मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|कुराण|
अद्‌दखान

सूरह - अद्‌दखान

कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.


(मक्काकालीन, वचने ५९)

अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.

हामीऽऽम. शपथ आहे या उज्ज्वल ग्रंथाची की आम्ही याला एका अत्यंत कल्याणकारी व समृद्धशाली रात्री अवतरला आहे. कारण आम्ही लोकांना सावध करण्याचा इरादा बाळगा होतो. ही ती रात्र होती ज्यात प्रत्येक मामल्याचा विवेकपूर्ण निर्णय आमच्या आज्ञेने सादर केला जातो. आम्ही एक प्रेषित पाठविणार होतो, तुझ्या पालनकर्त्याची कृपा म्हणून, निश्चितपणे तोच सर्वकाही ऐकणारा आणि जाणणारा आहे, आकाशांचा व पृथ्वीचा पालनकर्ता आणि त्या प्रत्येक वस्तूचा पालनकर्ता जी आकाशांच्या व पृथ्वीच्या दरम्यान आहे, जर तुम्ही लोक खरोखर विश्वास बाळगणारे असाल. कोणीही त्याच्याव्यतिरिक्त उपास्य नाही. तोच जीवन प्रदान करतो आणि तोच मृत्यू देतो. तुमचा पालनकर्ता आणि तुमच्या त्या पूर्वजांचा पालनकर्ता जे पूर्वी होऊन गेले आहेत. (परंतु खरे पाहता या लोकांना विश्वास नाही) तर हे आपल्या शंकेत ग्रस्त, खेळत आहेत. (१-९)

ठीक, तर प्रतीक्षा करा त्या दिवसाची जेव्हा स्पष्ट धूरासमान असलेले आकाश येईल आणि ते लोकांवर पसरेल, ही आहे यातनादायक शिक्षा. (आता म्हणतात की), “हे पालनकर्त्या, आम्हावरून हा प्रकोप दूर कर, आम्ही श्रद्धा ठेवतो.” यांची गफलत कुठली दूर होते? यांची स्थिती तर अशी आहे की यांच्याजवळ तेजस्वी प्रेषित आला, तरीसुद्धा हे त्याच्याकडे वळले नाहीत आणि म्हटले की, “हा तर शिकविलेला-पढविलेला वेडसर आहे.” आम्ही जरा प्रकोप हटवितो, तुम्ही लोक पुन्हा तेच काही कराल जे पूर्वी करीत होता. ज्यादिवशी आम्ही मोठा आघात करू तो दिवस असेल जेव्हा आम्ही तुमच्यावर सूड उगवू. (१०-१६)

आम्ही यांच्यापूर्वी फिरऔनच्या लोकसमूहाला अशाच कसोटीत घातले आहे. त्याच्याजवळ एक अत्यंत सज्जन प्रेषित आला, आणि तो म्हणाला, “अल्लाहच्या दासांना माझ्या हवाली करा, मी तुमच्यासाठी एक विश्वसनीय प्रेषित आहे. अल्लाहच्याविरूद्ध शिरजोरी करू नका. मी तुमच्यासमोर (आपल्या नियुक्तीची) स्पष्ट सनद प्रस्तुत करतो. आणि मी आपल्या पालनकर्त्याचे व तुमच्या पालनकर्त्याचे आश्रय घेतलेले आहे यापासून की तुम्ही माझ्यावर आक्रमक व्हावे. जर तुम्ही माझे म्हणणे ऐकत नसाल तर माझ्यावर हात टाकण्यापासून दूर रहा.” सरतेशेवटी त्याने आपल्या पालनकर्त्याचा धावा केला की हे लोक अपराधी आहेत. (उत्तर दिले गेले), “ठीक, तर रातोरात माझ्या दासांना घेऊन निघून जा तुम्हा लोकांचा पाठलाग केला जाईल. समुद्राला त्याच्या स्थितीत मोकळे सोड. हे संपूर्ण लष्कर बुडणार आहे.” कित्येक उद्याने व झरे आणि शेते व वैभवशाली राजवाडे होते जे ते सोडून गेले व कितीतरी विलासाचा सरंजाम ज्यात ते विलास करीत असत, त्यांच्या पाठीमागे तसाच पडून राहिला. असा झाला त्यांचा शेवट आणि आम्ही दुसर्‍यांना या वस्तूंचे वारस बनविले मग ना आकाश त्यांच्यासाठी रडले व ना पृथ्वी, आणि थोडीशी सवडसुद्धा त्यांना दिली गेली नाही. अशा प्रकारे बनीइस्राईलना आम्ही अत्यंत अपमानास्पद यातना देणार्‍या. फिरऔनपासून मुक्ती दिली, जो मर्यादेपलीकडे जाणार्‍यांपैकी खरोखरच मोठा उल्लांघनकारी मनुष्य होता. आणि त्यांची स्थिती जाणून त्यांना जगाच्या इतर लोकसमूहावर प्राधान्य दिले, आणि त्यांना असे संकेत दाखविले ज्यामध्ये उघड परीक्षा होती. (१७-३३)

हे लोक म्हणतात, “आमच्या पहिल्या मृत्यूशिवाय अन्य काहीच नाही, त्यानंतर दुसर्‍यांदा आम्ही उठविले जाणार नाही जर तुम्ही खरे असाल तर उठवून आणा आमच्या वाडवडीलांना.” हे श्रेष्ठतर आहेत की तुब्बअचे राष्ट्र आणि त्याच्या पूर्वीचे लोक? आम्ही त्यांना याच कारणास्तव नष्ट केले कीज ते अपराधी बनले होते. हे आकाश व पृथ्वी आणि त्यांच्या दरम्यानातील वस्तू आम्ही काही खेळ म्हणून बनविल्या नाहीत. यांना आम्ही सत्याधिष्ठित निर्माण केले आहे परंतु यांच्यापैकी बहुतेकजण जाणत नाहीत. या सर्वांच्या उठविण्यासाठी ठरलेली वेळ निर्णयाचा दिवस आहे. तो दिवस जेव्हा एखादा निकट स्नेही आपल्या निकट स्नेहीच्या कोणत्याही उपयोगी पडणार नाही आणि कोठूनही व कसलीही मदत त्यांना पोहचणार नाही, याव्यतिरिक्त की अल्लाहनेच एखाद्यावर दया करावी, तो जबरदस्त आणि परमकृपाळू आहे. (३४-४२)

जक्कूमचे वृक्ष गुन्हेगारांचे खाद्य असेल, तेलाच्या उकळीप्रमाणे, पोटांत ते अशाप्रकारे उकळेल जसे उकळते पाणी उसळत असते, “धरा याला आणि फरफटत न्या याला नरकाच्या मधोमघ. आणि ओता याच्या डोक्यावर उकळत्या पाण्याचा प्रकोप. चाख याची चव, मोठा जबरदस्त सन्माननीय मनुष्य आहेस तू. ही तीच गोष्ट आहे जिच्या येण्यात तुम्ही लोक शंका बाळगत होता.” (४३-५०)

ईशभीरू लोक शांतीच्या स्थळी असतील. उद्यानात व झर्‍यांत, तलम रेशीम व जरतारी वस्रे परिधान करून समोरासमोर बसले असतील, असे असेल त्यांचे वैभव. आणि आम्ही गोर्‍यापान मृगनयनी स्त्रियाशी त्यांच्या जोडया बनवू. तेथे ते समाधानपूर्वक हरतर्‍हेच्या चविष्ट वस्तू मागतील. तेथे मृत्यूची चव ते कधीही घेणार नाहीत. बस्स, जगात जो मृत्यू आला तोच आला. आणि अल्लाह आपल्या मेहेरबानीने त्यांना नरकाच्या प्रकोपापासून वाचवील. हेच मोठे यश होय. (५१-५७)

हे पैगंबर (स.), आम्ही या ग्रंथाला तुमच्या भाषेत सुलभ बनविले आहे. जेणेकरून या लोकांनी उपदेश घ्यावा. आता तुम्हीही प्रतीक्षा करा आणि हेदेखील प्रतीक्षेत आहेत. (५८-५९)

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP