यशवंतराय महाकाव्य - सर्ग दहावा

श्री. वासुदेव वामन शास्त्री खरे यांनीं रचिलेंले.


शहराच्या तटावर लढण्याची तयारी - तट घेण्यासाठीं मराठ्यांचे निष्फळ प्रयत्न - मराठे तटास खिंडार पाहून हल्ला करितात - रजपूत मागें हटतात - यशवंतराय त्या स्थळीं येऊन रजपूत लोकांस उत्तेजन देतो - पुन्हा लढाई - मराठे मागें हटून आपल्या छावणींत येतात - मल्हारराव कोटा शहरास वेढा घालून पुन्हा बसतो.

आर्या
मल्हारराव कोटा - शहरींच्या वेढुनि तटा बसला ॥
झटला हठें जरी तरि न चले त्याचा उपाय ही कसला ॥१॥
जो काळ्या पाषाणीं बांधियला उंच पंधरा हात ॥
वेढुन कोटा - शहरा सर्पासम ती कोसहि रहात ॥२॥
डौलें बुरूज त्यावरि जाती गगनास काय भेटाया ॥
उचलुन काय शिरें हीं बाहे पांथांस नगर ‘ भेटा !! या !!! ’ ॥३॥
होत्या त्या शहराला एकंदर वेशि थोरशा चवदा ॥
प्रत्येकीवर तोफा स्थापी यशवंत शत्रुला भयदा ॥४॥
एकेका वेशीवर ठेवियले पांच पांच शत योध ॥
त्यावरि कुलीन शूर स्वजन नियोजी स्वयें करुन बोध ॥५॥
निवडुन चार हजार श्रुत - बल भट ठेविले महाभागें ॥
मागें, कीं समयाला चालुन जातील अरिवरी रागें ॥६॥
जी जी व्हावि तयारी युद्धाला हो तयार ती सगळी ॥
श्रीमंत सभ्य लोकीं भांडारें उघडिलीं म्हणुन अपुलीं ॥७॥
दिल्लिरखानें लोकां वागविलें दुष्ट रीतिनें म्हणुन ॥
आधींच नागरांचें त्याविषयीं क्षुभित होय फार मन ॥८॥
यशवंताच्या वाक्यें होता सर्वांस चेव बहु आला ॥
जो तो सावध होत अकीम न पडो शत्रुचा पुरीं घाला ॥९॥
कोटा - नगर पुन्हा जरि बादशहाच्या करामधें जातें ॥
नाहीं धडगति आम्हां वाटे ऐसें पुरांतिल जनातें ॥१०॥
स्वाधिन जालों जरि तरि करितिल जाळून सर्व ही राख ! ॥
क्रूर मराठे नेतिल घरदार लुटून हा असे धाक ॥११॥
त्यांतुन रजपूतांच्या शौर्याचा कीर्ति - दुंदुभी वाजे ॥
झाले त्यास मराठे नाशक मत्सर असा मनींमाजे ॥१२॥
होती हिंमत अंगीं भरली नूतन न जाहले क्लेश ॥
होळकरातें यास्तव नागर भ्याले न शूर ते लेश ॥१३॥
मल्हारराव ऐसें समजत होता मनामधें पूर्ण ॥
पाहुन भाले भ्याले स्वाधिन करितील पुर अरी तूर्ण ॥१४॥
जेव्हां परंतु त्यानें यशवंताचा निरोप आयकिला ॥
झाला निराश मानी । वेढा घालुन तटा हठें बसला ॥१५॥
रात्रंदिवस धडाडे तोफांचा मार मोर्चियांवरून ॥
झणणण जाती गोळे आपटति तटावरि त्वरेंकरून ॥१६॥
नेत्र - कटाक्षें पाहे जैसी रंभा बुधा शुका मोहूं ॥
ब्रह्मानंद - परायण परि तो योगींद्र काय वद तो हूं ॥१७॥
तैशाच मराठ्यांच्या तोफा भंगावया तटा बघती ॥
पोक्त वयें वृद्ध असा स्थिर साहे तट विटंबना मग ती ॥१८॥
कीं गलबलाट ऐकुनि पोरींचा कोप पावला वृद्ध ॥
धिक्कारुनि डौलाने राहे जाग्यावरी उभा क्रुद्व ॥१९॥
लावुनि शिड्या चढावें दह्रिला हट यापरी मराठ्यांनीं ॥
ते झोडिले पुरजनीं सहज समे जेंवि काय काठ्यांनीं ॥२०॥
धैर्ये रागांत उभे रजपूत अचंचल - स्थिति रहाती ॥
येतां जवळ मराठे शस्त्रें धरितात एकदम हाती ॥२१॥
भाले बर्च्या फेंकिति रागें धरिती मनीं अहंकार ॥
‘ सूं सूं सणणण ’ सुटती बाण धनुष्यें करीति टंकार ॥२२॥
संतप्त पौर वर्षति कढ्यांतुन फार तापलें तेल ॥
ढकलिति दगड धडाधड ऐशा प्रळयांत कोण वांचेल ? ॥२३॥
लावुन शिड्या तटाला वर जाणें कर्म हें असे खोटें ॥
हटती शूर मराठे आश्चर्यें वदनिं घालिती बोटें ॥२४॥
मग ते सुरुंग लावुनि यत्नें बघती तटीं करूं भंग ॥
परि तो अभंग राहे घडिलें ओतून लोह जणु अंग ॥२५॥
पहिल्या आठा दिवशीं युद्धांत सहस्र दोन भट पडले ॥
मेले शूर गुणी किति त्यांचे बहु मित्र सोयरें रडले ॥२६॥
मेले तसेचि समरी पौरांचे पांच सातशें वीर ॥
हानी मोठी झाली परि त्यांनीं सोडिला न लव धीर ॥२७॥
एके रात्रीं बसला होता तंबूंत वीर होळकर ॥
ज्या पौर - शौर्य वदलें व्यर्थोद्यम तूं असाच चोळ कर ॥२८॥
तों वार्ता त्यास कळे जिंकाया नगर युक्त हा समय ॥
ईशान्येस सुरुंगें तट ढांसळला घडे महा प्रलय ॥२९॥
आवेशें मग वदला “ जे माझे म्हणविती खरे मित्र ॥
येतिल माझ्या मागुन ऐशा समयीं धरून करिं शस्त्र ” ॥३०॥
ती भव्य दिव्य मूर्ति उत्साहें भरुन शोभली फार ॥
गेली छाती दाटुन चमके नेत्रांत तेज अनिवार ॥३१॥
तों सरदार विचारी वदले “ स्वामी दिसे न हें युक्त ॥
जोडुनि करांस विनवूं ऐकावें आज आमुचें उक्त ॥३२॥
कोटा धुळीस मिळवुन इच्छा आम्हांस बंड बुडवाया ॥
आहे तुझ्यापरि पदीं समरीं रजपूत सर्व तुडवाया ॥३३॥
ऐश्वर्य पेशव्याचें वाढावें म्हणुन आमुचा जन्म ॥
हें बाण करिं सतीचें आचरिलों घेउनी समर कर्म ॥३४॥
क्षुल्लक रजपूतांला भीतों वाटे असें तुला काय ? ॥
जाइल जेथें भाला देतिल हरिचे तिथे विजय पाय ॥३५॥
परि काळ वेळ पाहुन वागावें बोलती असें लोकीं ॥
पश्चात्ताप न होवो संतत दुःखद कधीं मग विलोकीं ॥३६॥
ही मध्य - रात्र झाली अंधारें सर्व भुवन भरणार ॥
अज्ञात देश शत्रुहि मायावी घ्रो कर्म करणार ॥३७॥
कोसळला तो तट जरि होइल रात्रींत नीट नच वाटे ॥
भांडूं उद्यां सकाळीं नेऊं नगरीं स्व - सैन्य त्या वाटे ॥३८॥
इच्छा जरि तव असली जातों आम्ही समस्त सरदार ॥
मिळवावया यशःश्री आलों येथें त्यजून घरदार ॥३९॥
वार्धक्य तुजसि आलें सोसूं न श्रम शरीर हें युक्त ॥
होइल जिवा अपाय हि बाळगिती धाक हा तुझे भक्त ॥४०॥
म्हणुनी विनंति करितों बाहेर पडूं नये तुवां आज ॥
आज्ञा दे तव सेवक येतिल साधून सत्य हें काज ” ॥४१॥
मल्हारराव बोले, “ ध्याया कोटा प्रसंग हा आहे ॥
एकैक क्षण जातो भ्याडासम भीति दावितां कां हे ? ॥४२॥
पुरुन उरेन जगाला झालों जरि वृद्ध केंस हे पिकले ॥
किति देशांचीं दैवें असती माझ्या करांत हें न कळे ! ॥४३॥
केला निश्चय जो कीं ब्रम्हा फिरवूं शकेल तो न लव ॥
कां मी भोक्ता दवडिन आलें हातास जें यशोविभव ” ॥४४॥
ऐसें वदे व्यवस्था सांगे त्यांतें करावया सिद्ध ॥
कांहीं निवडुन घेतो संगें करण्यास रात्रिचें युद्ध ॥४५॥
तों दिल्लिरखानानें अपकार समस्त पूर्व आठविले ॥
होळकराच्या साह्या निवडक कांहीं पठाण पाठविले ॥४६॥
वेगें पायदळाची टोळी घेऊन जाय मल्हार ॥
करितें दिशा सुगंधी ज्याचें परिफुल्ल कीर्ति - कल्हार ॥४७॥
विश्वासु स्वामीचें रक्षण करण्यास जीव देणार ॥
होते त्या टोळिंतले ख्यात बळी माण देशचे वीर ॥४८॥
दोन हजार असे हे एकंदर लोक जाहले संगे ॥
घटकेंत एक आला गोटाबाहेर होळकर अंगें ॥४९॥
सत्वर पाउल टाकी स्वीकारी आडमार्ग जायाला ॥
गांठूं रजपूतांला हिंमत अत्यंत वीर - रायाला ॥५०॥
जाऊन गुप्तमार्गें पोंहचला त्या तटासमीप बळीं ॥
ऐके कुणकुण कांहीं आंतुन तो कान देउनी जवळी ॥५१॥
होता उजेड केला पेटवुनी आंत दीपक मशाला ॥
जमलें पौर सभोंती नीट करूं भिंत पाहति विशाला ॥५२॥
बोले एक “ गड्यांनो ! नीट मनुष्याकृती मला दिसती ॥
वाटे खरेंच मजला येथ मराठे कुठे तरी असती ” ॥५३॥
“ भितर्‍या जेथें तेथें दिसति मराठे ! न मार हांकेला ” ॥
बोलून सोबत्यांनीं त्याच्या गोंगाट हांसुनी केला ॥५४॥
हंसण्य़ाचा न प्रतिरव भिंतिस आपटुन पावला विलय ॥
तों नगर - रक्षकांवर एकाएकींच जाहला प्रलय ॥५५॥
होउन पुढें मराठे रांगें तसेच काढिती बार ॥
शतसंख्य पौर मेले रंभा तत्कंठिं घालिती हार ॥५६॥
इतक्यांत पौर आले धांवुन मागून ओरडत रागें ॥
त्यांवरि निज वीरांतें जाया मल्हार त्या क्षणीं सांगे ॥५७॥
मग शत्रुमित्र झाले एकाएकींच एकवट सुभट ॥
करिती खटपड पटपड मरति हठें कपट दाविती निपट ॥५८॥
मल्हार उग्रकर्मा रजपूतांतें कृतांत दिसताहे ॥
भक्ति - रसें शत्रु - शिरें अमित तदा भूमि - देविला वाहे ॥५९॥
ते नगर रक्षणारे धाकें सोडून समर पळतात ॥
झाला गोंधळ तेव्हां हांका मारून कोण वळतात ? ॥६०॥
यशवंतराय आला इतक्यांतच जेंवि मातला नाग ॥
कीं अन्य गुहेंत शिरे म्हणुनि जणो काय खवळला वाघ ॥६१॥
धांवे गर्जुनि सांगे मागें लोकांस धीट परताया ॥
“ रजपूताच्या येउन जन्मास अयोग्य काय करितां ? या ॥६२॥
पूर्वज लाजिरवाणें तुमचें हें कर्म पाहुनी सारें ॥
रडतील वर बघा कीं शोभति जे दिव्य कांतिनें तारे ॥६३॥
तुमचीं होऊन मुलें मोठीं घेतील शस्त्र ज्या कालीं ॥
आठवुनी ही दुष्कृति लाजेनें मान घालतिल खालीं ॥६४॥
केव्हां तरी मरावें जन्मा येउन न काय मनुजानें ॥
धन्य म्हणावा देशा सोडविण्या अर्पिली स्वतनु जानें ॥६५॥
जरि काळें मुख करूनी पुर देणें शत्रुच्या करीं द्यावें ॥
तरवरा हीच घेउन मातें तोडून आज यश घ्यावें ” ॥६६॥
यशवंतोक्ती ऐकुन लाजुन परतून धांवले पौर ॥
ते दक्षणींस होती भयद जसे काय राशिला सौर ॥६७॥
उठले जाले जागे नागर कोट्यांत गडबड उडाली ॥
दुंदुभि वाजति गाजति तोफा, नगरी तया रविं बुडाली ॥६८॥
झाला यशवंत पुढें सर्वांच्या झगडतो जिवापरता ॥
लाजवि निजशत्रूतें अद्भुत करणी रणामधें करिता ॥६९॥
तळपति त्या आपटती पाडिति ठिणग्याच काय तरवारी ॥
धांवे एक कराया वार दुजा त्यास शीघ्रतर वारी ॥७०॥
दोहन मान हि सागर संगें घेउन हजार दोन भट ॥
यशवंताच्या आले साह्या झुंजोनि दावितात हठ ॥७१॥
उत्साह पौर - पक्षीं तेव्हां युद्धार्थ तत्क्षणीं वाढे ॥
अद्भुत साहस कृत्यें करितां कौशल्य दाविती गाढें ॥७२॥
अरुणोदय तो झाला आशा - चंद्रास अस्त ये पूर्ण ॥
गोटास मग निघाले त्यजुन मराठे रणांगणा तूर्ण ॥७३॥
त्या दिवसापासुनियां मल्हार तटावरी करि न घाला ॥
मोच्यावरून मात्रच तोफांचा मार ठेविता झाला ॥७४॥
घालूनियां गराडा कोटा - शहरासभोवती बैसे ॥
स्वांती संतत चिंती व्हावे हे नम्र नागरिक कैसे ? ॥७५॥
श्लोक
रक्षावया सतत चिंति असे उपाय ।
राहून सावध पुरा यशवंतराय ॥
आज्ञेंत वागुनि सहाय तयास होती ।
ते पौर संकट - निवारणिं हेच रीती ॥७६॥

N/A

References : N/A
Last Updated : March 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP