स्फुट अभंग - २४

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


२४
काया माया छ्याया हे कांहिं तगेना । वैभव जगेना जन्मवरी ॥१॥
जन्मवरी लोक देखत आहेती । किती येक जाती सांडुनीयां ॥२॥
सांडुनीयां जाती कन्या पुत्र धन । सर्व साभिमान लोकिकांचा ॥३॥
लोकिकांचा भाव लोकिकीं राहिला । प्राणीमात्र गेला येकलाची ॥४॥
येकलाची येता येकलाची जातो । मध्येंची भुलतो मायाजाळें ॥५॥
मायजाळ माया हें कांहीं सुटेना । नाचतीं वासना अनावर ॥६॥
अनावर मन कदा आवरेना । धरितां धरेना अनुमानें ॥७॥
अनुमानें कांहिं नव्हे समाधान । जंव आत्मज्ञान पाविजेना ॥८॥
पाविजेना मोक्षा तुटेना बंधन । श्रवण मनन जेथें नाहिं ॥९॥
जेथें नाहिं सारासार विचारणा । या जन्म मरणा ठाव तेथें ॥१०॥
तेथें ठाव जाला देहे संदेहासी । होती पापराशी अनुमानें ॥११॥
अनुमानें पाप अनुमानें पुण्य । अनुमाने धन्य होईजेना ॥१२॥
होईजेना धन्य विचारणेवीण । लोकिकाचा शीण वेर्थ जातो ॥१३॥
वेर्थ जातो शीण देखता देखतां । लोकिक तत्त्वता राखवेना ॥१४॥
राखवेना परी राखीला पाहिजे । मनामधें कीजे विचारणा ॥१५॥
वीचारणा कीजे या देवांभक्तांची । कर्ता कोण तोची वोळखावा ॥१६॥
वोळखावा कर्ता सर्वत्र सृष्टीचा । मी तो कोण कैचा धुंडाळावें ॥१७॥
धुंडाळावें महावाक्यपंचीकरण । तत्वांचें विवरण यथासांग ॥१८॥
यथासांग व्यंग पडोंची नेंदावें । अत्यंतची व्हावें सावधान ॥१९॥
सावधानपणें देवासी पाहाणें । नासीवंत जाणें सांडूनीयां ॥२०॥
सांडुनीया सव अष्टधा प्रकृती । विवेकाची गती वोळखावी ॥२१॥
वोळखावी मुख्य सज्जनाची कृपा । तेणें पुण्यपापा नातळावें ॥२२॥
नातळावें कदा दृश्य पदार्थासी । असोनी देहासी लिंपों नये ॥२३॥
लिंपों नये जैसें पद्मिणीचें पत्र । देहे डिंबमात्र चालतसे ॥२४॥
चालतसे सर्व तत्वांचें गांठोडें । तेतें काय वेडें गुंडाळतें ॥२५॥
गुंडाळतें वेडे देहसंबंधासी । भ्रमें विवेकासी सांडुनीयां ॥२६॥
सांडुनीयां सार घेईल असार । ऐसा अनावर भ्रम आहे ॥२७॥
भ्रम आहे जय अंतरीं माजला । तोचि तो गांजला संवसारीं ॥२८॥
संवसारी येक सुटोनीयां गेले । येक ते बांधलें संकल्पानें ॥२९॥
संकल्पानें सुटे ऐसा कोण आहे । ईश्वरासी पाहे शोधुनीया ॥३०॥
शोधुनीयां पाहे तोची देव लाहे । येर तो न राहे देवापासीं ॥३१॥
देवापासीं राहे बहुतां सुकृतें । लोकिकांसेसे भूतें झडपीती ॥३२॥
झडपीती भूतें सत्यची मानीतां । देव पाहों जातां भूतें मिथ्या ॥३३॥
भूतें मिथ्या ऐसें हृदई बिंबलें । तेव्हांची जाहलें समाधान ॥३४॥
समाधान आहे मायातीत होतां । नाथिली अहंता घेऊं नये ॥३५॥
घेऊं नये पक्ष कदा असत्याचा । वेगीं या सत्याचा पंथ धरा ॥३६॥
पंथ धरा जेणें परत्र पाविजें । देवासीं लाविजे संनिधान ॥३७॥
संनिधानेमात्रें तरे बहुजन । पावनें पावन होईजेतें ॥३८॥
होईजे पावन तेंची तें स्वहीत । सोडीतां पतीत होईजेतें ॥३९॥
होईजेतें कष्टी तेंचि कां धरावें । वेगीं उद्धारावें आपणासी ॥४०॥
आपणासीं वैर कदा धरूं नये । अंतीं सर्व जाये निघोनीयां ॥४१॥
निघोनियां जाये त्याचें घेसी काये । वेगीं धरीं सोये शाश्वताची ॥४२॥
शाश्वताची सोये सांडुनी करंटा । वेर्थ बारा वाटा धांवतसे ॥४३॥
धांवतसे चहूंकडे अनुमानें । तया समाधानें मोकलीलें ॥४४॥
मोकलीलें मन ऐसें हीं कळेना । मातला वळेना मनासंगें ॥४५॥
मनासंगें कदा निःसंगता नये । अपाये उपाये मानीतसे ॥४६॥
मानीतसे मनें जें जें वोळखीलें । स्वरूप राहिलें मनातीत ॥४७॥
मनातीत होतां होये सार्थकता । मनासवें जातां अधोगती ॥४८॥
अधोगती चुके तें कांहि करावें । मनासवें व्हावें कासावीस ॥४९॥
कासावीस पंचभौतिकीं राहातां । भूतांसी पाहतां भूतलोक ॥५०॥
भूतलोक वेगीं सांडुनीयां जावें । विचारें पाहावें परब्रह्म ॥५१॥
परब्रह्म तेंचि आपणची आहे । दास म्हणे पाहें अनुभवें ॥५२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP