मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप|
अध्याय ४१ वा

पांडवप्रताप - अध्याय ४१ वा

पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.


॥ श्री गणेशाय नमः ॥ जय जय सुभद्र कारके भवानी ॥ मूळपीठद्वारकाविलासिनी ॥ आदिमायेची तूं कुलस्वामिणी ॥ प्रणवरूपिणी
श्रीरंगे ॥१॥
व्यास वाल्मीक नारक ॥ शुक प्रर्‍हाद रुक्मांगद ॥ अंबरीष ऋषि सनकादि ऋषिवृंद ॥ वर्णिती कीर्ति अंबे तुझी ॥२॥
धर्म भीम सुभद्राकांत ॥ नकुल सहदेव पंडुसुत ॥ द्रुपद विराट सात्यकी समस्त ॥ दिवटे तुझे नाचती ॥३॥
सप्त अक्षौहिणी दळ पूर्ण ॥ या भूतावळी संगें घेऊन ॥ कुरुक्षेत्रा जाऊन ॥ गोंधळ मांडिला स्वानंदें ॥४॥
रणमंडळ हें होमकुंड द्वेषाग्नि प्रज्वळला प्रचंड ॥ कौरव बस्त उदंड ॥ आहुति आंत पडतील पैं ॥५॥
भीष्म द्रोण कर्ण वीर ॥ दुःशासन शकुनि कपट सागर ॥ हतरही दैत्यांश नृपवर ॥ आहुति घेशील ययांच्या ॥६॥
दुर्योधन याची निश्चितीं ॥ शेवटीं घेशील पूर्णाहुती ॥ राज्य़ीं स्थापूनि धर्मनृपती ॥ मग तूं जाशील द्वारके ॥७॥
अंबे तुझे दिवटे अपार ॥ त्यांमाजी दासानुदास श्रीधर ॥ तेणें पांडवप्रतापदीपिका थोर ॥ पाजळिली यथामती ॥८॥
आबाल भोळे अज्ञान जन ॥ प्रपंचरजनींत पडिले जाण ॥ त्यांसी हे ग्रंथदीपिका पाजळून ॥ सारांश मार्ग दाखविला ॥९॥
ब्रह्मानंदा यादवेंद्रा ॥ पंढरीशा करुणा समुद्रा ॥ श्रीधरवरदा आनंद भद्रा ॥ पुढें चरित्र बोलवीं ॥१०॥
हातीं लेखणी घेऊनि लवलाहें ॥ तव वदन मी सदा पाहें ॥ पुढें आतां लिहूं काय ॥ लवलाहें सांग तें ॥११॥
पंढरीशें हे ऐकून ॥ सुहास्यमुखें बोले वचन ॥ म्हणे मी सांगतों लेखन ॥ करीं तूं तेंचि सत्वर ॥१२॥
ऐसें वदोनि चक्रपाणी ॥ हातीं दिधली लेखणी ॥ श्रीधरसखया येथूनी ॥ भीष्मपर्व लिहीं कां ॥१३॥
उद्योगपर्व मागें संपतां ॥ वैशंपायनें कथिली कथा ॥ सप्रेमें जन मेजय श्रोता ॥ अत्यादरें पुसतसे ॥१४॥
कौरव आणि पांडवदळें ॥ क्रुरुक्षेत्रीं मिळालीं सकळें ॥ जैसें सागरीं लवण फुटलें ॥ प्रलयीं लोटलें भूमीवरी ॥१५॥
कौरवांशीं करूनि शिष्टाई ॥ आला क्षीराब्धीचा जांवई ॥ दुर्योधन कुबुद्धि पाहीं ॥ सहसाही नायके तो ॥१६॥
सेनापति गंगानंदन ॥ दुर्योधनें केला संपूर्ण ॥ इकडे धर्में जो धृष्टद्यम्न ॥ रणपट्ट त्यासी बांधिला ॥१७॥
येथूनि भीष्मपर्व रसाळ ॥ बोले वैशंपायन ॥ निर्मळ ॥ मनीं चिंतूनि व्यास पदकमळ ॥ कथा पुढें चालविली ॥१८॥
तेचि कथेचा अन्वय ॥ धृतराष्ट्रासी सांगे संजय ॥ दोहीं दळीं गजर पाहें ॥ विशेष जाहला वाद्यांचा ॥१९॥
धर्म कृष्णार्जुन भीम देख ॥ हंहीं त्राहाटिले बळें शंख ॥ कौरव दळींही अनेक ॥ वाजविले जलत तेधवां ॥२०॥
दोहीं दळींचा वाद्यगजर ॥ त्यांत कंबु वाजले अपार ॥ तेणें ब्रह्मांडगोळ समग्र ॥ डळमळत अतिभयें ॥२१॥
दोन्ही दळें परम सदट ॥ मिळाली जेव्हां सेना अचाट ॥ वाटे उर्वी शतकूत ॥ होऊनि जाईल क्षणार्धें ॥२२॥
ऐकतां तो गजर विशेष ॥ ग्रावा सहस्त्र डोलवी नागेश ॥ भ्रमित जाहलें मानस ॥ म्हणे अनर्थ काय हा ॥२३॥
भगणें रिचवती भूमंडळीं ॥ बैसली मेघांची दांतखिळी ॥ कृतांतासही ते वेळीं ॥ भय अत्यंत वाटलें ॥२४॥
उचंबळलें समुद्रा जळ ॥ डळमळलें धरणीमंडळ ॥ हेलावले सप्त पाताळ ॥ वराह कूर्म द्चकले ॥२५॥
दिग्गज चळचळां कांपती ॥ मेरु मंदार आंदोळती ॥ सुधापानी परम चित्तीं ॥ भय पावले तेधवां ॥२६॥
आखंडल मनीं दचकला ॥ अपर्णा पडली शिवाचे शिवाचे गळां ॥ भयभीत जाहली कमला ॥ विष्णु तियेसी सांवरी ॥२७॥
सृष्टि बुडाली देख ॥ तिहीं लोकीं वाजली हांक ॥ पार्थाचे रथीं आदिपुरुष निःशंक ॥ पाहे विस्मित उगाचि ॥२८॥
सृष्टि बुडेल हें जाणोन ॥ मुखींचा काढिला पांच जन्य ॥ तों अवघेचि नाद राहोन ॥ तटस्थ जाहलीं दोन्ही दळें ॥२९॥
वृद्ध बाळ घरीं ठेवून ॥ मिळाले पृथ्वीचे वीर तरुण ॥ तों गजपुरीं सत्यवती नंदन ॥ धृतराष्ट्रासी भेटला ॥३०॥
म्हणे दोन्ही दळें आटतील ॥ पांडव पांच उरतील ॥ तूं जरी पुत्रांचें युद्ध पाहशील ॥ तरी मी चक्षू चेईन तूतें ॥३१॥
विचारें बोले अंबिकानंदन ॥ कुलक्षय न पाहवे माझेन ॥ मज एथेंचि कळेल वर्तमान ॥ ऐसें करीं गुरु वर्या ॥३२॥
मग संजयाच्या मस्तकीं हस्त ॥ ठेविता जाहला शुकतात ॥ म्हणे ज्ञान द्दष्टीनें निलोकूनि समस्त ॥ करीं श्रुत रायातें ॥३३॥
जें जें वर्तेल रणाचे समयीं ॥ तें तें सर्वही पाहूनि येईं ॥ तुज श्रम न होती कांहीं ॥ मजो जवें येतां ॥३४॥
तुज शस्त्रें न लागती रणीं ॥ सुखें तूं येईं जाईं क्षणोक्षणीं ॥ ऐसें श्रीव्यास बोलोनी ॥ अंतर्धान पावले ॥३५॥
संजय म्हणे ते वेळीं ॥ राया दोन्ही दळें सिद्ध जाहलीं ॥ तुझें पुत्र मिळाले सकळी ॥ नामें ऐकें अनुक्रमें ॥३६॥
दुर्योधन दुःशासन युयुत्सु जाण ॥ सह जल संध सहविंद सुलक्षण ॥ अनुविंद भीष्मवर्मा सुबाहु प्रदर्शन ॥ धुमत्सेन बारावा ॥३७॥
दुर्मुख दुष्म्कर्ण विशंति विकर्ण ॥ जल शंख उपचित्र चित्राक्ष लोचन ॥ चारुचित्र दुर्मद शरासन ॥ दुःप्रगाह चोविसावा ॥३८॥
विवत्स विकट सुभ दर्शन ॥ उपनंद नंद चित्र चित्र भान ॥ चित्रकर्ण सुवर्मा दुर्विष मोचन ॥ सुनाभ जाण छत्तिसावा ॥३९॥
आयुर्बाहु महाबाहु चित्रांगद दीर्घचरण ॥ भीष्मवेग भीम बल सुभग जाण ॥ उग्रायुध भीमकर्मा बलवर्धन ॥ कर्णेयु अठ्ठेचाळिसावा  ॥४०॥
द्दढायु बहुकर्मा बृहत्क्षेत्र पूर्ण ॥ सोमकीर्ति द्वंद्वसंध जन संध जाण ॥ सत्य संध उग्रश्रवा सेनानी असेन ॥ दूःपूर अपराजित साठ जाहले ॥४१॥
कुंडशायी विशालाक्ष अक्षय दुराधर्ष ॥ द्दढहस्त सुकेश वात सुवेष ॥ बद्धसिंह आदित्य केतु विशेष ॥ उग्रज बाहात्तर जाहले ॥४२॥
कवचीनाग दंतखड्गी अंडह थोर ॥ उग्र भीमरथ बाहु अलोलुप कुंडधर ॥ अभय शौचकर्मा द्दढरहंवर ॥ युद्धद्दढ चौर्‍यायशीं हे ॥४३॥
इंद्रायुध अनालस्य कुंडभेदी दीर्घलोचन ॥ प्रथन प्रमाथी दीर्घ लोभ वीर्यवान ॥ व्यूढ ध्वज कनक ध्वज कुंडशीर्ण पूर्ण ॥ कर्णिक शाण्णव जाहले ॥४४॥
बलाकी सुभग सगुण ॥ सुहस्त विरोधी पूर्ण ॥ एकशतावरी आगळा जाण ॥ एकोत्तरशत पुत्र हे ॥४५॥
संजय म्हणे इतर वीर देख ॥ त्यांचींही नामें ऐक ॥ कृपाचार्य द्रोणाचार्य वीरनायक ॥ अश्वत्थामा द्विज तिन्ही ॥४६॥
भीष्म कर्ण शकुनि भगदत्त ॥ शल्य उलूक बाल्हीक सोमद्दत ॥ भूरिश्रवा अलंबुष जय द्रथ ॥ बृहद्वल आश्रश्रृंगी ॥४७॥
सैंधव विंद अनुविंद ॥ अंगराज म्लेंच्छपति बहुविध ॥ पर्वतिकराजे विविध ॥ नामें त्यांचीं असंख्य ॥४८॥
त्रिगर्त सुशर्मा हलायुध ॥ दंडधर माग धराजे दळसन्निध ॥ जयत्सेन कांबोज पौरव प्रसिद्ध ॥ महावीर कौरव दळीं ॥४९॥
आतां पंडुपुत्रांचे दळीं ॥ वीर ऐकें राया महाबळी ॥ मुख्य वीरनायक वनमाळी ॥ काळ चळचळां कांपे जया ॥५०॥
धर्म भीम अर्जुन ॥ नकुल सहदेव माद्रीनंदन ॥ आतां प्रतिपांडव पांच जाण ॥ त्यांचीं नांवें ऐक पां ॥५१॥
प्रतिविंध्य श्रुतसोम श्रुतसोम ॥ शतानीक श्रुतसेन ज्यांची युद्धसीमा ॥ हे द्रौपदीपुत्र अगाध महिमा ॥ पांडवांचे प्रतिपांव ॥५२॥
जैसा नवग्रहांत सूर्य नारायण ॥ तैसा सुभद्रात्मज प्रत्यर्जुन ॥ द्रुपद शिखंडी धृष्टद्युम्न ॥ बहुत नंदन द्रुपदाचे ॥५३॥
युद्ध समयीं नामें जाण ॥ त्यांचीं सांगेल वैशंपायन ॥ विराटसुत उत्तर सात्यकी यादव जाण ॥ शिशुपालपुत्र धृष्टकेतु ॥५४॥
कुंतिभोज काशिराज चेकितान ॥ घतोत्कच अंजनपर्वा त्याचा नंदन ॥ उलूपीपुत्र इलावान ॥ अर्जुनवीर्यैं जन्मला ॥५५॥
नीलराज क्षत्रिय देवाधिराज वीर ॥ शंख उत्तमौजा युयुधान संजित दशपुत्र ॥ युधामन्यु विक्रांत महावीर ॥ धृष्टद्युम्नकुमार क्षात्रधर्मी ॥५६॥
वार्ध्यक्षमी चित्रायुध सुकुमार ॥ सत्यधृति व्याघ्रदत्त चंद्रसेन वीर ॥ सेनाबिंदु परंजय सत्यजित थोर ॥ पांडयराज महाबळी ॥५७॥
श्रोणिमान्‍ वसुधान पूजित ॥ हे पांडवदळीं वीर विख्यात ॥ राया वीरगणना समस्त ॥ तथानुक्रमें सांगितली ॥५८॥
कौरवदळीं वीर अद्धुत ॥ सेनामुखीं मुख्य देवव्रत ॥ शुभ्र घोडे भुभ्र रथ ॥ पंच ध्वज शुभ्र ज्याचे ॥५९॥
शुभ्र वस्त्रें शुभ्र मुक्तामाळा ॥ शुभ्र परिमळ सर्वागळा ॥ एकत्र करूनि द्वादशादित्यकळा ॥ वाटे घडिला कमलासनें ॥६०॥
महावीर रणपंडित ॥ जेणें रणीं तोषविला रेणुकासुत ॥ उर्वीचे राजे विपरीत ॥ ज्याच्या भयानें वर्तती ॥६१॥
कल्पांतीं जैसा कृतान्त ॥ विश्व ग्रासूं पाहे क्षुधाक्रांत ॥ तैसा पाहतां देवव्रत ॥ भयभीत पांडवदळें ॥६२॥
दोन सेना दोन भागीं अद्धुत ॥ मध्यें भीष्में केला उभा रथ ॥ हस्त संकेत दाखवूनि त्वरित ॥ राहवीत वाद्यध्वनी ॥६३॥
पांडव कौरव तटस्थ होऊन ॥ ऐकती भीष्माचे बोल गहन ॥ म्हणे वीर हो ऐका सावधान ॥ दोहीं दळींचे समस्तही ॥६४॥
युद्धसमयींच करावें वैर ॥ शिबिरा गेलिया निर्वैर ॥ सेनेंत हिंडावें निःशस्त्र ॥ भय मनीं न धरू नियां ॥६५॥
कित्येक राजे सेने सहित ॥ भोंवते युद्धकौतुक विलोकीत ॥ त्यांवरी जाऊनि शस्त्रघात ॥ सर्वथाही न करावा ॥६६॥
पळे तयासी न मारावें ॥ शस्त्र टाकील त्यासी रक्षावें ॥ शरणागतासी पाळावें ॥ बहुतीं न जावें एकावरी ॥६७॥
घेऊनि उपचार तांबूल उदक ॥ मध्यें वागती जे कां सेवक ॥ त्यांसी न मारावें देख ॥ ऐका समस्त धर्म हा ॥६८॥
वार्तिक चार येत जात ॥ सूत्रधार लोहचर्मकारक ॥ भूमिसमानकर्ते खनक ॥ त्यांसी कदा न मारावें ॥६९॥
महाराज गंगानंदन ॥ आणिक बोले हस्त उभारून ॥ पांडवदळींचे नृप संपूर्ण ॥ सावधान ऐका पां ॥७०॥
मज भीष्माचा नेम निश्चितीं ॥ नित्य मारीन दहासहस्त्र रथी ॥ निर्वीर करीन सकल क्षिती ॥ निजसामर्थ्यें करू नियां ॥७१॥
द्रोणाचार्य कृपाचार्य कृपाचार्य ॥ कर्ण अश्वत्थामा बळें आर्य ॥ जे रणपंडित प्रताप सूर्य ॥ आटिती तुम्हांसी दळासहित ॥७२॥
तरी आम्हां कडे जे येणार ॥ ते आतांच या नृप हो सत्वर ॥ ऐकोनि पांडवदळींचे वीर ॥ उगेचि उत्तर न देती ॥७३॥
मग आपुल्या दळाकडे पाहून ॥ बोले शंतनुरायनंदन ॥ म्हणे जिकडे असती कृष्णार्जुन ॥ जय तिकडे निश्चयें ॥७४॥
विजय चाप विजप तूणीर ॥ विजय ध्वज विजय वायु कुमार ॥ विजय रथावरी विजय वीर ॥ विजय देणार श्रीकृष्ण तेथें ॥७५॥
भीमाची ऐकतां हां ॥ चळचळां कांपती तिन्ही लोक ॥ गदाघायें सकळिक ॥ निवटील हा निश्चयें ॥७६॥
धर्म तपस्वी सत्यपरायण ॥ नयन उघडील क्रोधेंकरून ॥ सर्व पृतना जाळील पूर्ण ॥ उमारमण दुसरा तो ॥७७॥
तैसेचि हे सहदेव नकुल ॥ उतावीळ पाहती युद्धकाल ॥ सौभद्र सात्यकी प्रत्यक्ष काल ॥ दळ सकल उरों न देती ॥७८॥
द्रुपद पांचाळ महारथी ॥ असो जय पांडवचि पावती ॥ कोण जाणार ते नृपती ॥ त्वरितगति जा आतां ॥७९॥
तो युयुत्यु धृतराष्ट्र नंदन ॥ वेश्योदरीं पावला जनन ॥ जो कां आगळा शतांहून ॥ तो उठोन चालिला ॥८०॥
निजसेसे सहित जात ॥ देखोनि सुयोधन संतप्त ॥ मग बोले गंगासुत ॥ तूं का व्यर्थ राहविसी त्या ॥८१॥
आपणाकडे आला युयुत्सव ॥ हें जाणोनि संतोषले पांच पांडव ॥ गजाखालीं उतरूनि धर्मराव ॥ भेटोनि तया गौर विलें ॥८२॥
धर्म बोले प्रियवचन ॥ संकटीं बंधु आलासी धांवोन ॥ तूं मज आवडसी प्राणांहून ॥ ऐकोनि युयुत्सु तोषला ॥८३॥
असो यावरी भीष्म महाबली ॥ जेणें दहा दिवस सेना रक्षिली ॥ दुर्योधन आज्ञापी सकलीं ॥ नृपवरीं रक्षावें भीष्मातें ॥८४॥
शिखंडीस रक्षा अवघेजण ॥ अथवा सत्वर टाका मारून ॥ देवव्रत त्यावरी न घाली बाण ॥ स्त्री म्हणूनि पूर्ण तो ॥८५॥
दोन्ही दळींचे दिसती हस्ती ॥ जैशा चालिल्या पर्वतपंक्ती ॥ कनकपाखरा झळकती ॥ हिरे दंतीं जडियेले ॥८६॥
कर्णांमधूनि रुळती चामरें ॥ घंटा वाजती अतिगरजरें ॥ रणसागरींचीं तारें ॥ रथ तैसे दोन्ही दळीं ॥८७॥
ध्वज तळपती साचार ॥ वरी चिन्हें तेचि कर्णधार ॥ रत्न कनकमंडित रहंवर ॥ रणपंडित वरी बैसले ॥८८॥
पवनवेगें गरुडा समान ॥ दोन्ही दळीं तुरंग संपूर्ण ॥ कित्येक धांवती श्यामकर्ण ॥ मनोजवें करू नियां ॥८९॥
फुटलें जैसें समुद्र जळ ॥ तैसें न गणवेचि पायदळ ॥ तों उठिले वाद्यांचे कल्लोळ ॥ भूमंडळ डळमळलें ॥९०॥
शशिवदना भेरी धडकत ॥ दुंदुभी वाजती असंख्यात ॥ श्रृंगें करणें फुंकीत ॥ नाहीं अंत वाद्यांसी ॥९१॥
वरी उगवला सूर्य नारायण ॥ रणीं दुसरा सूर्य गंगा नंदन ॥ कर्ण विलोकी दुरून ॥ नेमवचन द्दढ धरिलें ॥९२॥
भीष्माचा जों होय अंत ॥ तोंवरी कदा न ये युद्धांत ॥ असो देवर्षी समस्त ॥ कल्याण चिंतिती पांडवां ॥९३॥
महारथी वीस सहस्त्र ॥ भीष्माचे पाठीशीं उभे सादर ॥ वज्रव्यूह द्दढ साचार ॥ धृष्टद्युम्नें रचियेला ॥९४॥
मध्य भागीं युधिष्ठिर ॥ जैसा भगणीं वेष्टित रोहिणीवर ॥ कीं निजकिरणीं वेष्टित भास्कर ॥ कीं देवीं शक्र त्यापरी ॥९५॥
दिव्य रत्नां भोंवतीं सकळी ॥ मिळे जैसी परीक्षकमंडळी ॥ कीं सिद्धा भोंवतीं पाळी ॥ साधकांची विराजे ॥९६॥
दोन्ही दळींची अपार धुळी ॥ गेली ऊर्ध्व गगमंडळीं ॥ निर्बुजले पक्षी सकळी ॥ वायु फिरूं न लाहे ॥९७॥
कौरवांसी अपशकुन जाणा ॥ जाणवताती क्षणक्षणां ॥ विजय कल्याण पंडुनंदनां ॥ शकुनचिन्हें दिसती पैं ॥९८॥
केवळ देवां ऐसी जाणा ॥ दिसों लागली पांडवपृतना ॥ दैत्यराक्षसवत कौरवसेना ॥ अमंगळ दारुण दिसतसे ॥९९॥
केशव म्हणे किरीटी ऐक ॥ शुचिष्मंत होऊनि सेनेसन्मुख ॥ दुर्गास्तवन करीं सम्यक ॥ जय प्राप्त तेणें तुम्हां ॥१००॥
मग हस्तपाद प्रक्षालून ॥ श्वेतवाहनें कर जोडून ॥ करूं आरंभिलें स्तवन ॥ जेणें प्रसन्न अंबा होय ॥१०१॥
जय जय आदिजननी ॥ भवच्छेदके वरदायिनी ॥ भवप्रिये भवभय मोचनी ॥ समरांगणीं पाठीं राखें ॥१०२॥
इंद्र उपेंद्र कमलासन ॥ शिव करिती तुझें अर्चन ॥ ऋषिगण गंधर्व मानव जाण ॥ तुज स्ववून यशस्वी ॥१०३॥
अनंत तरुणा दित्यपंक्ती ॥ तव प्रभेमाजी गुप्त होती ॥ प्रणवस्वरूपिणी मूळस्फूर्ती ॥ त्रिपुरसुंदरी जग न्माते ॥१०४॥
ऐसें ऐकतां स्तवन ॥ देवी अंतरिक्ष बोले वचन ॥ तुज साह्य मी आणि श्रीकृष्ण ॥ रक्षूं सदा समरांगणीं ॥१०५॥
मग रथारूढ जाहला सुभद्रावर ॥ सारथी पुढें त्रिभुवन सुंदर ॥ अंजनी ह्रदया रविंद भ्रमर ॥ देत भुभुःकार सत्राणें ॥१०६॥
फुटली भूतांची आरोळी ॥ जलज वाजविती भीभत्सु वनमाळी ॥ शुक्ष्क तुंबिनीचें फळ जळीं ॥ तेवीं डळमळे कुंभिनी हे ॥१०७॥
श्रीवल्लभासी म्हणे पार्थ ॥ उभयसेनांमध्यें लोटीं रथ ॥ मग त्रुटि न वाजतां त्वरित ॥ मध्य भागीं उभा केला ॥१०८॥
संजय म्हणे कुरु भूषणा ॥ ह्रषीकेशें लोटितां स्यंदना ॥ तटस्थ पाहे उभयसेना ॥ मध्यें रथोत्तम स्थापिला ॥१०९॥
मग चहूंकडे पार्थ ॥ कौरवसेना विलोकीत ॥ तों अवघेचि देखिले आप्त ॥ भीष्मद्रोणादि सर्वही ॥११०॥
ऐसें देखोनि सुभद्रावर ॥ म्हणे हे श्रीकृष्ण हे श्रीकरधर ॥ अवघे प्राण सखे हे सहोहर ॥ यांसी कैसें वधूं आतां ॥१११॥
अरे हा भीष्म महाराज पाहें ॥ आमुचा पितामह प्रत्यक्ष होत आहे ॥ बाळ पणा पासूनि पाळिलें स्नेहें ॥ त्यासी कैसें वधूं आतां ॥११२॥
हा द्रोणाचार्य गुरुमाउली ॥ त्याच्या स्नेह सागरीं म्यां बुडी दिधली ॥ आपुल्या पत्राहूनि आगळी ॥ मजवरी प्रीति तयाची ॥११३॥
पृथ्वीपरी क्षमा आगळी ॥ ता द्रोणाचे ठायीं न्याहाळीं ॥ गुण गंभीरा दयेची खोली ॥ सागराहूनि अधिक पैं ॥११४॥
हें राज्य जावो जळोन ॥ जाऊं दे आतांचि माझा प्राण ॥ परी गुरुद्रोणावरी बाण ॥ टाकूं कैसे कमलावरा ॥११५॥
हा कृपाचार्य दया सागर ॥ हा अश्वत्थामा गुरु पुत्र ॥ हे सुयोधनादि माझे सोदर ॥ कैसा गोत्रवध करूं आतां ॥११६॥
थरथरां कांपे अर्जुन ॥ नेत्रीं वाहे अश्रु जीवन ॥ मुखकमल गेलें सुकोन ॥ जिव्हा अधर ॥ वाळले ॥११७॥
हातींचें चाप गळालें ॥ सर्वांसीं रोमांच उभारले ॥ उडी घातली रथाखालें ॥ मोहें व्यापिलें ॥ पार्थासी ॥११८॥
कंठ दाटला सद्नदित ॥ स्फुंदस्फुंदोनि रडे पार्थ ॥ म्हणे हा मांडला अनर्थ ॥ स्वजन कैसे वधूं आतां ॥११९॥
नलगे राज्य संपदा धन ॥ घेवोत सुखें हे माझा प्राण ॥ परी मी यांवरी बाण ॥ सहसाही सोडींना ॥१२०॥
यांसी समरांगणीं मारूनी ॥ रक्तें भिजवावी हे मेदिनी ॥ मग ते भोगावी चक्रपाणी ॥ महापापें भरली जे ॥१२१॥
कुलक्षय मित्रद्रोह करून ॥ गुरुहत्या मारूनि ब्राह्मण ॥ जळो जळो हें क्षत्रियपण ॥ काय भोगूं राज्य तें ॥१२२॥
मग राज्यांतीं नरक घोर ॥ आपण भोगावे अपार ॥ सुखें सेवावें गिरिकंदर ॥ जळो क्षत्रिय धर्म हा ॥१२३॥
हे रविकरवरांबरधरा ॥ मधुमुरनरक संहारा ॥ द्वारका नगर विहारा ॥ युद्ध मी सहसा न करींचा ॥१२४॥
यावरी इंदिरा ह्रदयाञ भ्रमर ॥ मेघ गंभीरगिरा बोले उत्तर ॥ म्हणे प्राण सखया विचार ॥ व्यर्य काय आरंभिला ॥१२५॥
दोन्ही दळें सिद्ध जाहलीं ॥ रणतुरांची घाई लागली ॥ तुझी मति मोहें व्यापिली ॥ कैसी पडली भुली तूतें ॥१२६॥
तूं मारिसी तरीच हे मरती ॥ नाहीं तरी काय चिरंजीव होती ॥ कालत्रयीं क्षय न पावती ॥ सांग मज तूं आतां हें ॥१२७॥
तुझें करूनि निमित्त मात्र ॥ मी उतरितों हा भूभार ॥ कर्ता हर्ता पाळिता सर्वत्र ॥ मीच व्यापक सर्व असें ॥१२८॥
या ब्रह्मांडाची रहाटी ॥ मज पासूनियां जाहली किरीटी ॥ लया पावोनि शेवटीं ॥ मज माजी सर्व मिळे ॥१२९॥
जैशा अलंकारांच्या आकृती ॥ मुसेमाजी सर्व विरती ॥ तैसे हे जीव सामावती ॥ मजमाजी सुभद्रावरी ॥१३०॥
मणि ओंविले जैसे सूत्रीं ॥ तैसा मी व्यापक सर्वांतरीं ॥ आदि अंतीं मध्यें निर्धारीं ॥ मजवांचूनि नसे दुजें ॥१३१॥
जैसीं काष्ठाचीं बुद्धिबळें मांडिजेत ॥ तेथें चलनवलन ॥ नाहीं किंचित ॥ हारी जिती समस्त ॥ खेळणाराजवळीच असे ॥१३२॥
बुद्धिबळानें अभिमान तेथ ॥ कां हो धरावा उगाचि एथ ॥ आम्ही युद्ध करते जयवंत ॥ कायसी मात विचारीं हे ॥१३३॥
तैसीं ही कौरव पांडवदळें ॥ मीच हें बुद्धिबळ ठेविलें ॥ स्वच्छंदें मी खेळ खेळें ॥ तुवां कां मांडिलें नसतेंचि ॥१३४॥
तूं मजसीं आहेस अभिन्न ॥ अवघें कर्तृत्व माझेंचि जाण ॥ व्यर्थ धरूनि देहाभिमान ॥ आपणा दुषण लाविसी ॥१३५॥
ऊठ घेईं धनुष्यबाण ॥ पाहसी काय माजवीं रण ॥ तूं माझें स्वरूप ओळखून ॥ होईं निमग्न मजमाजी ॥१३६॥
आरशांत पाहिलें वदन ॥ तरी काय जाहलें दुजेपण ॥ तैसें माझें प्रतिबिंब पूर्ण ॥ निमित्त पुढें तुज केलें ॥१३७॥
तूं निर्दोष सच्चिदानंद घन ॥ माझें स्वरूप तूंचि पूर्ण ॥ पार्था हें माझें सत्यज्ञान ॥ तुझी आण वाहतसें ॥१३८॥
श्रीधर विनवी सकळ पंडितां ॥ एथूनि अद्भुत भगव द्नीता ॥ अवघी वर्णावी तत्ततां ॥ तरी ग्रंथविस्तर होईल पैं ॥१३९॥
आदिपर्वा पासून ॥ हा एकेचाळिसावा अध्याय जाण ॥ अपार ग्रंथ वैशंपायन ॥ व्यासप्रसादें बोलिला ॥१४०॥
साह्य होऊनि पंढरीनाथ ॥ त्यांतील सारांशकथा वदवीत ॥ एरवीं समुद्रा ऐसा ग्रंथ ॥ महाभारत व्यासोक्त हा ॥१४१॥
साठ लक्ष मूळभारत ॥ सवा लक्ष निवडी सत्यवतीसुत ॥ त्याची टीका पदपदार्थ ॥ मानवां केवीं करवेल पां ॥१४२॥
सवालक्ष श्लोक पावन पावन ॥ त्यांची टीका संपूर्ण ॥ शतवर्षें ॥ शतवर्षें करितां जाण ॥ तरी कदा न सरेचि ॥१४३॥
त्यांत मनुष्याचें आयुष्य क्षणिक जाण ॥ केव्हां सरेल न कळे खूण ॥ त्यांत संसार व्यथा परम दारुण ॥ आधि व्याधि पीडिती ॥१४४॥
शतवर्षें वांचल्या जरी ॥ पन्नास वर्षें गेलीं रात्री ॥ कांहीं बालत्व तारुण्यभरीं ॥ तों वृद्धत्व निर्धारीं लागलें ॥१४५॥
त्यांतही पूर्व पुण्या नुसारें ॥ आठवतील भगवंताचीं चरित्रें ॥ गंगा न प्राशवे समग्र करें ॥ म्हणूनि तृषा कां मोडावी ॥१४६॥
एक दोन अंजुळी जीवन ॥ घेऊनि करावें तृषाहरण ॥ पर्वताइतुकें दिधलें धन ॥ तरी शक्ति पाहून स्वीकारावें ॥१४७॥
देखिला दिव्यान्नाचा पर्वत ॥ परी केवीं मावेल पोटांत ॥ तरी कां बैसावें क्षुधाक्रांत ॥ घ्यावें किंचित उदराइतुकें ॥१४८॥
वाचेचें सर्थक करावें यथार्थ ॥ म्हणोनि आरंभिलें व्यास भारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ अतुट कथा निवडिली ॥१४९॥
असो भीष्मपर्व आरंभितां ॥ एथें लागली भगवद्नीता ॥ सातशत श्लोक पाहतां ॥ गणना ऐका समस्तही ॥१५०॥
धृतराष्ट्रोक्त एक श्लोक ॥ दुर्योधनाचे नऊ देख ॥ संजयाचे बत्तीस सम्यक ॥ अर्जुनाचे चौर्‍यायशीं ॥१५१॥
पांचशें चौर्‍याहत्तर सुरस ॥ स्वयें बोलिला जगन्निवास ॥ एवं सप्तशत श्लोक गीता निःशेष ॥ महापुरुष उपासिती ॥१५२॥
गीता हे भवानी सतेजा ॥ अष्टादशाध्याय तिच्या भुजा ॥ बोधत्रिशूल घेऊनि ओजा ॥ कुतर्कदैत्य मर्दीत ॥१५३॥
पार्थाचे ह्र्दयीं मोह फार ॥ हाचि माजला होता महिषासुर ॥ बोधशस्त्रें छेदूनि शिर ॥ पायांखाळीं रगडिला ॥१५४॥
अर्जुन मोहें व्यापला कैसा ॥ आपुलें स्वरूप नेणे सहसा ॥ त्यासी गीता हाचि आरसा ॥ रमावरें दाखविला ॥१५५॥
अर्जुनाचे ह्रदयीं अंधार ॥ पडला असतां निबिड फार ॥ तेथें सातशतें श्लोक दिवाकर ॥ उदय पावले एकदांचि ॥१५६॥
गीता हे कामधेनु जाणा ॥ अर्जुनासी घाली प्रेम पान्हा ॥ तेंचि दुभतें संतसज्जनां ॥ परिपूर्ण होय अद्यापि ॥१५७॥
कीं गीता हें पदक अवधारा ॥ त्यावरी जोडिले हिरे अठरा ॥ पार्थ प्राण सखा जाणोनि खरा ॥ कंठीं घातलें तयाच्या ॥१५८॥
कीं पार्थ ह्र्दय समुद्रा ओघा ॥ मिळाल्या अष्टादश गंगा ॥ कीं गीता सुरतरूची अंगलगा ॥ अष्टादश शाखांची ॥१५९॥
कीं अष्टादश पुराणांचें हें सार ॥ कीं अठरा कोहळीं द्रव्य अपार ॥ गीतामंजूषेंत भरूनि श्रीधर ॥ समर्पीत अर्जुनासी ॥१६०॥
सहा अध्याय कर्मकांड जाण ॥ सहा अध्याय पूर्ण औपासन ॥ सहा अध्याय पूर्ण दिव्यज्ञान ॥ त्रिकांड संपूर्ण वेद हा ॥१६१॥
कीं अष्टादश दिव्य खण ॥ गीता हेंचि वृंदावन ॥ स्वानुभवतुळशी शोभायमान ॥ घवघवीत साजिरी ॥१६२॥
तेथें पारायण प्रदक्षिणा अनुदिन ॥ करिती सदा संत जन ॥ असो गीता सुरसा गहन ॥ पार्थाप्रती निरोपिली ॥१६३॥
ब्रह्मानंदें श्रीधर ॥ विनवी पंडितां जोडूनि कर ॥ गीतेवरी टीका साचार ॥ जरी आतां येथें करावी ॥१६४॥
तरी ज्ञानेश्वराहूनि निश्चितीं ॥ माझी नव्हे कीं आगळी मती ॥ तेचि पाहावी सर्व संतीं ॥ दिनरातीं अत्यादरें ॥१६५॥
गीता हें पदक निर्धारें ॥ वरी ज्ञानेंश्वरें जोडिले हिरे ॥ इतर जडतील तीं खापरें ॥ मागें अथवा पुढेंही ॥१६६॥
ज्ञानेश्वरी निंदिती साचार ॥ ते नर नव्हेत प्रत्यक्ष असुर ॥ कीं मनुष्य रूपें खर ॥ व्यर्थ जन्मासी आले ते ॥१६७॥
ज्ञानेश्वर तोचि कृष्णनाथ ॥ केला गीतेचा तेणें अर्थ ॥ जे निंदितील यथार्थ ॥ ते मंदमती जाणावे ॥१६८॥
असो ज्ञानेश्वर आणि सर्व संत ॥ त्यांसी ब्रह्मानंदें श्रीधर विनवीत ॥ पुढें कथेसी द्यावें चित्त ॥ भीष्मपर्व रसागळें ॥१६९॥
अर्जुनासी ज्ञान अद्भुत ॥ उपदेशूनि क्षीराब्धिजामात ॥ निजरथीं बैसवी स्वस्थ ॥ पुढें कथार्थ परिसिजे ॥१७०॥
धर्म रथाखालीं उतरून ॥ शस्त्र कवच सर्व ठेवून ॥ दोन्ही ह्स्त जोडून ॥ कौरव सेनेंत चालिला ॥१७१॥
कौरव धर्मासी निंदीत ॥ क्षत्रियधर्म टाकूनि समस्त ॥ जीव भयें शरण येत ॥ भीष्मालागीं वाटतें ॥१७२॥
चोघेही बंधु वेगें ॥ धांवती धर्माचे पाठिलागें ॥ कौरव आनंदले सर्वांगें ॥ म्हणती बरवें आतां जाहलें ॥१७३॥
दोन्ही दळींचे राजे समस्त ॥ म्हणती हें काय जाहलें विपरीत ॥ पांडव झाले शरणा गत ॥ परम नीच कर्म हें ॥१७४॥
कौरव वस्त्रें उडवूनि वहिले ॥ म्हणती पांडव आम्हांसी शरण आले ॥ वाद्य घोष उगोचि राहिले ॥ शब्द न बोले कोणी तेथें ॥१७५॥
कां पांडव गेले कर जोडून ॥ हें एक जाणे श्रीकृष्ण ॥ वरकड दोन्ही दळींचे जन ॥ संशयचक्रीं पडियेले ॥१७६॥
असो भीष्माजवळी येऊन ॥ पांडव अनुक्रमें करिती वंदन ॥ पुढें बद्धांजलि उभारून ॥ धर्मराज विनवीतसे ॥१७७॥
म्हणे जन कज नका कुरु नायका ॥ निजकुल वल्ली प्रतिपालका ॥ युद्ध करावया आम्हां सेवकां ॥ आज्ञा यावरी होईल कीं ॥१७८॥
मग बोलिला देवव्रत ॥ जरी तुम्ही न येतां पुसावया येथ ॥ तरी मी शापितों यथार्थ ॥ कोपोनियां निश्चयें ॥१७९॥
आतां प्रसन्न मी तुम्हांसी ॥ जय पावाल निश्चयेंशीं ॥ तुम्हीं निर्भय होऊनि मानसी ॥ समरीं मजशीं भिडावें ॥१८०॥
धर्म म्हणे मज विचार ॥ सर्वज्ञा सांग वारंवार ॥ भेटीस येईन साचार ॥ क्षणक्षणां महाराजा ॥१८१॥
तुजपासूनियां सत्य ॥ आम्हांसी कैसा जय प्राप्त ॥ भीष्म म्हणे तो वृत्तान्त ॥ पुढें येईं सांगेन तूतें ॥१८२॥
मग पितामहासी नमून ॥ पांचही वंदिती द्रोणाचे चरण ॥ कर जोडूनियां स्तवन ॥ करिती प्रेमें आवडीं ॥१८३॥
पार्थ सद्नदित होऊनी ॥ भाळ ठेवी द्रोणाचे चरणीं ॥ म्हणे गुरु वर्या समरांगणीं ॥ तुजशीं कैसा युद्ध करूं ॥१८४॥
या शरीराच्या पादुका करून ॥ तुझे चरणीं मी लेववीन ॥ तरी तुझे उपकारां उत्तीर्ण ॥ नव्हे कदा गुरु वर्या ॥१८५॥
तुझिया उपकारें दाटलों फार ॥ कैसें सोडूं तुजवरी शर ॥ द्रोण म्हण धर्म युद्ध साचार ॥ करितां दोष कदा नसे ॥१८६॥
तुम्हांसी जय होईल प्राप्त ॥ कौरव क्षय पावतील समस्त ॥ तुम्ही आरंभीं भेटलेत येऊनि येथ ॥ इतुकेनि तृप्त मी झालों ॥१८७॥
जिकडे असे वैकुंठविलास ॥ तिकडे जय आणि निर्दोष यश ॥ धर्मा जें तुझें इच्छित मानस ॥ तें मी पुरवीन सांग पां ॥१८८॥
धर्म म्हणे आम्हांसी जय ॥ तुज पासूनि कैसा प्राप्त होय ॥ मग संतोषोनि द्रोणाचार्य ॥ वर्म सांगे शेवटींचें ॥१८९॥
मजशीं अर्जुनावांचूनी ॥ भिडे ऐसा वीर नाहीं समरांगणीं ॥ शेवटीं महामुनीश्वर येऊनी ॥ माझिये कर्णीं सांगेल ॥१९०॥
त्याचा बोध कर्णीं ऐकोन ॥ शस्त्रें माझीं मीच ठेवीन ॥ योगदीक्षा आकळून ॥ मी जाईन निजधामा ॥१९१॥
मग तुम्हांसी जय प्राप्त ॥ ऐकोइ संतोषले पंडुसुत ॥ मग गुरुसी पुसोनि शारद्वत ॥ वंदूनि प्रेमें स्ववियेला ॥१९२॥
कृपाचार्य सुप्रसन्न ॥ म्हणे तुम्हांसी होईल जय कल्याण ॥ मी चिरंजीव मज नाहीं मरण ॥ युद्ध निर्वाण करा तुम्ही ॥१९३॥
मग जो शल्य मातुल जाण ॥ त्यासी भेटले पांचही जण ॥ धर्म बोले कर जोडून ॥ नेमवचन सांभाळीं ॥१९४॥
कर्णाचें सारथ्य करूनी ॥ तेजोभंग करावा क्षणोक्षणीं ॥ मग शल्य अवश्य म्हणोनी ॥ आशीर्वाद देता जाहला ॥१९५॥
मग स्वदळांत येऊन ॥ रथारूढ जाहले पांचही जण ॥ कीं उगवले पंच चंडकिरण ॥ श्रीकृष्ण कृपांबरीं ॥१९६॥
भीष्माचें युद्ध संपूर्ण ॥ होय तों कदा न ये कर्ण ॥ हेंही उत्तम जाहलें कारण ॥ जगज्जीवन बोलिला ॥१९७॥
उतरावया भूभार ॥ अवतरलासे यादवेंद्र ॥ त्याची माया परम दुस्तर ॥ करी विचित्र करणी पहा ॥१९८॥
ब्रह्मानंद अज अविनाश ॥ श्रीमद्भीमातीर विलास ॥ अर्जुनाचे रथीं हुषीकेश ॥ सरथी जाहला स्वयें पैं ॥१९९॥
भीष्मपर्व अतिसुरस ॥ पुढें माजेल बहु वीररस ॥ श्रीधरवरद जगन्निवास ॥ पांडुरंग बोलवील पैं ॥२००॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ भीष्मपर्व व्यास भारत ॥ त्यांतील यथार्थ ॥ एकेचाळिसाव्यांत कथियेला ॥२०१॥
इति श्री श्रीधरकृतपांडवप्रतापे भीष्मपर्वणि गीतोपदेशकथनं नाम एकचत्वारिंशाध्यायः ॥४१॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP