गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस भारतीय संस्कृतीत गो-मातेला फार महत्त्व आहे. ’वसुबारस’ असे मराठीत दिवाळीच्या या पहिल्या दिवसाचे नाव. संस्कृतमध्ये यालाच म्हणता गो-वत्स द्वादशी. आश्विन कृष्ण द्वादशीचेच नाव आहे गोवत्स द्वादशी. या दिवशी संध्याकाळी सूर्यास्त सहा ते सव्वासहाच्या दरम्यान असल्यामुळे संध्याकाळी दिवेलागणीच्या थोडेसे आधीच साडेपाच-पावणेसहापूर्वीच सर्व गोशाळा (गोठे) स्वच्छ करून रांगोळ्या, तोरणे यांनी सजवून,पणत्या, दीपमाला यांनी प्रकाशित करून मोठ्या प्रेमाने, आदराने आणि भक्तीने गोवंश (गायवासरू) पूजन करायचे आहे. यावेळी ताम्रकलश (तांब्याचा लोटा/ताम्रपात्र, तांब्याच फुलपात्र, पंचपात्री, पेला) पाण्याने भरून घेऊन गायवासरांच्या पायावर (डाव्या हातातील पाणी उजव्या हातातून) पाणी सोडावे. यालाच म्हणतात अर्घ्य.

हे अर्घ्य देताना म्हणावयाचा मंत्र असा-

क्षीरोदार्णव-संभूते सुरसुर -नमस्कृते ।

सर्व-देव-मये मातर्‍ गृहाण अर्घ्यं नमोस्तुते॥

अर्थ - क्षीरसागरातून जन्म झालेल्या देव आणि राक्षसांनी प्रणाम केलेल्या सर्व देवस्वरूप अशा (कामधेनू) माते, मी देत असलेल्या या सत्काराचा स्वीकार कर. तुला आमचे अनंत प्रणाम.!

ज्या गायवासरांचे पूजन करायचे ती शक्य तर एका वर्णाची असावीत. गाय भरपूर दूध देणारी असावी. तिची गंध, कुंकूम, अक्षता वाहून, पुष्पहार घालून आणि अर्घ्य देऊन पूजा केल्यावर तिला उडीद (संस्कृत -माष) वडे (कानडी भाषेतील मेदूवडा) खायला घालावेत.या वेळी तिची-गोमातेची प्रार्थना करावी-

सर्व-देव-मये देवि । सर्व-देवैर अलंकृते ।

मातर्‍ मम अभिलषितं सफलं कुरु नन्दिनी ॥

(अर्थ - सर्वांना आनंद देणार्‍या हे नंदिनी गोमाते ! सर्वदेव तुझ्या ठायी निवास करतात म्हणून तू सर्वदेवमयी. सर्व देवांनी तुझा गौरव केलेला आहे. तेव्हा हे आई, आमच्या इच्छा पूर्ण कर.)

या दिवशी आपण गायीचे दूध, दही, तूप, ताक; तसेच तेलात तळलेले वडे इ. पदार्थ वर्ज्य करावेत. याच गोवत्स द्वादशी- वसुबारसेपासून पाच दिवस (पाडव्यापर्यंत) देव, विद्वन, गुरुजन, गाई, घोडे, वडीलधारी मंडळी, मुलेबाळे (ज्येष्ठ-श्रेष्ठ-कनिष्ठ) या सर्वांचे घरातील माताभगिनींनी नीरांजनाने ओवाळून औक्षण (दीर्घायुष्यचिंतन) करावे, असे नारदवचन आहे.

वसुबारसनिमित्त अशी प्रार्थना करा

या लक्ष्मी सर्वभूतानां या च देवेषु संस्थिता ।

धेनुरूपेण सा देवी मम शान्ति प्रयच्छतु ।

चतुर्मुखस्य या लक्ष्मीर या लक्ष्मीर धनदस्यच ।

लक्ष्मीर या लोकपालानां सा धेनुर वरदास्तु मे ।

स्वधा या पितृमुख्यानां स्वाहा यज्ञभुजांच या ।

सर्व-पाप-हरा धेनुस तस्मात्‍ शान्ति प्रयच्छ मे ।

विष्णोर वक्षसि या लक्ष्मीः स्वाहा या च विभावसो ।

चन्द्रार्क-शक्र-शक्तिर या धेनु-रूपास्तु सा श्रिये ॥

(सर्व देवस्वरूप गोमाता मला शांती, वर लक्ष्मी देवो!)

दिन-दिन दिवाळी ।

गाईम्हशी ओवाळी ।

गाई म्हशी कोणाच्या ।

गाई-म्हशी लक्ष्मणाच्या ॥

याच वेळी बाळगोपाळ आनंदीत होऊन फुलबाज्या गोल गोल फिरवून गाणे म्हणत असतात.
या दिवसापासून दिवाळीला सुरुवात होते. घरावर आकाशकंदिल लावतात.  स्त्रीया अंगणातील तुळशीवृंदावनापुढे पणती लावतात. सर्व घरांमध्ये लाडू, करंज्या, चकल्या, शेव, चिवडा असे पदार्थ केले जातात.
दिवाळी हा सणच मुळी दिव्यांचा आहे, म्हणून सर्वजण आपापल्या दारासमोर पणत्या लावतात. अंगणांत रांगोळया काढतात या रांगोळया विविध प्रकारच्या असतात. कोणी ठिपक्यांच्या काढून यात आकर्षक रंग भरतात. कोणी फुलांची, तर कोणी धान्याची रांगोळी काढतात. रांगोळयांमुळे अंगी असलेली कला दाखवण्यास वाव मिळतो. प्रत्येकाच्या दारावर वेगवेगळया आकारातील आकाशकंदिल लावलेले असतात. सुबक रांगोळया, टांगलेले आकाशकंदिल, तेवणार्‍या पणत्या आणि फटाक्यांची, रोषणाई यामुळे सगळे वातावरण उत्साही आणि आनंदी होते.
लहान मुले मातीचे किल्ले बांधतात. वर्षभराचे कष्ट विसरून आनंदात हा उत्सव साजरा केला जातो. गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत हा सण तितक्याच उत्साहात साजरा केला जातो.

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP