मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|द्वितीय परिच्छेद|
कार्तिकस्नान

धर्मसिंधु - कार्तिकस्नान

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


आश्विनशुद्धातल्या दशमी, एकादशी अथवा पौर्णिमा यांपैकी कोणत्या तरी एका तिथीवर आरंभ करून, दोन घटका रात्र शिल्लक राहिली असता, कोणच्या तरी तीर्थावर जाऊन, एक महिनाभर दररोज कार्तिकस्नान करावे. स्नानाचा प्रकार असाः - प्रथम विष्णूचे स्मरण करून, देशकालादिकांचा उच्चार केल्यावर,

नमो कमलनाथाय नमस्ते जलशायिने ।

नमस्तेस्तु ह्रषीकेश गृहाणार्घ्यं नमोस्तुते ॥'

या मंत्राने अर्घ्य देऊन,

'कार्तिकेऽहं करिष्यामि प्रातःस्नानं जनार्दन ।

प्रीत्यर्थं तव देवेश दामोदर मयासह ॥

ध्यात्वाहं त्वांच देवेश जलेऽस्मिन्स्नातुमुद्यतः ।

तव प्रसादात्पापंमे दामोदर विनश्यतु ॥'

या मंत्रांनी स्नान करावे आणि

'नित्ये नैमित्तिके कृष्ण कार्तिके पापनाशने ।

गृहाणार्घ्यं मया दत्तं राधयासहितो हरे ॥

व्रतिनः कार्तिके मासि स्नातस्य विधिवन्मम ।

गृहाणार्घ्यं मया दत्तं राधयासहितो हरे ॥'

या मंत्रांनी पुन्हा दोन वेळा अर्घ्य द्यावे. कुरुक्षेत्र, गंगा, पुष्कर वगैरे विशेष तीर्थांच्या ठिकाणी या (स्नाना) चे विशेष फळ जाणावे. ह्या कार्तिकस्नानाच्या बाबतीत आणखी जो एक विशेष आहे, तो असा जो कोणी सर्व कार्तिक महिनाभर जितेंद्रिय राहून, रोज स्नान, जप, हविष्यान्न भक्षण करून राहतो, तो सर्व पापांपासून मुक्त होतो. भागीरथी, शिव आणि सूर्य यांचे स्मरण करून, पाण्यात शिरावे. बेंबीपर्यंत पाण्यात उभे राहून व व्रती होऊन यथाविधि स्नान करावे. हे कार्तिकस्नान, प्रातःस्नान व प्रातःसंध्या केल्यावर करावे; कारण ती कर्मे केल्यावाचून इतर कर्मे करण्यास अधिकार नाही. प्रातःसंध्या जरी सूर्योदयी संपवावी असे आहे तरी या संबंधाने विशेष वचन असल्याने, सूर्योदयापूर्वीच संध्या आटपून कार्तिकस्नान करावे, असे निर्णयसिंधूत सांगितले आहे. ही गोष्ट इतर ग्रंथात सांगितलेली नाही. अशा प्रकारचे स्नान अशक्ताने तीन दिवस करावे. कार्तिकातल्या इतर व्रतांनाही याच वेळी आरंभ करावा. ती व्रते येणेप्रमाणे- कार्तिकात एकलक्ष तुळशी पानांनी जो हरीचे अर्चन करतो, त्याला प्रत्येक पानाबद्दल मुक्तीसारखे फळ मिळते. तुळशीच्या मंजिर्‍यांनी जर हरि व हर यांचे अर्चन केले तर मुक्ति मिळते. तुळस लावणे तिचे पालन करणे व तिला स्पर्श करणे या गोष्टी केल्यास पापाचा नाश होतो. तुळशीच्या सावलीत श्राद्ध केल्याने पितरांची तृप्ति होते. ज्या घरात तुळस असते ते घर तीर्थाप्रमाणेच होय; त्या घरात यमदूत येत नाहीत. असे तुळशीचे माहात्म्य आहे.आवळीचेही जे असेच माहात्म्य आहे, ते असेः - कार्तिकात आवळीखाली निरनिराळ्या अन्नांनी हरीचा संतोष करावा, भक्तीने ब्राह्मणाला जेवू घालावे व आपण बांधावांसह भोजन करावे. आवळीच्या छायेत श्राद्ध आणि आवळीच्या पानाफलांनी हरिपूजन या गोष्टी केल्याने मोठे फळ मिळते; कारण देव, ऋषी व यज्ञांना योग्य अशी तीर्थे यांची वरती आवळीत असते, असे वचन आहे. या महिन्यांत हरिजागरविधि करावा. 'कार्तिकात दामोदराच्या सन्निध जो अरुणोदयापर्यंत जागरण करतो, त्याला हे षडानना, हजार गाईंच्या दानाचे फळ मिळते. शिव अथवा विष्णु यांची देवळे नसल्यास इतर कोणत्याही देवळात अथवा पिंपळाच्या मुळापाशी, अगर तुळशीच्या वनात जो विष्णूच्या नामप्रबंधाचे गायन विष्णूच्या समीप करतो, त्यास सहस्त्र गोदानाचे फळ मिळते. (विष्णूजवळ) वाद्य वाजविणारालाही वाजपेय यज्ञाचे फळ मिळते. नाचणारालाही सर्व तीर्थात स्नान केल्याचे फळ मिळते. या गोष्टी करणाराला जो द्रव्य देतो त्यालाही सर्व फळे मिळतात. अर्चन किंवा दर्शन ही केल्याने षष्ठांश फळ मिळते; असे कौस्तुभात सांगितले आहे. वरच्या सासर्‍यांचा जर अभाव असेल तर विष्णुभक्त ब्राह्मण, पिंपळ किंवा वड यांची सेवा करावी असेही कौस्तुबात म्हटले आहे. कार्तिकात कमळे, तुळशी, जाई अगस्त्याची फुले ह्यांनी पूजा करून दीपदान देणे योग्य आहे. कार्तिक महिन्याचा उपास-वानप्रस्थ, संन्यासी, विधवा व गृहस्थ यांनी करू नये. जे व्रती असतील त्यांनी कार्तिकांत कृच्छ्र, अतिकृच्छ्र अथवा एकरात्र किंवा त्रिरात्र प्राजापत्य करावे. शाकाहार, दुग्धाहार, फलाहार किंवा यवान्नाहार करावा.

N/A

References : N/A
Last Updated : May 05, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP