युद्धकान्ड - प्रसंग सहावा

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


सभे बैसला राव त्रीकूटवासी । पुढें भेटला इंद्रजीतू तयांसी । नमस्कार केला तया रावणाला । म्हणे शत्रुचा सर्व संहार केला ॥१॥
बहू लंकवासी रणीं भग्र केले । कितीएक ते मृत्युपंथेंचि गेले । बळें ऊसणें हो तयांचें । प्रभू शोधिले मुख्य त्या वैरियांचे ॥२॥
तया रावणा थोर संतोष जाला । बळें अमृताचे नदी पूर आला । अकस्मात संताप सर्वै उडाला । पुढें बोलता जाहला कूमराला ॥३॥
म्हणे इंद्रजीता विरा बैस आतां । सुपुत्रा तुवां तोडिली सर्व चिंता । बळी चक्रचूडामणी वीर राजा । असाव्या तुझ्या वज्र कल्याण भूजा ॥४॥
अगा इंद्रजीता सखे गोत्र बंधू । प्रतापें बळें आगळे वीर सिंधू । निमाले रणीं । वैरियांचेनि हातें । बहूसाल वाटे मनीं दु:ख मातें ॥५॥
त्रिकूटाचळीं वानरीं लाग केला । मुळारंभ राक्षेस कीती निमाला । पुढें थोर संग्राम दारूण जाला । विरू राक्षसू सर्वही तो बुडाला ॥६॥
तयाऊपरी वीर धूम्राक्ष जेठी । तयें जिंकिले देव तेतीस कोटी । समारंगणीं त्या विरा अंत आला । रणामंडळीं देह त्यागून गेला ॥७॥
रणीं वज्रदंष्ट्री दिसे काळरूपी । गिरीसारिखा अंकपन्न प्रतापी । महावीर ते दोघे युद्धासि गेले । समारंगणीं युद्ध होतां निमाले ॥८॥
बळी दक्ष वित्पन्न चातर्य जाणे । तया देखतां अंतरा सूख बाणे । प्रसंगेंचि तो वीर युद्धासि गेला । प्रहस्तू रणीं युद्ध होतां निमाला ॥९॥
तयाचा बहू क्रोध आम्हांसि आला । रिपू राम जिंकावया वेग केला । तयाचें महा युद्ध तें काय बोलों । समारंगणीं भ्रष्टलों भग्र जालों ॥१०॥
तयाऊपरी धीर आम्हां धरेना । पुढें ऊठवीलें बळें कुंभकर्णा । तयासारिखा कोण आहे बळाचा । समारंगणीं धीर काळासि कैंचा ॥११॥
महावीर तो घोर युद्धासि गेला । रिसां वानरां थोर संहार केला । रिपूनें तया शेवटीं बाणघातें । समारंगणीं धाडिला मृत्युपंथें ॥१२॥
प्रतापी सखा बंधु माझा निमाला । बळें आगळा थोर आधार गेला । मला पूसिल्यावीण गंतव्य केलें । नये बोलतां दु:ख ब्रह्मांड जालें ॥१३॥
तयाऊपरी चौघेही सूत माझे । अगा इंद्रजीता सखे बंधु तूझे । तयांच्या प्रतापानळें सूख लोटे । समारंगणीं भीडतां काळ वीटे ॥१४॥
नरा अंतकाला नरा अंतकानें । बळें पीटिलें देवदेवांतकानें । तळीं घातले सर्व त्या त्रीशिरानें । रणीं वानरीं घेतले सर्व प्राणें ॥१५॥
अतीकाय तो वीर मेरू बळाचा । प्रतापें बळें आगळा विक्रमाचा । रथारूढ होऊनि युद्धासि गेला । तयाचा सुमित्रासुतें घात केला ॥१६॥
निमाले सखे दु:ख ऊदंड जालें । पुढें पाहतां वीर सामर्थ्य गेलें । महावीर ते मृत्युपंथेंचि जाती । नरें वानरें बापुडीं येश घेती ॥१७॥
निमाले सखे सूत बंधू बळाचे । प्रतापें सुरांहूनि ते विक्रमाचे । रणामंडळीं सर्व सेना निमाली । बहूसाल संहारिली कूळवल्ली ॥१८॥
अगा इंद्रजीता तुवां सूख द्यावें । प्रतापें रणीं सर्व शत्रू वधावे । मला सांगसी लविले मृत्युपंथीं । परी मागुती ते रिपु गर्जताती ॥१९॥
रिपू ऊठती मागुती हें न व्हावें । बळें सर्व निर्मूळ त्यांचें करावें । प्रतापें रणीं सर्व पाहून येसी । परी मागुता जीव येतो तयांशीं ॥२०॥
बहू वेळ तां युद्धसामर्थ्य केलें । परी पाहतां सर्वही व्यर्थ गेले । प्रतापे रणीं पाडिले बाणघातीं । सभारंगणी मागुते सिद्ध होती ॥२१॥
महीमंडळीं नाम त्यांचें नसावें । विरा विक्रमें त्वां मला सौख्य द्यावें । पिता बोलतां धीर पोटीं धरेना । असंभाव्य कोपानळू सांवरेना ॥२२॥
उभा राहिला वाक्य बोले पित्याशीं । म्हणे शीघ्र संहारितो वैरियांशीं । समारंगणाभाजिं ऐसें न होतां । तरी जाणिजे भेटि ते हेचि आतां ॥२३॥
बहु कोपला चालिला वीर जेठी । प्रतापें म्हणे सर्व जाळीन सृष्टी । पुढें बापुडीं वानरें दैन्यवाणीं । खिळी तो बळें सर्व ब्रह्मांड बाणीं ॥२४॥
पित्याकारणें वीरभद्रू निघाला । तयां दैत्यजांला धरूं सिद्ध झाला । तयाचेपरी कोपला काळरूपी । बळें चालिला शक्रशत्रू प्रतापी ॥२५॥
तुरे वाजती नाद गेला भुगोळा । दळेंशीं बळें पावळा होमशाळा । तया राक्षसें मागुती होम केला । महावीर मेघासनीं गुप्त झाला ॥२६॥
बळें पूजिलें सर्व आकाश बाणीं । पडों लागलीं वानरें दैन्यवाणीं । कपीवाहिनीमाजिं आकांत जाला । पुन्हां मागुतां थोर कल्पांत आला ॥२७॥
वरी पाहतां युद्धकर्ता दिसेना । धडाडां पडों लागली सर्व सेना । महावीर ते घोर मागें पळाले । पळाले कपी राघवा आड गेले ॥२८॥
म्हणे राम तो सुग्रिवा मारुता हो । नभोमंडळीं युद्धकर्ता पहा हो । प्रतापें बळें वीर सप्तै उडाले । असंभाव्य ते पोकळीमाजिं गेले ॥२९॥
महा थोर तें युद्धसामर्थ्य गेलें । तया इंद्रजीतें पुढें काय केलें । अकस्मात तो भूतळामाजिं आला । रणामंडळीं सैन्यसिंधू मिळाला ॥३०॥
खटाटोपिले ते बहू शस्रपाणी । रुपें कर्कशे काळ कर्कोटबाणीं । बळें चालिला भार वेष्टीत सेना । रजें मातला व्योम पूढें दिसेना ॥३१॥
कपीवीर राक्षेस सन्मूख जाले । समारंगणामाजिं युद्धा निघाले । पुढें राक्षसें रूप केलें सितेचें । महा रम्य लावण्य तें जानकीचें ॥३२॥
रणीं लोटल्या वीर राक्षेसफौजा । कपीभार ऊठावले स्वामिकाजा । दळीं राक्षसांचा बळीं इंद्रजीत । बळी चालिला काळ जैसा कृतांतू ॥३३॥
तयां देखतां धांवला रुद्र तैसा । करीं घेतला शैला ब्रह्मांड जैसा । बळें इंद्रजीता उजू धांव घाली । तंई इंद्रजीतें सिता दाखवीली ॥३४॥
म्हणे रे कपी हे सिता राघवाची । गुणी स्वामिणी हे तुम्हां मर्कटाची । महापापिणी सर्पिणी दु:खदाती । त्रिकूटाचळीं राक्षसीकूळहंती ॥३५॥
अशोकावनामाजिं हे शोकवल्ली । अकस्मात कोठून निर्माण झाली । तया दीवसापासुनी दु:ख झालें । त्रिकूटाचळा थोर दारिद्य आलें ॥३६॥
बळाचें बहू वीर हे पापिणीनें । सखे आमुचे ग्रासिले सर्पिणीनें । कळी मांडली त्यास हे मूळ सीता । करीतो इचा शीघ्र संहार आतां ॥३७॥
तया राक्षसें मारिलें जानकीला । म्हणे रे कपी सांग त्या राघवाला । समारंगणीं शीर छेदूनि नेलें । तया राक्षसें शीघ्र गंतव्य केलें ॥३८॥
सिता देखतां मारुती अंग घाली । प्रसंगीं तये मूर्छना शीघ्र आली । महा शोक आरंभिला त्या कपीनें । म्हणे काय केलें जगज्जननीनें ॥३९॥
बहू दू:ख मागील तें आठवीलें । उदासीन हें चित्त दुश्चीत जालें । म्हणे काय सांगों तया राघवाला । कपी मारुती शोकसिंधूं बुडाला ॥४०॥
म्हणे रे कपाळा असें काय केलें । बहू थोर हें पाप माझें उदेलें । न सांगों तरी गोष्टी राहों नये कीं । पुढें सांगतां राघवा दु:ख हें कीं ॥४१॥
प्रवाहो बळें चालिला अश्रपातीं । विलापें करूं लागला तो रुदंती । बळें ऊठला चालतां चालवना । रघूनायका भेटला दैन्यवाणा ॥४२॥
अधोमूख पाहोनि कांहीं वदेना । दुखें दाटला कंठ त्या बोलवेना । म्हणे जानकीसारखी शस्रघातें । रणीं मारिली राक्षसें इंद्रजीतें ॥४३॥
तयें सांगतां मांडिला शोक रामें । मिळालीं दळें दैन्यवाणीं विरामें । कपीवाहिनीमाजिं आकांत जाला । सुमित्रासुतें राम तो शांत केला ॥४४॥
भविष्योत्तरें वाल्मिकी सत्य व्हावीं । देहें सोंगसंपादणी कां करावी । म्हणूनी रघूनायकें शोक केला । तदा वीर बीभीषणू शीघ्र आला ॥४५॥
म्हणे जी प्रभू शोक वायां करीतां । असे सत्य नेमस्त कल्याण सीता । अशोकावना दूत म्यां पाठवीले । प्रसंगीं समाचार घेऊनि आले ॥४६॥
तया इंद्रजीतें रणीं भाव केली । नव्हे सत्य हें मिथ्य होऊनि गेली । पुरीं होम आरंभिला मेघनादें । पुरा जालिया कोण घेईल द्बंद्वें ॥४७॥
तया इंद्रजीतासि आधीं वधावें । वृक्षा शोक सांडूनियां सिद्ध व्हावें । पुरा होम हो जालिया आवरेना । समारंगणीं मारितांही मरेना ॥४८॥
प्रभू जाहलीं अश्रिणी व्योमपंथें । वधावा सुमित्रासुताचेनि हात । तयें सांगतां सर्व आनंद जाला । बहुतांपरी राघवें गौरवीला ॥४९॥
पुढें राघवाची बहू स्तूति केली । विरांची असंभाव्य भांदी मिळाली । सभामंडळीं । ते कपी रीसराजे । तयां मध्यभागीं महावीर साजे ॥५०॥
समस्तांसि सोडीलसिम इंद्र भावी । समर्था तया ऊपमा काय द्यावी । असा राम हा देव ब्रह्मादिकांचा । सुमित्रासुताची वदे रम्य वाचा ॥५१॥
म्हणे होम आरंभिला इंद्रजीतें । मुखें बोलिलें सत्य नैरृत्यनाथें । पुरा होम होतां कदा आवरेना । समारंगणीं मारितांही मरेना ॥५२॥
प्रतापें समारंगणीं त्या वधावें । बलें आजि ब्रह्मादिकां सौख्य द्यावें । पुढें ऊठिला शीघ्र सौमित्र कैसा । नभोमंडळीं तीव्र आदित्य जैसा ॥५३॥
जया देखतां काळ कांपे थरारां । सवें दीधलें राघवें पंचवीरां । हनूमंत बीभीषणू जांबुवंतू । सुगंधू कपी ऋषभू वीर्यवंतू ॥५४॥
महावीर ते पांचही सिद्ध जाले । कपी रीस आणीक कीती निघाले । सुमित्रासुतालगिं राजाधिराजें । मुखें बोललीं शक्तिसामर्थ्यबीजें ॥५५॥
वरू दीधला स्वामि देवाधिदेवें । म्हणे शत्रु जिंकोनियां शीघ्र यावें । करू मस्तकीं ठेविला रामचंद्रें । नमस्कार तैसाचि केला फणींद्रें ॥५६॥
समस्तीं विरींही नमस्कार केले । पुढें सव्य घालूनि तैसे निघाले । अती आदरें स्कंघभागीं विरानें । सुमित्रासुता घेतलें मारुतीनें ॥५७॥
निघाले महावीर ते लागवेगें । पिता हिंपुटी मारुती मागमागें । पुढें चालतां पंथ नीकुंबळेचा । विरां थोर आवेश काळासि कैंचा ॥५८॥
महा घोर तो लंघिला मार्ग तीहीं । पुढें पाहतां पाहतां वाट नाहीं । तरूंचीं वनें लागलीं  तीं वितंडे । प्रचंडें उदंडें बहु झाडखंडें ॥५९॥
भुमीं दाटले वृक्ष वृक्षां मिळाले । तयां अंतरीं वंश मिश्रीत झाले । वरी पाहतां वाड आकाशंपथें । पुढें रीघ नाहीं तया वारियातें ॥६०॥
समें वीषमें झाडखंडें अचाटें । मिळालीं बळें वाजती कर्कराटें । कडे तूटले थोर त्या पर्वताचे । झरे वाहती झाडखंडीं विषाचे ॥६१॥
तया अंतरीं सिंह शार्दूल कैसे । मदें मातले गर्जती काळ जैसे । गजांचीं बहू दाट थाटें विशेषेम । पळों लागती थोर किंकाटघोषें ॥६२॥
बहू संकटें धांवतीं रानह्मैसे । रिस कर्कशें देखतां जीव त्रासे । बहू  सांबरें चीतळें रानगाई । शुनी सूकरां मर्कटां मीति नाहीं ॥६३॥
बहु श्र्वापदें घोर नानापरींचीं । बहू गर्जताती बहूतां स्वरांचीं । भुतें खेचरें शक्ति वेताळ पीसे । बहू धांवती वन्हिचे ज्वाळ जैसे ॥६४॥
बहू व्याळ वेटाळले झाडखंडीं । वनें व्यापिलीं सर्व कूळीं उदंडीं । बहूतांपरींचीं बहू तीं विखारें । विषें घोळती लोळती थोरथोरें ॥६५॥
बहाती विषाचे महा ओघ तेथें । धुधूकारतां ज्वाळ आकाशपंथें । गिरीशीं बळें आदळे तोयराशी । बहूसाल त्या तोडिलें पर्वताशीं ॥६६॥
गिरीशृंग पाठार दारीं कपाटें । शिळा शीखरें वृक्ष पाषाण थाटें । दरे दर्कुटे थोर भ्यासूरवाणे । बहूतांपरींचे तरू ते पुराणे ॥६७॥
कडे कापले तोय नेटें भडाडी । गिरीकंदरीं घोष तेणें धडाडी । धडाडां नद्या लोटल्या व्योमपंथें । भुमी तूटल्या घोर घातें विघातें ॥६८॥
महारण्य तें घोर नीकुंबळेचें । पुढें जावयालगिं सामर्थ्य कैंचें । समुद्रातिरीं दाटले वीस गांवें । पुढें जावया वाट नाहीं स्वभावें ॥६९॥
भुमीपंथ नाहीं पुढें जावयातें । उडाले महावीर आकाशपंथें । समुद्रासि सांडूनि वेगें निघाले । बलें शीघ्र नीकुंबळेमाजिं गेले ॥७०॥
पुढें काळविक्राळ ते वीर गाढे । बळें राक्षसीं घातले सप्त वेढे । तयां मध्यभागीं विरें इंद्रजीतें । त्वरें आणिलीं होमद्रव्यें बहूतें ॥७१॥
घटीं मद्य आज्यादिक मांस नेलें । विरें राक्षसें शोणितें स्नान केलें । पुढें वेदिकेमाजिं हूताशनू तो । महावीर प्रेतासनीं बैसला तो ॥७२॥
सहस्रैक आहूतिंचा नेम केला । म्हणे म्यां वधावें नरां वानरांला । शतें भक्ति संख्याहुति लागवेगें । विरें घातल्या अग्रिमूखीं प्रसंगें ॥७३॥
रथू नीघतां हिंसती दिव्य घोडे । उदेलें भुखीं आगळे घोष गाढे । तया धूर्त बीभीषणा श्रत जालें । सुमित्रासुतालगिं तें जाणवीलें ॥७४॥
म्हणे होम पूर्णाहुतीलगिं आला । प्रतापें बळें पाहिजे यत्न केला । म्हणो शेष गा धन्य बीभीषणा तूं । सवें धाडिलें राघवें याचि हेतू ॥७५॥
वधूं शीघ्र राक्षेस हे बाणघातें । तंई वारिलें त्यासि नैरृत्यनाथें । झणे वो प्रभू झुंजतां पूरवेना । पुरा होम होतां रिपू आवरेना ॥७६॥
तंई बोलिला ऋक्ष तो जांबुवंतू । म्हणे वीर हो आइका एक मातू । तुम्हीं होम विघ्वंसिजे लागवेगें । रणामाजिं मी पाडितों दैत्यदुर्गे ॥७७॥
मुखें बोलिला वीर मेरूबळाचा । सुमित्रासुतू गौरवी रम्य वाचा । कपी ऋषभू आणि त्या वायुसूतें । बळें घातली धांव आकाशपंथें ॥७८॥
नभीं मुख्य हे वीर दोघे उडाले । कपी रीस ऊदंड धांवूनि गेले । धबाबां शिळा टाकिती व्योमपंथें । बळें होम विध्वंसिला घोर घातें ॥७९॥
रथू मोडिला फोडिलीं सर्व पात्रें । विरें मोडिलें कुंड संकेतमात्रें । पुढें वन्हि वीदारिला वेग केला । कितीएक राक्षेस तेथें निमाला ॥८०॥
रिपू रावणी ध्यान भंगून पाहे । तंई भंगिला होम तो दीसताहे । त्वरें इंद्रजीतू नभीं दृष्टि घाली । तंई ऋषभानें दिशा शीघ्र केली ॥८१॥
बळें होम विध्वंसिला मारुतीनें । देहेधर्म संपादिला ऋषभानें । पुढें पाहतां होम भंगून गेला । महावीर राक्षेस युद्धा निघाला ॥८२॥
बळें कोपला काळ कृतांत जैसा । महावीर उठावला शीघ्र तैसा । कपीवीर दोघे त्वरेंशीं निघाले । बळें आपुल्या ते दळाभाजिं आले ॥८३॥
सुमित्रासुतें वाहिला चंड मेढा । पुढें चालिला तो बळें वीर गाढा । कपी लोण कल्लोल कोटयानुकोटी । दळेंशीं बळें चालिला वीर जेठी ॥८४॥
महावीर ते थोर राक्षेस होते । कपीवीर ते धांवले शीघ्र तेथें । समारंगणीं भार भारी मिळाले । कितीएक ते भीडतां भग्र जाले ॥८५॥
दळें लोटलीं राक्षसांचीं अचाटें । समारंगणीं चाललीं दाट थाटें । बळें हाणीती शस्रघातें खणाणां । महीमंडळीं घोष ऊठे दणाणा ॥८६॥
असंभाव्य राक्षेस मारीत आले । कपी वीर ते भंगले भग्र केले । तयां देखतां मारुता कोप कैसा । बळें चालिला काळ कृतांत जैसा ॥८७॥
 गदा घेतली शीघ्र नैरृत्यनाथें । उडाला कपी ऋषभू व्योमपंथें । सुगंधू कपी लोटला वीर्यवंतू । बळें आगळा चालिला जांबवंतू ॥८८॥
कंपी काळ कलांतिंचे मेघ जैसे । रणीं लोटले गर्जती वीर तैसे । बळें घालिती पालथें या भुगोळ । तिहीं मांडिला आट राक्षेसकूळा ॥८९॥
रणीं हाणिती एकमेकां फडाडां । तुटों । लागले पादपाणी तडाडां । नद्या लोटल्या शोणिताच्या भडाडां । समारंगणीं घोष ऊठे धडाडां ॥९०॥
रणीं पाडिले दैत्य कोटयानुकोटी । बहूतीं विरीं दीधली त्यासि पृष्ठी । पुढें देखतां कोपला काळ जैसा । रणीं लोटला रावणी वीर तैसा ॥९१॥
तया राक्षसें घोर संधान केलें । कपीवाहिनीभाजिं कल्पांत आलें । मयूरासि पिंजारिलें पुच्छ जैसें । रणीं पाडिले ते कपीवीर तैसे ॥९२॥
कपी मारुतीसारिखे भग्र केले । कितीएक ते वीर धाकें पळाले । पुढें पाहतां वीर सौमित्र कैसा । गजा देखतां ऊठला सिंह जैसा ॥९३॥
टणत्कारिले चाप काळाग्रिरोषें । थरारी धरा राप्त पाताळ घोषें । भुभीं वर्षती मेघ ऊदंड गारा । चळों लागल्या त्या असंभाव्य तारा ॥९४॥
भिडाया रणीं ऊठले वीर कोपें । बळें सृष्टि जाळील नेणों प्रतापें । तंई शीघ्र बीभीषणें वेग केला । गदा घेउनी वार सन्मुख जाला ॥९५॥
सुमित्रासुतालगिं सांडूनि मागें । पुढें धांवला वीर तो लागवेगें । रणीं देखिला वीर बीभीषणू तो । तया बोलता जाहला रावणी तो ॥९६॥
म्हणे रे बहूतां दिसां देखिलासी । वृक्षा पुष्ट तूं राक्षसांमाजिं होशी । नरें वानरें दास जालसि त्यांचा । मनू भांगिला रे तुवां पूर्वजांचा ॥९७॥
तुला ठाउका कोप माझा कृतांतू । मला इंद्रजीता पुढें मश्यकू तूं । करूं पाहशी थोर सामर्थ्य येथें मश्यकू तूं । करूं पाहशी थोर सामर्थ्य येथें । समारंगणीं धाडितों मृत्युपंथें ॥९८॥
म्हणे इंद्रजीतास नैरृत्यनाथू । बळेंवीण तूं बोलशी व्यर्थ मातू । मजलगिं तो काल मारूं शकेना । वरू दीधला तोषला रामराणा ॥९९॥
बहू शीकवीलें तुम्हां दुर्जनांसी । परी नायका रे तुम्ही पापराशी । मला सांगतां हीत अव्हेर केला । समस्तांसि येणें गुणें मृत्यु आला ॥१००॥
मला ताडिलें वैभवाचेनि तोषें । बुडालेत रे सर्व तेणेंचि दोषें । समस्तांसि मारील हा रामराजा । समारंगणीं मीच पाहीन वोजा ॥१०१॥
सभामंडपीं फार तां गर्व केला । कळेना तुला मृत्यु संनीध आला । तुला आजि मारील सौमित्र बाणीं । मुढा राक्षसा जाण हे सत्य वाणी ॥१०२॥
बहूसाल धिक्कार केला तयातें । प्रतापें सिमा सांडिली इंद्रजीतें । पदें ताडितां तो महा सर्प जैसा । रणीं कोपला वीस राक्षेस तैसा ॥१०३॥
म्हणे रे उभा फीर सन्मूख राहें । समारंगणीं धीर संधान साहे । बळें सोडिले बाण दारूण आले । सुमित्रासुतें सर्व छेदून नेले ॥१०४॥
रणीं घातला रावणानूज पाठीं । प्रतापें पुढें चालिला वीर जेठी । समारंगणीं अंतकातुल्य भासे । महावीर तो देखतां जीव त्रासे ॥१०५॥
महा युद्ध होईल दोघांजणांशीं । पुढें सज्जनीं चित्त द्यावें कथेसी । म्हणे दास ऊदास श्रोतीं न व्हावें । ऋषी बोलिला तेंचि हें सार ध्यावें ॥१०६॥

N/A

References : N/A
Last Updated : April 03, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP