अगस्त्यगीता - उत्तमभर्ताप्राप्तिव्रत

अगस्त्य, एक वैदिक ॠषि होते. ते वशिष्ठ मुनिंचे वडील बंधू होत. यांचा जन्म श्रावण शुक्ल पंचमी (ई.पू. ३०००) ला काशीमध्ये झाला.


अध्याय चौथा
‘उत्तमभर्ताप्राप्तिव्रत’
भद्राश्व म्हणाला -
हे मुने, ज्ञानप्राप्तीची इच्छा ज्याला आहे अशा पुरुषाने कोणाला आणि कशा प्रकारे भजावे हे मला कृपा करून सांगा. ॥१॥
अगस्त्य म्हणाले -
भगवान विष्णुचीच सर्व प्रकारे अगदी देवांनीसुद्धा पूजा करावी. त्यांचेकडून अशा प्रकारे वर मिळेल त्याचा उपाय सांगतो. ॥२॥
विष्णु हेच सर्व वेदांचे ऋषींचे आणि मनुष्यजन्माचे रहस्य आहे. हाच श्रेष्ठ देव होय. याला नमस्कार करणारा कोणीही नष्ट होत नाही. ॥३॥
विष्णुला प्रसन्न करुन घेण्याचे व्रत नारदांनी अशाप्रकारे अप्सरांना सांगितले असे हे राजा ऐकिवात आहे. ॥४॥
अप्सरा म्हणाल्या -
हे ब्रम्हपुत्र देवर्षे, आम्हाला पती असावे अशी इच्छा आहे. भगवान नारायण आमचे पती कसे होतील ते सांगा. ॥५॥
नारद म्हणाले -
अशा प्रकारचा प्रश्न विचारण्यापूर्वी साष्टांग नमस्कार करावा असा नियम आहे परंतु तारुण्याच्य उन्मादात तुम्ही तो पाळला नाही. ॥६॥
तरीही तुम्ही विष्णुचे नाव घेतले आणि तोच तुमचा पती व्हावा अशी तुमची इच्छा आहे. तिव्हा तुम्ही आपल्या अपराधाचे थोडे परिमार्जन केले असे मला वाटते. आता मी तुम्हाला ते व्रत सांगतो, ज्यामुळे विष्णु स्वत: वर देईल आणि तशी इच्छा असणार्‍याचा पती होईल.
नारद म्हणाले -
वसंतऋतूमधल्या शुक्लपक्षातील द्वादशीला उपवास करून रात्री विष्णुचे विधिपूर्वक पूजन करावे. ॥७-८-९॥
मूर्तीभोवती लाल फुलांचे वर्तुळ करावे आणि निद्रा न घेता गायन, वादन, नर्तन यांमध्ये रात्र घालवावी. ॥१०॥
विष्णुच्या शीर्षाची भाव म्हणून पूजा करावी. कमरेची अनंग म्हणून, हातांची काम म्हणून, उदराची सुशास्त्र म्हणून, पायांची मन्मथ म्हणून आणि
सर्वांगाची हरी म्हणून पूजा करावी. ॥११॥
त्यानंतर भक्ताने सर्व दिशांना वाकून नमस्कार करावा. ॥१२॥
प्रात:काळी शरीराने अव्यंग असलेल्या एखाद्या वैदिक ब्राम्हणाला दान द्यावे. ॥१३॥
ब्राम्हणांना नमस्कार केल्यानंतर व्रताची सांगता करावी. हे तुम्ही केले तर विष्णु निश्चितच तुमचा पती होईल.
ऊसाचा उत्कृष्ट रस आणि जाईच्या फुलांनी देखील विष्णुची पूजा करावी. अभिमानाने भारल्यामुळे या प्रश्नापूर्वी तुम्ही मला नमस्कार न केल्याने
त्याच्या परिणाम तुम्हाला भोगावा लागे. या तळ्यातच अष्टावक्र नावाचे महामुनी आहेत. त्यांचा उपहास तुम्ही कराल आणि त्याच्याकडून शाप मिळवाल.
तो श्रेष्ठ हरी तुम्हाला पती म्हणून प्राप्त होईल. ॥१४-१८॥
परंतु तुमच्या अभिमानामुळे गुराख्यांकडून तुमचे हरण होण्याचा अपमान तुम्हाला सहन करावा लागेल. तरी भगवान तुमचा पती होईलच. ॥१९॥
अगस्ती म्हणाले -
असे म्हणून देवर्षी नारद अंतर्धान पावले. अप्सरांनी सांगितल्याप्रमाणे व्रत केले आणि विष्णु त्यांच्यावर प्रसन्न झाले. ॥२०॥
अगस्त्यगीतेमधील उत्तमभर्ताप्राप्तिव्रत नावाचा चवथा अध्याय समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 04, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP