प्रासंगिक कविता - आत्मचरित्र

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


अभंग.
नमो अधिष्ठाता विष्णु मुख्य साधू । तेथूनियां बोधू विधीलागीं ॥१॥
विधीपासूनियां ज्ञान विधिसुता । तेंचि ज्ञान प्राप्त वसिष्ठासी ॥२॥
वसिष्ठें उपदेश केला रामचंद्रा । तोचि महारुदा हनुमंता ॥३॥
हनुमंत कलीमाजीं चिरंजीव । झाले देव सर्व बौद्धरूप ॥४॥
बौद्ध नारायण होऊनी बैसला । उपाय बोलिला व्यासमुनी ॥५॥
व्यास मुनि बोले भविष्यपुराण । जग उद्धरणें कलीमाजीं ॥६॥
कलीमाजीं गोदातीरीं पुण्य क्षेत्र । तेथें वातपुत्र अवतरे ॥७॥
अवतरे अभिधानीं रामदास । कृष्णातीरीं वास जगदुद्धारा ॥८॥
जगदुद्धरासाठीं श्रीरामा सांकडें । केलें वाडेंकोडें भक्तिपंथें ॥९॥
भक्तिपंथें मोठा केला श्रीरामानें । जंबू अभिधान ग्राम तेथें ॥१०॥
तेथे ब्रह्मनिष्ठ अधिष्ठाता पूर्ण । सूर्य नामा जाण द्बिजवर्य ॥११॥
द्बिजवर्य सूर्य जैसा तपोधन । अद्‍भूत विदान झालें तेथें ॥१२॥
झाली रामनवमी मव्य अष्टमीसी । अर्धरात्रीं त्यासी दूत आले ॥१३॥
दूत आले पुढें घालोनी चालिले । महाद्बारा आले भीम जेथें ॥१४॥
भीमदेवालयीं नेऊनी तयांसी । तेथें उभयतांसी देखियेलें ॥१५॥
देखियेलें राजपुत्र सूर्यवंशी । झांपड नेत्रांसी पडे तेव्हां ॥१६॥
पडे तेव्हां जसा दंडवत भूमीं । मग अंतर्धामी बोलविलें ॥१७॥
बोलावूनि माथां ठेवी सव्य पाणी । मंत्र सांगे कर्णीं रामनाम ॥१८॥
नाम सांगुनियां ताम्रमूर्ति रम्य । पटाभिश्रीराम दिधला तया ॥१९॥
तया दिला वर तुज पुत्र होतील । ध्वज उभारतील रामदास्यें ॥२०॥
रामदास्य झालें धन्य वंशोद्धार । बोलेनि सत्वर गैब झाले ॥२१॥
झाला रामनवमीमहोत्सव थोर । मध्यान्हीं सत्वर जन्म झाला ॥२२॥
जन्म झाला झाला देव वंशा आले । उपासना चाले राघवाची ॥२३॥
राघवाची भक्ति सुखाची विश्रांति । पितयाची शांति झाली पुढें ॥२४॥
पुढें ज्येष्ठ बंधु न सांगेचि कांहीं । सुखें देवालयीं निद्रा केली ॥२५॥
निद्रा केली तेथें श्रीरामें उठवूनी । तोचि मंत्र कानीं सांगितला ॥२६॥
सांगितला बोध रामीं रामदास । गुरूच्याही वंशा निरोपिलें ॥२७॥

N/A

References : N/A
Last Updated : April 01, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP