यशवंतराय महाकाव्य - सर्ग तेरावा

श्री. वासुदेव वामन शास्त्री खरे यांनीं रचिलेंले.


अनंताचार्य सदाशिवरावभाऊची भेट घेतात - सदाशिवराव अनंताचार्यास आश्वासन देतो - पेशव्याचें दरबार - अनंताचर्याचें दरबारांत भाषण - त्या भाषणाचा पेशव्याच्या मनावर परिणाम - वादविवाद - पेशव्याचा निश्चय.

श्लोक
तो विप्र जाऊन सदाशिवाला । भेटे न जों येउन वेळ झाला ॥
वृत्तांत कोटा - शहरीं उदेला । तो सर्व ही त्याप्रत सांगिजेला ॥१॥
उन्मत्त खानें कवण्या तर्‍हेनें । लोकां छळीलें कथिलें तयानें ॥
जो सिद्ध कोटापुर सोडवाया । वाखाणिलें त्या यशवंतराया ॥२॥
“ दिल्ली - पतीनें धन देउं केलें । तेणें मराठे वश त्यास जाले ॥
आले कराया यशवंत - नाश । घालून वेढा बसले पुरास ॥३॥
प्रत्येक होते दिवसास झुंज । दोहींकडे पावत नाश फौज ॥
आलों म्हणोनी विनती कराया । कीं वांचवावें यशवंतराया ॥४॥
आहों स्वधर्मी म्हणुनी तयार । मैत्रीस होऊं न धरूं हत्यार ॥
या रक्त - पाताप्रत थांबवावें । आतां न कोणासहि दुःख व्हावें ” ॥५॥
ऐकून हें वृत्त समस्त डोले । भाऊ तयाला मग काय बोले ॥
“ आचार्य यावें दरबारिं आज । पाहीन आधीं तुमचेंच काज ॥६॥
सांगून मी पाहिन पेशव्याला । ऐकेल माझ्या बहुधा वचाला ॥
पाडीन त्याची समजूत कांहीं । मी पक्ष घेतों तुमचाच पाहीं ॥७॥
वाड्यांत होतो दरबार जेव्हां । हा जाणवा अर्ज नृपास तेव्हां ॥
जें जें तुम्हांतें वदणें वदावें । सर्वांस तें विश्रुत तेथ व्हावें ” ॥८॥
त्या रात्रिं झाला दरबार आले । झुंजार ते मानकरी मिळाले ॥
गेला भरोनी शनवार - वाडा । ऐसा जमे लोक - समूह गाढा ॥९॥
जाया निघाला मग तो अनंत । मार्गी चमत्कार बघे अनंत ॥
जी जी बघे वस्तु नवीन वाटे । पाहून आश्चर्य मनांत दाटे ॥१०॥
नानाप्रकारें करूनी सुवेष । ऐश्वर्य दावूं बघते अशेष ॥
फेंकीत दृष्टी भंवती अमंद । तेथें किती जाति खुशालचंद ॥११॥
शृंगारिलें अश्व सुभूषणांनीं । कित्येक त्यांच्या वरती बसूनी ॥
रस्त्यांत डौलें फिरतात दृष्टी । लोकांचिया ओढुन ते धरीती ॥१२॥
वारांगना सुंदर पद्म - नेत्री । जातात मार्गांतुन रम्य - गात्री ॥
त्या मारिती चंचल वक्र डोळे । ते बाण फाडूनच ऊर गेले ! ॥१३॥
श्रीमंत संभावित सभ्य लोक । जातात देवालयिं ते अनेक ॥
धंदे किती आटपुनी निघाले । याया गृहा, एकच गर्दि चाले ॥१४॥
पोटें परान्नें फुगवून तट्ट । खुशाल येथें बसतात भट्ट ॥
हे मठ्ठ बुद्धींत शरीरिं लठ्ठ । दानालयीं दाविती घट्ट हट्ट ! ॥१५॥
रस्त्यांत गर्दी मिळतो न वाव । जाती निराळ्या विविध - स्वभाव ॥
वेषांत वृत्तींत तसे निराळे । एका स्थळीं लोक कसे मिळाले ॥१६॥
तो विप्र जाऊन नृपालयांत । पोंचे तसा नीट महासभेंट ॥
तेथें व्यवस्थापक येउनीया । योग्यासनीं सांगति या बसाया ॥१७॥
पाहे सभेला सरदार लोक । युद्धप्रयायी बसले अनेक ॥
ठोकून वीरासन धीर मुद्रा । धिक्कारिती दाउन जे समुद्रा ॥१८॥
जों शत्रुचा थोर पडून घाला । राज्यास धोका अनिवार आला ॥
ज्यांनीं बळें तो परि दूर केला । होते असे वीर तया सभेला ॥१९॥
वंशांतले वीस पुरूष ज्यांचे । स्वराज - कार्या झटणार साचे ॥
गेले मरोनी लढतां रणांत । सभेंत होते बहु राज - भक्त ॥२०॥
व्यापार शेती कुल - वृत्ति यांतें । धिक्कारूनी शस्त्र धरून हातें ॥
जे वैभवाला चढले अपार । होते असे शूर सभेस फार ॥२१॥
कोणी महात्मे असतां लहान । जे तर्किले सुज्ञ - जनीं न सान ॥
ज्यांचा प्रतापार्क उजेड पाडी । पृथ्वीवरी, भीति अरींस धाडी ॥२२॥
किल्लेकरी सावध पूर्ण सिद्ध । किल्ला मिळेना करूनी सुयुद्ध ॥
वेगें शिड्या लावुन दुर्ग घेते । धैर्यांबुधी योध सभेस होते ॥२३॥
कांहीं नवे काढुन नीति - पंथ । सौख्य प्रजांचे बहु वाढवीत ॥
न्यायें प्रजा तोषित ज्यांहिं केली । होते सभेला जन बुद्धि - शाली ॥२४॥
पर्जन्य - काळीं रिपु अन्य - तीरा । दांतांत धैर्ये धरूनी हत्यारा ॥
हाणीति शत्रूंस तरून पूर । होते तिथे यापरि वीर शूर ॥२५॥
गाजी मराठ्यांमधिं शूर बाजी । जो भासला कीं दुसरा शिवाजी ॥
त्याचे सखे साहस संकटांत । कित्येक होते सरदार तेथ ॥२६॥
गादीवव्री शोभत तेथ नाना । दात्यांमधें कर्ण जया म्हणाना ॥
भावांवरी टाकुन राज्य - भार । जो भोगिता भूप - विलास थोर ॥२७॥
दोघेहि बंधू असुनी समर्थ । जे वाढवूं राज्य सदा पहात ॥
डोक्यावरी भार धरील तो कां ? । आणी स्व - सौख्यास कशास धोका ? ॥२८॥
या पेशव्यानें परि पूर्ण काळीं । साधून कामें बहु कीर्ति केली ॥
राज्याचिया दुर्गम नीति - शास्त्रीं । प्राविण्य दावी असुनी सुशस्त्री ॥२९॥
जाग्यावरी बैसुन तो पुण्यांत । संकल्प जे गुप्त करी मनांत ॥
येती फळें त्या जणु आपआप । तेव्हां कळे तन्मतिचा प्रताप ॥३०॥
युद्धाविणें जो निजकार्य साधी । उपाय योजी बहु सौम्य आधीं ॥
कोणी तयाला कपटी म्हणोत । न दोष त्या देतिल कोंकणस्थ ॥३१॥
बापाप्रमाणें अतिरम्य - मूर्ति । होती तयाची बहु शांतवृत्ति ॥
काळे तया किंचित थोर डोळे । जैं धूर्तता - दर्शक तेज खेळे ॥३२॥
सुदैव तें दावित थोर भाळ । बाहू तयाचे दिसती विशाळ ॥
उभार आलार न पुष्ट भासे । नाना असा त्या दरबारिं बैसे ॥३३॥
विश्वास आणी रघुनाथराव । भाऊ हि तेथें सरल - स्वभाव ॥
शोभेस देती दरबारिं साचे । बैसून जे हातच पेशव्याचे ॥३४॥
जे मैत्रिला इच्छिति पेशव्यांशीं । नृपाळ जे राहति दूरदेशीं ॥
त्यांचे सभेला मुखत्यार हो ते । प्रसन्न मर्जी करण्यात होते ॥३५॥
झुंजार इब्राहिमखान गारदी । जो शत्रु हे पक्षि तयांस पारधी ॥
मेहंदळेही बळवंतराव तो । बैसून सन्मान विशेष पावतो ॥३६॥
उतार ज्याचें वय भव्य कांती । जो जाणणारा दरबार - रीती ॥
तेथें व्यवस्थापक शुभ्र - केश । गादीपुढें राहि उभा सुवेष ॥३७॥
बोलावया त्या समयीं द्विजातें । हळूच तो दावित खूण हातें ॥
अनंत राहून उभा सभोंती । पाहे सभा सर्वहि एकदा ती ॥३८॥
( येथे ३९ नंबर नाही. )
यातें न्यहाळून किती पहाती । परस्परीं गोष्टि हळू करीती ॥
कटाक्षही टाकिति एकमेकीं । संकेत केले दुसरे अनेकीं ॥४०॥
तो स्पष्ट साधें मधुर स्वरानें । लागे करूं भाषण आर्जवानें ॥
कीं व्यक्त ज्या ज्या विषया करीतो । त्या त्या मधें तन्मय - चित्त होतो ॥४१॥
“ बल्लाळ भूपा ! नय - मार्ग - चारिन । हे हिंदु - लोक - प्रतिपाल - कारिन् ॥
श्रीमंत तूं सत्यच भाग्य - शाली । येवो जयश्री तुज सर्व काळीं ॥४२॥
कोटापुराहून पुण्या निघालों । विज्ञापना मी करण्यात आलों ॥
दयाळु चित्तें परिसून घ्यावी । बुद्धी तुला न्याय करूं घडावी ॥४३॥
स्वतंत्र कोटा असुनी प्रदेश । म्लेच्छाचिया जाय कसा करास ॥
हें सर्व तूं जाणसि लोक - नाथा ! । सांगेन कां तो इतिहास आतां ? ॥४४॥
हिंदु प्रजा दुर्बल म्लेछ - हस्तीं । येऊन जे तेथ अनर्थ होती ॥
राज्यांत दिल्ली - पतिच्या घडून । ते सर्व आले कथितों म्हणून ॥४५॥
दिल्ली - पती दिल्लिर आप्त नेमी । मानी सुभेदार सुभ्यास कामी ॥
कोट्यास येऊन अनर्थ केले । त्यानें जनां फारचि गांजियेलें ! ॥४६॥
अन्याय - मार्गे कर बैसवीले । व्हावे तसे सज्जन नागवीले ॥
लोभी मनुष्या अधिकार हातीं । सामर्थ्य मोठें नच लाज चित्तीं ॥४७॥
वाटे न कांहीं तर रक्त - पात । चुके कराया नच जीव - घात ॥
द्रव्यार्थ मार्गीं भलत्या पडून । घे साधुनी इच्छित कार्य खान ॥४८॥
लोकांस वाटे परि हा न मोठा । अन्याय झाला जरि फार तोटा ॥
दिल्लीर वित्तार्थच ताप देतो । नाहीं तिथे काय करील कीं तो ! ॥४९॥
वित्ताहुनी वस्तु जगांत कांहीं । आहेत ज्याम मौल्यच होत नाहीं ॥
त्या वस्तु घेऊं जंव खान पाहे । होऊन तों एक अनर्य राहे ! ॥५०॥
धर्मामधें होउं जुलूम लागे । उन्मत्तसा दिल्लिरखान वागे ॥
स्व - धर्म - कर्में प्रतिबद्ध झालीं । नीती जनाची बिघडून गेली ॥५१॥
कामांध तो दिल्लिर दुष्ट थोर । कुलस्त्रिया नेइ करून जोर ! ॥
येईल कोणावर धाड खोटी । रात्रंदिनीं काळजि हीच पोटी ! ॥५२॥
बेबंद झालें सगळेंच राज्य । अन्याय - वन्हीमधिं होय आज्य ॥
वेळीं उभा त्या यशवंत राहे । रक्षावया हिंदु जनास पाहे ॥५३॥
आहे मराठ्यांत तयास जन्म । अर्थांत त्याचे जन - मान्य कर्म ॥
अन्याय देखूं शकला न वीर । गोळा करी लोक धरून धीर ॥५४॥
देऊन कीं तो स्वसुखास लात । कामीं अशा दुर्घट घालि हात ॥
होऊनियां सक्त परोपकारीं । राहे उभा सज्जन मृत्यु - दारीं ॥५५॥
त्यानें तयारी लढण्यास केली । वार्ता अशी जों नगरीं उदेली ॥
तों भ्याड तो खान पळून गेला । धनी पुराला यशवंत झाला ॥५६॥
झाल्याविणें एकहि जीव - नाश । स्वातंत्र्य पावे सगळाच देश ॥
तो विघ्न आला अनिवार्य एक । भ्याले जया चिंतुनि सर्व लोक ॥५७॥
दिल्लीपती मालक त्या पुराचा । संतापला घातक दुर्लबांचा ॥
मल्हारराया मग लोभ दावी । सैन्यें मराठी निजकार्यि लावी ॥५८॥
तो राजपूतांसह भांडताहे । रक्षीत कोटा यशवंत राहे ॥
चोहींकडे होउन रक्त - पात । दुःखामधें देश असे समस्त ॥५९॥
यासाठिं मातें यशवंत पाठवी । कीर्ती तुझी थोर मनांत आठवी ॥
वारूनियां होळकरास सत्वर । तूं शांति देशाप्रत दे सुखाकर ॥६०॥
वृत्तांत माझा इतुकाच आहे । तो सांगुनी स्वस्थ बसून राहें ॥
तूं एक शब्दा सदया ! वदावें । लक्षावधी जीव सुखी असावे ॥६१॥
हातांत येतां अधिकार शक्ती । दीनां छळावें नच राज्य - रीती ॥
हा होतसे हिंदुवरी जुलूम । हें कीं मराठ्यांप्रत योग्य काम ? ॥६२॥
स्व - देश - मुक्तीकरितां झटावें । स्वधर्म - संवर्धन ही करावें ॥
स्व - राज्य - योगें स्वजनांस सौख्य । असे मनीं हें धरिं तत्व मुख्य ॥६३॥
ज्याचें असे संमत याच काजा । स्थापी महाराज्य शिवाजि राजा ॥
देशोन्नतीचाच जयास काम । तो शोभला वीर - शिरोललाम ॥६४॥
तो स्तुत्य हेतू धरूनी मनांत । हें कार्य हातीं यशवंत घेत ॥
कां आडवे आज तयास येतां ? । कां ही चिर - स्थायि अकीर्ति घेतां ॥६५॥
वैराण झाला सगळा मुलूख । खाया नसे अन्न जनां कितीक ॥
लागेल जें घेउन तेंच हातीं । देशांतरा येथिल लोक जाती ॥६६॥
व्हावा अम्हां हर्ष तुम्हां पहातां । स्वजातिचे यास्तव भेट होतां ॥
हें आज आलें अमुच्या कपाळा । घेणें करीं कीं तरवार भाला ॥६७॥
जे नित्य कोटा - शहरासभोंती । युद्ध - प्रसंग स्वजनांत होती ॥
जाती लयाया किती वीर - रत्नें । जीं वाटती दुर्मिळही प्रयत्नें ॥६८॥
दुष्काळ मोठा पडला असेल । कोट्यांत कोणीहि सुखी नसेल ॥
शें दोनशें नित्य मनुष्य - घात । होतील दुःकें रडतील आप्त ॥६९॥
झुंझार मोठे तुमचे मराठे । घेतील काळें नगरास वाटे ॥
अपार हानीस वरून कांहीं । नाहीं तयां तादृश लाभ पाहीं ॥७०॥
मल्हाररावास हुकूम द्यावा । मोर्चा तयाचा तिथुनी उठावा ॥
झालें असो काय उपाय त्याला । ऐकें विनंती अजुनी दयाळा ! ॥७१॥
कल्याण जे इच्छिति पेशव्यांचें । होवो अकल्याण न त्या नरांचें ॥
नाचो जगीं तें भगवें निशाण । म्लेच्छावरी हिंदुवरी कधीं न ॥७२॥
आहेत उन्मत्त अरी जगांत । त्यांच्यावरी सैन्य सुटो अनंत ।
कोट्यांतले दुर्बळ लोक त्यांतें । मारूनियां काय नफा तुम्हातें ? ॥७३॥
गंगानदी पैलतटीं अपार । जावोत वेगें उतरून वीर ॥
निर्मूळ होवो परधर्मि वैरी । शोभाल तेणें भुवनाधिकारी ॥७४॥
आम्ही प्रसंगीं रजपूत येऊं । हर्षे यथाशक्ति सुसाह्य देऊं ॥
व्हावे मराठे रजपूत राया । एकत्र अन्योन्य - हिता झटाया ॥७५॥
श्रीमंत राजे मुखत्यार येथें । जे धाडिती देउन संपदेतें ॥
नाहीं तसा मी परि विप्र भोळा । होवोन अन्याय म्हणे दयाळ ! ॥७६॥
बोलावयाला निज पक्ष युक्त । नाहीं मला युक्ति वदूं सदुक्त ॥
मी नम्रसा सेवक या पदांचा । पाढा असें वाचित आपदांचा ॥७७॥
नेत्रांमधें आणुन अश्रु - वारी । लक्षावधी दुर्बळ लोक दारीं ॥
माझे मुखें बोलति हें समक्ष । दे त्यांकडे एक कृपा - कटाक्ष ! ” ॥७८॥
बोलून हे शब्द अनंत ऐसे । सन्मान्य आचार्य उगीच बैसे ॥
आकर्षिलीं लोक - मनें तयानें । ते बैसती निश्चल विस्मयानें ॥७९॥
तों पेशवा बोलत रम्य वाणी । पोटीं महात्मा करूणेस आणी ॥
“ वृत्तांत जो त्वांकथिला अनंता । झाला अम्हां विश्रुत तो समस्तां ॥८०॥
गोष्टींत या होळकरास दोष । द्यावा असें वाटतसे मनास ॥
मल्हार वेढा उठवून जाई । काढीन ऐशी तजवीज कांहीं ” ॥८१॥
तों शौर्यशाली रघुनाथ दादा । वेळेस त्या बोलत काय शब्दां ॥
“ मल्हाररावाप्रत दोष देतां । नाना ! असे दुःख म्हणून चित्ता ॥८२॥
मल्हार तो सुज्ञ जनांस ठावा । प्रताप त्याचा कवणें वदावा ? ॥
त्याच्या मनाला न विषाद व्हावा ।विचार कांहीं असला करावा ॥८३॥
त्या सार्वभौमाप्रत दिल्लिनाथा । अयुक्त कांहींच न साह्य देतां ॥
पुराण तो भूपति - वंश गाजे । सन्मान देतात म्हणून राजे ॥८४॥
जे शाहुराजावर बादशाहें । अनंत केले उपकार पाहें ॥
तें पाहिजे आठविलें मनांत । झालों मराठे जरि शक्तिमंत ॥८५॥
इच्छा जरी उत्तर - देश घ्यावा । तो आपुला बादशहा करावा ॥
सन्मान त्याचा यवनांत वारो । हें ठेवणें नित्य मनांत लागे ” ॥८६॥
संतापला ऐकुन या वचाला । सदाशिव श्रेष्ठ तदा म्हणाला ॥
“ दादा ! कसेंही म्हणती म्हणोत । न वाटते तें मजला सुयुक्त ॥८७॥
जो दिल्लिच्या बादशहास तोष । द्याया स्वयें दे स्वजनास रोष ॥
जो शक्ति लावी भलत्याच कामीं । वाखाणितो होळकरास कां मी ? ॥८८॥
मेघांप्रमाणें मिळुनी समस्त । एकेक एकत्र अविंध होत ॥
मल्हार वायू करिता निराळे । त्यांतें तरी योग्य धरून भाले ॥८९॥
प्रख्यात - कीर्ती सरदार धीट । पेटे हठा हें गमतें न नीट ॥
कां हिंदुचें रक्त पडेल खालीं ? । इच्छा अशी कीं यवनास झाली ॥९०॥
कोट्यांतुनी दिल्लिर घालवाया । स्व - राज्य - संस्थापनही कराया ॥
जो बेत घाली यशवंतराज । सुज्ञांत तें होईल मान्य काज ॥९१॥
त्या नागरांचा करुनी विनाश । देणें पुन्हा तें पुर मोंगलांस ॥
ही गोष्ट तो केवळ निंद्य आहे । दुष्कीर्ति देईल अम्हांस पाहें ॥९२॥
हिंदूंत आणी यवनांत मोठें । होणार केव्हां तरि युद्ध वाटे ॥
रक्षू म्हणोनी रजपूत सर्व । कीं शत्रुचा हे हरितील गर्व ॥९३॥
यासाठिं येथून हुकूम जावा । मल्हार ताळ्यावर नीट यावा ॥
कोट्यांतले लोक सुखी असावे । त्यांनीं नृपा ! त्वद्गुण - गीत - गावें ” ॥९४॥
यापरि वादविवाद घडे दरबारिं महा ।
भांडति ते रघुनाथ सदाशिवराव पहा ॥
काय इथे करणें नच पेशवियास सुचे ।
भाउ वदे समयास तया वच तेंच रूचे ॥९५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP