वज्रनाभ राजाची कथा

हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कथा उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.


कश्‍यप नावाचे महातपोनिधी ऋषी होते. इंद्र हा त्यांचाच पुत्र. कश्‍यपांची एक पत्नी दिती हिला वज्रनाभ व सुनाभ अशी दोन मुले होती. दोघेही अत्यंत शूर व शक्तिशाली. मेरू पर्वतावर वज्रपुरी नावाची एक भव्य व सुंदर नगरी त्यांनी राजधानी म्हणून वसवली व थोरला वज्रनाभ तेथे राज्य करू लागला. पण एवढ्याने त्याचे समाधान होईना. संपूर्ण पृथ्वी व स्वर्गाचेही राज्य मिळावे यासाठी त्याने ब्रह्मदेवाची घनघोर भक्ती केली. आपल्या योगबलाने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेऊन त्याने वर मागितला, की माझे राज्य संपूर्ण पृथ्वी व स्वर्ग यांना व्यापू दे. तसेच देव, मनुष्य, राक्षस, पशू, पक्षी यांच्याकडून माझा मृत्यू घडू नये. तथास्तु! असे म्हणून ब्रह्मदेव सत्यलोकी गेले.
आता वज्रनाभ उन्मत्त झाला. त्याने सर्व पृथ्वी जिंकून सर्व राजांना बंदी केले. नंतर तो देवेंद्राच्या अमरावतीस गेला व राज्य मागू लागला. अन्यथा युद्ध करण्याचे त्याने आव्हान दिले. वज्रनाभचे ते भयंकर स्वरूप पाहून देवेंद्र भयभीत झाला. युक्तीप्रयुक्तीने ही वेळ टळावी म्हणून गोड स्वरात तो वज्रनाभला म्हणाला, "तुझे मागणे योग्य आहे, पण माझा राज्यकारभार मी गुरू बृहस्पती यांच्या सल्ल्याने चालवतो. तेव्हा त्यांना विचारून कळवतो.'' विचार करून बृहस्पती म्हणाले, "ब्रह्मदेवाच्या वरामुळे वज्रनाभ बर्‍याच अंशी चिरंजीव झाला आहे. तेव्हा हरिश्‍चंद्र राजाने बुद्धिबळाने जसे आपल्या पुत्राचे रक्षण केले, तसे युक्तीने हे युद्ध टाळले पाहिजे.'' बृहस्पतीच्या सांगण्यावरून इंद्राने वज्रनाभाला बोलावून घेतले व दोघेही आपले वडील कश्‍यप ऋषी यांच्याकडे गेले. कश्‍यपासही कोणाची बाजू घ्यावी असा पेच पडला. तेव्हा ते म्हणाले, "पुत्रहो, हल्ली मी यज्ञदीक्षा घेतली असल्याने या गोष्टीचा विचार मला आता करता येणार नाही. माझा यज्ञ पुरा होईपर्यंत दोघांनी स्वस्थ राहावे. नंतर मी हे भांडण मिटवीन.''
पुढे योगायोगाने वज्रनाभाची कन्या प्रभावती हिने श्रीकृष्णाचा मुलगा प्रद्युम्न याच्याशी वज्रनाभाच्या इच्छेविरुद्ध गुप्तपणे लग्न केले. त्यामुळे संतापलेल्या मदनाशी युद्ध आरंभले. घनघोर युद्ध झाले. श्रीकृष्णाचे सर्व यादववीर तसेच इंद्राचे सैन्य मदनाच्या मदतीस आले. शेवटी श्रीकृष्णाने गरुडाकडून सुदर्शनचक्र पाठवून मदनाकडून वज्रनाभास युक्तीने मृत्युपंथास धाडले. वज्रनाथ हत झाल्यावर इंद्राने त्यास स्वर्गात नेले व तेथे त्याचे नाव पद्मनाभ असे ठेवले.

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP