विषम अलंकार - लक्षण ३

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


या श्लोकांत प्रियकराला दूर घालवणें हा इष्ट अर्थ, त्याकरतां साधन म्हणून योजलेलें जें कमळानें मारणें, त्या साधनानें, प्रियकराला घालवून देणें तर दूरच राहिलें, उलट त्यानें दिलेल्या आलिंगनरूप अनिष्टाची उत्पत्ति झाली. (म्हणून इष्ट साधनानें अनिष्ट कार्याची उत्पत्ति होणें हा विषमाचा प्रकार येथें झाला आहे.)
अथवा हें उदाहरण :---
“खंजन पक्षासारखे डोळे असलेली (एक सुंदर गोपी) गाईला शोधण्याकरतां कुंजांत गेली; पण तेथें असलेल्या श्रीकृष्णाच्या वदनकमलाच्या दर्शनानें तिच्या सगळ्या गाई हरवल्या. (या ठिकाणीं मुळांतील गो या शब्दाचे गाय व इंद्रिय असे दोन अर्थ होतात; ते घेऊनच या ठिकाणीं विरोधमूलक विषमालंकार साधला आहे.)
पूर्वींच्या उदाहरणांत (दूरीकर्तुं० यांत) सांगितलेलें अनिष्ट खरोखरीचें होतें; पण या उदाहरणांतील अनिष्ट काल्पनिक आहे; कारण, सर्व इंद्रियांचें हरण हें लोकांत जरी जवळ जवळ अनिष्ट असलें तरी; त्या इंद्रियहहरणाला पुढें करून वर्णन केल्यास येथें चमत्कृति होणार नाहीं, पण गाईचें हरण पुढें करुन वर्णन केल्यास चमत्कार निश्चित होईल; म्हणून, इंद्रियें व गाई या दोहोंचें श्लेषमूल्लक अभेदाध्यवसान केल्यानें इंद्रियहरण हें सर्व गायांच्या हरणरूपी अनिष्टाचें स्वरूप येथें धारण करीत आहे; हा या श्लोकांतील एक विशेष आहे.
आतां, ‘या ठिकाणीं शोधली जाणारी गाय हें इष्ट; त्याची प्राप्ति झाली नाहीं, असें येथें शब्दानें सांगितलें नसल्यानें, हें केवळ अनिष्टप्राप्तिरूप विषमाचेंच उदाहरण समजावें. पण पूर्वींच्या ‘दूरीकर्तुं प्रियं बाला०’ ह्या श्लोकांत, इष्टाची अप्राप्ति व अनिष्टाची प्राप्ति हीं दोन्हींही सांगितलीं आहेत; हा पूर्वींच्या व ह्या श्लोकांत फरक आहे,’ असें म्हणणें योग्य नव्हें. कारण सर्व गाई हरवल्या असें सामान्य विधान केल्यानें, शोधल्या जाणार्‍या गाईचें हरवणेंही त्या सर्व गायांच्या अपहरणांच्या पोटांत प्रतीत होतेंत. (तेव्हां वरच्या श्लोकांत इष्टाची अप्राप्ति व अनिष्टाची प्राप्ति हे दोन्हीही प्रकार आहेत असें समजावें).

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP