मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह २|
जन म्हणती सांवळी !

जन म्हणती सांवळी !

भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात


जन म्हणति सांवळीं तुज सगळे.

करुणार्ह बिचारे ते अंधळे ! ध्रु०

नवमीची गे रात्र सांवळी.

चंद्रकोर बिजवरा कपाळीं,

शालूवरि तार्‍यांची जाळी,

ज्या मोहवी न त्या काय कळे ? १

त्याच रात्रिच्या अगाध उदरीं

तेजोनिधि वडव्यापरि सागरिं

प्रगटतांच तो दशदिशांतरि

कोंदुनी प्रभा त्रिभुवन उजळे. २

अगाध सुंदर यमुना काळी,

तटीं गर्द झाडांच्या ओळी,

वेडा झाला तो वनमाळी,

उजळिते मनोमल शाम जळें. ३

काळा काळा मेघ सुंदरी,

भाग्यहीन जो मोहे न परी,

धनधान्याची समृद्धि उदरीं

मरतील बापडे जरी न वळे. ४

तरंग झुलती, विचार फुलती,

हास्य-अश्रु तव मनिं दरवळती,

बाग पटांतरिं फुले गोड ती,

पट गळतां सेवूं गोड फळें. ५

नील कमलिनी माझी सुंदरि,

जन्मजन्मिं लाभो मज ती तरि,

केवि बघति मतिमंद पटांतरिं,

दृष्टीच जयांची भरे मळें ? ६

N/A

कवी - भा. रा. तांबे

जाति - नववधू

राग - दुर्गा

ठिकाण - अजमेर

दिनांक - १ फेब्रुवारी १९२२


Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP