केशवस्वामी - श्लोक संग्रह ११

केशवस्वामी रामदास पंचायतनातील प्रख्यात साधू असून महानभगवद्‌भक्त व अंतर्निष्ट आणि मोठे निस्पृह वक्ते होते.

संकल्प वैरी बरवा निमाला । प्रपंच गैरी परताचि झाला ॥

झाला सदानंद अपार पाही । न बोलवे तो निजलाभ कांहीं ॥५०१॥

संसार जाळी भजनेचि जाळी । तो वंदिता चिन्मय अंशजाळी ॥

काळी कराळी रजनी निमाली । निजाक्षराची मज भेट झाली ॥२॥

स्वरुपीच जे राहिले सर्व भावे । तया ते कसे धारी ह्मणावे ॥

स्वइच्छा जरी वर्तती सर्व लोकी । तरी ते निजानंद ऐसे विलोकी ॥३॥

सखा सद्गुरुनाथ भेटीस आला । महत्या तया सर्व शोकासि झाला ॥

निमाला भवी गेला दिग्गता । अनंतीमृषा आटली चित्त चिंता ॥५०४॥

सदा सत्पदी रंक होवूनि लागे । क्रियेमाजि जो कामना शुन्य वागे ॥

जनी सच्चिदानंद बोधेचि जागे । भवाचा कदा पंक त्याते नलागे ॥५॥

संसारशत्रू बरवा हराया । तात्काळ माया श्रम वोसराया ॥

समग्रया सर्व गता वराया । आलो तुझे पाय शिरी धराया ॥६॥

साधू जनाच्या मिळणी मिळावे । निष्काम बोधे बरवे फळावे ॥

भवार्णवासी अवघे गिळावे । चिन्मात्र वेगे सगळेचि व्हावे ॥७॥

सम सनातन मंडप केला । गति विना कवि वस्तीस गेला ॥

मति विना अति निश्चळ राहे । सुख घनात्मक सर्वहि पाहे ॥८॥

सित्धांत सारी करिती मिराशी । संसार हा सार दिसे तयासी ॥

संसार राशी मग तेचि पाही । तया वनाधार तयासि नाही ॥९॥

साधू दया सिंधु विवेक राशी । वंदूनिया केवळ निश्चयेसि ॥

आत्माहरी पूर्ण स्वयंप्रकाशी । केले सदा अद्वय लग्न त्यासी ॥५१०॥

संसार मस्ती अवघी झडाया । निवृत्तीसी लग्न बरे घडाया ॥

आलो सदा संत पदी पडाया । स्वानंद राशी शिव सापडाया ॥११॥

संकल्पाचे जाळ तात्काळ तोडी । संसाराचे जाळ निःशेष सोडी ॥

त्याची गोडी लागता वोढि गेली । नाही जोडी जोड त्याचीच केली ॥१२॥

शमा दमादिक साधन नाना । न करिता करिता गति जाणा ॥

सुख घने गुरुने दिधली हो । गति मृषा गतिने कळली हो ॥१३॥

साधू दया वैभव प्राप्त झाले । त्दृत्यंकजा केवळ ब्रह्म आले ॥

धाले निवाले मन ऐक्य योगे । गेले लया पंचक जाळ वेगे ॥१४॥

साधू दया तेज प्रकाशले रे । संसार दुःखा लया नास लेरे ॥

स्वानंद पाने बरवा निवालो । जेणे कळे सर्व हितेचि झालो ॥१५॥

शुके घातली जे फळी झेप वेगे । तया सत्काळ लागि विज्ञान योगे ॥

करी देवुनी भक्षवी बाप माझा । असे देह तो आठवू त्यासि वोझा ॥१६॥

सदा लग्न वेदांत शास्त्री चलावी । जगा माजि या मग्न रामासि दावी ॥

निजि मग्न तो लक्षिता भग्न माया । मने सेवुनी पाव निर्विघ्न ठाया ॥१७॥

साधू संगे मानसी राम दाटे । माया सिंधू सर्व तात्काळ आटे ॥

जेथे तेथे अच्युतानंत भेठे । ब्रह्मानंदे सर्वदा पूर लोटे ॥१८॥

साधू संगे सर्व दासानु रागे । आह्मी रामी रंगलो द्वैत त्यागे ॥

आता आह्मा आणि रामास कांहीं । नाहीं नाही सर्वथा भेद नाही ॥१९॥

सोडूनिया सर्व वीचारणारे । धरी मनी अद्वय धारणारे ॥

होशील तू कारण कारणाचे । या कारणे अन्य पथीन नाचें ॥५२०॥

साधू मुखे कर्म सपाट केले । अपार हे द्वैत कपाट गेले ॥

झाले मनी सौख्य आचाट मोठे । फुटेचि ना वाट गती कोठे ॥५२१॥

सांगूनिया मंगलरुप गोष्टी । दावी सखा मंगळ राम दृष्टी ॥

करी सदा मंगळ सर्व पाही । या वेगळे मंगळ अन्य नाहीं ॥२२॥

श्रुति मुखें हरि हा परवाचा । मूर्ख लोक ह्मणती परवाचा ॥

याचि लागि पडती भव ओळी । शीघ्र त्यासि दुरि नेउनि जाळी ॥२३॥

श्रुती सम्मते कल्पनेच्या लई हो । करी वास जो नित्य सच्चिन्मयी हो ॥

क्रियाचा सनिःशेष ज्याचे गळाले । घनानंद हे विश्व संपूर्ण झाले ॥२४॥

श्रुति मुखें हरुनि श्रम कारणा । जरि मना धरिसी निज धारणा ॥

तरी त्वरे तरिसी भवसागरी । निजसुखें निवसी त्दृश्यांबरी ॥२५॥

शिवगुणे जडली मति बाळिका । ह्मणवुनी सरली भव काळिका ॥

शिवचराचर सर्वहि भासले । शिव सुखे मतिचे भय नासले ॥५२६॥

सुखाची बरी खाणी हातासि आली । ह्मणोनि बहू वाणि वाणीस झाली ॥

मृषा हालणे चालणे सर्व झाले । पदी बैसता डोलणेही निमाले ॥२७॥

श्रुति परात्परता अमलोदये । भगगिरी खचला मतिचा लये ॥

निजसुखे खचला बरवा कवी । कवि नव्हे मग तो रविचा रवी ॥२८॥

सन्मात्र आहे जन सर्व पाही । या वेगळा निर्णय अन्य नाहीं ॥

जे जाणता नेविव शुन्य झाली । हे जाणता जाणिवही निमाली ॥२९॥

स्वराज्य होता प्रति पूर्ण आले । सायोज्य भद्रासन प्राप्त झाले ॥

विश्रांतीचे छत्र अखंड माथा । झाला जगी आत्मप्रकाश आता ॥५३०॥

साधूपदी चित्त बळेचि नाहो । त्रैलोक्य चिन्मात्र बळेचि नाहो ॥

यालागी स्वानंद फळेचि नाहो । ऐसे सदा गर्जति शांति नाहो ॥५३१॥

सरे गोमती गोपती आठवीता । असे ठाउके वर्म झाले महंता ॥

ह्मणोनि सदा सेउनी गोपतीते । स्वबोधेतिही नासिले गोमतीते ॥३२॥

शिव रसाप्रति हा जिव घेता । जि वदसे परता तरि होता ॥

अति सुखें निवृता मग पाही । मति विना वसता निज ठायीं ॥३३॥

सोडूनिया सर्व क्रियाटणासी । मी पावलो चिन्मय पाटणासी ॥

यालागि मी आजि सभाग्य झालो । स्वराज्य पावोनि सुखे निमालो ॥३४॥

साधू पदी वास करुनि जागे । निरंजनी लाग तयासि लागे ॥

नेणेचि तो चित्र जगत्रयाचे । झाला घनानंद स्वरुप साचे ॥३५॥

सर्व देव कळिला जरि माये । व्यर्थ गर्व धरणे तरि काय ॥

मोक्ष पर्व वदना कवि ऐसे । दिव्यरुप रविमंडळ जैसे ॥३६॥

साधू कुळी तो खळवाट पाडी । त्या काम चोरासी बळेचि ताडी ॥

मायामयी पाझर सर्व झाडी । दयानिधी अमृत ताट वाढी ॥३७॥

शिवजळी रमता मनमच्छा । विसरलो विविधा भव इच्छा ॥

क्षणभरी न वचे तरि कोठे । मग ह्मणे बहुरे सुख मोठे ॥३८॥

स्थळ जसे मिरवे स्थळ संगे । जळ जसे भरले जळ रंगे ॥

शिवसा विलसे शिवयोगे । गुज असे वदवी श्रुति वेगे ॥३९॥

सोडोनि गोडी भव वैभवाची । करी बरी भक्ति दयार्णवाची ॥

तो नातळे सर्व क्रिया प्रमाणा । गेला गुणातीत पदासि जाणा ॥५४०॥

सुखमया सखया गुरुराजया । निजदया करुनी हरिशी भया ॥

ह्मणवुनी वदती श्रुति पक्षिणी । समपदा मिळणी तव ईक्षणी ॥५४१॥

श्रम हरा भव तारक देवा । निशि दिवा करिता तव सेवा ॥

मम करा निज वंदन आले । निजसुखें मन पांगुळ झाले ॥४२॥

संसार सिंधू तरणार्थ पाही । मी लागलो सद्गुरुनाथ पायीं ॥

तात्काळ तेणें भवदुःख गेले । तीर्थे मला चिन्मय तीर्थ केले ॥४३॥

सत्संगती प्रेमसुखें निवालो । यालागि मी उत्तम श्र्लोक झालो ॥

गाती जया वेद श्रुती पुराणे । ते ब्रह्म मी केवळ हेचि जाणे ॥४४॥

सत्संगमी या बरवा निवालो । यालागि मी पूर्ण पदासि आलो ॥

झालो स्वता चित्सुखा तत्वता हो । नये कथाते मज सांगता हो ॥४५॥

दया सद्गुरु स्वामिनें पूर्ण केली । मृषा कल्पना नाशिली भ्रांती गेली ॥

अती पक्वता पावली वृत्ती धाली । अवाधीत हे केशवी प्राप्ति झाली ॥४६॥

दयानिधी राघव प्रेम तोषे । नांदे जनी केवळ संत वेषे ॥

तरी जना लागुनी आर्त नाहीं । ठेवीच ना चित्त निवांत पाई ॥४७॥

दिवा आणि रात्री निजात्माचि नेत्री । स्वबोधे सदा लक्षिती सर्वगात्री ॥

सुमित्री तया श्रूतमात्री घडे हो । अभेदे चिदानंद हाता चढे हो ॥४८॥

सुखसिंधूच्या पोटा आलो । आह्मी चित्सुख चंद्र झालो ॥

माझे अंग मज गोड वाटे । सेवी तव आनंद दाटे ॥४९॥

मजपासूनि झाला बोध । तोहि स्वानंद रुपसिद्ध ॥

अंगग्रासूनि अनंग झालो । ह्मणे केशव अंगीच धालो ॥५५०॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP