मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|केशवसुत|
पहिला प्रश्न

पहिला प्रश्न

केशवसुतांच्या काव्यांवर क्रांतिकारक विचारांचा, स्वातंत्र्यवादाचा, मानवधर्माचा आणि आत्मनिष्ठेचा प्रभाव आहे.


( भुजंगप्रयात )

मुलें अंत्यजांचीं बिचारीं मजेनें
पथाच्या अहो खेळताती कदेनें;
दुरूनी तिथें विप्र डौलांत आला,
वदे काय तो मुग्ध त्या बालकालाः---

” सरा रे दुरी पोर हो म्हारडयांचे !
चला ! खेळ हे मांडले डोंबलाचे !
निघा ! वाट द्या लौकरी ब्राह्मणातें ! ”
पळालीं मुलें;---कोण राहील तेथें !

परी एक त्यांतील तैसाचि ठेला;
उगारी तधीं दुष्ट तो यष्टिकेला.
म्हणे---” गाढवा ! सांवली ना पडेल !
दुरी हो ! पहा हाच खाऊ मिळेल !”

तधीं बाळ तोही घराला निघाला,
मनीं आपुल्या या करी चिन्तनालाः---
” जरी त्यावरी सांवली माझि गेली.
तरी काय बाघा असे ठेविलेली ?”

घरीं जाउती तेंचि मातें विचारीं ;
वदे तेधवां त्यासि माता विचारीः---

” अम्ही नीच वा, आणि ते लोक थोर;
तयां पाहतां होईजे नित्य दूर.”
सुधें बोलली !--- हें परी काय तीतें
कळे कीं जगीं नाडुनीयां परांते,
म्हणूनी करूनी अधीं घोर पाप,
जनीं गाजवी मानवी स्वप्रताप !

१ सप्टेंबर १८८८

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP