स्फुट अभंग - २५

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


२५
अज्ञानजनांचे देव नानापरी । त्यांची संख्या करी कोण आतां ॥१॥
कोण आतां देव पावेल तयासी । जन्ममरणासी चुकवीता ॥२॥
चुकविला देव पाहतां दिसेना । निश्चयो असेना येके ठाई ॥३॥
येके ठाईं भाव येके ठांई देव । चुकला उपाव सार्थकाचा ॥४॥
सार्थकाचा देव तरीच सांपडे । जरी कांहिं घडे संतसेवा ॥५॥
संतसेवा भाव करितां तरले । जन उद्धरलें नेणों किती ॥६॥
जन साधूचे संगती । आपुले प्रचीती मुक्त जाले ॥७॥
मुक्त जालें ज्ञानें विचारें पाहाता । स्वरूपीं राहतां निरंतर ॥८॥
निरंतर देव फुटेना तुटेना । चळेना ढळेना कदा काळीं ॥९॥
कदा काळीं देव रचेना खचेना । येईना जाईना निरंजन ॥१०॥
निरंजन देव पाहातां दिसेना । परी तो नासेना कल्पकोटी ॥११॥
कल्पकोडी गेले देवासी नेणतां । यातना भोगितां जन्मोजन्मीं ॥१२॥
जन्मोंजन्मीं देव जवळी चुकला । प्राणी भांबावला मायाजाळीं ॥१३॥
मायाजाळें कांहिं उमजत नाहीं । देव ठांई कल्पनेचे ॥१४॥
कल्पनचे देव कल्पांतीं नासती । ऐसें वेदश्रुती बोलतसे ॥१५॥
बोलतसे श्रुती दृश्य नासिवंत । जाणिजे शाश्वत परब्रह्म ॥१६॥
परब्रह्म आहे सर्वत्र व्यापक । तेंचि पाहें येक गुरूमुखें ॥१७॥
गुरूमुखें ब्रह्मविचार पाहावा । निश्चयो राहावा निर्गुणाचा ॥१८॥
निर्गुणाचा ध्यास निर्गुण करील । मग उद्धरील आपणासी ॥१९॥
आपणासी पाहे जो कोण्ही शोधूनी । तो जन्मापासुनी मुक्त जाला ॥२०॥
मुक्त जाला देहेसमंध सोडीतां । निर्गुण धुंडीतां निर्गुणची ॥२१॥
निर्गुणची स्वयें जो कोण्ही जाहला । तोचि येक भला समाधानी ॥२२॥
समाधनी साधु जोडतां संकट । मिथ्या खटपट जेथें तेथें ॥२३॥
जेथें नाहिं माया जो मायेवेगळा । ऐसा तो विरळा संतजन ॥२४॥
संतजन तोचि जो स्वयें देवची । तेथें ये मायेची वार्ता नाहीं ॥२५॥
वार्ता नाहिं ऐसें सज्ञान जाणती । अज्ञान नेणती कांहिं केल्यां ॥२६॥
कांहिं केल्यां पापरी पुण्य आचरेना । संसार सरेना दुःखमूळ ॥२७॥
दुःखमूळ जन्म ज्ञानें निरसावा । विवेकें पाहावा सारासार ॥२८॥
सार निराकार असार आकार । निकारें पार पाविजेतो ॥२९॥
पाविजेतो परी अर्थीं विवरावें । विवेकें विरावें स्वस्वरूपीं ॥३०॥
स्वस्वरूपीं ज्ञाते जे कोण्ही विरले । स्वरूपची जाले आत्मबोधें ॥३१॥
आत्मबोधस्थिति बाणलीसे जया । मज तया माया आतळेना ॥३२॥
आतळेना मायाममता अंतरीं । नित्य निरंतरीं निरंतर ॥३३॥
निरंतर असे परी तो न दिसे । गुप्त जाला भासे भासमात्र ॥३४॥
भासमात्र देहे तया ज्ञानियांचा । अंतरीं सुखाचा सुखमूर्ती ॥३५॥
सुखमूर्ती सुखदुःखाविरहित । बोलियेलों हेत कळावया ॥३६॥
कळावया हेतु शब्द निःशब्दाची । लक्षें अलक्षाची सोय लाये ॥३७॥
सोय लागे तेथें लक्ष ना अलक्ष । देहें पूर्वपक्ष बोलियेला ॥३८॥
बोलियेलों शब्द अनिर्वाच्या वाचे । जाणती मुक्तीचे वांटेकरी ॥३९॥
वांटेकरी जाले अवस्थेवेगळे । श्रुतीसी ना कळे पार ज्यांचा ॥४०॥
पार ज्याचा नाहीं अपार विदेही । देहातीत पाहीं समाधान ॥४१॥
समाधान राहे निःसंग राहतां । संग पाहों जातां कासावीस ॥४२॥
कासावीस जाले संगाचेनी गुणे । निःसंगची होणें सर्वकाळ ॥४३॥
सर्वकाळ संग सोडावा आपुला । मीपणाच्या बोला लागों नये ॥४४॥
लागों नये कदा मनामागेंमागें । कल्पनेंच्या त्यागें समाधान ॥४५॥
समाधान राहे संतांचे संगती । वस्तुची प्रचीती वस्तुरूप ॥४६॥
वस्तुरूप जाला जो कोण्ही साधक । धन्य तोचि येक लोकांमध्यें ॥४७॥
लोकांमधें परलोकचि साधावा । भगवंत शोधावा नानापरी ॥४८॥
नानापरी सांगें रामीरामदास । भाविकें विश्वास सोडूं नये ॥४९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP