मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|अनंत काणेकर|संग्रह १|
31 डिसेम्बर १९२६ ची मध्यरात्र.

31 डिसेम्बर १९२६ ची मध्यरात्र.

अनंत काणेकर यांच्या कवितेत, भावनेची उत्कटता, आणि तिचे प्रकटन होण्यासाठी अनुरूप अशी रससिद्ध भाषाशैली यांची एकजीव जुळणी झालेली आहे.


रातकाळची पसरे शांती,

मुलें माणसें स्वस्थ घोरती;

धूम्रदीप रस्त्यांत तेवतो;

फ़िकट पांढरी दीप्ति पसरितो.

मध्यरात्रिचा निर्जन रस्ता,

प्रकाशांत त्या वितरि विकटता.

दचकचुनी तों-बारा ठणठण

घडयाळ साङ्गे स्पष्ट वाजवुन,

" वर्षाची या सरती घटिका,

पहा,चालली सोडुनि लोकां !"

वर्ष बिचारें गेलें, गेलें

करपलों जणूं वियोगानलें !

अन्त:करणीं ये कालवुनी,

विषादतमिं मी गेलों बुडुनी !

अगणित वर्षे आली गेलीं,

कितीक लोकें जन्मा आलीं;

हंसली, रडली, म्हुनी गेलीं,

'उदो' 'उदो' हो त्या त्या कालीं ,

स्मृतिहि न त्या अमरांची उरली !

आजहि अगणित जगती मरती,

त्यांत कुणी अजरामर होती !

किति अमरत्वा परि पचवोनी,

काळ बसे हा ' आ ' वासोनी !

उदास असले विचार येती,

लाज परी मज वाटे चित्ती.

असेल काळाहाती मरणें,

परी आमुच्या हाती जगणें !

कां नच मग वीरोचित जगणें,

अभिमानाने हांसत मरणे ?

विचार असले जो मनिं आले,

अंत:करणहि पार निवळलें,

दिव्य कांहि तरि मनि आठवुनी,

झोंपी गेलों अश्रू पुसुनी.

N/A

References :

कवी- अनंत काणेकर

दिनांक - १ जानेवारीन १९२७

Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP