मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोवाडे|शिवाजी महाराज|
नरवीर मालुसरे

शिवाजी महाराजांचा पोवाडा - नरवीर मालुसरे

इतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.


(चाल :- महाराज शिवाजी छत्रपतीची कीर्ति )

चौक १

धन्य धन्य शिवाजी महाराज पराक्रमी महान् ।

महा मत्त मारिला ज्याने अफझुलखान ।

शाहिस्त्याची बोटें तोडुनी केला हैराण ।

कांपती यवन थरथरां, म्हणती अंतरा,

शिवाजी खरा, बडा सैतान ॥ध्रु०॥

एके दिवशी जिजाबाई विचार करुनी स्वमनाचा ।

शिवाजीस प्रश्न पुसे आपल्या राजकारणाचा ।

सिंहगडावरी अम्मल अझुनी यवनांचा ।

गड किल्ल्याचा हा तात, घेऊनी हातात,

पुणें प्रांतात, खुशाल तुम्ही नाचा ॥

केला विचार शिवाजीनें मातुश्रीच्या वचनाचा ।

आणविला मित्र जिवलग सखा प्राणांचा ।

तानाजी मालुसरे अवतार भीमसेनाचा ।

त्याच्या घरीं पाहुण्यांचा मेळा, झाला होता गोळा,

आनंद सोहळा, मुहूर्त लग्नाचा ॥

सूर्याजी बंधु आणि शेलार मामा त्याचा ।

म्हातारा ऐंशी वर्षाचा लढवय्या साचा ।

बाराशें मावळे जमाव घेऊन लोकांचा ।

आला रायगडावरी शीघ्र, स्वरुप त्यांचे उग्र,

जसा काय व्याघ्र, कलिजा राजाचा ॥

चाल

तानाजी मोठा बलवान, धिप्पाड महान्,

विस्तीर्ण भाळ, स्वरुप विक्राळ ॥

दंडासारख्या मिशा गुलढबू, त्यावरी लिंबू राहे सूढाळ,

हृदय विशाळ ॥ हत्तीचे धरुनिया सुळे,

उभा करी बळें वीर्य तेजाळ, कर्दनकाळ ।

चाल : दुसरी

दांडपट्टा करवाईत नंबर पहिला खरा ।

शिवाजीस भेटतां लवून केला मुजरा ।

कां बोलविले मज सांगा राजेश्वरा ।

काय संकट पडलें सत्य सांग मैतरा ।

राव म्हणे जिजाईस पुस जाऊनि चातुरा ।

आली जिजाबाई पंचारती घेऊनी करा ।

शिवाजीस ओवाळुनी मग तानाजी वीरा ।

ओवाळु लागतां चकित मालुसरा ।

मोडते

काय घालू ओवाळणी राजमाता ही महान ।

म्हणे जिजाबाई शिव थोरला पुत्र तूं लहान ।

तुम्ही दोघे समान मज ओवाळीलें प्रेमानें ।

काय ओवाळणी अवघड, द्यावा सिंहगड,

वैरी तुझ्याकडे वांकवील मान ॥१॥

चौक २

ऐकुनी खवळला व्याघ्र जसा काय दरिचा ।

गर्जना करुनी आदळला पाय आणि बरचा ।

उचलुनी विडा बोलिला हेतु अंतरीचा ।

जाऊनी सिंहगड घेतो, तरिच मागें येतों,

नातरि धरितों, रस्ता स्वर्गीचा ॥

घ्यावा मुजरा शिवाजी शेवटला मित्राचा ।

जरी मेलों तिकडे तरी सांभाळ करी पुत्राचा ।

घरी लहान रायाजी येवढा हेतु अंतरीचा ।

द्यावें भोजन सकळ सैन्यास, हुरुप जाण्यास,

उदयभान्यास दरारा आमुचा ॥

भोजन घालून सर्वांस विडा पैजेचा ।

उचलुनी तानाजी शब्द करी मौजेचा ।

हत्यारबंद जमाव करुनी सार्‍या फौजेचा ।

मावळे निघाले फडफडाड, शब्द कडकडाड,

धरला झडझडाड, रस्ता सिंहगडाचा ।

चाल

भाला बरची तलवार पट्टा,

बाण तीर कमटा असा परिवार, चपळ अनिवार ॥

सिंहगड फार अवघड, भयंकर चढ चढले भराभर, केवळ वान्नर ॥

माघ महिना वद्य अष्टमी, काळोख नामी, गडद अंधार, रात्र दीड प्रहर ॥

चाल : दुसरी

चाळीस हात उभा कडा किल्ला अवघड ।

बांधीव तटावर बुरुज तिकोनी गड ।

किल्ल्यावरी सोडली यशवंती घोरपड ।

तीन वेळ परतली मग झाली चरफड ।

रागे धरुन सोडितां तिने धरिली पक्कड ।

तानाजी शेलार मामा सर्वांच्या पुढें ।

तीनशें चढून वर गेले वीर फक्कड ।

इतक्यात तुटला दोर पडले वरकड ।

मोडते

घस्तीस लागली चाहुल गनिम आया कोण ।

एक शिपाई आला पाहवया धरुनी अभिमान ।

ठार केला त्यास पुढे येतां मारुनी बाण ।

बाकीचे पळाले धडधडा, गनिम आया बडा,

चढके अभी कडा खडा दुष्मान ॥२॥

चौक ३

उदयभानू बाटगा रजपूत मगरमस्त ।

एक गाय दीड शेळी नित्य खाऊन करी फस्त ।

अफु, गांज्या, दारुच्या निशेंत निशिदिन मस्त ।

अठरा बिब्या भोगि महालांत, विषय-ख्यालांत,

धुंद तालांत, बलाढय प्रस्थ ॥

त्याच्या पुढें युद्धाला कोण टिकेना दरोबस्त ।

चांदवडी रुपये चिमटीनें तोडितो नुस्त ।

तेल्याची पहार बडी वाकवुनी भारदस्त ।

थट्टेनें करुनियां सरी, बिबीच्या तरी, गळ्याभीतरी, बैसवी तुस्त ॥

आठराशें शिपाई रजपूत पठाण मदमस्त । वेशीच्या आंत सदरेवरी बंदोबस्त ।

रात्रीची वेळ लोक निजले होते काय सुस्त । अशा संधित केला हल्ला,

झाला गलबला, करुन भिसमिल्ला, कापली घस्त ॥

तानाजीनें केली कापाकापी धरुनियां शिस्त ।

पांचशें पठाण कापुनी केले उध्वस्त ।

किती जखमी झाले कितीकांचे तुटले हस्त ।

रक्ताचा झाला कर्दम, पाहून एकदम, पळाले अधम, करुनी शिकस्त ॥

चाल

उदेभानु आणि तानाजी, सहजासहजीं येक झाली नजर, भिडले सामोर ॥

द्वंद्व युद्ध झालें मग सुरु, हिमाचळ मेरु जसे गिरीवर, लढाई घनघोर ॥

एकाचे एकाला वार, झाले अनिवार, उभयता वीर, जाहले ठार ॥

चाल : दुसरी

इतुक्यांत दरवाजा भवानीनें उघडिला ।

सूर्याजी मावळे घेऊनियां वर आला ।

तानाजी पडला पाहुनी फार खवळला ।

गर्जनायुक्त रणीं व्याघ्र जसा धांवला ।

मोड करुनि शत्रुचा पुरा किल्ला घेतला ।

कितीकांनी भीतीनें आपुल्या हातीं आपुला ।

तटावरुन उडया घालूनी जीव काय दिला ।

जय सूचक केंबळ घरासी अग्नी लाविला ।

रायगडावरुनी तो शिवाजीनें पाहिला ।

त्या आनंदात म्हणे धन्य सुभेदार भला ।

मोडते

दुसर्‍या दिवशी फडकले मराठयांचे निशाण ।

तीनशे मावळे झाले निकामी सैन्य ।

शिवाजीस समजतां सकळ वर्तमान ।

सिंह गेला आणि गड आला, देव कोपला,

उपाय नाहीं त्याला, भरले मग नयन ॥३॥

चौक ४

जिजाबाईस झालें दुःख त्यावेळी भारी ।

धन्य धन्य तानाजी मोक्षाचा अधिकारी ।

ओवाळणी घालून काय गेला स्वर्गा माझारीं ।

धाय धाय जिजाबाई रडे, बहूत ओरडे, असा वीर पुढें, न होय निर्धारी ॥

सूर्याजीस दिली त्या गडावरची मुखत्यारी ।

रणीं पडले त्यांच्या वारसाला द्रव्य दिलें भारी ।

कडी तोडे कितीकांस दिल्या ढाल तलवारी ।

खूष केले सकळ सैनिका, इनाम किती एका,

पराक्रम पक्का, पाहुन बाहादुरी ॥

रायाजीनें लग्न मग केलें आपुल्या द्वारी ।

रद्द केली प्रतीकुळ समजुनी पहिली नवरी ।

रुपवान कुलवान दुसरी आणुनिया गहिरी ।

समारंभ करुनी ठाकठीकी, देउन देशमुखी, रायाजीस पक्की, दिली सरदारी ॥


चाल

पुढें शिवाजीच्या मर्जीनें, त्या सूर्याजीनं पराक्रम केला, ऐका दाखला ॥

गड किल्ला पुरंधर, डोंगरावर, चढविला हल्ला, यवन फार भ्याला ॥

उदेभानुचा तिथें भाउ, पाहूनी झाला म्याऊ, त्या सूर्याजीला, शरण मग आला ॥

चाल दुसरी

आला आला सूर्याजी आला दंड ठोकुन ।

उदेभानुची दुर्दशा सकळ ऐकुन ।

चट सारे मोंगल पठाण भ्याले देखून ।

केला स्वधीन किल्ला आपुला बोज राखून ।

शिवाजीचें निशाण किल्ल्यावरी अवलोकुन ।

बादशाहासी हेर सांगती तोंड फांकुन ।

ऐकुनी शहाची गेली कंबर वाकुन ।

झाली साह्य भवानी वैरी दिले हांकुन ॥

मोडते

एकापाठीं एक जय मिळतां कांहीं दिवसान ।

दिल्ली विजापूर बादशहाचें गळले अवसान ।

कवि रामचंद्राचें कवन शब्दाची खाण ।

श्रीकृष्णातिरी रहिवास, यमक अनुप्रास, ऐकतील खास, मर्द प्रेमानं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP