चौकीदार

भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात


अस्ताचलीं सूर्य, हें किर्र घन रान,

घाटींतली वाट, पायीं नसे त्राण. ध्रु०

ती गर्जना ऐक, हें हादरे रान !

ती मृत्युची हांक भयसूचना जाण. १

ये सांजचा पांथ, त्या थांबावायास

लावी इथे चौकि राजा दयावान ! २

हें झोपडें क्षुद्र, ती पाहिं परि खाट,

फळमूळकंदांस नाहीं इथें वाण. ३

त्या बोरजाळींत खुळखूळ वाहून

बोलावि ओढाहि करण्यास जलपान. ४

मी पेटवीं आग काटेरि झगर्‍यांत,

पाणी करीं ऊन, येईं करीं स्नान. ५

रे कोसचे कोस नाहीं कुठे गांव,

टेकावया अंग नाहीं कुठे ठाण. ६

घरची तुला ओढ, बघती तिथे वाट,

धोक्यामधें ऐक झोकूं नको प्राण. ७

निघतां उद्यां सूर्य, तूं लाग मार्गास,

दावीन मी वाट हातीं धनुर्बाण. ८

N/A

कवी - भा. रा. तांबे

जाति - किंकिणी

राग - दुर्गा

ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर

दिनांक - २६ ऑक्टोबर १९३५

Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP