मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप|
अध्याय ४६ वा

पांडवप्रताप - अध्याय ४६ वा

पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ रणीं पडला जय द्रथ ॥ पांडवदळ आनंद भरित ॥ संजया प्रति अंबिकासुत ॥ पुसता जाहला तेधवां ॥१॥
संजया मज सांगें निश्चिय ॥ कोणी कडे ये संपूर्व जय ॥ माझ्या पुत्रांचें कैसें होय ॥ चिंता बहुत मज लगीं ॥२॥
येरू म्हणे ऐकें साचार ॥ ब्राह्मण तेथें आचार ॥ पंडित तेथें विचार ॥ सर्व दाही वसतसे ॥३॥
मित्र तेथें प्रकाश ॥ सुख तेथें उल्हास ॥ गुरु तेथें सद्विद्या विशेष ॥ मान जैसा वसतसे ॥४॥
भक्ति तेथें प्रेम ॥ औदार्य तेथें धर्म ॥ ज्ञान तेथें निःसीम ॥ शांति सुख वसतसे ॥५॥
शांति तेथें दया वसे ॥ दया तेथें क्षमा असे ॥ क्षमा तेथें विलसे ॥ निजबोध सर्वदा ॥६॥
बोध तेथें आनंद ॥ आनंद तेथें ब्रह्या नंद ॥ तो ब्रह्मा नंदचि गोविंद ॥ पार्थ रथीं सर्वदा ॥७॥
तो पार्थ आणि जगत्पती ॥ ज्याचे दळीं विराजती ॥ तरी जय तिकडेचि नृपती ॥ काय पुससी वेळोवेळां ॥८॥
पुढें ऐकें समरवृत्तान्त ॥ युद्धा निघाला शारद्वत ॥ तों तिकडूनि अभिमन्युतात ॥ अत्यावेशें धांवला ॥९॥
परस्परें शर मारीत ॥ युद्ध जाहलें अत्यद्भुत ॥ वर्णीं बाण बैसले बहुत ॥ मूर्च्छा येत कृपाचार्या ॥१०॥
कृपाचार्य पडला म्हणोनी ॥ चमूमाजी उठला ध्वनी ॥ सारथी रथ काढूनी ॥ नेता जाहला एकीकडे ॥११॥
जाहलें युद्ध अत्युद्भुत पूर्ण ॥ धनंजय तेव्हां सद्न्द होऊन ॥ म्हणे जळो हा क्षत्रिय धर्म हीन ॥ काय करूं गोविंदा ॥१२॥
जो माता पिता गुरु परम ॥ ज्याची सेवा करावी उत्तम ॥ ज्याच्या पादुका शिरीं धरिजे सप्रेम ॥ त्याशीं युद्ध करणें पडे ॥१३॥
निर्वाणास्त्र कपट भावें ॥ गुरूवरी सहसा न टाकावें ॥ कृपाचार्यें कृपाळुवें ॥ सांगितलेंसे पूर्वीं मज ॥१४॥
माता क्रोधावली पूर्ण ॥ देत जरी गालि प्रदान ॥ तरी पुत्रासी व्हावें मरण ॥ सहसाही कल्पीना ॥१५॥
तैसे शारद्वत आणि द्रोण ॥ मजवरी प्रेरिती जरी बाण ॥ तरी जावा माझा प्राण ॥ सहसा मनीं नसे त्यांचे ॥१६॥
जळो हा दुर्यो धन चांडाळ ॥ याच्यापायीं आटलें कुळ ॥ असो ऐसा बीभत्सु व्याकुळ ॥ आचार्यस्नेहेम जाहला ॥१७॥
तों रथा रूढ सूर्य नंदन ॥ येत वेगें पवनाहून ॥ श्रीकृष्णासी म्हणे अर्जुन ॥ रथ प्रेरीं कर्णाकडे ॥१८॥
तंव तो भक्त काज कैवारी ॥ म्हणे कर्ण जातो सात्यकीवरी ॥ तूं त्यासी युद्धा न पाचारीं ॥ आजिचा दिन तत्त्वतां ॥१९॥
त्यापाशीं आहे वासवी शक्ती ॥ ते तुजवरी टाकील अवचितीं ॥ त्या शक्तीचें भय अहोरातीं ॥ माझें चित्तीं वसतसे ॥२०॥
त्या शक्तीसी निवारिता पाहीं ॥ ऐसा पुरुष जाहलाचि नाहीं ॥ ते तुजवरी घालीन लवलाहीं ॥ हें उत्कंठा सदा कर्णाची ॥२१॥
तरी ते शक्ति आजि रात्रीं ॥ टाकील एका महावीरावरी ॥ मग तूं त्याशीं युद्ध करीं ॥ निर्भय समरीं मनेच्छें ॥२२॥
इकडे सात्यकीशीं भास्करी ॥ युद्ध करीत घटिका चारी ॥ परस्परीं तीक्ष्ण शरीं ॥ खिळिलीं अंगें उभयांचीं ॥२३॥
आदित्यात्मजें सोडूनि बाण ॥ छेदिला सात्यकीचा स्यंदन ॥ सारथी तुरंग मारून ॥ विरथ केला तेधवां ॥२४॥
ऐसें देखोनि जग दीश्वर ॥ दरुका सहित आपुला रहंवर ॥ ध्वजीं ज्याचिया खगवर ॥ सात्यकी प्रति देतसे ॥२५॥
सात्यकी बैसूनि तये रथीं ॥ युद्ध करितां सर्व पाहती ॥ कर्णाचा रथ आणि सारथी ॥ समरांगणीं चूर्ण केले ॥२६॥
यावरी तो भास्करी ॥ आणिके रथीं आरोहण करी ॥ बाण जाळ ते अवसरीं ॥ सात्यकीवरी घालीत ॥२७॥
मित्र पुत्र महारथी ॥ सात्यकी खिळिला शरपंथीं ॥ तों युधामन्यु द्रुपदनृपती ॥ उत्तमौजा धांवला ॥२८॥
शर सोडीत अपार ॥ सर्वांगीं खिळिला रवि पुत्र ॥ दिसे जैसा मयूर ॥ पिच्छें पसरी स्वइच्छें ॥२९॥
द्रुपदें छेदूनि रथ ॥ राधेय केला समरीं विरथ ॥ उणें देखोणि कौरव समस्त ॥ एकदांचि धांवले ॥३०॥
परम बाल मित्र कर्ण ॥ दुर्यो धनासी आवडे प्राणांहून ॥ यालागीं त्वरें हात देऊन ॥ आपुले रथीं बैसविला ॥३१॥
सात्यकी महाराज यादववीर ॥ कौरव बाणीं केले जर्जर ॥ दारुकें फेरिला रहंवर ॥ कुलालचक्रसारिखा ॥३२॥
प्रज्ञाचक्षुसी संजय बोलत ॥ भीमें तुझें एकतीस सुत ॥ मारिले जाण आजिपर्यंत ॥ पुढेंही अनर्थ ॥ दिसतसे ॥३३॥
सात्यकीनें महावीर ॥ समरांगणीं मारिले अपार ॥ भीमासी म्हणे अर्कपुत्र ॥ बालयुद्ध काय करिसी ॥३४॥
अस्त्र विद्या आतां कांहीं ॥ तुजपाशीं रे दिसत नाहीं ॥ अर्जुन म्हणे ते समयीं ॥ सूत पूत्रा ऐकें तूं ॥३५॥
सात्यकीनें तुज केलें विरथ ॥ तूं म्हण विसी रणपंडित ॥ गर्व धरिला आहेसी बहुत ॥ परी तुज मी सत्य मारीन ॥३६॥
तूं आपुले भोग ॥ येईं सकल मित्रांसी पुसोन ॥ मागें कांहीं इच्छा ठेवून ॥ आतां येऊं नको रे ॥३७॥
तुज मी रणीं मारीन सत्य ॥ म्हणोनि गांडीवा घाली हात ॥ कर्ण म्हणे बोलसी बहुत ॥ गर्व अंगीं धरू नियां ॥३८॥
काय बोलोनि बहुत वाणी ॥ रणी ॥ रणीं करूनि दाख वीन करणी ॥ चिंतार्णवीं कौरव वाहिनी ॥ पडली तेव्हां जाण पां ॥३९॥
म्हणती पडले वीर सकळ ॥ उरले ते दिसती निर्बळ ॥ रोगिष्ठा ऐसें विकळ ॥ दळ सकळ दिसतसे ॥४०॥
दुर्यो धन बोले संतप्त ॥ इतुके असतां रणपंडित ॥ रक्षिला नाहीं जय द्रथ ॥ केला घात शत्रूंनीं ॥४१॥
परम संतप्त कौरवेश्वर ॥ जैसा कपाळ शूळें तळमळे व्याघ्र ॥ कीं उदर शूळीं पादोदर ॥ आरंबळत जैसा कां ॥४२॥
वणव्यांत आहाळला अजगर ॥ कीं महाकूपीं पडिला मृगेंद्र ॥ तैसा दुःखी दुर्यो धन सत्वर ॥ द्रोणा प्रति बोलतसे ॥४३॥
पहा कैसें कर्म प्रबळ ॥ सात अक्षौहिणी आटिलें दळ ॥ एकतीस बंधू सबळ ॥ मृत्यु नगरा बोळविले ॥४४॥
अहो यावरी गुरु वर्या ॥ पृथ्वी ठाव नेदी मज लपावया ॥ तरी मी आतां युद्ध करू नियां ॥ मारीन किंवा मरेन ॥४५॥
तुझी कृपा पार्था वरी फार ॥ वरिवरी युद्ध करिसी समोर ॥ जैसा कमळीं बैसे भ्रमर ॥ परी केसर तुटों नेदी ॥४६॥
तरी तूं गुरु आम्हांसी ॥ मृत्यु रूप वाटतोसी ॥ द्रोण म्हणे कां विंधितोसी ॥ वाग्बाणें व्यर्थ तूं ॥४७॥
पार्थाशीं भिडे समरांगणीं ॥ ऐसी कोण प्रसवली जननी ॥ कपटद्यूत खेळोनी ॥ तुम्हीं त्यांसी जिंकिलें ॥४८॥
ते सत्यधर्में निश्चितीं ॥ समरीं तुम्हांसी जिंकिती ॥ सभेसी तुम्ही आणूनि द्रौपदी सती ॥ गांजिली कैसी अधर्में ॥४९॥
तीस साह्य जगन्निवास ॥ वस्त्रें पुरविलीं आसमास ॥ पांडव धाडिले वनवासास ॥ बहुत श्रेष्ठीं वर्जितां ॥५०॥
द्रौपदीचें समाधान ॥ करितां बोलिला जगन्मोहन ॥ कीं कौरव मिळोनि जाण ॥ गांजिली पूर्ण देवकीच ॥५१॥
त्याचें फळ हेंचि जाण ॥ पांडवांसी साह्य होऊन ॥ कौरव कुल संहारीन ॥ प्रतिज्ञा केली श्रीधरें ॥५२॥
पार्थ तो केवळ वासव ॥ साह्य हे माधव उमाधव ॥ त्याशीं समरांगणीं धरी हाव ॥ ऐसा पुरुष कोण आहे ॥५३॥
भगवद्भक्तांशीं करिती द्वेष ॥ त्यांसी निर्दाळी ह्रषीकेश ॥ तुज आम्हीं शिकविलें बहुवस ॥ नाय कसी सर्वथा ॥५४॥
तुझ्या दोषे करून ॥ आम्ही समस्त गेलों बुडोन ॥ शिष्याचें पाप दारुण ॥ मस्तकीं बैसे गुरूच्या ॥५५॥
मैत्रेय़ विदुर व्यास ऋषी ॥ इंहीं तुज शिकविलें बहुवसीं ॥ परी तूं मतिमंदा नायकिलेंसी ॥ आतां रडतोसी कासया ॥५६॥
तरी आतां प्रतिज्ञा हेच ॥ आंगींचें मी न काढीं कवच ॥ सर्वांसी जिंकीन एक मीच ॥ किंवा परंधाम पावेन पैं ॥५७॥
यावरी तो कौरव नायक ॥ करी कर्णा जवळी परम शोक ॥ म्हणे गुरूचें मन अधिक ॥ पार्था कडे असे पां ॥५८॥
व्यूहद्वारीं वाट देऊन ॥ येणेंचि प्रेरिला अर्जुन ॥ येणेंचि जय द्र्थ राहवून ॥ घेतला प्राण तयाचा ॥५९॥
कर्ण म्हणे निर्धारीं ॥ गुरु निंदा तूं सहसा न करीं ॥ धनंजय नाटोपे समरीं ॥ इंद्रादिकां सहसाही ॥६०॥
ज्याच्या रथावरी हरिहर ॥ विजय चाप विजय तूणीर ॥ समरीं विजय रहंवर ॥ न ढळे अणुमात्र माघारा ॥६१॥
गुरु निंदा करितां पाहें ॥ तत्काल होय कुलक्षय ॥ तूं आचार्याचें ह्रदय ॥ दुःखी सहसा करूं नको ॥६२॥
स्वकर्मचि मुख्य प्रधान ॥ आमुचें रुद्राक्षौहिणी द्ळ दारुण ॥ त्यांची ऋषि अक्षौहिणी चमू संपूर्ण ॥ परी जय जाण त्यांज कडे ॥६३॥
आम्ही तुझ्या स्नेहें करून ॥ समरांगणीं वेंचूं प्राण ॥ परी जिकडे आहे रुक्मिणी जीवन ॥ शेवटीं जय तिकडेचि ॥६४॥
असो यावरी रणतूयाची घाई ॥ दोन्ही दळीं गाजतसे ते समयीं ॥ दुर्यो धन ॥ लवलाहीं ॥ रथा रूढ जाहला ॥६५॥
अपार सोडिले बाण ॥ द्विरद विध्वंसी कमल वन ॥ तैसें पांडवद्ळ संपूर्ण ॥ विध्वंसिलें दुर्यो धनें ॥६६॥
तीक्ष्ण वर्षें बाण जाळ ॥ पुत्रा सहित पळविला पांचाळ ॥ कुंतीचा तृतीय पुत्र सबळ ॥ शतबाणीं विंधिला ॥६७॥
सत्तर बाणीं सबळा ॥ विंधिला सहदेव नकुळ ॥ धर्मा वरीही तेजाळ ॥ ऐशीं बाण घातले ॥६८॥
नव्वद बाणें करून ॥ सात्यकीस विंधी सुयोधन ॥ विराटावरी क्रोधें करून ॥ पन्नास बाण घातले ॥६९॥
द्रुपद धृष्टद्युम्न ते वेळे ॥ साठ बाणीं खिळियेले ॥ अवघें दळ जर्जर केलें ॥ दुर्यो धनें तेधवां ॥७०॥
कर्णपिता अस्ताचलीं ॥ मावळतां रजनी प्रवर्तली ॥ युद्धाची झडी लागली ॥ अधिकाधिक तेधवां ॥७१॥
वायु संगें चेतला कृशान ॥ तैसा खवळला भीमसेन ॥ बहु सोडूनि मार्गण ॥ कौरव सैन्य खिळियेलें ॥७२॥
दुर्यो धनाचे बंधु तिघे जण ॥ दीर्घ बाहु दुर्मद दुष्कर्ण ॥ त्यांचीं शिरं बाणें करून ॥ भीमसेनें उडविलीं ॥७३॥
भीमावरी एक शक्ती ॥ कर्णें प्रेरिली शीघ्रगतीं ॥ येतां देखोनि हस्तीं ॥ भीमें धरिली पराक्रमें ॥७४॥
मग ती तेणें स्वबळें करूनी ॥ कर्णावरी दिधली झोंकूनी ॥ ते शकुनीवरी जाऊनी ॥ पडावी जों अकस्मात ॥७५॥
तों कर्णें शर सोडूनि निवाडें ॥ शक्ति पाडिली एकीकडे ॥ यावरी चपला अकस्मात पडे ॥ तैसा आचार्य धांवला ॥७६॥
सात्यकी सोडी सायक ॥ परी तो द्रोण प्रतापपार्क ॥ तूळराशीस जाळी पावक ॥ तैसें सैन्य संहारीत ॥७७॥
तेव्हां शिरांच्या लाखोल्या ॥ गुरुनें भूलिंगासी समर्पिल्या ॥ एकचि आकांत वर्तला ॥ पांडवदळीं तेधवां ॥७८॥
तों समसप्तकांसी परा भवून ॥ अकस्मात आला अर्जुन ॥ जैसा संकटीं धांवे भगवान ॥ भक्तांलागीं एका एकीं ॥७९॥
जैसा प्रभं जन जल दजाळ ॥ पुरुषार्थें विदारी तत्काळ ॥ तैसें कौरवांचें दळ कौरवांचें दळ ॥ केलें विकळ शरपंथें ॥८०॥
प्रकटला केवळ कृतान्त ॥ तैसा पुढें आला वृकोदरसुत ॥ अष्टचक्र जयाचा रथ ॥ किंवा पर्वत दुसरा पैं ॥८१॥
जो घटोत्कच भयानक वदन ॥ आरक्तध्वज गृध्रचिन्ह ॥ त्याची गर्जना ऐकून ॥ कौरव दळ दचकलें ॥८२॥
एक म्हणती आला काळ ॥ ग्रासील हा अवघें दळ ॥ सवें राक्षससेन प्रबळ ॥ भयानक न लक्षवे ॥८३॥
घटोत्कच सोडी जे शर ॥ ते चपले समान ॥ अनिवार ॥ वल्मीकांत संचरती विखार ॥ वीरां अंगीं तेवीं रुतती ॥८४॥
ऐसें देखोनि अद्भुत ॥ त्यावरी धांवला गुरु सुत ॥ तीक्ष्ण सायक एक शत ॥ घटोत्कचावरी टाकिले ॥८५॥
कुंजरावरी सुमन भार ॥ तैसे न गणी तो तीक्ष्ण शर ॥ मग हे गुरु पुत्रा धरीं धीर ॥ म्हणोनि हांक फोडिली ॥८६॥
कालदंडवत सत्तर बाणीं ॥ भीमात्मजें खिळिला द्रौणी ॥ तों घटोत्कच पुत्र ते क्षणीं ॥ अंजन पर्वा धांवला ॥८७॥
चक्रें सोडी अनिवार ॥ निवटीत कौरवांचे भार ॥ मिळोनि सर्व कौरव वीर ॥ वर्षत शर सूटले ॥८८॥
दुर्यो धन कर्ण द्रौणी ॥ शरीं राक्षस खिळिले ते क्षणीं ॥ असुर वर्षत वृक्षणाषाणीं ॥ कौरव बाणीं उडविती ॥८९॥
कर्णें अद्भुत सोडोनि शर ॥ छेदिलें अंजनपर्व्याचें शिर ॥ कौरव दळीं आनंद थोर ॥ कीं महावीर पडियेला ॥९०॥
देखोनि पुत्राचें मरण ॥ घटोत्कच खवळला दारुण ॥ पर्वत वृक्ष उपटून ॥ अरिसेनेवरी वर्षतसे ॥९१॥
साठ सहस्त्र दळ घेऊनी ॥ पांडवांवरी धांवली शकुनी ॥ दोन्ही दळें मिसळलीं ते क्षणीं ॥ झोड धरणी होतसे ॥९२॥
होत युद्धाचें घन चक्र ॥ गुरु सुतें प्रेरिलें अग्न्यस्त्र ॥ असुर जाळिले अपार ॥ प्रलय थोर वर्तला ॥९३॥
अनिवार ते रजनीचर ॥ वर्षती शिळा आणि तरुवर ॥ घटोत्कचें शक्ति तीव्र ॥ द्रौणी वरी भिरका विली ॥९४॥
ते शक्ती परम अचाट ॥ सबळ घंटा बांधल्या आठ ॥ करीत प्रलयबो भाट ॥ अश्वत्थाम्यावरी आली ॥९५॥
परमपराक्रमी वीर द्रौणी ॥ शक्री धरिली करें करूनी ॥ घटोत्कचावरी परतोनी ॥ टाकिली तेव्हां अतिबळें ॥९६॥
घटोत्कचाचा महारथ ॥ शक्तीनें जाळिला क्षणांत ॥ मग आणिके रथीं भीमसुत ॥ आरूढत सवेंचि ॥९७॥
परमपुरुषार्थी गुरु पुत्र ॥ द्वयदळीं वर्णिती चरित्र ॥ रथ जाळूनि शक्ती अनिवार ॥ पृथ्वी गर्भीं प्रवेशली ॥९८॥
सुरथ आणि शत्रुं जय ॥ द्रुपदाचे पुत्र पाहें ॥ गुरु पुत्रा पुढें येऊनि लवलाहें ॥ युद्ध करिती अपार ॥९९॥
गुरु पुत्रानें दोन बाणीं ॥ दोघांचीं शिरें उडविलीं गगनीं ॥ कुंति भोजाचे दश पुत्र रणीं ॥ प्रेतें करूनि टाकिले ॥१००॥
भूरिश्रवपिता अद्भुत ॥ नाम जयाचें सोमदत्त ॥ तो महावीर रणपंडित ॥ मारी बहु पांचाळसेना ॥१०१॥
तों सात्यकीनें समरांगणीं ॥ त्याचें शिर उडविलें गगनीं ॥ भीमें चौघे पुत्र रणीं ॥ शकुनीचे संहारिले ॥१०२॥
तों बाल्हीकें निजशरें करून ॥ रणीं खिळिला भीम सेन ॥ जैसा मयूर वेष्टित पिच्छें करून ॥ तैसा भीम शोभतसे ॥१०३॥
भीमें गदा भोंवंडूनी ॥ बाल्हीक मारिला समरांगणीं ॥ दुर्यो धनाचें बंधु ते क्षणीं ॥ दहा जण वधियेले ॥१०४॥
त्यावरी घालूनि गदा घात ॥ मारिले कर्णाचे चौघे सुत ॥ देशोदेशींचे राजे बहुत ॥ धर्म राजें आटिले ॥१०५॥
परम पुरुषार्थीं युधिष्ठिर ॥ मारीत उठिला अनिवार ॥ सहस्त्रांचे सहस्त्र वीर ॥ शत्रु आटिले रणांगणीं ॥१०६॥
धर्माचा पराक्रम देखोन ॥ आचार्य धांवला वर्षत बाण ॥ दहा सहस्त्र बाण सोडून ॥ धर्म भेदिला ह्रदया वरी ॥१०७॥
साठ बाणीं द्रोण समरीं ॥ धर्में खिळिला ते अवसरीं ॥ धर्माचा रथ सारथी झडकरी ॥ चूर्ण केला आचार्यें ॥१०८॥
तीस बाणीं तत्काळ ॥ धर्म रणीं केला विकळ ॥ नकुल रथीं वाहूनि तत्काळ ॥ नेता जाहला तेधवां ॥१०९॥
दुर्यो धन म्हणे कर्णवीरा ॥ रणपंडिता समर धीरा ॥ माझे नमोरथ चतुरा ॥ करिसील पूर्ण केव्हां तूं ॥११०॥
अर्कज म्हणे ऐकें नृपती ॥ आतां सोडीन वासवी शक्ती ॥ रणांगणीं सुभद्रापती ॥ पहुडवीन निश्चियें ॥१११॥
मग बोले शारद्वत ॥ वल्गना कां करिसी व्यर्थ ॥ जों देखिला नाहीं वीर पार्थ ॥ कपिवर ध्वज श्रेष्ठ तो ॥११२॥
निवात कवच योद्धा अभिनव ॥ त्याचा पार्थें पुशिला ठाव ॥ व्योमकेश आणि वासव ॥ समरांगणीं तोष विले ॥११३॥
गोग्रहणीं तुमची गती ॥ कैसी केली आठवा चित्तीं ॥ स्वाहास्वधेचा जो पती ॥ आरोग्य केला पुरुषार्थें ॥११४॥
ऐकतां कोपला वीर कर्ण ॥ शारद्वतासी बोले तीक्ष्ण ॥ मज वाटतें जिव्हा छेदून ॥ तुझी टाकवी बाह्मणी ॥११५॥
तूं आणि गुरु द्रोण ॥ पार्थाचे कैवारी केवळ पूर्ण ॥ तों द्रौणी खडग घेऊन ॥ कर्णा वरी धांवला ॥११६॥
म्हणे अकालीं मेघ गडगडत ॥ बिंदु न टाकी अवनीं व्यर्थ ॥ तैसी बडबड एथ ॥ मूर्खा तुझी जाण पां ॥११७॥
कपिवर ध्वज सिंहा पुढें ॥ तूं  जंबुक कायसें बापुढें ॥ आचार्यनिंदा करिसी तोंडें ॥ करीन खंडें तुझीं आतां ॥१८॥
गुरु निंदा करिसी जाण ॥ तरी निकट आलें तुज मरण ॥ आतांचि तुझें शिर छेदीन ॥ म्हणोन शस्त्र उचलिलें ॥११९॥
शस्त्रें घेऊनि भानु सुत ॥ क्रोधें त्यावरी लोटों पाहात ॥ दुर्यो धन आणि शारद्वत ॥ निवारिती दोघां जणां ॥१२०॥
दोघांसी म्हणे दुर्यो धन ॥ काल कैसा पहा विलोकून ॥ रणीं आटले थोर लहान ॥ व्यर्थ भांडण करितां कां ॥१२१॥
असो त्यावरी युद्ध मांडलें सबळ ॥ उठले वीर पांचाळ ॥ त्यांवरी सूर्य पुत्र केवळ काळ ॥ संहारीत ऊठिला ॥१२२॥
सहस्त्र वीरांचीं शीर्षें ॥ कर्णें छेदिलीं अत्यावेशें ॥ देखतां दुर्यो धन संतोषे ॥ बोले कर्ण धन्य पूर्ण ॥१२३॥
कर्णा ऐसा रणपंडित ॥ ऐशासी निंदितो गुरु सुत ॥ असो भानुजें वीर बहुत ॥ समर भूमीं पहुडविले ॥१२४॥
कर्णाचा पुरुषार्थ थोर ॥ देखोनि गर्जती कौरव वीर ॥ तें ऐकोनि किरीटी यदुवीर ॥ मनोवेगें धांविन्नले ॥१२५॥
कर्णा समोर अकस्मात ॥ उभा केला विजय रथ ॥ पार्थें बाण टाकूनि तीन शत ॥ सूर्य सुत खिळियेला ॥१२६॥
चाप आणि बाण भाता ॥ घोडे सारथी आणि रथा ॥ विजय छेदी क्षण न लागतां ॥ धन्य पार्थ वीर म्हणती ॥१२७॥
कर्ण विरथ उभा उभा जगतीं ॥ मग गौत मसुतें बैसविला रथीं ॥ वरकड दळ भार पळती ॥ पार्थ भयें करू नियां ॥१२८॥
ऐसें देखोनि सुयो धन ॥ म्हणे मी आजि झुंजेन निर्वाण ॥ मग गुरु पुत्र गौतम नंदन ॥ निवारिती दुर्यो धना ॥१२९॥
समीप असतां द्ळें अपारें ॥ उडी न घालावी कदा नृपवरें ॥ दुर्यो धन म्हणे निर्धारें ॥ मंद भाग्य सत्य मी ॥१३०॥
तुम्ही मंद युद्ध करितां ॥ जरी मनीं धराल तत्त्वतां ॥ तरी निःपांडवी पृथ्वी आतां ॥ क्षण न लागतां कराल ॥१३१॥
कृपी पुत्र म्हणे ते अवसरीं ॥ अमुचें युद्ध पाहें यावरी ॥ वीज संचरे उद्यानांतरीं ॥ तैसा वेगें धांविन्नला ॥१३२॥
चापमेघा पासून ॥ वर्षत शरांचा दाट घन ॥ पळविलें पांडव सैन्य ॥ दश दिशा ते वेळे ॥१३३॥
तें देखोनि धृष्टद्युम्न ॥ पुढें धांवला वर्षत बाण ॥ म्हणे रे गुरु पुत्रा तूं बाह्मण ॥ परम अधम जाण पां ॥१३४॥
सांडूनि याग अनुष्ठान तप ॥ राजहिंसा करितां हें पाप ॥ तूं आणि तुझा बाप ॥ परम अधम निर्धारें ॥१३५॥
तूझिया पित याचा प्राण ॥ मीच घेईन सत्यवचन ॥ मग यावरी धृष्टद्युम्न ॥ वर्षें पर्जन्य शरांचा ॥१३६॥
पार्थें टाकूनि बाण जाळ ॥ भूभुज पळविले सबळ ॥ किंशुक फुलती सकळ ॥ तैसे वीर दिसती पैं ॥१३७॥
रात्रीं युद्ध होत घोरांदर ॥ सुगंध स्नेह परम सुंदर ॥ त्याच्या दीपिका अपार ॥ दोन्ही दळीं पाजळिल्या ॥१३८॥
लक्षानुलक्ष चंद्र ज्योती ॥ लावितां उजळली सर्व जगती ॥ कर्पूरदीपिकांची दीप्ती ॥ गगना माजी न समाये ॥१३९॥
रथ इभ स्वारां प्रती ॥ पांच पांच दीपिका प्रका शती ॥ सुवर्ण कवचें झळकती ॥ चपले ऐसीं तेजाळ ॥१४०॥
अलंकार मुकुटांची प्रभा ॥ तेणें आणिली दश दिशां शोभा ॥ वस्त्रें आणि चापें नभा ॥ उजळिती स्वतेजें ॥१४१॥
ध्वज झळकती अपार ॥ रात्रींचें युद्ध घोरांदर ॥ द्रोणाचे पाठीशीं कौरव वीर ॥ लक्षूनि बळ असती पैं ॥१४२॥
रथांशीं रथ दाटले ॥ गजांशीं गज संघट्टले ॥ स्वारांशीं स्वार भेटले ॥ हांकें भरलें ब्रह्मांड ॥१४३॥
तंत वितंत घन सुस्वर ॥ चतुर्विध वाद्यांचे होती गजर ॥ कृतवर्मा आणि युधिष्ठिर ॥ परमावेशें भिडती पैं ॥१४४॥
शारद्वत सुत अर्जुन ॥ द्रोण विराट दोघे जण ॥ माध्यान्हींचा चंडकिरण ॥ तैसा आचार्य शोभतसे ॥१४५॥
तों भीमें दिधली आरोळी ॥ जेणें कृतांतही कांपे चळीं ॥ गदा घेऊनि महाबळी ॥ गज भारीं संचरला ॥१४६॥
सहस्त्रांचे सहस्त्र भद्रजाती ॥ भीमें बळें आपटिले क्षितीं ॥ भिरका वितां गगन पंथीं ॥ वायु चक्रीं पडिले ते ॥१४७॥
अद्याप भोंवती नभोमंडलीं ॥ कित्येक पडले समुद्र जलीं ॥ लंकादुर्गीं आदळलीं ॥ गजकलेवरें कित्येक ॥१४८॥
चर्या पडती ढांसळोन ॥ आश्चर्य करी बिभीषण ॥ मग कुरुक्षेत्रासी आला धांवोन ॥ भारती युद्ध पहावया ॥१४९॥
गजावरी गज घालोन ॥ रणीं मारी भीमसेन ॥ वीरां सहित अश्व उचलून ॥ आपटीत भूमीवरी ॥१५०॥
रथावरी घालूनि रथ ॥ शतांचीं शतें चूर्ण करीत ॥ ऐसा प्रलय अद्भुत ॥ भीमें केला कौरव दळीं ॥१५१॥
रथा वरूनि सहदेव चपळ ॥ कर्णावरी सोडी शरजाळ ॥ आदित्यात्मजें तत्काळ ॥ रथ सारथी छेदिला ॥१५२॥
विरथ होतां माद्री सुत ॥ असिलता घेऊनि धांवत ॥ तीही छेदिली अकस्मात ॥ रवितनुजें तेधवां ॥१५३॥
मग धांवे गदा घेऊनी ॥ तेही छेदिली ते क्षणीं ॥ सवेंचि शक्ति घेत बळें करूनी ॥ तेही तोडिली येतयेतां ॥१५४॥
मग घेऊनि रथांग सत्वर ॥ तळपतसे माद्री कुमार ॥ राघेयें तें टाकूनि शर ॥ छेदूनि पाडिलें एकी कडे ॥१५५॥
मग मृत गज कलेवरें ॥ उचलूनि टाकिलीं माद्री पुत्रें ॥ यावरी कर्ण हास्यवक्रें ॥ सर्वही छेदी क्षणार्धें ॥१५६॥
तेव्हां कृपाकौतुकें करून ॥ उदार कर्ण बोले वचन ॥ रणपंडित जे महादारुण ॥ त्यांशीं युद्ध करूं नको ॥१५७॥
समवय सम विद्या पाहोन ॥ युद्ध करावें तुवां जाण ॥ जंबुक सिंहावरी जाय चढोन ॥ तैसा मज पुढें येऊं नको ॥१५८॥
आतां पळोनि जाईं पार्था आड ॥ न धरीं युद्धाची कदा चाड ॥ माझा कोप गग नाहूनि वाड ॥ त्या वरचढ होऊं नको ॥१५९॥
सहदेव नेदी प्रतिवचन ॥ गेला पांचालरथीं बैसोन ॥ इकडे विराट शल्य दोघे जण ॥ महायुद्धासी प्रवर्तले ॥१६०॥
विराट बंधु शतानीक वीर ॥ शल्यें त्याचें छेदिलें शिर ॥ त्यावरी मत्स्यरायें अपार ॥ बाण जाळ घातलें ॥१६१॥
सहस्त्र बाणीं अचाट ॥ शल्यें खिळिला विराट ॥ सकल चमूचा केला आट ॥ अतिसंकट ओढवलें ॥१६२॥
हें देख्नोनि पंडुपुत्र ॥ धांवले शल्यावरी सत्वर ॥ बाणें करूनि जर्जर ॥ पराभविला तेधवां ॥१६३॥
यावरी धनुर्वेदपरायण ॥ तो पुढें धांवला गुरु द्रोण ॥ पांडवदळ कंपाय मान ॥ पाहोनि संधान तयाचें ॥१६४॥
टाकिला बाण न जाय व्यर्थ ॥ महाझुंजार रणपंडित ॥ हें पाहोनि विराट धांवत ॥ निजदळाशीं तेधवां ॥१६५॥
विराटाचे पुत्र जाण ॥ सुबाहु बलबाहु वीरसेन ॥ मणिमंत आणि सुकर्ण ॥ त्याही पुढें धांविन्नले ॥१६६॥
विराट माघारां घालून ॥ युद्ध केलें तिंहीं निर्वाण ॥ सर्वांगीं विंधिला द्रोण ॥ अवघे जण पाहती ॥१६७॥
द्रोणाचार्य प्रचंड वीर ॥ टाकिले पांच निर्वाण शर ॥ पांचांचीं शिरें सत्वर ॥ आकाश मार्गीं उडविलीं ॥१६८॥
ऐसें देखतां विराट नृप ॥ पुढें धांवत नावरे कोप ॥ बाप सोडीत अमूप ॥ भारद्वाज लक्षूनियां ॥१६९॥
तुरंग सारथी स्यंदन ॥ विराटें बाणीं केले चूर्ण ॥ सहस्त्र बाणांहीं करून ॥ खिळिला द्रोण सर्वांगीं ॥१७०॥
आणिके रथीं द्रोण बैसत ॥ क्षोभला जैसा प्रलयकृतान्त ॥ चपले ऐसे बाण सोडीत ॥ अंगीं भेदत विराटाचे ॥१७१॥
चाप सारथी स्यंदन ॥ समरीं आचार्यें केले चूर्ण ॥ मग काढूनि निर्वाण बाण ॥ चापावरी योजिला ॥१७२॥
उदया चलावरी जैसा मित्र ॥ तैसा बाण दिसे परम तीव्र ॥ चापा पासूनि सुटतां सत्वर ॥ मोह पावती दोन्ही द्ळें ॥१७३॥
विराटाचें कंठनाळ ॥ छेदूनि उडविलें तत्काळ ॥ पांडव दळीं कोल्हाळ ॥ हाहाकार जाहला ॥१७४॥
समसप्तकांकडे अर्जुन ॥ युद्ध करीतसे निर्वाण ॥ इकडे चौघे बंधु धांवोन ॥ द्रोणावरी चालिले ॥१७५॥
द्रुपदराज सहपरिवारें ॥ लोटला त्याही पुढें ॥ चंद्र ज्योति दीपिका एकसरें ॥ पजळूनि धांवती ॥१७६॥
द्रुपद म्हणे द्रोणा लागून ॥ तुवां सांडूनि तपानुष्ठान ॥ दुष्टांसी साह्य होऊन ॥ राजहिंसा करितोसी ॥१७७॥
तुज मज पूर्वींचें बैर ॥ परधर्म आचरसी अधर्म विप्र ॥ आजि तुझें छेदीन शिर ॥ समरांगणीं जाण पां ॥१७८॥
द्रोण म्हणे रे मशका ॥ ब्रह्मद्वेषिया परमनिंदका ॥ पार्था हातीं कीटका ॥ तुज बांधोनि आणि विलें ॥१७९॥
गुरु द्रोही तूं दुष्ट पूर्ण ॥ तुझें न पाहावें कदा वदन ॥ आतां सांभाळीं आले बाण ॥ तुझे प्राण हतें जे ॥१८०॥
त्यावरी दहा शरीं ॥ द्रुपद खिळिला ह्र्दया वरी ॥ येरें शत बाण झडकरी ॥ द्रोणावरी सोडिले ॥१८१॥
बाण टाकितां परस्परीं ॥ शरमंडप दाटला अंबरीं ॥ अस्त्रें सोडिलीं समरीं ॥ रामरावणां समान ॥१८२॥
परस्परें तोडितां स्यंदन ॥ सवेंचि आणविती नूतन ॥ यावरी आचार्यें एक बाण ॥ भार्ग वदत्त काढिला ॥१८३॥
जैसी प्रलयींची चपला ॥ तैसा बाण वेगें सुटला ॥ द्रुपदाचा कंठ छेदिला ॥ कमल न्यायें अकस्मात ॥१८४॥
पांडवदळीं हाहाकार ॥ कौरवांकडे वाद्यांचा गजर ॥ म्हणती धन्य धन्य आचार्य वीर ॥ केला संहार पांडवांचा ॥१८५॥
दाटली शर्वरी तमें घोर ॥ होतसे युद्धाचें घन चक्र ॥ पांडवदळें समग्र ॥ पळतां देखिलीं घटोत्कचें ॥१८६॥
मग समस्तांसी धीर देऊन ॥ दळें परत विलीं संपूर्ण ॥ अष्टचक्र त्याचा स्यंदन ॥ पुढें लोटिला तेधवां ॥१८७॥
पूर्वीं अतिकाय इंद्रजित ॥ तैसा योद्धा तो भीमसेन सुत ॥ राक्ष सदळ अत्युद्भुत ॥ घेऊ नियां लोटला ॥१८८॥
घालू नियां वायु अस्त्र ॥ दीपिका परदळींच्या समग्र ॥ विझवू वियां तीक्ष्ण शर ॥ सोडिता जाहला तेधवां ॥१८९॥
विजां ऐसे दिव्य बाण ॥ असंख्य देतसे सोडोन ॥ पर्वत आणि पाषाण ॥ यांचा पर्जन्य पडतसे ॥१९०॥
पर्वतशिलांचे तळीं जाण ॥ महावीर होती चूर्ण ॥ जैसे मृद्धट जाती फुटोन ॥ अकस्मात आदळतां ॥१९१॥
मायावी युद्ध परम घोर ॥ दशदिशांनीं येती शर ॥ शक्ती सुटती अपार ॥ तैसे तोमर न गणवती ॥१९२॥
द्रोण कर्ण आणि कृपीसुत ॥ कौरवही शरीं खिळिले समस्त ॥ परस्परें हांका फोडीत ॥ न चाले बळ कोणाचें ॥१९३॥
प्रलय वर्तलासे थोर ॥ कौरव दळीं हाहाकार ॥ गदाचक्रांचे भार ॥ आकाशांतूनि रिचवती ॥१९४॥
वृक्ष पाषाण पर्वत ॥ राक्षस टाकिती असंख्यात ॥ कौरव दळ भयें पळत ॥ दशदिशांनीं नाटोपे ॥१९५॥
अकस्मात शस्त्रें येती ॥ महावीरांचे अंगीं खोंचती ॥ तेव्हां दुर्यो धन कर्णा प्रती ॥ दीन वदनें बोलतसे ॥१९६॥
घटोत्कचाची माया दारुण ॥ आलें सर्वांसी आतां मरण ॥ या वेळेसी राखीं आमुचा प्राण ॥ वासवी सोडीं जाजवरी ॥१९७॥
कर्ण म्हणे तये वेळीं ॥ ते म्यां अर्जुनाकरितां ठेविली ॥ प्राणांवरोबरी रक्षिली ॥ आजिवरी शक्ति ते ॥१९८॥
दुर्यो धन म्हणे तरी प्राणान्त ॥ आतांचि ओढवला कीं त्वरित ॥ कर्णासी विनविता समस्त ॥ टाकीं शक्ति याजवरी ॥१९९॥
मग दीपिकांचे भंबाळ ॥ कौरवीं पाजळिले तत्काळ ॥ घटोत्कचावरी दानशीळ ॥ भास्करपुत्र धांवला ॥२००॥
हरिमाया परमगहन ॥ हें कर्तृत्व त्याचेंचि पूर्ण ॥ रक्षावया पार्थाचा प्राण ॥ चरित्र जाण केलें हें ॥२०१॥
शर टाकूनि अमित ॥ असुरांचीं शस्त्रें निवारीत ॥ मग जे इंद्र शक्ति अद्भुत ॥ गवसणी तिची फाडिली ॥२०२॥
उगवले सहस्त्र वासरमणी ॥ तेवीं प्रकाश पडला धरणीं ॥ दोन्ही दळांवरी तये क्षणीं ॥ प्रभा पसरली अद्भुत ॥२०३॥
ते कृतान्त जिव्हाचि तेजाळ ॥ कीं यमदंष्ट्रा अति विशाळ ॥ कीं दावाग्नीची तीक्ष्ण ज्वाळ ॥ किंवा गरळ काळसर्पाची ॥२०४॥
ते महाप्रलयींची सौदामिनी ॥ कीं काळ पुरुषाची ज्येष्ठ भगिनी ॥ कीं सकल विद्या गाळोनी ॥ एकरूपिणी ओतिली ॥२०५॥
सप्तकोटि महा मंत्र पाहीं ॥ त्यांचें सामर्थ्य या शक्तीचे ठायीं ॥ शक्र प्रसन्न होऊनि एके समयीं ॥ कर्णा प्रति दिधली तेणें ॥२०६॥
न्यास मंत्र कर्णें जपोन ॥ केलें शक्तीचें पूजन ॥ मग दोन्ही हस्तीं धरून ॥ घटोत्कचावरी सोडिली ॥२०७॥
चतुरानन आणि हरिहर ॥ यांसी जे शक्ति अनिवार ॥ ते कडकडली परम तीव्र ॥ पळविती सुरवर विमानें ॥२०८॥
सहस्त्र चपला कडकडत ॥ तैसी चालली प्रलय करीत ॥ ब्रह्मांड अवघें उजळत ॥ जाहला आकांत दोन्ही दळीं ॥२०९॥
पथ्वी तल डळमळी ॥ मेदिनीवसन ॥ भयें खळबळी ॥ जलचर वनचर ॥ ते वेळीं ॥ गत प्राण जाहले ॥२१०॥
दोन्ही दळींचे वीर ॥ पळती घेतलें गिरिकंदर ॥ अधीरांचे प्राण ॥ समग्र ॥ एकवटोनि पडियेले ॥२११॥
असो शक्ति कडकडोनि ते समयीं ॥ भरली घटोत्कचाचे ह्रदयीं ॥ गवाक्ष पाडूनि लवलाहीं ॥ षड्‍दल भेदूनि गेली ते ॥२१२॥
महावृक्ष उन्मळला ॥ कीं गजासी पर्वतपात जाहला ॥ कीं मेरूचा कडा कोसळला ॥ तैसा पडला घटोत्कच ॥२१३॥
मग कर्ण आणि द्रोण ॥ इंहीं बाण जाळ घालून ॥ राक्ष ससेना जाळून ॥ तृणप्राय टाकिली ॥२१४॥
कौरव परम आनंदती ॥ जय वाद्यें वाज विती ॥ शोकसमुद्रीं केली वस्ती ॥ पंडुपुत्रीं तेधवां ॥२१५॥
प्रलय गजर ऐकोन ॥ आले कृष्णार्जुन धांवोन ॥ तों विराट पांचाळ भीमनंदन ॥ महावीर पडियेले ॥२१६॥
कालरूप समरांगणीं ॥ द्रोण उभा देखती नयनीं ॥ यावरी विश्वचालक चक्रपाणी ॥ काय करिता जाहला ॥२१७॥
म्हणे रे रजनी उरली किंचित ॥ जय वाद्यें वाजवा बहुत ॥ रणीं पडला द्रोण सुत ॥ म्हणोनि गजर बहुत करा ॥२१८॥
धर्मासी म्हणे जगज्जीवन ॥ तुज पुसेल येऊनि द्रोण ॥ तूं इतुकें बोलें वचन ॥ की अश्वत्थामा पडियेला ॥२१९॥
मग म्हणे पंडुनंदन ॥ जन्मा दारभ्य असत्य वचन ॥ मी बोलिलों नाहीं जाण ॥ जळो भाषण असत्य तें ॥२२०॥
कृष्ण म्हणे सर्वांचें कल्याण ॥ होय तें असत्य बोलावें वचन ॥ हिंसक शोधीत आला गोधन ॥ तरी काय सत्य बोलावें ॥२२१॥
वाटपाडे पुसती तांतडी ॥ ये वाटे गेले काय कापडी ॥ तेथें असत्य बोलतां जोडी ॥ होय द्विगुण सत्याची ॥२२२॥
नरो वा कुंजरो वा म्हणोन ॥ इतुकें तरी बोलें वचन ॥ या शब्दें कार्य साधोन ॥ बहुत येतें आमुचें पैं ॥२२३॥
कां बोल वितो हें जगज्जीवन ॥ धर्मासी न कळे वर्तमान ॥ श्रीकृष्णाचे भिडेंकरून ॥ अवश्य म्हणे तेधवां ॥२२४॥
आधींच रात्रींचा अंवसर ॥ जाहला वाद्यांचा गजर ॥ हांका फोडिती वीर ॥ अश्वत्थामा पडियेला ॥२२५॥
तें द्रोणें ऐकोनि कर्णी ॥ परम दचकला अंतःकरणीं ॥ म्हणे चिरंजीव ॥ द्रौणी ॥ केवीं मरण पावला ॥२२६॥
दोन्ही दळीं गाजली मात ॥ पडिला पडिला गुरु सुत ॥ द्रोण म्हणे हा वृत्तान्त ॥ धर्मासी सत्य पुसावा ॥२२७॥
तो आहे सत्य सागर ॥ मग द्रोणें प्रेरिला रहंवर ॥ पांडवदळ भयातुर ॥ म्हणती द्रोण कां आला ॥२२८॥
रथा जवळी आला रथ ॥ धर्म राज नमन करीन ॥ गुरु म्हणे बोलें सत्य ॥ अश्वत्थामा पडियेला ॥२२९॥
कृष्णें करविला वाद्यांचा गजर ॥ त्यांत धर्म बोलिला हें उत्तर ॥ नरो वा कुंजरो वा साचार ॥ एक जण पडियेला ॥२३०॥
वाद्य गजर तत्क्षणीं ॥ नरो वा इतुकें पडिलें कानीं ॥ पुत्र सत्य पडिला मानूनी ॥ द्रोण परतला तेधवां ॥२३१॥
जाऊ नियां आपुले दळीं ॥ रथावरीच ते वेळीं ॥ धनुष्य बाण ठेवूनि महाबळी ॥ द्दढा सन घातलें ॥२३२॥
चार्‍ही वेद मुखोद्नत ॥ सर्व शास्त्रीं पारंगत ॥ अष्टादश पुराणें समस्त ॥ दश ग्रंथ करत लामल ॥२३३॥
चौदा विद्या चौसष्ट कला ॥ जाणे सकल मंत्र माळा ॥ अस्त्र शस्त्रें अत्या गळा ॥ धनुर्वेदीं निपुण जो ॥२३४॥
भूत भविष्य वर्त मान ॥ जाणोनि झांकिले आचार्यें नयन ॥ ज्ञान द्दष्टी करूनि संपूर्ण ॥ विलोकीत ब्रह्मांड हें ॥२३५॥
म्हणे अश्वत्थामा मरोन ॥ राहिला कोणे लोकीं जाऊन ॥ विचार करितां जाण ॥ तों अपूर्व वर्तलें ॥२३६॥
ध्यानां तरींच जाण ॥ पक्ष्यांचें रूप धरून ॥ सप्तर्षि भेटले येऊन ॥ ब्रह्म नंदन नारदादि ॥२३७॥
विश्वामित्र पिता भरद्वाज पुण्य रूप ॥ जमदग्नि गौतम ॥ अत्रि दिव्य रूप ॥ वसिष्ठ आणि सातवा कश्यप ॥ नारद स्वामी वेगळा ॥२३८॥
म्हणती द्रोणा सावधान ॥ पहा एका दुष्ट संगावांचून ॥ राज हिंसा करा वया कारण ॥ कांहींच नाहीं विचारीं ॥२३९॥
कैंची कांता कैंचा पुत्र ॥ मृग जलन्यायें संसार विचित्र ॥ कौरव पांडव सेना समग्र ॥ स्वन्पवत आभास हा ॥२४०॥
सोडीं आतां मायिक कर्मा ॥ चाल जाऊं परंधामा ॥ स्वरूपीं पावें विश्रामा ॥ नामा नामातीत जें ॥२४१॥
कन्या पुत्र गृहदारीं ॥ स्वन्पीं नांदत मस्करी ॥ जागा होऊनि विचारीं ॥ मिथ्या सर्व जाहलें ॥२४२॥
तैसें करितां आत्मचिंतन ॥ नाना परींचे दोष दारुण ॥ सर्व जाती भस्म होऊन ॥ अग्निसंगें तृण जैसें ॥२४३॥
ऐसें ऋषिवर बोधून ॥ तत्काल पावले अंतर्धान ॥ द्रोणें प्राणा पान आकर्षून ॥ इंद्रिय मार्ग निरोधिला ॥२४४॥
सांडोनि माया मोह द्वंद्व ॥ आचार्य जाहला ब्रह्मा नंद ॥ दूरी गेला सर्व खेद ॥ भेदाभेद विराले ॥२४५॥
कौरव पांडव समस्त ॥ आचार्य मूर्ति विलोकीत ॥ निजधामा गेला गुरु सुत ॥ हें तों समजलें समस्तां ॥२४६॥
तों पितयाचें वैर आठवून ॥ परम दुष्ट घृष्टद्युम्न ॥ धांवला असिलता घेऊन ॥ शिर छेदिलें द्रोणाचें ॥२४७॥
संपूर्ण जाहले पांच दिवस ॥ उदय पावला चंडांश ॥ तों घृष्टद्युम्नें विशेष ॥ विपरीत कर्म केलें हें ॥२४८॥
त्रुटि न वाजतां शिर छेदून ॥ गेला परतोनि घृष्टद्यम्न ॥ आचार्य पावला स्वर्ग भुवन ॥ हांक तेव्हां गालली ॥२४९॥
दोन्ही दळीं हाहाकार ॥ अश्रुधारा टाकी युधिष्ठिर ॥ धरणीवरी लोटिलें शरीर ॥ पार्थ वीरें तेधवां ॥२५०॥
सहदेव नकुल भीमसेन ॥ आठवूनि आचार्याचे गुण ॥ शोकार्णवीं जाहले निमग्न ॥ म्हणती धन्य द्रोण गुरु ॥२५१॥
बाल पणापा सोनि चरित्र ॥ पार्थों आठ विलें विचित्र ॥ आठवूनि गुरूचे उपकार ॥ खेद अपार करीतसे ॥२५२॥
पार्थ बैसला उठोन ॥ म्हणे धृष्टद्युम्नाचें शिर छेदीन ॥ तों सात्यकी शस्त्र घेऊन ॥ पांचाला वरी चवताळला ॥२५३॥
म्हणे गुरु द्रोही तूं चांडाल साचार ॥ तुझें आतांचि छेदितों शिर ॥ मग सात्यकी यादव वीर ॥ भीम सेनें आटोपिला ॥२५४॥
अर्जुनासी म्हणे श्रीपती ॥ होणार तें न चुके कल्पांतीं ॥ आचार्य पावला स्वरूपस्थिती ॥ स्थूल देह त्यजूनियां ॥२५५॥
प्रेत शिर टाकिलें छेदूनी ॥ पुरुषार्थ कोण मानी ॥ तेणें द्रुपद मारिला रणीं ॥ तें धृष्टद्यम्ना न मानलें ॥२५६॥
पित्याचा सूड घेऊन ॥ तेणें पुरुषार्थ दाविला पूर्ण ॥ शून्य घरीं नेऊनि वाण ॥ वर्थ जैसें ठेविलें ॥२५७॥
योगबळें करून ॥ आचार्यें सोडिला निज प्राण ॥ एरवीं त्याशीं समरां गण ॥ काळही करूं शकेना ॥२५८॥
ऐसें बोलतां मन्मथतात ॥ उगेचि राहिले सात्यकी पार्थ ॥ तों अश्वत्थामा पिटीत रथ ॥ पितया जवळी पातला ॥२५९॥
आचार्य गेला निज धामा ॥ धरणीवरी पडला अश्वत्थामा ॥ संसार माया मोहप्रेमा ॥ झळंबला ते काळीं ॥२६०॥
कर्ण दुर्यो धन शारद्वत ॥ शांत विती तेव्हां गुरु सुत ॥ म्हणती रडसी काय ऊठ त्वरित ॥ सूड घेईं पित याचा ॥२६१॥
मग तो अश्वत्थामा वीर ॥ रथा रूढ जाहला सत्वर ॥ पाठीशीं सकल कौरव भार ॥ युद्ध घोर मांडलें ॥२६२॥
जैसा कल्पांतीं त्रिनेत्र ॥ तैसाचि दिसे द्रोण पुत्र ॥ पांडव सेना समग्र ॥ शरधारीं खिळियेली ॥२६३॥
द्रोण पुत्राचा थोर मार ॥ कोणीही साहों न शकती समोर ॥ मग तो कपिध्वज सोडीत शर ॥ परम आवेशें धांवला ॥२६४॥
बाण जाळ घालूनि बहुत ॥ समरीं खिळिला गुरु सुत ॥ चाप सारथी तूणीर रथ ॥ छेदू नियां पाडिला ॥२६५॥
परा भव पावला गुरु सुत ॥ युद्ध टाकूनि गेला त्वरित ॥ सरस्वतीतीरीं बैसत ॥ द्दढ आसन घालू नियां ॥२६६॥
पांडवरहित करावी धरणी ॥ ऐसें तप मांडिलें ते क्षणीं ॥ तों वेदव्यास येऊनी ॥ उभा ठाकला त्या पुढें ॥२६७॥
म्हणे नर आणि नारायण ॥ ते हे अवतरले कृष्णार्जुन ॥ तूं तप व्यर्थ काय करून ॥ सिद्धि न पावे सर्वथा ॥२६८॥
युद्ध सोडूनियां येथ ॥ तूं बैसलासी तप करीत ॥ तरी वीर हांसतील समस्त ॥ लाज गेली जन्मवरी ॥२६९॥
म्हणतील हा अधीर विप्र सत्य ॥ पित याचा सूड न घेववे बलहत ॥ म्हणोनि बैसला तप करीत ॥ द्रोणी यथार्थ म्हणे तेव्हां ॥२७०॥
मग स्यंदना रूढ होऊन ॥ सेनेंत मिसळला येऊन ॥ द्रोण पर्व संपलें येथून ॥ कर्ण पर्व पुढें असे ॥२७१॥
द्रोण पर्व करितां श्रवण ॥ एकशत यज्ञांचें श्रेय संपूर्ण ॥ ऐकतां विजय कल्याण ॥ होय क्षालन महादोषां ॥२७२॥
रसाळ कथा व्यास भारत ॥ लेखक जाहला गौरी सुत ॥ परम विशाल अत्यद्भुत ॥ नाटोपेंचि आकळितां ॥२७३॥
कथा न तुटतां सत्य ॥ त्यांतील सारांश जो रसभरित ॥ तोचि लिहिला असे येथ ॥ पंढरीनाथ प्रसादें ॥२७४॥
भीमातीर दिगंबर ॥ ब्रह्मा नंद अत्युदार ॥ श्रीधर वरद निर्विकार ॥ अभंग साचार न विटे ॥२७५॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ द्रोण पर्व व्यास भारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ शेचाळिसाव्यांत कथियेला ॥२७६॥
इति श्री श्रीधरकृतपांडवप्रतापे द्रोणपर्वणि द्रोणनिधनं नाम षट्‍चत्वारिंशाध्यायः ॥४६॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शूभं भवतु ॥

॥ श्रीपांडवप्रताप द्रोणपर्व समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP