतीचे दिवस व प्रेतदहन केल्याचा दिवस हे सारे व त्याच्या पुढचे करिनावाचे दिवस, हे सर्व शुभकार्यात वर्ज्य करावेत असे वचन आहे. ग्रहण, अयन, संक्रांति व प्रेतदहनाचा दिवस यात मध्यरात्रीच्या विभागाने पूर्वदिवस व करिदिवस यांचा निर्णय समजावा. फाल्गुनी पुनवेला मनुष्याने व्रतस्थ राहून, पुरुषोत्तम गोविन्दाला झोपाळ्यावर झोके द्यावेत व त्याचे दर्शन घ्यावे, म्हणजे त्याला वैकुंठप्राप्ति होते.

N/A

References : N/A
Last Updated : May 05, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP