शिवभारत - अध्याय बत्तिसावा

श्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून लिहिलेलें कवीन्द्र परमानन्दकृत ' श्रीशिवभारत '


कवींद्र म्हणाला :-
नंतर शिवाजीनें जुना राजनीतिमार्ग चालू करून सर्वच प्रभावली प्रांत स्वपराक्रमानें आपल्या हस्तगत केला. ॥१॥
जोराच्या - वेगाच्या युद्धांत निष्णात, प्रख्यात, शहाण्या अशा त्र्यंबक भास्करास शिवाजीनें लगेच प्रभावली प्रांताचा अधिकारी नेमलें. ॥२॥
क्रोधानें राजापूरची संपत्ति हरण करणार्‍या व बलानें शृंगारपूर जिंकणार्‍या त्या शिवाजीस शत्रूकडील शेंअक्डों शरणेच्छु श्रेष्ठ सैनिक प्रणाम करूं लागले. ॥३॥
मग त्या नगराच्या ( शृंगारपूरच्या ) रक्षणासाठीं जवळच असलेला प्रख्यात गड क्षणभर पाहून त्यानें त्याचें ‘ प्रतीतगड ’ असें नांव ठेविलें. ॥४॥
चंद्र, कमळतंतु, चांदणें, दंव, चंदन, चांपा इत्यादीच्यायोगें आनंद देऊन अत्यंत सुखावह अशा ग्रीष्म ऋतूनें त्याची सेवा केली. ॥५॥
आश्रयास असलेल्या बकुळी व पाडळी यांच्या फुलांच्या बाणांचा भाता धारण करणार्‍या व ज्याचे बाण जगास जिंकणारे आहेत अशा कोमल मदनानेंसुद्धां शिवाजीचें मन हरण केलें नाहीं ( तो मदनवश झाला नाहीं ). ॥६॥
ग्रीष्म ऋतु आला असतां अतिशय तापणांच्या सूर्याच्या योगें कोमट झालेल्या पाण्यच्या खालीं नद्यांत चांगलें शीतळ पाणी होतें ( व ) जनांवरें त्या आश्रयावर तेथें होतीं. ॥७॥
अतिशय कडक ऊन्ह असणार्‍या ग्रीष्म ऋतूनें प्रत्येक दिवशीं तलावांतील पाणी आटवून टाकल्यामुळें ( कमी कमी केल्यामुळें ) सारसपक्षीं चिखलांत बसूं लागले आणि मासे व कांसवें यांचे थवेच्या थवे मरूं लागले. ॥८॥
फुललेल्या शिरीष व पाडळी यांच्या छताच्या सुगंधानें सुगंधित झालेल्या वायूच्यायोगें विरक्त व विद्वान लोकांच्या मनाससुद्धां कामज्वराची बाधा झाली ! ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : September 12, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP