कहाणी महालक्ष्मीची

हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.


आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला दोन बायका होत्या. एक आवडती होती, दुसरी नावडती होती. आवडतीचं नांव पाटमाधवराणी आणि नावडतीचं नांव चिमादेवराणी होतं. त्या राजाला एक शत्रु होता. त्याचं नांव नंदनबनेश्वर होतं. तो क्षणी उडे, क्षणीं बुडे, क्षणी अंतराळीं जाई, क्षणीं पाताळीं जाई, असा राजाच्या पाठीस लागला होता. त्यामुळं राजा वाळत चालला. एके दिवशीं राजानं सर्व लोक बोलावले. नंदनबनेश्वरला मारा म्हणून आज्ञा केली. सर्व लोकांनीं राजाला बरं म्हटलं. त्याला जिकडे तिकडे शोधू लागले. त्याच नगरांत एक म्हातारीचा लेक होता. तो आपल्या आईला म्हणूं लागला, आई आई, मला भाकरी दे. मी राजाच्या शत्रूला मारायला जातों. म्हातारी म्हणाली, बाबा, तूं गरिबाचा पोर, चार पावलं पुढं जा. झाडाआड वाळली भाकरी खा म्हणजे लोक तुला हंसणार नाहीत. पोरानं बरं म्हणून म्हटलं. म्हातारीनं भाकरी दिली.म्हातारीचा पोर भाकरी घेऊन निघाला. सगळ्यांच्या पुढं गेला. इतक्यांत संध्याकाळ झाली. सर्व लोक घरीं आलें. त्यांना नंदनबनेश्वर कांहीं सांपडला नाहीं. तशी राजाला फार काळजी लागली. पुढं फार रात्र झालीं. म्हातारीचा पोर तिथंच राहिला. पुढं मध्यरात्र काय झालं ? नागकन्या, देवकन्या तिथं आल्या. महालक्ष्मीचा वस सांगूं लागल्या. पोरानं विचारलं, बाई बाई, ह्यानं काय होतं ? त्यांनीं सांगितलं, पडलं झडलं सांपडतं, मनीं चितंलं कार्य होतं. इतकं ऐकल्यावर तोहि त्यांच्याबरोबर वसा वसूं लागला. पूजा केली, घागरी फुंकल्या. पहाटेस महालक्ष्मीमाय कोल्हापुरी जातीजागती झाली, तसा नागकन्या देवकन्यांनीं आशीर्वाद मागितला, तसा ह्यानंहि मागितला. तसा देवींनी दिला. राजाचा शत्रु मरेल, तुला अर्ध राज्य मिळेल, अर्ध भांडार मिळेल. माडीशीं माडी बांधील, नवलवाट नांव ठेवील. तो वैरी डावा पाय मस्तकीं घेऊन उद्यां राजाच्या अंगणांत मरून पडेल ! असं म्हणून देवी अदृश्य जाली. म्हातारीचा पोर घरीं आला.

दुसर्‍या दिवशीं राणी पहाटेस उठलीं. परसांत आली. राजाचा वैरी मेलेला पाहिला. तिला आनंद झाला. तशी तिनं ही गोष्ट राजास जाऊन सांगितली. राजानं चौकशी केली. म्हातारीचा पोर सगळ्यांच्या मागं होता. त्यानं ह्याला मारलं असेल, असं लोकांनीं राजाला सांगितलं. राजानं त्याला बोलावू धाडलं. म्हातारीचा पोर राजाच्या घरीं आला. त्यानं राजाला विचारलं, राजा राजा, आळ नाहीं केला, अन्याय नाहीं केला; मला इथं कां बोलावलं ? राजा म्हणाला, भिऊं नको, घाबरू नको. माझा वैरी नंदनबनेश्वर कोणी मारला ? सगळे लोक तुझं नांव सांगतात. याचं काय कारण तें सांग. राजाला पोर म्हणाला, राजा, मीं मारला नाहीं. पण तो देवीच्या वरानं मेला ! राजा म्हणाला, ती देवी कोणती ? तिला तूं कोठं भेटलास ? पोर म्हणाला, सगळ्यांच्या पाठीमागून निघालों, त्यांच्यापुढं थोडा गेलों. शिळी भाकर झाडाआड करून खाल्ली. येतां येतां रात्र झाली. झाडाखालीं वस्ती केली. रात्रीं नागकन्या- देवकन्या तिथं आल्या. त्यांनी महालक्ष्मीचा वसा वसला. त्याची मी चौकशी केली. पुढं मी पूजा केली, घागरी फुंकल्या. पहाटेस महालक्ष्मीमाय कोल्हापुरीं जातीजागती झाली. सर्वांना आशीर्वाद असा मिळालां कीं, शत्रु मरेल, अर्ध राज्य मिळेल, अर्ध भांडार मिळेल, माडीशीं माडी बांधील, नवलवाट नांव ठेवील. असं म्हणून देवी अदृश्य झाली. मग आम्ही उत्तरपूजा केली. तातू घेऊन घरी आलो. तों तुझं बोलावणं आलं. राजानं हकीकत ऐकली आनंदी झाला. पोराला अर्ध राज्य दिलं. भांडार अर्ध दिलं, माडीशीं माडीं बांधून दिली. नवलवाट नांव ठेवलं. पुढं म्हातारीचा पोर आनंदानं वागूं लागला.

ही बातमी राणीला समजली. राणीनं नवलवाटाला बोलावणं धाडलं. महालक्ष्मीचा वसा कसा वसावा म्हणून विचारलं. नवलवाटानं तातू दाखविला. तिला सांगितलं, आश्विनमास येईल, पहिली अष्टमी येईल, त्या दिवशीं सोळा सुताचा तातू, तेल हळद लावून करावा. सोळा दूर्वा, सोळा तांदूळ घेऊन तुळशीची पंचामृती पूजा करावी. सोळा अर्ध्य द्यावींत. मग धूपदीप दाखवावा. नैवेद्य दाखवून कहाणी करावी. ज्यास हा वसा घेण असेल त्यानं तातूची पूजा करावी. तातू हातात बांधावा. दुसरी कहाणी चतुर्थीला व तिसरी चतुर्दशीला करावी. याप्रमाणं दर आश्विनमासी करावं. स्वतः तिनं वसा समजावून घेतला. तें व्रत पाळूं लागली.

पुढं एके दिवशीं काय झालं ? राजा राणीच्या महालीं आला. सारीपाट खेळूं लागला. राजानं राणीचा तातू पाहिला. हें का, म्हणून विचारलं, राणीनं तातूची हकीकत सांगितली. राजा म्हणाला, माझे घरीं हारे बहू, दोरे बहू, कांकणे बहू, कळावे बहू. व्रताचं सूत तोडून टाक ! मला ह्याची गरज नाहीं ! पुढें रात्र झाली. राजाराणी निजली. सकाळीं दासीबटकी महाल झाडूं लागल्या. केरांत त्यांना तातू सांपडला. दासींनीं तो तातू नवलवाटाला दिला. त्याला राणीचा राग आला. इतक्यात काय चमत्कार झाला ? त्याला नावडती राणी भेटली. तिनं तो तातू मागितला. हा म्हणाला, उतशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील ! तिनं सांगितलं उतणार नाहीं, मातणार नाहीं, घेतला वसा टाकणार नाहीं. तसा तातू तिच्या हवाली केला. वसा सांगितला.

पुढं आश्विनमास आला. पहिली अष्टमी आली. त्या दिवशी काय चमत्कार झाला ! देवी महालक्ष्मीनं म्हातारीचं सोंग घेतलं. पाट माधवराणीचें महालीं गेली. महालक्ष्मीनं तिला आठवण आहे किंवा नाही हें पाहूं लागली. तों घरांत कोठें काहींच तयारी दिसेना. तेव्हां ती पाटमाधवराणीला म्हणूं लागली, अग अग पाटमाधवराणी, पुत्राची माय, आज तुझ्या घरी काय आहे ? राणीन उत्तर दिलं. आज माझ्या घरीं काहीं नाहीं. तेव्हां ती राणीला पुन्हा म्हणाली अग, अग पाटमाधवराणी, पुत्राची माय, म्हातारीला पाणी देशील तर तुझ्या राज्याला पुरे होईल ! राणीनं उत्तर दिलं, म्हातारीला तांब्याभर पाणी दिलं तर माझ्या राज्याला पुरणार नाहीं. तेव्हां म्हातारीनं पुन्हां पाटमाधवराणीला हांक मारली. अग अग पाटमाधवराणी, पुत्राची माय, म्हातारीला दहीभाताची शिदोरी देशील तर तुझ्या राज्याला पुरे होईल ! राणी म्हणाली दहीभाताची शिदोरी दिली तर माझ्या राजाला पुरणार नाही. म्हातारीला राग आला. तिनं शाप दिला. तो काय दिला ? सवतीच्या न्हाणीं डाराडुरी करीत असशील, अर्ध अंग बेडकाचं, अर्ध अंग मनुष्याचं, अशी होऊन पडशील ! इतकं राणीनं ऐकलं, खदखदां हंसली.

पुढं म्हातारी निघून गेली, ती चिमादेवराणीच्या महलीं आली. इकडे तिकडे पाहूं लागली तों तिला जिकडे तिकडे गडबड दिसली. एकीकडे पूजेचं साहित्य दिसलं, दुसरीकडे महालक्ष्मीचा मुखवटा मांडलेला पाहिला.

तिनं चिमादेवराणीला विचारलं, अग अग चिमादेवराणी, पुत्राची माय, आज तुझ्या घरीं काय आहे ? तिनं उत्तर दिलं, आज माझ्या घरीं महालक्ष्मी आहे. तेव्हां म्हातारी म्हणाली, महालक्ष्मी म्हणतात ती मीच ! राणी म्हणाली, कशानं ओळखावी ? कशानं जाणावी ! तो ती सकाळीं कुंवारीण झाली, दुपारीं सवाशीण झाली, संध्याकाळी पोक्त बायको झाली. शा तिन्ही कळा तिनं तिला पालटून दाखविल्या. नंतर राणीनं तिला घरांत बोलावलं, न्हाऊं माखूं घातलं, पीतांबर नेसायला दिला, चौरंग बसायला दिला. राणीनं व नवलवाटानं तिची पूजा केली. संध्याकाळ झाली. देवीसमोर दोघंजणं घागरी फुंकू लागलीं, तसा घागरींचा आवाज राजाचे कानीं गेला. धुपाचा वसा महालीं आला. तशी राजानं चौकशी केली. शिपायांना हांक मारली, नावडतीच्या घरीं आवाज कशाचा येतो, तो तुम्ही पाहून या ! शिपाई नावडतीच्या घरीं आले. महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. तसेच ते परतले. राजाच्या महालीं आले. पाहिलेली हकीकत सांगितली. तसा राजा म्हणाला, मला तिथं घेऊन चला ! शिपाई राजाला घेऊन राणीकडे आले. राणीनं पंचारती ओवाळली. राजाचा हात धरला, मंदिरात घेऊन गेली. सारीपाट खेळू लागली, खेळतां खेळतां पहाट झाली. पहाटेस महालक्ष्मीमाय कोल्हापुरा जाती-जागती झाली. तसं राणी म्हणाली, माय मला आशीर्वाद दे ! महालक्ष्मी म्हणाली, तुला आशीर्वाद काय देऊं ? राजा तुला सकाळीं घेऊन जाईल आणि तुझी सवत तुझ्या न्हाणीं डाराडुरी करील ? अर्ध अंग बेडकाचं, अर्ध अंग मनुष्याचं अशी होऊन पडेल ! तशी चिमादेवराणीनं तिची प्रार्थना केली कीं, तिला इतका कडक शाप देऊं नये. तसं देवीनं सांगितलं की, राजा तिला बारा वर्ष वनांत तरी धाडील ! असं म्हणून देवी अदृश्य झाली.

उजाडल्यावर राजानं तिला रथांत घातलं. वाड्यासमोर घेऊन आला. पाटमाधवराणीला निरोप धाडला कीं, राजा राणीला घेऊन येतो आहे, तिला तूं सामोरी ये ! तशी ती फाटकतुटकं नेसली, घाणेरडी चोळी अंगांत घातली, केस मोकळे सोडले. कपाळीं मळवट भरला. जळतं खापर डोकीवर घेतलं आणि ओरडत किंचाळत पुढं आली. तों राजानं विचारलं कीं, ओरडत किंचाळत कोण येत आहे ? भूत आहे कीं खेत आहे ? शिपायांनीं सांगितलं भूत नाही, खेत नाहीं. तुझीच राणी तुला सामोरी येत आहे. राजा म्हणाला, तिला रानांत नेऊन मारून टाका ! असा शिपायांना हुकूम केला आणि आपण उठून महालीं आला. राजाराणी सुखानं नांदू लागली. इकडे शिपायांनी पाटमाधवराणीला रानांत नेली. तिला राजाचा हुकूम सांगितला. राणी मुळूमुळू रडू लागली. तसं शिपायांनीं सांगितलं, बाई बाई, रडूं नको. आम्ही तुझ्या हातचं खाल्लेले-प्यालेले आहों. आमच्याच्यानं कांहीं तुला मारवत नाहीं, म्हणून आम्ही तुला सोडून देतों. पुन्हां तूं या राज्यांत कांही येऊ नको ! असें म्हणाले. राणीला तिथं सोडून दिलं. आपण निघून नगरांत आले.

नंतर ती तशीच फिरतां फिरतां एका नगरांत गेली. पहिल्यानं कुंभाराचे आळींत गेली. तिथं नव्या राणीला नवा कळस घडवीत होते. परंतु एकंहि कळस उतरेना. त्यांनी चौकशी केली. नवं माणूस कोण आलं आहे ? तो ही सांपडली. त्यांनीं तिला हांकून पिटून लावली. पुढं ती कासाराच्या आळींत गेली. तों तिथं नव्या राणीला नवा चुडा करीत होते; पण एकहि चुडा उतरेना. तेव्हां चौकशी केली, नवं माणूस कोण आलं आहे ? तेव्हां ही सांपडली. लोकांनी तिला हाकून पिटून लावली. तेथून निघाली ती सोनाराच्या आळींत गेली. तिथं नव्या राणीला नवा दागिना घडवीत होते, तों एकहि दागिना उतरेना. तेव्हांन त्यांनी चौकशी केली, नवं माणूस कोण आलं आहे ? तेव्हां ही सांपडली. लोकांनी तिला हाकून पिटून लावली. तिथून निघाली ती साळ्याच्या आळींत गेली. तिथं नव्या राणीला नवा साडा विणीत होते; पण एकहि साडा उतरेना. मग त्यांनी चौकशी केली, नवं माणूस कोण आलं आहे ? तेव्हां ही सांपडली. लोकांनी तिला हाकून पिटून लावली. पुढं ती रानात निघून गेली.

जातां जातां ऋषींची गुंफा दृष्टीस पडली. तिथं गेली तों ऋषी ध्यानस्थ बसले होते. ती तिथंच राहिली. ऋषि स्नानाला गेले म्हणजे ही आपली झाडसारवण करी, पुजेचं मांडून ठेवी. अशी तिनं बारा वर्षे सेवा केली. ऋषि प्रसन्न झाले. ते म्हणाले, इथं झाडसारवन कोण करतं, त्यानं माझ्यासमोर यावं. तशी ती ऋषींच्या पुढं आली. नमस्कार केला. ऋषींनी झाडसारवणाच कारण विचारलं. ती म्हणाली, अभय असेल तर सांगतें. ऋषींनी अभय दिलं. राणीनं पहिल्यापासून हकीकत सांगितली, ऋषींनीं पोथ्यापुस्तकं वंचू पाहिली. तों इच्यावर महालक्ष्मीचा कोप आहे असं समजलं. ऋषींनीं तिच्याकडून महालक्ष्मीची पूजा करवून घेतली, रात्रीं घागरी फुंकविल्या. पहांटे महालक्ष्मीमाय कोल्हापुरीं जातीजागती झाली, तसा राणीनं आशीर्वाद मागितला. देवी रागावली होती. ऋषींनी देवीजवळ क्षमा मागितली. तेव्हां देवीनं उःशाप दिला. ह्या झाडाखाली सगळी तयारी कर. पाय धुवायला पाणी ठेव, चंदनाची उटी ठेव, फराळाची तयारी कर, कापुरी विडा ठेव, वाळ्याचा पंखा ठेव, त्याला सगळ्याला तुझ्या हातचा वास येऊं लागेल. राजा इथं आज-उद्या येईल. तहानेला असेल. त्याचे शिपाई थंड पाण्याचा शोध करतील. ते ही सगळी तयारी पहातील. राजाला जाऊन सांगतील. नंतर राजा इथं येईल ! त्याप्रमाणं दुसर्‍या दिवशीं तिथं राजा आला. थंडगार छाया पाहिली, स्वस्थ बसून विश्रांती घेतली. नंतर पाय धुतले, पोटभर फराळ केला, पाणी प्याला. कापुरी विडा खाल्ला, आत्मा थंड झाला. पुढं राजानं शिपायांना विचारलं, इथं मी पाणी प्यालो, फराळ केला, विडा खाल्ला, ह्याला सगळ्याला पाट माधवराणीच्या हातचा वास कसा आला ? शिपाई म्हणाले, अभय असेल तर सांगतों. राजानं अभय दिलं. तेव्हा शिपाई म्हणाले, आम्ही तिच्या हातचं खाल्लं प्यालं. आमच्यानं कांहीं तिला मारवलं नाहीं म्हणून आम्ही तिला सोडून दिलं. राजा म्हणाला, असं असेल तर तिचा आसपास शोध करा ! शिपाई निघाले. ऋषींच्या गुंफा पाहिल्या. तिथं ही सापडली. राजाला जाऊन शिपायांनीं सांगितलं. राजा उठला. ऋषींच्या गुंफेत गेला. त्याचं दर्शन घेतलं. ऋषींनी ओळखलं. त्याला सगळी हकीकत सांगितली. पुष्कळसा बोध केला. राणीला नमस्कार करायला सांगितला. नंतर तिला हवाली केलं. तसा उभयतांनीं ऋषींना नमस्कार केला. त्यांना त्यांनी आशीर्वाद दिला. पुढं राजानं तिला रथांत घातलं. आपल्या नगरीं घेऊन आला, बाहेर रथ उभा केला. राणीला निरोप पाठवला, आजा पाटमाधवराणीला घेऊन येत आहे, त्याला तूं सामोरी ये ! तशी राणी न्हाली, माखली, पीतांबर नेसली, शालजोडी पांघरली, अलंकार घातले, नगरच्या नारी बरोबर घेतल्या आणि वाजतगाजत राणी सामोरी गेली. राजानं विचारलं, वाजतगाजत कोण येत आहे ? नागकन्या कीं देवकन्या ? तसं शिपायांनी सांगितलं, नागकन्या नाहीं, देवकन्या नाहीं, तुझीच राणी तुला सामोरी येत आहे ! तेव्हां राजा पाटमाधवराणीला म्हणाला, तूं जर अशीच सामोरी आली असतीस तर तुला इतके हाल भोगावे लागले नसते ! राणी उगीच बसली. राजानं चिमादेवीराणीला उचलून रथांत घेतली आणि दोघींसह वाजतगाजत नगरांत आला. सुखानं राज्य करूं लागला. जशी पाटमाधवराणीला महालक्ष्मीमाय कोपली तशी तुम्हा आम्हावर न कोपो ! ही साठा उत्तरांची कहाणी पांचा उत्तरीं सुफळ संपूर्ण.

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP