यशवंतराय महाकाव्य - सर्ग एकोणिसावा

श्री. वासुदेव वामन शास्त्री खरे यांनीं रचिलेंले.


कमलाबाईचा पिता आनंदराव डफळे याची व मल्हारराव होळकराची गांठ व संभाषण - आनंदराव आपली हकीकत सांगतो - पराभवानें झालेली दुर्दशा-  परोपकाराचें कृत्य - त्याचें फळ चौदा वर्षेपर्यंत तुरुंगांत राहणें - तेथून सुटका - वैराग्य.

श्लोक
मल्हार तैसें यशवंतराजया । बोलून सांगे दुरि न्यावया तया ॥
झालें विनाकारण खिन्न मानस । वाटे जगीं जीवन त्या जसे विष ॥१॥
भृत्यांस राहूं जवळी न दे स्थित । बैसे उगा तो सुसकार टाकित ॥
खायास प्याया नच घेत आवडी । चिंता कशाची कळवी न एवढी ॥२॥
तों सेवकें येउन आंत वंदिलें । नम्र स्वरें होळकरा कथीयलें ॥
“ गोंसावि दारीं तुज भेटुं इच्छितो । आज्ञा कशी यास्तव वाट पाहतों ” ॥३॥
ठेवावया उत्तर देशिं भूपती । धाकांत मल्हार झटे महामती ॥
प्रत्येक होते दरबारि हिंडत । तद्दोत नानाविध - वेष - संयुत ॥४॥
“ गोसावि जो राहि उभाच बाहिर । माझा न तो हरे असेल कीं तर ॥
पाहीन त्यातें दवडून न क्षण ” । बोले असें चिंतुन शौर्य - लक्षण ॥५॥
“ बाहेर जाऊन तयास घेउन । ये आंत होवो मजलागिं दर्शन ” ॥
आज्ञेप्रमाणें मग जाय चाकर । गोंसावि तो घेउन येइ सत्वर ॥६॥
“ द्वारीं उभा जाउन राहिं बाहेरी । येऊं नको देउं कुणास अंतरीं ” ॥
भृत्या असें सांगुन वाक्य बोलला । योगीस तो होळकर प्रधी भला ॥७॥
पाळें जशीं दूरवरी जमीनिंत । जाऊन वृक्षासबळत्व आणित ॥
सर्वत्र तैसें मम दूत हिंडती । मंत्रें अरी यास्तव जिंकितों किती ॥८॥
आहेस तूं दूतच एक जाणतों । केला तुला काय हुकूम नेणतों ॥
सांगितलें काय कुणा करावया । ध्यानांत नाहींच रहात माझिया ॥९॥
हें योगिनाथें परिसून सत्वर । केलें तदा होळकरास उत्तर ॥
“ जैसा तुम्हां मी सिसतों असें तसा । मी हेर नाहीं मज कां करीतसां ? ” ॥१०॥
मल्हार बोले “ मग काय कारणें । आलास येथें मज शीघ्र सांगणें ॥
माझी तुझी भेट कधीं न जाहली । कां आज इच्छा मज पाहुं धांवली ? ” ॥११॥
गोंसावि तों बोलत काय भाषण । “ केलें अहा ! निर्दय कीं तुवां मन ॥
होता असा काळ जयांत दास हा । पावे तुझी सुप्रिय मित्रता पहा ॥१२॥
एका स्थळीं बैसुन गोष्टि बोललों । एका स्थळीं दावुन शौर्य वाढलों ॥
सव्वीस वर्षे जरि यास लोटलीं । माझी तुला विस्मृति काय जाहली ? ॥१३॥
शौर्ये स्वकीयें समरीं महाबळी । जो शत्रु - कीर्ती हरिता स्थळीं स्थळीं ॥
आनंद मी हा डफळे कुळांतला । आहें पहा ओळखिसी न तूं मला ? ” ॥१४॥
आनंद होऊन विरक्त हिंडतां । पाहे कसा तो कमलेचिया सुता ॥
कन्या - सुता जाणुन त्या रडे बळी । ही गोष्ट मीं मागिल सर्गिं आणिली ॥१५॥
आनंद तो रक्षण नातवा करूं । सन्मित्र दृष्टी पडतां सुखा वरूं ॥
गोटांत तो त्या समयास पातला । आला त्वरें होळकरास भेटला ॥१६॥
खाणाखुणा पूर्ण पटून पोंचल्या । चित्तीं सुखाच्या लहरीच ऊठल्या ॥
स्वानंद भारी जरि दाखवी निका । मल्हार कांहीं दिसला गमे फिका ॥१७॥
तो बोलला “ बा सदया ! सुहृत्तमा ! । आनंदराया ! सुगुणा ! मनोरमा ॥
नेलीं कशीं हीं इतुकीं तुवां दिनें ? । कां धन्य केलें न मला स्वदर्शनें ? ॥१८॥
जाटांसवें तुंबळ युद्ध जाहलें । तेथें मराठे अपकीर्ति पावले ॥
पासून तेव्हां घडलें कसें कसे । आनंद तो होळकरा कवीतसे ॥१९॥
“ सैन्यें मराठी पळतां चहूंकडे । वाटे मला तें अतिथोर सांकडें ॥
कीं लागला डाग यशश्शशीस हा । मानी जना दुस्सह होय तो पहा ॥२०॥
विख्यात माझ्या पथकांतले भट । एकेक गेले फुटुनी भयावृत ॥
मीं एकटा वैभव - हीन चाललों । जावें कुठे निश्चय हा न पावलों ॥२१॥
पायीं स्ववेषांतर मी करूनियां । देशामधें हिंडत चाललो तया ॥
गांवांत एके दिनिं एक पोंचलों । जें वृत्त झालें तुज तेथ तें कळो ॥२२॥
विस्तीर्ण देऊळ सुरम्य पाहिलें । विश्रांति घेऊं क्षण चित्त धांवलें ॥
तो पाहिले त्या स्थळिं राज - पुरूष । होते तिथे हिंडत जे अहर्निश ॥२३॥
सुरालयीं सावध ज्यास कोंडुन । करूं पहारा खपतात हे जन ॥
असे असा कोण पुरूष बंदिंत । कळावया हें मन होय उत्सुक ॥२४॥
विघ्नाविणें सत्वर आंत जाउन । मीं पाहिला तो गुणवंत सज्जन ॥
जो कृष्णदासाख्य धनाढ्य वत्सल । कोटा - पुरींचा रहिवासि सत्कुल ॥२५॥
यात्रार्थ तो हिंडत हिंडत स्वयें । घेऊन कांहीं परिवार तेथ ये ॥
कांहीं शिपाई तंव येति त्या स्थळीं । त्या कृष्णदासाप्रत वेढिती बळी ॥२६॥
या सावकारा छळण्यास दुर्मती । धाडी शिपाई अजमीर - भूपती ॥
पूर्वीच होतें मनिं वैर सांठलें । तें आज घ्यावें उगवून वाटलें ॥२७॥
औदार्य कर्णासम थोर ज्या असे । संपत्ति दासीसम यद्गृहीं वसे ॥
शुद्धस्वभावें व्यसनार्त तो जन । पाहून माझें द्रवलें तदा मन ॥२८॥
जाऊनियां धैर्य दिलें तयास मीं । झालों श्रमी पाहुन त्याजला श्रमी ।
संगें तयाच्या दिन कांहीं राहिलों । तत्स्नेह विश्वास विशेष पावलों ॥२९॥
स्वप्राण पाशीं स्वयमेव गुंतवीं । आयुष्य खर्चूनि ही यास सोडवीं ॥
आला असा हेतु मनांत माझिया । मी सज्जलों त्यावरी करूं दया ॥३०॥
रक्षूं स्वदेहा परजीव खर्चुनी । तो ही महात्मा नच आयके गुणी ॥
येतात जे सज्जन संकटामधें । शोभा तयांची कृति त्यांस फार दे ॥३१॥
‘ गजेंद्र - लक्ष्मी तुज ईश्वरें दिली । व्ययें तिच्या कीर्ति मिळे तुला भली ॥
परोपकारीं तव हेतु आगळे । तुझी जगातें उपयुक्तता कळे ॥३२॥
प्राणांस भीती तव संकटांत या । यत्नें तयां पाहिन वांचवावया ॥
घे साधुनी संधि अशी कशी मिळे । हानी तुझी चिंतुनि चित्त हें जळे ॥३३॥
तूं वांच बा शंभर आणि वत्सर । होई अनायांस सदा दयाकर ॥
दे निर्ग्रुहाला गृह दुर्गता धन । साधीं सख्या दीन - जनावलंबन ॥३४॥
देऊळ लक्षावधि राहुं दे उभें । येवोत विद्वान् शतशा तुझ्या सभे ॥
जे यज्ञ - कुंडांतुन धूर चालती । होवो तुला तीच सुलोक - पद्धती ॥३५॥
आयुष्य सद्धर्म - पयेंचि घालवी । कीर्ती दिगंता अतिपुण्य पाठवी ॥
बा कृष्णदासा ! पळ येथुनी भला । कामीं तुझ्या खर्चिन जीव आपुला ’ ॥३६॥
ऐशा प्रकारें करूनी सुबोधन । वेगें पळाया वळवून तन्मन ॥
मी लागलों संधि पहावया जपूं । त्या सोडवाया दिनरात्रही खपूं ॥३७॥
मीं वेष माझाच मराठि त्या दिला । त्यातें, तयाचा निज देहिं घेतला ॥
एक्या पहांटेस शिपाइ निद्रित । पाहून केलें झणि त्या पलायित ॥३८॥
जागे शिपाई करितात ओरड । झाला घसा ओरडुनीच कोरडा ॥
धांवूनियां धुडिति सर्व ही स्थळें । कैदी कुठे जाय न तें तया कळे ॥३९॥
रागें मला येउन ताडिती बळें । पोटांत संताप तयांचिया जळे ॥
‘ वाणी कुठे जाय लपून तो बसे । सांगें तरी जीव तुझा रहातसे ’ ॥४०॥
बोलोनियां यापरि ताडिती मला । कांहीं नफा त्यांस परी न जाइला ॥
जो मीं अबोला धरिलाच एकदा । नाहींच तो सोडियला पुन्हा कदा ॥४१॥
जो हादवैरी नृपतीस भासला । कैदी असा सांपडुनी गमावला ॥
पोटांत भीती म्हणुनी उठे महा । झाली तयां लाज विशेष तैं पहा ॥४२॥
घेऊन मातें मग राजसंनिध । गेले तदा जाट शिपाइ दुर्मद ॥
मी राहिलों त्या नृपतीपुढें उभा । ज्याच्या मुखीं शोभतसे जयप्रभा ॥४३॥
त्यानें मला ओळखिलें ह्मणे ‘ अरे ! । हा दुष्ट यायास पुढें कसा सर ? ॥
हा मत्त नाईक मराठि जाणतो । जो आपणा शौर्य - बलाढ्य मानितो ॥४४॥
कां रे तुवां खालति मान घातली ? । कीं आज जिव्हा तव बद्ध जाहली ॥
सैन्यें मराठी जमवून तेधवां । विध्वस्त केला मम देश कां तुवां ? ॥४५॥
षण्मास रात्रंदिन घोडियांवरी । बैसून मंत्री जपले बहूं परी ॥
नाहींच निद्रा मज लागली क्षण । तेव्हांच झालें मम देश - रक्षण ॥४६॥
तो मी तुला सोडिन आज काय रे ? । त्वां ओढिला मृत्यु धरूनियां करें ! ॥
बंदींत आधीं दिन कांहिं घालवीं । आशा - लता घेउ तुझी न पालवी ’ ॥४७॥
कारागृहीं वाक्य वदून यापरी । न्यायास दूर स्वसभेंतूनी करी ॥
मी घालुनी खालति मान चाललों । त्या संकटीं क्लेश न लेश पावलों ॥४८॥
जेव्हां करीं शूर हि शत्रु सांपडे । तेव्हा दया दाखविणें तया पडे ॥
सन्मान देती जित शत्रुला गुणी । ही गोष्ट भालीच कधीं न तन्मनीं ॥४९॥
एकेक वर्षासम भासले दिन । चौदा असे वत्सर होय बंधन ॥
ज्या ज्या व्यथा संभवती मनाप्रत । त्या लागल्या होउं मलाहि सांप्रत ॥५०॥
आला किती वेळ नभामधें रवी । शोभाभरें भूमि - तळास तोषवी ॥
माते तयाचा उपयोग कासया । मीं एकदां पाहियला न तो कसा ! ॥५१॥
नाना चमत्कार - युता सवैभवा । सृष्टी मला काय असून तेधवां ? ॥
खोलीच माझें जग त्यांत मी धनी । स्वातंत्र्य स्वप्नामधिं मात्र ये मनीं ॥५२॥
हातीं विडी पायिं बिडी सदा असे । खायास ही पोटभरी कधीं नसे ॥
ऐशा स्थळीं राहुन देह वांचला । याचा चमत्कार गमे अतां मला ॥५३॥
कारागृहीं मात्र कुडी वसे मन । देशांतरा दूर करीत लंघन ॥
एका स्थळीं राहि कधीं न तें स्थिर । चिंता नव्या भोगित मात्र दुर्धर ॥५४॥
वेळीं अवेळीं कमला - स्मृती घडे । तों जीव चिंता - जलधीमधें पडे ॥
स्वप्नांत पाहून सुतेस हर्षलों । कित्येक वेळां दचकून ऊठलों ॥५५॥
जो मी मराठा सरदार केसरी । अत्यंत शोभेस पुण्यामधें धरीं ॥
उत्कर्ष - कालीं रडवूनियां अरी । दुर्भाग्य गेलों निजशत्रुच्या करीं ॥५६॥
कारागृहीं मी हतभाग्य सांपडें । वाटे जगीं निज्फळ जन्म हा घडे ॥  
जों मान जें सौख्य किज्यास वारूळीं । त्याचा मिळे लेश मला न त्या स्थळीं ॥५७॥
त्या कोठडीच्या खिडकींतुनी वरी । पाहे तदा धार दिसे नभोंऽतरीं ॥
स्वच्छंद पंखां पसरून चालली । माझ्या मनीं मत्सर - बुद्धि जाहली ॥५८॥
पशूंस पक्ष्यांसहि जी स्वतंत्रता । मिळे वनीं वा गगनांत हिंडतां ॥
तियेस भोगूं प्रतिबंध माणसा । मनुष्य ठेवी सुविचार हा कसा ? ॥५९॥
संज्ञापलों एक दिनीं सकाळीं । तोडूनियां बंधन गर्दि केली ॥
आला शिपाई धरिलें तयाला । एका क्षणीं तो हत - वीर्य केला ॥६०॥
खङ्गास त्याच्या हिसकून धांवें । तों स्वार तेथें झणि एक पावे ॥
मीं घातली त्यास उडी धराया । तो कोसळे खालिं तयाच ठायां ॥६१॥
घोड्यावरी बैसुन धांव घेतली । मागून गर्दी मग फार जाहली ॥
दैवें दिला हात म्हणून वांचलों । स्वातंत्र्य माझें प्रिय पूर्ण पावलों ॥६२॥
रानोमाळीं हिंडुन दमलों मम कन्या ॥
शोधायाला सांपडली ती नच धन्या ॥
संसाराचा वीट मला ही मग आला ॥
वैतागानें वेष असा मीं मग केला ॥६३॥
हृदय विटलें माझें तेव्हां जगांतिल वस्तुंला ॥
हरि - हर - पदीं तें लावोनी हितार्थच साधिला ॥
मम तनु झिजो अन्यासाठीं निरिच्छपणें सदा ॥
म्हणुन झटलों कामक्रोधां करूं जित दुःखदां ॥६४॥
गेलों गंगोत्रिला मी हिमनग चढुनी श्रीहरिद्वार पारी ॥
काशी - रामेश्वरीं श्री रघुपति नगरीं श्री जगन्नथ दारीं ॥
लीला श्रीकृष्ण जेथें घडवित मथुरा - द्वारका - गोकुळांत ॥
जावोनी क्षेत्र - तीर्थें सकळ बघितलीं जाहलें चित्त शांत ॥६५॥
भोगुन दुःख सुखादि जगांतिल मी श्रमलों ।
हेतु उरे मम एकचि तो तुजलागिं कळो ॥
आणुन मैत्रि मनीं अपुली बहुतां दिवसें ।
घालुन आण सुजाण सख्या विनवीत असें ” ॥६६॥

N/A

References : N/A
Last Updated : March 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP