मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप|
अध्याय ४३ वा

पांडवप्रताप - अध्याय ४३ वा

पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.


॥ श्री गणेशाय नमः ॥ भीम आणि सुभद्रापती ॥ रणरंगीं उभे शोभती ॥ दोघांचें युद्ध विलोकिती ॥ सुरपतिही विमानीं ॥१॥
एक कल्पांतींचा चंडकिरण ॥ दुजा केवळ प्रलयाग्न ॥ कीं एक भृगुकुल भूषण ॥ रविकुलमंडण दुसरा तो ॥२॥
एक कृतान्त एक काळ ॥ एक कुंभिनी एक निराळ ॥ एक वासुकी एक शेष केवळ ॥ तैसे दोघे दिसती पैं ॥३॥
भीष्मावरी सहस्त्र बाण ॥ टाकिता जाहला वीर अर्जुन ॥ तेणें तितुकेही निवारून ॥ सोडिले मार्गण दोन सहस्त्र ॥४॥
पार्थें निवारिले वरिच्यावरी ॥ तों शिखंडी धांवला समरीं ॥ बाण वर्षें भीष्मावरी ॥ मेघ धारा जैशा कां ॥५॥
शिखंडी सोडी असंख्य बाण ॥ तिकडे न पाहे गंगा नंदन ॥ न टाकी एकही मार्गण ॥ स्त्री अभिधान म्हणो नियां ॥६॥
आधीं स्त्री मग पुरुष ॥ त्यावरी पूर्व जन्मींचा द्वेष ॥ म्हणोनि तो कुरुनरेश ॥ बाण सहसाही न टाकी ॥७॥
मग शिखंडी वरी बाण ॥ घालिता जाहला गुरु द्रोण ॥ तों हांक फोडी भीम सेन ॥ सुर ऐकोन भयभीत ॥८॥
चतुरंगदळ अपार ॥ संहारीत जाय वृकोदर ॥ गदाघायें रथ कुंजर ॥ चूर्ण करी न गणवेचि ॥९॥
इकडे रणांगणीं विजयरथ ॥ दिसे जैसा उंच पर्वत ॥ त्यावरी ध्वज नभचुंबित ॥ भोंवता दिसे दशयोजनें ॥१०॥
त्यावरी विशाळ रूप धरून ॥ अंजनी सुत विक्राळवदन ॥ प्रलयविजे समान ॥ ऊर्ध्व लांगूल गेलें असे ॥११॥
गाजवी पुच्छाचा फडत्कार ॥ वेळोवेळां देत भुभुःकार ॥ त्यांत उभय कृष्ण भयंकर ॥ शंख बळें त्राहाटिती ॥१२॥
त्यामाजी वाद्यांचें घन चक्र ॥ वीरांच्या हांका अनिवार ॥ भूतें आरडती भयासुर ॥ वायुतनुजा भोंवतीं ॥१३॥
त्यांत गांडीवाता ऐकतां ध्वनी ॥ टाळी बैसली दिग्ग जकर्णीं ॥ तो घोष कौरवीं ऐकोनी ॥ पाठीं दडती भीष्माचे ॥१४॥
एकासी दाटला हिमज्वर ॥ एक वहनें टाकूनि सत्वर ॥ भीष्मरथामागें वीर ॥ भयभीत दडताती ॥१५॥
त्यांत नावाजिके महावीर ॥ निवडिले चवदा सहस्त्र ॥ त्यांहीं वेढिला पार्थ वीर ॥ शस्त्र संभार वर्षो नियां ॥१६॥
लघुला घवी पृथा नंदन ॥ उभय करांचे समसंधान ॥ संधानीं वेग परम गहन ॥ सोडी बाण चपलत्वें ॥१७॥
दाटला बाण मंडप थोर ॥ दिवसाचि पडला अंधकार ॥ चौदा सहस्त्र वीर ॥ करूनि जर्जर संहारिले ॥१८॥
बाण मेघ धारा तत्त्वतां ॥ असिलता झळकती विद्युल्लता ॥ तों जयद्रथ अवचिया ॥ पार्थावरी चवताळला ॥१९॥
पार्थ म्हणे रे तस्करा ॥ महामलिना खळा निष्ठुरा ॥ आम्ही नसतां द्रौपदी सुंदरा ॥ चोरूनि नेत होतासी ॥२०॥
शिरीं पांच पाट काढितां जाण ॥ आलासी काकुळती दीनवदन ॥ मग धर्मराजें सोडून ॥ तुज दिधलें पामरा ॥२१॥
तो तूं काळें वदन घेऊनी ॥ युद्धा आलासी समरांगणीं ॥ तरी आतां धीर धरीं रणांगणीं ॥ पाठिमोरा पळूं नको ॥२२॥
जय द्रथ नेदी प्रत्युत्तर ॥ पार्थावरी टाकी बाण घोर ॥ अर्जुनें टाकोनि दहा शर ॥ ह्रदयवर्मीं भेदिला ॥२३॥
विकल जाहला जय द्रथ ॥ सारथियानें फिरविला रथ ॥ इकडे नकुल आणि त्रिगर्त ॥ युद्ध करिती रणांगणीं ॥२४॥
तों धांवला कृपीचा नंदन ॥ पार्थाचें ह्रदय लक्षून ॥ भेदिता जाहला दहा बाण ॥ होती चूर्ण गिरी जणें ॥२५॥
सवेंचि तो वीर द्रौणी ॥ कृष्णासी विंधी सत्तर बाणीं ॥ ऐसें अर्जुनें देखोनी ॥ निर्वाण शर सोडिले ॥२६॥
सर्वांगीं खिळिला गुरुनंदन ॥ ध्वजीं टेंकला मूर्च्छा येऊन ॥ मग उगाचि राहिला अर्जुन ॥ सहसा बाण सोडीना ॥२७॥
म्हणे गुरु बंधु आणि ब्राह्मण ॥ यांसी न मारावें गेलिया प्राण ॥ जळो हा क्षात्र धर्म दारुण ॥ अन्याय होतो पाहतां ॥२८॥
तों सात्यकीचे दहा पुत्र ॥ पुढें धांवले वर्षत शर ॥ भूरिश्रवा कौरव वीर ॥ त्यांशीं युद्धा प्रवर्तला ॥२९॥
एक याम पर्यंत ॥ दहाही बाळें युद्ध करीत ॥ त्यांहीं कौरव सेना समस्त ॥ बाण जाळीं झांकिली ॥३०॥
मग भूरिश्रव्यानें दश बाणीं ॥ दहाही वीर मारिले रणीं ॥ सात्यकी धांवला तये क्षणीं ॥ प्रलय काल जैसा कां ॥३१॥
भूरिश्रव्याचा रथ सारथी ॥ केला चूर्ण रणपंथीं ॥ शरीं खिळोनि क्षितीं ॥ मूर्च्छित रणीं पाडिला ॥३२॥
सात्यकीचे कैवारें पार्थ ॥ मिसळला कौरव वाहिनींत ॥ पंचवीस सहस्त्र वीर अद्भुत ॥ समर भूमीं पहुडविले ॥३३॥
पांच दिवस जाहले संपूर्ण ॥ यावरी सहावे दिवशीं निर्वाण ॥ युद्ध मांडलें दारुण ॥ भीमसेन धांवला ॥३४॥
तूलराशीस जाळी कृशान ॥ तेवीं भीमें मारिलें बहुत सैन्य ॥ सात्यकी वीर वेगें करून ॥ आला मागुता धांवोनी ॥३५॥
भीम मिसळला सेने आंत ॥ रिता देखिला तयाचा रथ ॥ सात्यकी जाहला भयभीत ॥ म्हणे भीम काय जाहला ॥३६॥
अश्रुधारा वाहती नयनीं ॥ घेत वक्षः स्थल पिटोनी ॥ तों भीमाचा सारथी ते क्षणीं ॥ विशोक जवळी पातला ॥३७॥
म्हणे भीम आहे स्वस्तिक्षेम ॥ सेनेंत करितो घोर संग्राम ॥ जैसा समुद्रांत मत्स्य परम ॥ चवताळत चपलत्वें ॥३८॥
मग घेऊनि असि लता ओढण ॥ धांवे सात्यकी पंचानन ॥ तया देखोनि भीम आनंद घन ॥ रणांगणीं नाचतसे ॥३९॥
मग सात्यकी आणि भीमसेन ॥ वीस सहस्त्र वीर मारून ॥ कौरव दळ पळवून ॥ विजयी होऊन परतले ॥४०॥
मग सकल सेना घेऊन ॥ पुढें धांवला दुर्यो धन ॥ तों द्रौपदीचे पंच नंदन ॥ वर्षत बाण ऊठिले ॥४१॥
सकळ शरीं करोनि जर्जर ॥ पळविले कुमारीं कौरव भार ॥ रक्तगंगेचे पूर ॥ लवणाब्धि पाहों धांवती ॥४२॥
सहा दिवस संपूर्ण जाहले ॥ सातवे दिवशीं युद्ध मांडलें ॥ दुर्योधनाशीं ते वेळे ॥ भीम बोले समरांगणीं ॥४३॥
म्हणे दुर्जना रण टाकून ॥ निर्लज्जा पळूं नको एथून ॥ तुवां जें केलें गहन ॥ त्याचें फळ भोगीं आतां ॥४४॥
आम्ही षंढतीळ जाण ॥ उलूकाहातीं पाठविलें सांगून ॥ शतखंड तुझें वदन ॥ करावें वाटे दुर्जना ॥४५॥
गदाघायें परम दारुण ॥ तुझा अंक मी करीन चूर्ण ॥ लत्ता प्रहारें करून ॥ रगडीन सत्य मस्तक तुझें ॥४६॥
ऐसें बोलोनि भीम सेन ॥ घातले तयावरी बाण ॥ अश्व सारथी स्यंदन ॥ केले चूर्ण रणांगणीं ॥४७॥
छत्र ध्वज तूणीर ॥ चाप छेदिलें सत्वर ॥ मग धांवोनि बहुत वीर ॥ दुर्यो धन पळविला ॥४८॥
पार्थें सोडूनि इंद्रास्त्र ॥ बहुत खिळिले नृपवर ॥ सहस्त्रांचे सहस्त्र वीर ॥ पाठीं लपती भीष्माच्या ॥४९॥
रण सागरीं अचाट ॥ भीष्मरथ हेंचि बेट ॥ कासावीस वीर श्रेष्ठ ॥ आश्रयें त्याच्या राहती ॥५०॥
विराट आणि द्रोण ॥ माजविती समरांगण ॥ परी द्रोणाचें सामर्थ्य गहन ॥ विराट निघोन चालिला ॥५१॥
तिघेही वर्षती शर ॥ परमप्रतापी उत्तरावर ॥ तेणें लघुल घवें समग्र ॥ सायक त्यांचे छेदिले ॥५३॥
परी आगळें करी दुर्यो धन ॥ छेदिला सौभद्राचा स्यंदन ॥ अश्व सारथी मारुन ॥ ध्वजही खालीं पाडिला ॥५४॥
चरण चालीं युद्ध करीत ॥ रणीं एकला विराटजामात ॥ श्रीकृष्ण पार्थासी सांगत ॥ संकटीं पडला सुत तुझा ॥५५॥
पातया पातें न लागत ॥ इतुक्यांत धांवला वीर पार्थ ॥ छेदोनि तिघांचेही रथ ॥ भूमीवरी आणिले ॥५६॥
पिच्छें पसरिजे मयूरीं ॥ तैसे तिघे खिळिले शरीं ॥ समस्त वीर ते अवसरीं ॥ पळविते जाहले तिघांतें ॥५७॥
पार्थें परमप्रतापें ॥ छेदिलीं सकल वीरांचीं चापें ॥ सवेंचि तूणीर साक्षेपें ॥ छेदिता जाहला ते वेळीं ॥५८॥
परम बळियाढे महारथी ॥ एकाकडे एक पाहती ॥ म्हणती बरी न दिसे गती ॥ पळती वेगेंकरो नियां ॥५९॥
धर्म म्हणे द्रुपद कुमारा ॥ ऐकें शिखंडी महावीरा ॥ आपुली प्रतिज्ञा सत्वरा ॥ खरी करूनि दावीं कां ॥६०॥
समरांगणीं युद्ध करून ॥ टाकीं भीष्मासी वधून ॥ शिखंडी अवश्य म्हणोन ॥ सोडीत बाण भीष्मावरी ॥६१॥
तिकडे न पाहे गंगा सुत ॥ जैसी पुष्प वृष्टि गज मदोन्मत्त ॥ कीं काडिया पडतां पर्वत ॥ सहसा खेद न मानी ॥६२॥
अचाट वीर गंगा नंदन ॥ समोर शिखंडी अव्हेरून ॥ आणि केकडे जाय धांवोन ॥ पांडवसेना संहारी ॥६३॥
सप्त दिवस जाहले संपूर्ण ॥ पुढें लागला आठवा आठवा दिन ॥ परम घोर माजलें रण ॥ गंगा नंदन युद्ध करी ॥६४॥
जैसा वृषा भारावरी पंचानन ॥ तैसा प्रवेशला भीमसेन ॥ बाण जाळीं सकल सैन्य ॥ संहारिलें प्रतापें ॥६५॥
सुनाभ राजा भीमावरी ॥ कोसळला जैसा गिरीवर गिरी ॥ युद्ध जाहलें घटिका चारी ॥ मग मारिला समरीं भीम सेनें ॥६६॥
त्याचें छेदोनियां शिर ॥ गगनीं भिरकावी वृकोदर ॥ दुर्यो धना पुढें सत्वर ॥ उतरोनि मागुती पडियेलें ॥६७॥
कुंडधार शरपंडित ॥ त्याचा केला निःपात ॥ विशालाक्ष जादित्यकेत ॥ सहोदरही संहारिला ॥६८॥
ऐसा संहार देखोन ॥ चिंतार्णवीं पडिला दुर्यो धन ॥ म्हणे विदुर बोलिला जें वचन ॥ तैसेंचि होत चालिलें ॥६९॥
भीष्मा पुढें जाऊन ॥ दुर्यो धन करी रोदन ॥ गांगेय म्हणे त्वां पूर्वीं वचन ॥ ऐकिलें नाहीं वडिलांचें ॥७०॥
अजूनि तरी सोडीं अभिमाना ॥ शरणा जाईं जगज्जीवना ॥ परी तें न मानेचि सुयोधना ॥ दिव्यान्न जैसें रोगिया ॥७१॥
असो रण माजलें अपार ॥ इलावाननामा पार्थपुत्र ॥ उलूपी शेष कन्या पवित्र ॥ तिचे पोटीं जाहला जो ॥७२॥
तेणें माजविली रणमेदिनी ॥ शरीं झांकिली कौरव वाहिनी ॥ त्याचें युद्धकौशल्य पाहोनी ॥ पांडव ग्रीवा डोलविती ॥७३॥
शकुनीचे पांच सुत ॥ गज वृक्ष वृषकेत ॥ चर्मवान पांचवा सत्य ॥ युद्ध करिती रणांगणीं ॥७४॥
इलावान योद्धा प्रबळ ॥ पांचांचीं शिरें छेदिलीं तत्काळ ॥ मग अलंबुष राक्षस सबळ ॥ दुर्योधनें प्रेरिला ॥७५॥
मायावी कपटी निशाचर ॥ तेणें युद्ध केलें अपार ॥ नाना रूपें धरी भ्यासुर ॥ वृक व्याघ्र सर्पादि ॥७६॥
सहस्त्रावधि रूपें आपुलीं ॥ अलंबुषें तेव्हां धरिलीं ॥ इलावानानें तितुकीं छेदिलीं ॥ नाटोपेचि राक्ष सातें ॥७७॥
मग कपटी राक्षस बहुत ॥ ऊर्ध्वपंथें येऊनि अकस्मात ॥ शिर छेदोनियां त्वरित ॥ इलावानाचें टाकिलें ॥७८॥
पांडवदळीं हाहाकार ॥ मग तो घटोत्कच महावीर ॥ करीत चालिला संहार ॥ असुर भार घेऊनी ॥७९॥
असंख्य शिळांचा प्रहार ॥ चहूंकडूनि वृक्षांचा मार ॥ रथारूढ भीमपुत्र ॥ सुयोधनावरी धांवला ॥८०॥
म्हणे दुर्योधना पापखणी ॥ आजि तुज मारीन समरांगणीं ॥ माझें पितर वनोवनीं ॥ त्वां हिंडविले पामरा ॥८१॥
माझी माता याज्ञ सेनी ॥ सभेसी नेली त्वां पापखाणी ॥ तरी आजि समरांगणीं ॥ पळूं नको दुर्जना ॥८२॥
अधर रगडूनियां दांतीं ॥ घटोत्कचें प्रेरिलि शक्ती ॥ तों अंगराजें लोटिला हस्ती ॥ असुरा समोर तेधवां ॥८३॥
तों शक्ति आली दारुण ॥ गज पाडिला विदारून ॥ मग अंगराज ॥ उतरोन ॥ एकीकडे जाहला ॥८४॥
दुर्योधनावरी निर्वाण शर ॥ घटोत्कचें सोडिले अपार ॥ भयभीत कौरवेश्वर ॥ सोडूनि समर चालिला ॥८५॥
तों द्रोण आणि शारद्वत ॥ धांवले पुढें बाण वर्षत ॥ महावीर रणपंडित ॥ घटोत्कच नाटोपे ॥८६॥
क्षणामाजी होय गुप्त ॥ सवेंचि गगनोदरीं जात ॥ तेथूनि बाण वर्षत ॥ मेघधारा जैशा कां ॥८७॥
मागुती भूमीवरी येत ॥ द्रोणावरी बाण सोडीत ॥ तों घटोत्कचाचा रथ ॥ द्रोणें छेदूनि टाकिला ॥८८॥
घटोत्कच एकला देखोन ॥ द्रौपदीचे पंचनंदन ॥ आले वायूसी मागें टाकून ॥ तों अभिमन्यूही धांवला ॥८९॥
घटोत्कच आणि साही कुमार ॥ यांहीं रणभूमि माजविली अपार ॥ त्यांत धांवला बृकोदर ॥ हांकें अंबर गाजविलें ॥९०॥
थोर माजली रणधुमाळी ॥ कौरवसेना विभांडिली सकळी ॥ सात पांडव कुमार बळी ॥ देखोनि काळ चळीं कांपें ॥९१॥
तों गजारूढ भगदत्त ॥ धांवला जैसा प्रलयकृतांत ॥ घटोत्कचावरी शक्ति अद्भुत ॥ प्रेरिता जाहला तेधवां ॥९२॥
महाप्रलयींची वीज ॥ तैसी शक्ति येत सतेज ॥ पांडवदळीं गजबज ॥ थोर जाहली तेधवां ॥९३॥
तंव तो घटोत्कच महाबळी ॥ धांवोनि वेगें अंतराळीं ॥ प्रलय शक्ति हातीं धरिली ॥ घालोनि मोडिली पायांतळीं ॥९४॥
पांडव आदिकरूनि नृपती ॥ तर्जनी मस्तक डोलविती ॥ धन्य या वीराची शक्ती ॥ जगती माजी अभिनव ॥९५॥
इकडे नवल वर्तलें अपूर्व ॥ कुंडनामा वीर कौरव ॥ धरोनियां युद्धाची हांव ॥ भीमा समोर धांवला ॥९६॥
तो पायीं वृकोदरें धरोनी ॥ आपटूनि मारिला रणमेदिनीं ॥ इकडे पार्थेंही तये क्षणीं ॥ संहारिली बहुत सेना ॥९७॥
भीष्म द्रोण गौतम कुमार ॥ पार्थासी करिती शरमार ॥ परी तो रणपंडित महाशूर ॥ तितुक्यांसही नाटोपे ॥९८॥
त्याचि युद्धांत अभिमन्य ॥ धांवला वर्षत वज्रबाण ॥ जैसा प्रलयानलासी प्रभंजन ॥ साह्य पाठीं धांवतसे ॥९९॥
वीज प्रवेशे वनांत ॥ तैसा सौभद्र वेगें तळपत ॥ त्यांत धृष्टद्युम्न धांवत ॥ प्रलय अत्यंत वर्तला ॥१००॥
कंदुका ऐसीं शिरें ॥ उर्ध्वपंथें जाती अपारें ॥ हाहाकार एकसरें ॥ कौरवदळीं जाहला ॥१०१॥
तों मावळला वासरमणी ॥ स्वस्थाना पावली उभय वाहिनी ॥ रजनी सरतां तये क्षणीं ॥ अर्क उदय पावला तो ॥१०२॥
प्रवर्तला नवम दिन ॥ तळमळी परम ॥ दुर्यो धन ॥ दुःशासन शकुनी कर्ण ॥ विचार करिती तेधवां ॥१०३॥
प्रलय युद्ध मना पासून ॥ न करी कदा गंगा नंदन ॥ पांडवांचें कल्याण ॥ त्याचें मन इच्छीतसे ॥१०४॥
कर्ण म्हणे गंगा सुत ॥ जरी समरीं पावेला मृत्य ॥ कीं युद्ध सांडूनि पळत ॥ कीं शस्त्र टाकील उबगोनी ॥१०५॥
तरी मी न लागतां क्षण ॥ पांचही पांडव संहारीन ॥ मग भीष्मा प्रति दुर्यो धन ॥ येऊनि बोलत सक्रोधें ॥१०६॥
तुवां युद्ध केलें अभिनव ॥ परी एकही मेला नाहीं पांडव ॥ माझिया कर्णें आजवरी सर्व ॥ मारिले असते समरांगणीं ॥१०७॥
महाराज तो गंगा नंदन ॥ स्तब्ध न बोले दुःखे करून ॥ मग आरक्त करूनि नयन ॥ क्रोधाय मान बोलतसे ॥१०८॥
भीमार्जुनांचा पुरुषार्थ ॥ तूं जाणतोस कीं अद्भुत ॥ गंधर्वीं तुम्हांसी नेलें समस्त ॥ तेव्हां कां कर्ण पळाला ॥१०९॥
क्षणक्षणां बोलसी न्यून ॥ काय मशका काढिला कर्ण ॥ कोठें महावीर अर्जुन ॥ कौलिकपुत्र कोणीकडे ॥११०॥
सौंदणी आणि सागर ॥ कोठें रजक आणि रमावर ॥ बाभळ आणि कल्प वृक्ष साचार ॥ समान कैसे सांग पां ॥१११॥
दीप आणि दिनमणी ॥ इतर ओहळ आणि स्वर्धुनी ॥ इतर पाषाण आणि चिंतामणी ॥ समान काय सांग पां ॥११२॥
दुर्जन आणि सज्जन ॥ रंक आणि सहस्त्र नयन ॥ तैसा कर्ण आणि श्वेतवाहन ॥ कैसे समान होती पां ॥११३॥
ज्यासी साह्य हरिहर ॥ तो तुम्हां सर्वांचा करील संहार ॥ ते नरनारायण अवतार ॥ पुरुषरूपें अवतरले ॥११४॥
एकाचि बाणें करून ॥ नभ आणितील खालीं छेदून ॥ त्यांसी जिंकील कर्ण ॥ ऐसें छळणोत्तरें बोलसी ॥११५॥
तूं फार करितोसी वल्गना ॥ आजि युद्ध करितों पाहें नयनां ॥ तूं युद्ध समयीं घेऊनि कर्णा ॥ पहा कैसें होईल तें ॥११६॥
आजि मी प्रलय युद्ध करीन ॥ पांडवसेना संहारीन ॥ ऐसें बोलोनि गंगा नंदन ॥ रथ पुढें लोटीत ॥११७॥
भद्रव्यूह अतिथोर ॥ रचिता जाहला गंगा कुमार ॥ धृष्टद्युम्नें शेषाकार ॥ व्य़ूह तेव्हां रचियेला ॥११८॥
मांडिली एकचि रणधुमाळी ॥ चतुरंग सेना मिसळली ॥ उत्तरापति ते काळीं ॥ शर वर्षत धांविन्नला ॥११९॥
करीत दळाचा संहार ॥ हस्तलाघव दावी अपार ॥ मानवती सर्व वीर ॥ अनिवार म्हणती हा ॥१२०॥
निजमित्र जो अलंबुष ॥ दुर्यो धन म्हणे त्यास ॥ अभिमन्यूनें आसपास ॥ वीर पाडिलें धांवें कां ॥१२१॥
धांवला राक्षस भयंकर ॥ कपाळीं चर्चिला शेंदूर ॥ कृष्णवर्ण पर्वताकार ॥ दाढा शुभ्र दिसताती ॥१२२॥
राक्षसाची माव थोर ॥ दिवसा पडला अंधकार ॥ शिलांचा वर्षाव अनिवार ॥ करिता जाहला पापी तो ॥१२३॥
मग सौभद्रें सूर्यास्त्र ॥ प्रेरितां निरसला अंधकार ॥ निजबाणीं कौरव भार ॥ संहारीत तेधवां ॥१२४॥
सौभद्राचा मार विशेष ॥ पळाला तेव्हां  अलंबुष ॥ मग बाण जाळ आसमास ॥ कौरव दळावरी टाकी ॥१२५॥
सौभद्राचे ठायीं जाण ॥ श्रीकृष्णें दिधलें आपुलें गुण ॥ धैर्य शौर्य पराक्रम पूर्ण ॥ पाहतां सर्व मानवती ॥१२६॥
अर्जुनाचेही द्विगुण ॥ संधानवकर्ता अतिनिपुण ॥ दोन्ही पक्ष जयाचे पावन ॥ महिमा जाण न वर्णवे ॥१२७॥
केला कौरव दळाचा संहार ॥ चालिले रक्तनद्यांवे पूर ॥ जीवंत वीर वीर अपार ॥ वहात जाती ते समयीं ॥१२८॥
कोणी वीर तिकडून ॥ येत हस्ती वरी बैसोन ॥ तों यमराष्ट्रवर्धिनी भरून ॥ घोषें गर्जत जातसे ॥१२९॥
गदा घेऊनि वृकोदर ॥ संहारीत जाय कुंजर ॥ कुंभस्थळें फोडितां अपार ॥ मुक्तें बाहेर उसळती ॥१३०॥
शुंडादंड पिळून ॥ कित्येक पाडिले उलथून ॥ कित्येकांचे दंत मोहून ॥ वीर अपार झोडिले ॥१३१॥
पळतां गज पायीं धरी ॥ आपटूनि पाडी भूमीवरी ॥ पुच्छीं धरोनि चक्राकारीं ॥ भोंवंडूनि टाकीत ॥१३२॥
वणवा लागे जैसा वना ॥ तेवीं भीष्मवीरें आटिली पांडवसेना ॥ असंख्य वीर मारिले रणा ॥ करी गणना कोण त्यांची ॥१३३॥
अर्जुनासी म्हणे श्रीधर ॥ पाहा भीष्में केला संहार ॥ हा केवळ काळ गंगा कुमार ॥ उरों नेदी कोणातें ॥१३४॥
मग धांबला वीर पार्थ ॥ बाणीं बुजविला भीष्माचा रथ ॥ दहाही धनुष्यें तेथ ॥ भीष्महस्तींचीं छेदिलीं ॥१३५॥
घोडे फिरवी मुरहर ॥ पार्थासी लागों नेदी शर ॥ भीष्माचीं चापें पार्थं वीर ॥ वरिच्यावरी छेदीतसे ॥१३६॥
पार्थाचें संधान पाहोन ॥ भीष्म म्हणे धन्य धन्य ॥ तुझेनि वंश पावन ॥ नाहीं आन वीर ऐसा ॥१३७॥
तों अस्ता गेला दिनकर ॥ शिबिरा गेले सर्वही भार ॥ श्रीधर आणि युधिष्ठिर ॥ विचार करिती एकांतीं ॥१३८॥
धर्म म्हणे गा श्रीहरी ॥ भीष्म नाटोपेचि समरीं ॥ यासी आटोपी ऐसा निर्धारीं ॥ वीर कोणी दिसेना ॥१३९॥
भीष्मापासूनि जय ॥ कदाकाळीं प्राप्त न होय ॥ धर्म म्हणे धरूनि श्रीहरिपाय ॥ मज राज्य नलगे हें ॥१४०॥
मी वनामाजी जाऊन ॥ घोर तप आचरीन ॥ श्रीकृष्ण म्हणे चोघे जण ॥ बंधु तुझे पराक्रमी ॥१४१॥
त्यांसी जरी आटोपेना ॥ तरी मज प्रति देईं आज्ञा ॥ सोडोनियां सुदर्शना ॥ संहारीन क्षणार्धें ॥१४२॥
मी भक्तांचा साह्यकारी ॥ प्रर्‍हाद रक्षिला नानापरी ॥ दावाग्नि गिळूनि निर्धारीं ॥ रक्षिले गायीगोपाळ ॥१४३॥
शिलाधारीं सहस्त्र नयन ॥ वर्षला गोकुळीं जेव्हां घन ॥ अंगुलीवरी सप्तदिन ॥ गोवर्धन धरिला म्यां ॥१४४॥
रात्री माजी मथुरापुरी ॥ नेली द्वारावती माझारीं ॥ मग धर्म म्हणे मुरारी ॥ तुझेनें साजिरे आम्ही कीं ॥१४५॥
तरी जय कैसा होय तें संपूर्ण ॥ भीष्म बोलिला पुढें सांगेन ॥ मग पांच बंधु आणि जगज्जीवन ॥ रजनी माजी निघाले ॥१४६॥
भीष्मशिबिरा प्रति जाऊन ॥ घालिती पांचही लोटांगण ॥ भीष्में श्रीकृष्णासी नमून ॥ आपुले जवळी बैसविलें ॥१४७॥
भीष्म म्हणे रे पूतनारी ॥ माझीं पांच वत्सें जतन ॥ करीं ॥ युद्ध करितां श्रमलीं समरीं ॥ रक्षीं यांसी गोविंदा ॥१४८॥
बाळें वनवासीं श्रमलीं ॥ सवेंचि युद्धावरी पदियेलीं ॥ असो धर्म तेव्हां बद्धांजली ॥ उभा ठाकला भीष्मा पुढें ॥१४९॥
धर्म म्हणे आम्हांसी जय ॥ महाराजा कैसा प्राप्त होय ॥ तूं महावीर प्रताप सूर्य ॥ आकळशील कैसा पां ॥१५०॥
भीष्म म्हणे मज पासूनि जय निश्चित ॥ कृतांतासही नव्हे प्राप्त ॥ शिखंडी प्रति करूनि निमित्त ॥ पाठीं पार्थ असों द्या ॥१५१॥
शिखंडीचे पाठीशीं लपोन ॥ घालीं पार्था मजवरी बाण ॥ जय प्राप्तीस कारण ॥ वर्म हेंचि जाणिजे ॥१५२॥
मग जन कजनकासी नमून ॥ मंदिरासी गेले पंडुनंदन ॥ सवेंचि उगवला सूर्य नारायण ॥ दशम दिन प्राप्त जाहला ॥१५३॥
मग शिखंडीस पुढें करून ॥ वेगें निघाले पंडुनंदन ॥ द्रुपद पांचाळ धृष्टद्युम्न ॥ रक्षीत जाती पाठीसी ॥१५४॥
माजलें घोर युद्धकंदन ॥ प्रेतनाथपुर विवर्धन ॥ वाद्यें वाजती गजरें करून ॥ नाद गगनीं न समाये ॥१५५॥
कौरव सेनेचा संहार ॥ करिते जाहले पंडुकुमार ॥ तें देखोनि गंगा पुत्र ॥ प्रेरी वेगें रहंवर ॥१५६॥
भीष्माचें हस्तलघव गहन ॥ देखोनि स्तविती पंदुनंदन ॥ शिखंडी म्हणे भीष्मा लागून ॥ आजि मारीन तुज सत्य ॥१५७॥
भीष्म नेदी प्रत्युत्तर ॥ त्यावरी कदा न टाकी शर ॥ शिखंडीस म्हणे पार्थ वीर ॥ तुझे पाठीशीं मी आहें ॥१५८॥
सर्व कौरवांसी आवरीन ॥ तूं टाकीं भीष्मावरी बाण ॥ आजि सोडूं नको प्राण ॥ समरीं घेईं तयाचा ॥१५९॥
तों इकडे गंगा नंदन ॥ पाडीत शरांचा पर्जन्य ॥ गंगा त्मजें हांक देऊन ॥ दोन्ही द्ळें गर्जविलीं ॥१६०॥
गोरक्षक गोधनांचे भार ॥ एकदांचि पिटी समग्र ॥ तैसा घटोत्कच महावीर ॥ येतां पळती कौरव दळें ॥१६१॥
तों लक्ष महावीर नेमें ॥ ते दिवशीं मारिले भीष्में ॥ पूर्वीं लंकैसी दाशरथिरामें ॥ पराक्रम जेवीं केला ॥१६२॥
दहा सहस्त्र कुंजर ॥ लक्ष पायदळ भयंकर ॥ इतुका भीष्में केला संहार ॥ हाहाकार जाहला ॥१६३॥
पार्थ म्हणे शिखंडी ॥ भिऊं नको बाण सोडीं ॥ सर्व वीर कडोविकडी ॥ आम्ही तुजला रक्षितों ॥१६४॥
ठायीं ठायीं युद्ध मांडलें ॥ कौरववीर रणीं गोंविले ॥ महा अपशकुन ते वेळे ॥ भीष्मालागीं जाण वती ॥१६५॥
दुर्यो धनाचीं दैवतें रडती ॥ शिवा सेने समोर बोभाती ॥ बायु घातें निश्चितीं ॥ सुयो धनाचें छत्र पडे ॥१६६॥
दुःशा सन पाहे आदर्श समोर ॥ तंव न दिसे आपुलें शिर ॥ सुयो धनाचे गृहावरी अपवित्र ॥ दिवाभीतें बाहती ॥१६७॥
कौरव स्त्रिया देखती स्वन्प ॥ विगत धवा स्त्रिया येऊन ॥ मृत्तिका रक्षा घेऊन ॥ ओंटी भरिती आग्रहें ॥१६८॥
मंगल दयक दिव्य शकुन ॥ धर्मासी जाण विती शुभचिन्ह ॥ असो भीष्मावरी बाण ॥ शिखंडी टाकी अतिवेगें ॥१६९॥
महाप्रलय भीष्म करी ॥ पांडवसेना संहारी ॥ धर्मासी ते अवसरीं ॥ देवव्रत बोलत ॥१७०॥
हें मी शरीर टाकीन ॥ भगवत्पदा प्रति जाईन ॥ तुम्ही अवघे वीर मिळून ॥ शर टाकावे मजवरी ॥१७१॥
शिखंडी टाकी ते बाण ॥ उगाचि सोशी गंगा नंदन ॥ त्याचे मागूनि अर्जुन ॥ तीक्ष्ण मार्गण वर्षत ॥१७२॥
पांडव दळींचीं रितीं वाहनें ॥ बहुत केलीं गंगा नंदनें ॥ भीष्मा चिया तये भेणें ॥ वीर पळती दश दिशा ॥१७३॥
शिखंडीचे हळवट बाण ॥ लागतां हांसे गंगा नंदन ॥ मग दिव्यास्त्र दारुण ॥ भीष्में बाणीं स्थापिलें ॥१७४॥
तें अस्त्र गहन देखोन ॥ शिखंडी आड लपे अर्जुन ॥ मग देव व्रतें आवरून ॥ निजस्थानीं ठेविले ॥१७५॥
कल्यांतींचा भास्कर ॥ तैसा दिसे गंगा कुमार ॥ मग पार्थें टाकूनि शर ॥ सर्वांगीं तो खिळियेला ॥१७६॥
सर्व रायांनीं शर ॥ भीष्मावरी घातले अपार ॥ तितुक्यांवरी गंगा कुमार ॥ बाण वर्षत प्रतापें ॥१७७॥
भीष्मांगींचें कवच पुण्यरूप ॥ गळोनि पडिलें आपो आप ॥ शिखंडी होऊनि सकोप ॥ दहा बाण सोडीत पैं ॥१७८॥
ते खडतरले भीष्माचे ह्रदयीं ॥ सारथी रथ भेदिला ते समयीं ॥ ध्वज घोडे लवलाहीं ॥ शिखंडीनें मारिले ॥१७९॥
एकाचि बाणें करून ॥ पांच पांडवांचीं शिरें छेदून ॥ क्षणें टाकणार गंगा नंदन ॥ परी तें मानसीं न धरीच ॥१८०॥
पुढें द्यावया तिलांजली ॥ एवढेचि उरतील स्वकुळीं ॥ ऐसें जाणोनि ह्रदय कमळीं ॥ भीष्म न मारीच तयांतें ॥१८१॥
येतां शिखंडीचे बाण ॥ म्हणे हे लागती जैसें तृण ॥ हे पार्थाचे शर तीक्ष्ण ॥ शरीर भेदोन पुढें जाती ॥१८२॥
प्रसूतिसमयीं सिंहिणीचें देख ॥ उदर फोडूनि निघे शावक ॥ तैसे पार्थाचे बाण निःशंक ॥ भेदूनि जाती कलेवरा ॥१८३॥
शंतनुरा याचा वर जाण ॥ कीं स्वेच्छेनें पावशीं मरण ॥ म्हणो नियां गंगा नंदन ॥ अजिंक्य वीर सर्वांसी ॥१८४॥
तों अष्टवसु आणि सप्त ऋषी ॥ गुप्त येती भीष्मापाशीं ॥ म्हणती आतां ज्ञानराशी ॥ सीमा युद्धाची जाहली ॥१८५॥
महायोगिया वीरा भीष्मा ॥ आतां चाल वेगीं निज धामा ॥ विमानांतूनि सुत्रामा ॥ सुमन भार वर्षतसे ॥१८६॥
तों काम क्रोध मद मत्सर ॥ भीष्में सोडिले समग्र ॥ देव करिती जय जय कार ॥ सोडी नव शर शिखंडी ॥१८७॥
पार्थें टाकिले एकवीस बाण ॥ परी आनंद रूप गंगा नंदन ॥ तों दहावा संपूर्ण ॥ जाहला ऐसें पाहिलें ॥१८८॥
पार्थाचे रथाकडे पाहोन ॥ ह्रदयीं रेखिलें कृष्ण ध्यान ॥ किरीट कुंडलमंडित वदन ॥ दिव्य तेज झळकतसे ॥१८९॥
कौस्तुभ आपाद वनमाळा ॥ पीतवसन कटीं मेखळा ॥ चतुर्भुज घन सांवळा ॥ ह्रदयीं रेखिला भीष्म देवें ॥१९०॥
सूर्य अस्त मानासी जैसा गेला ॥ तैसा भीष्म रथाखालीं पडला ॥ शरपंजरीं पहुडला ॥ कंपित जाहला भूगोला ॥१९१॥
इतुक्यांत सोडावा जों प्राण जों प्राण ॥ तों थोडें उरलें दक्षिणा यन ॥ अंतरिक्ष ध्वनि जाहली पूर्ण ॥ आतांचि शरीर सोडूं नको ॥१९२॥
मग चाप बाण ते वेळे ॥ भीष्में भूमीवरी ठेविले ॥ तों महर्षी सर्व धांवले ॥ भीष्म दर्शन घ्यावया ॥१९३॥
गुप्त रुपें ऋषी येऊन ॥ भीष्मासी करिती प्रदक्षिण ॥ स्वर्गींहूनि देवगण ॥ ॥ पुष्पें टाकिती क्षणक्षणां ॥१९४॥
इकडे कौरव द्ळीं आकान्त ॥ द्रोणाचर्य शारद्वत ॥ दुर्योधनादि राजे समस्त ॥ शोकार्णवीं बुडाले ॥१९५॥
वाटे बुडालें समग्र ॥ पडला त्रिभुवनीं अंधार ॥ पांडवदळीं जय जय कार ॥ वाद्य ध्वनि जय घोषें ॥१९६॥
भीमें मारिली आरोळी ॥ दोन्ही दळें हडबडलीं ॥ भीष्मालागीं पांडवदळीं ॥ शोक करिती सर्वही ॥१९७॥
म्हणती जळो हा क्षात्र धर्म ॥ पडला कीं महाराज भीष्म ॥ ज्याचें प्रातःकाळीं घेतां नाम ॥ सर्व पातकें भस्म होती ॥१९८॥
जो भक्ति ज्ञाने वैराग्ययुक्त ॥ ब्रह्मचारी जैसा शुक हनुमंत ॥ पुण्यपरायण आणि रणपंडित ॥ ऐसा पुन्हां न होय पैं ॥१९९॥
चिंताग्नींत आहाळला कर्ण ॥ म्हणे गेलें भीष्मा ऐसें निधान ॥ दुर्यो धन दुःशासन ॥ अश्रु गाळिती अधोवदनें ॥२००॥
कौरव पांडव शस्त्रें ठेऊनी ॥ आले भीष्मापाशीं ते क्षणीं ॥ त्याचे पाय मस्तकीं वंदोनी ॥ करिती प्रदक्षिणा रडतचि ॥२०१॥
धर्म आणि दुर्यो धन ॥ स्फुंदती तेव्हां अधोवदन ॥ नकुल सहदेव भीमार्जुन ॥ नेत्रीं जीवन ढाळिती ॥२०२॥
शरपंजरीं देवव्रत ॥ परी शिर खालीं लोंबत ॥ म्हणे मज उसें द्या रे त्वरित ॥ शिरासी टेंकण ये समयीं ॥२०३॥
उत्तम उशा आणी दुर्यो धन ॥ मग बोले गंगा नंदन ॥ म्हणे पाहा माझें आंथरुण ॥ उशी आणोनी तैसीच द्या ॥२०४॥
भीष्म पार्थाकडे पाहोनी ॥ म्हणे श्रीकृष्ण प्रिया वीरचूडामणी ॥ तूं तरी उशी दे आणोनी ॥ ग्रीवा धरणीं लोंबते रे ॥२०५॥
मग पार्थें गांडीव चढवून ॥ तीन बाणांचें तिकटें करून ॥ क्षणमात्रें शर सोडून ॥ ग्रीवा उचलोन ॥ सांवरिली ॥२०६॥
भीष्म म्हणे अहा अर्जुना ॥ उत्तम उशी दिली सुजाणा ॥ विजया तुज वैकुंठराणा ॥ सर्वदाही रक्षो कीं ॥२०७॥
प्राप्त होय उत्तरायण ॥ तोंवरी मी न सोडीं प्राण ॥ मग भोंवतें ठेविलें रक्षण ॥ कौरव पांडवां अंतर बहु ॥२०८॥
दुर्यो धन वैद्य आणीत ॥ देखोनि हांसे देवव्रत ॥ मी समर भूमीस जाहलों मुक्त ॥ आतां वैद्य कासया ॥२०९॥
दोन्ही दळींचे नृपवर ॥ भीष्मासी अर्पिता पूजा संभार ॥ प्रदक्षिणा नमस्कार ॥ करूनि जाती स्वस्थाना ॥२१०॥
सकल प्रजा अठरा याती ॥ भीष्मदेवासी येऊनि नमिती ॥ गांवो गांवींच्या नरयुवती ॥ पाहों येती महाराज तो ॥२११॥
क्षणक्षणां पंडुकुमार ॥ येऊनि घेती समाचार ॥ भीष्म कृष्ण स्मरणीं सादर ॥ सहस्त्रनाम उच्चारी ॥२१२॥
भीष्म होऊनि तृषाक्रांत ॥ कौरवांशीं उदक मागत ॥ तंव ते सुगंधोदक आणीत ॥ देवव्रत न घेचि तें ॥२१३॥
म्हणे बोलावा अर्जुन ॥ तंव तो उभा ठाकला येऊन ॥ म्हणे सखया पाजीं जीवन ॥ तेणें बाण लाविला गुणीं ॥२१४॥
भीष्मासमीप दक्षिण भाग पाहुन ॥ धरणी फोडिली बाण मारून ॥ भागीरथीचें दिव्य जीवन ॥ कारंजें तेथें लाविलें ॥२१५॥
धार मुखीं पडतां तत्काळ ॥ जाहलें सर्वांग तेणें शीतळ ॥ जान्हवीतोय औषध निर्मळ ॥ दुःख समूळ विसरला ॥२१६॥
तेव्हां अर्जुनाचें स्तवन ॥ राजे करिती अवघे जण ॥ भयें आणि आश्चयें करून ॥ कौरव सर्व कोंदले ॥२१७॥
भीष्म म्हणे र पार्था ॥ अमिततेजा गुण भरिता ॥ श्रीरंगप्रिया सुभद्राकांता ॥ धन्य वंश तुझेनी ॥२१८॥
दुर्यो धनें पाप करून ॥ स्वकुला टाकिलें जाळून ॥ तुम्ही पवित्र पंडुनंदन ॥ भय नाहीं तुम्हांतें ॥२१९॥
सुयो धनासी म्हणे देवव्रत ॥ अजूनि तरी करीं स्वहित ॥ मित्र करूनि पंडुसुत ॥ सुखरूप नांदें कां ॥२२०॥
दुर्योधन प्रत्युत्तर ॥ सहसा नेदी दुराचार ॥ असो मग तो गंगा कुमार ॥ नाममाळा जप करी ॥२२१॥
यावरी तो महाराज कर्ण ॥ पहावया आला भीष्मा लागून ॥ कंठ दाटला अश्रुजीवन ॥ टपटपां टाकी धरेवरी ॥२२२॥
म्हणे हे भीष्म गंगा नंदन ॥ पहा मजकडे डोळे उघडून ॥ मी अपराधी संपूर्ण ॥ तुजशीं स्पर्धा वाढविली ॥२२३॥
मग डोळे उघडूनि देवव्रत ॥ कर्णासी करें कुरवाळीत ॥ तूं मज येऊनि भेटलासी एथ ॥ इतुकेनि तृप्त जाहलों मी ॥२२४॥
मज नारदें सांगितलें येऊन ॥ कीं कुंतीपुत्र तूं सूर्य वीर्य कर्ण ॥ तूं नीचा श्रयें संपूर्ण ॥ भगवद्भक्तांसी द्वेषिसी ॥२२५॥
येरवीं तुज ऐसा कोण पवित्र ॥ उदार शूर गुण गंभीर ॥ तूं महाराज प्रताप सागर ॥ वीर अर्जुन दुसरा पैं ॥२२६॥
तरी तूं पांडवांकडे जाईं ॥ येरू म्हणे हें न घडे कालत्रयीं ॥ मज हें वर्तमान सर्वही ॥ श्रीकृष्णें पूर्वींच सांगीतलें ॥२२७॥
पांडवांसी सांभाळी द्वारका नायक ॥ तैसा मी कौरवांचा रक्षक ॥ आम्हां क्षत्रियांचें भाग्य देख ॥ समरां गणीं पडावें ॥२२८॥
आतां पांडवांसी जिंकीन ॥ कीं समरांगणीं देईन प्राण ॥ भीष्मा माझे अपराध संपूर्ण ॥ क्षमा करीं यावरी ॥२२९॥
मग नमूनि भीष्मचरण ॥ स्वस्थला प्रति गेला कर्ण ॥ भीष्म म्हणे येथून ॥ मजला कोणी बोलवूं नका ॥२३०॥
मी घ्यातों श्रीहरीचें रूप ॥ येथें करूं नका कोणी विक्षेप ॥ मग बोलणें टाकूनि तो पुण्य रूप ॥ समाधिस्थ स्वस्वरूपीं ॥२३१॥
वैशंपायन म्हणे जन मेजया ॥ भीष्मपर्व संपलें येथो नियां ॥ संजय म्हणे कुरु वर्या ॥ द्रोणपर्व ऐका पुढें ॥२३२॥
नैमिषारण्यीं ऋषी समस्त ॥ त्यांसी हे कथा सांगे सूत ॥ एक शत चार अध्याय समस्त ॥ या पर्वाचे जाणिजे ॥२३३॥
तीन अध्यायां माजी सर्व ॥ आणिला तो अर्थ अपूर्व ॥ ब्रह्मानंद पंढरीराव ॥ सांगतो तेंचि लिहितों मी ॥२३४॥
हें पर्व श्रवण करितां ॥ शत्रुक्षय होय तत्त्वतां ॥ संतति संपत्ति वाचितां ॥ अंतीं मुक्तता प्राप्त होय ॥२३५॥
ब्राह्मणांसी विद्या प्राप्त ॥ क्षत्रियांसी आगळें शूरत्व ॥ वैश्यांसी धन अद्भुत ॥ पावती इच्छित शूद्रही ॥२३६॥
श्रवणें होय रोगहरण ॥ स्त्रियांसी सौभाग्य संपूर्ण ॥ ऐसें बोलिला वैशंपायन ॥ सत्कार करूनि सर्वही ॥२३७॥
आदिपुरुष श्रीदिगंबर ॥ श्रीमद्भी मातीर विहार ॥ ब्रह्मानंद अभंग साचार ॥ सर्वथाही विटेना ॥२३८॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ भीष्मपर्व व्यास भारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ त्रेचाळिसाव्यांत कथियेला ॥२३९॥
इति श्री श्रीधरकृतपांडवप्रतापे भीष्मपर्वणि त्रिचत्वारिंशत्तमाध्यायः ॥४३॥ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥

॥ श्रीपांडवप्रताप भीष्मपर्व समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP