चैत्र व. ३

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.

रायगड किल्ल्याचें दैव !

शके १७४० च्या चैत्र व. ३ रोजीं दोनशें युरोपियन व दोनशें एतद्देशीय शिपायांसह इंग्रज अधिकारी मेजर हाँल यास कर्नल प्राँथरनें रायगड किल्ल्याची टेहळणी करण्यास पाठविलें.
या काळीं महाराष्ट्राच्या इतिहासातील मोठें दु:खदायक पर्व सुरु झालें होतें. शके १७३९ च्या कार्तिकांत दुसरे बाजीराव पेशवे पुणें सोडून गेल्यानंतर राज्य हस्तगत करण्याचे प्रयत्न लगोलग सुरु झाले. मराठयांची पहिली राजधानी म्हणून ज्या रायगड किल्ल्याचें वैभव गाजून राहिलें होतें त्याकडे इंग्रजांचें लक्ष गेलें. रायगड किल्ला बळकट असल्यामुळें त्याच्या आश्रयास बाजीरावाची पत्नी वाराणशीबाई जाऊन राहिल्या होत्या. रायगडच्या मोहिमेचें काम कर्नल प्राँथर याच्याकडे आलें होतें. त्याच्या हाताखालीं पलटणी व तोफखाना अशा दोनहि प्रकारचे सैन्य होतें. बोरघाटच्या रस्त्यानें खोपवलीवरुन तोफखाना रवाना झाला, आणि शिपाई लोकांच्या पलटणी लोणावळयाजवळील डोंगरांतील पायवाटांनीं जंबुसरच्या घाटानें खालीं उतरल्या. पायथ्याशीं असणार्‍या सिध्देश्वरपाली नांवाच्या सुप्रसिध्द गणपतीच्या स्थानाजवळ दोन्ही सैन्यांची गांठ पडली.
त्यानंतर रायगडाकडे मोर्चा सुरु झाला. वाटेंतील तळे आणि घोसाळे हे दोन्ही किल्ले घेण्यांत आले. इंदापूर येथें स्वाभिमानाची थोडी धग उरलेली असल्यानें इंग्रजांना विरोध झाला. पण त्याचा कितीसा उपयोग होणार ? चैत्र व. ३ रोजीं सर्व सैन्य महाडास येऊन पोंचलें, आणि त्याच रात्रीं मेजर हाँल रायगड किल्ल्याची टेहळणी करण्यास निघाला. रायगडच्या पायथ्याशीं पेशव्यांच्या तीनशें लोकांनीं इंग्रजांना आडविलें. त्या वेळीं मोठी चकमक उडाली. परंतु दुर्दैवानें शेवटी इंग्रजांचा जय झाला; आणि मराठयांच्या या राजधानीवर तोफा चढविण्याचें काम सुरु झालें. किल्ला अतिशय अवघड असल्यानें त्यावर हल्ला कोणत्या बाजूनें व कसा करावा या योजनेंतच इंग्रजांचे पहिले आठदहा दिवस गेले. आणि लगेच रायगडावर तोफांच्या भडिमारास सुरवात झाली.
- २३ एप्रिल १८१८

N/A

References : N/A
Last Updated : September 02, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP