चतुर्थ पटल - शक्तिचालनमुद्राकथनम्

महायोगी आदिनाथ श्रीमहादेव विरचित " शिवसंहिता " हा ग्रंथ देवी पार्वतीने विचारलेले प्रश्न व त्या प्रश्नांना श्रीशिवांनी दिलेली उत्तरे या प्रश्नोत्तरांच्या रूपाने अवतरित झाला आहे.


आधार कमलात अर्थात् मूलाधारचक्रात निद्रिस्त अर्थात् अनादि कालापासून झोपलेल्या म्हणजे बहिर्मुख वृत्तीने संसारात रमलेल्या कुण्डलिनी शक्तीला बुद्धिमान् साधकाने अपानवायूवर आरूढ होऊन बलपूर्वक त्या शक्तीचे ऊर्ध्वाकर्षण करून तिला जागृत करावे. याचा अर्थ असा की, शक्तीची बहिर्गती म्हणजे अनादि कालापासून संसार भोगण्याची वासनात्मक निद्रितावस्था संपवून तिला उपरोक्त प्रक्रियेने चेतन किंवा जागृत करून तिची अंतर्गती म्हणजे सुषुम्नामार्गाने शिवाशी समरस करण्यासाठी तिला ऊर्ध्वगतीने मार्गस्थ करणे होय. या प्रक्रियेला उक्तिचालनमुद्रा म्हणतात. ही मुद्रा साधकाला सर्व शक्तींचे प्रदान करणारी आहे.

जो साधक ही शक्तिचालनमुद्रा नित्यनियमाने दररोज करतो त्याच्या आयुष्याची वाढ होते व सर्व रोगांचा नाश होतो.

या शक्तिचालनमुद्रेच्या भुजगी म्हणजे सर्पिणीसारखी आकृती असलेली कुण्डलिनी शक्ती आपल्या अनादि निद्रेचा म्हणजे बहिर्मुख वृत्तीचा अर्थात् संसार भोगण्याच्या वासनेचा त्याग करून स्वत:च ( सुषुम्नामार्गाने ) उर्ध्वगामी होईल हे निश्चित आहे. याचा अर्थ असा की, ज्यावेळी कुण्डलिनी शक्ती जागृत होते त्यावेळी ती स्वत: अंतरंग साधनाच्या रूपाने साधक शरीरात उपस्थित होते. त्यामुळे बाह्य साधनांची आवश्यकता संपुष्टात येत किंवा येथपर्यंतच बाह्य साधनाची गती उपयोगी होते. जागृत शक्ती ही साधक शरीरात गुरुरूपाने स्वत: साधन करून साधकाला सुषुम्नामार्गाने सहस्रारात नेऊन अंतिम सामरस्यसिद्धी प्राप्त करून देते. या करिता सिद्धीची इच्छा करणार्‍या योगीसाधकाने या शक्तिचालनमुद्रेचा नित्यप्रती अभ्यास केला पाहिजे.

जो साधकयोगी या उत्तमोत्तम म्हणजे सर्वश्रेष्ठ अशा शक्तिचालनमुद्रेचा नेहमी अभ्यास करील त्याला विग्रहसिद्धी प्राप्त होते म्हणजे अशा साधकाचे शरीर निश्चितपणे सिद्ध अर्थात् अमर होते. ही मुद्री अणिमादि सिद्धी प्रदान करणारी आहे.

जो साधक गुरूने उपदेश केलेल्या विधिप्रमाणे म्हणजे त्याने शिकविलेल्या प्रक्रियेप्रमाणे या शक्तिचालनमुद्रेचा अभ्यास करतो त्याला मृत्यूचे भय राहत नाही.  जो साधक विधिविधानपूर्वक प्रयत्नाने दोन मुहूर्तपर्यंत शक्तिचालनमुद्रेचा अभ्यास करतो त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात. या करिता साधकयोग्याला स्वत:ला जे आसन युक्त किंवा योग्य वाटेल अर्थात् रुचेल, पटेल व शरीराला संयुक्तिक होईल त्या आसनात बसून या शक्तिचालनमुद्रेचा अभ्यास करणे हे त्याचे कर्तव्य आहे.

श्रीशंकर म्हणतात, हे पार्वती ! मी ज्या ह्या दहा मुद्रा कथन केल्या आहेत, त्या मुद्रांसारखे आत्तापर्यंत साधन झाले नाही व पुढे होणार नाही. यातील एका एका मुद्रेचा म्हणजे कोणत्याही एका मुद्रेचा किंवा एका मुद्रेनंतर दुसर्‍या मुद्रेचा अभ्यास केला असता साधकाला सिद्धी प्राप्त होऊन तो सिद्ध होतो, हे नितांत सत्य आहे. ॥१११॥

अशा प्रकारे श्रीशिवसंहितेतील हरगौरीसंवादात्मक मुद्राकथन नावाचे चवथे पटल समाप्त झाले.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP