मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह २|
रे मानसहंसा !

रे मानसहंसा !

भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात


रे मानसहंसा माझ्या, उड्डाण तुझें अनिवार;

वायूहुनि तेजाहुनिही गति तुझी तरल ती फार

त्रैलोक्यीं गमन तुझेंरे, कोठें न तुला अटकाव;

रविकिरण न शिरती जेथे तेथेहि तुझी रे धाव.

क्षणिं नभीं क्षणीं पातालीं,

दशदिशांत एक कालीं,

कधिं शांति न ठावी जाली,

घेईल वीजही हार. रे० १

सामर्थ्य अतर्क्यचि तुझें, महिम्यास तुझ्या नच पार,

सुख व्हावें मजला म्हणुनी विश्वांत तुझा संचार.

आणिशी सुरासुर सकलां करुनिया तयां बेजार.

विश्रांति न माझ्या कामीं, मजवरी किती उपकार !

सूर्यहीं चितारी केला,

केलेंस फरास विजेला,

सारथी रथीं अग्नीला,

परि यांत काय रे सार ? रे० २

घालिशी हमामा कां रे ? विश्वांत कुठे सुखलेश ?

पतिवीण पसारा सारा हा फुका ! करिशि कां क्लेश ?

कारागृहिं कल्पलताही लावितां सुखाशा वाया !

बाजार मांडिल का रे ? निर्जीव भुतें ही छाया !

प्रिय सखा जिव्हाळा माझा

विश्वाचा सार्‍या राजा,

अंतरलें त्या पतिराजा-

त्यावीण काय संसार ? रे० ३

कालाच्या तीरावरुनी, मरणाच्या वेशीहून

घेउनी भरारी हंसा, अज्ञाती जाय शिरून;

प्रिय सखा पहा जा माझा प्राणाचा माझ्या प्राण,

तरि दूत खरा तूं हंसा, तरि खरें तुझें उड्डाण !

जा निरोप त्याला सांगें, जन्माची सांग कहाणी

"विरहानल जाळी सखया, वार्ताहि न कोणी आणी.

मी राणी या विश्वाची

जाहलें भिकारिण साची

विपरीत गती कर्माची,

विपरीत कसा व्यवहार !" रे० ४

"दिन गेले, वर्षे गेलीं, लोटलीं युगेंही नाथा;

तळमळें वियोगीं सखया, पाहशी अंत किति आतां ?

विसरशी कसा दासीला ? अपराध काय तरि झाला ?

कोणास शरण मी जाऊं ? कथुं दुःख तरी कोणालाअ ?

प्रार्थितें हात जोडोनी,

बहुवार पदर पसरोनी,

शांतवीं अता भेटोनी !

तुजवीण कोण आधार ?" रे० ५

N/A

कवी - भा. रा. तांबे

जाति - उद्धव

ठिकाण - प्रतापगढ

दिनांक - फेब्रुवारी, १९२०


Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP