प्रसंग पंधरावा - सद्‌गुरूचीं कठोर पण उदार वचनें

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


यालागीं हृदय शुच करा । परमार्थ शोधावा खरा । भाव भक्तीसी दृढ करा । सद्‌गुरु सेवूनियां ॥६४॥
भीड धरूनी बोलती साधू । तर थोर घडे अपराधु । जैसें मातेचें स्‍तनीं अशुदधु । खांडकासंगें निघे ॥६५॥
जैसा नीट कमानेचा तीर । तैसा सद्‌गुरु वचनाचा मार । तो सोशिल्‍या तरिजे भवसागर । शूरत्‍वपणें ॥६६॥
विंधला तीर मागें मुरडे । तरी साधूस निंदा घडे । हें गुह्य न कळतां म्‍हणती वेडे । साधु थोर निंदक ॥६७॥
पडोनि पर्जन्याच्या थेंबुटा । जरी चढोनि जाय वैकुंठा । तरी साधु हे म्‍हणती खोटा । बाध जडो पाहे ॥६८॥
उंबराचें फुल तेंच फळ । तैसें साधूचे शब्‍द केवळ । मूर्खाचे शब्‍द निर्फळ । वायुफुलान्यायें ॥६९॥
खारीक वरी गोडत्‍वपणें । भीतरीं कठीण आठोळी जाणें । तैशींच नष्‍टाचीं वचनें । वरपंगाची गोडी ॥७०॥
केकतीला कांट्याचे वेढे । भीतरीं निपजती केवडे । तैसे साधूचे शब्‍द गाढे । परोपकारालागीं ॥७१॥
फणस सर्वांगीं कांटावले । भीतरी महा गोडीनें कोंदले । तैसे साधुहृदय जालें । बोधासंगें परियेसा ॥७२॥
नारळ कठीण दिसे बाहेर । भीतरीं खोबरे अरुवार । तैसें साधूचें अंतर । बोधें वोसंडले ॥७३॥


Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP