ज्ञानेश्वरी अध्याय ५

संत ज्ञानेश्वर (जन्म : १२७५) हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी आहेत.


॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका अध्याय ५ ॥

॥ॐ श्री परमात्मने नमः ॥

अध्याय पांचवा ।

संन्यासयोगः ।

संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि ।

यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम् ॥१॥

मग पार्थु श्रीकृष्णातें म्हणे । हां हो हें कैसें तुमचें बोलणें । एक होय तरी अंतःकरणें । विचारूं ये ॥१॥

मागां सकळ कर्मांचा सन्यासु । तुम्हींचि निरोपिला होता बहुवसु । तरी कर्मयोगीं केवीं अतिरसु । पोखीतसां पुढती ? ॥२॥

ऐसें द्व्यर्थ हें बोलतां । आम्हां नेणतयांच्या चित्ता । आपुलिये चाडें श्रीअनंता । उमजु नोहे ॥३॥

ऐकें एकसारातें बोधिजे । तरी एकनिष्ठचि बोलिजे । हें आणिकीं काय सांगिजे । तुम्हांप्रति ॥४॥

तरी याचिलागीं तुमतें । म्यां राउळासि विनविलें होतें । जें हा परमार्थु ध्वनितें । न बोलावा ॥५॥

परी मागील असो देवा । आतां प्रस्तुतीं उकलु देखावा । सांगैं दोहींमाजि बरवा । मार्गु कवणु ॥६॥

जो परिणामींचा निर्वाळा । अचुंबितु ये फळा । आणि अनुष्ठितां प्रांजळा । सावियाचि ॥७॥

जैसें निद्रेचें सुख न मोडे । आणि मार्गु तरी बहुसाल सांडे । तैसें सोहोकासन सांगडें । सोहपें होय ॥८॥

येणें अर्जुनाचेनि बोलें । देवो मनीं रिझले । मग होईल ऐकें म्हणितलें । संतोषोनियां ॥९॥

देखा कामधेनु ऐसी माये । सदैवा जया होये । तो चंद्रुही परी लाहे । खेळावया ॥१०॥

पाहे पां श्रीशंभूची प्रसन्नता । तया उपमन्यूचिया आर्ता । काय क्षीराब्धि दूधभाता । देइजेचिना ? ॥११॥

तैसा औदार्याचा कुरुठा । श्रीकृष्णु आपु जाहलिया सुभटा । कां सर्व सुखांचा वसौटा । तोचि नोहावा ? ॥१२॥

एथ चमत्कारु कायसा । गोसावी श्रीलक्ष्मीकांताऐसा । आतां आपुलिया सवेसा । मागावा कीं ॥१३॥

म्हणौनि अर्जुनें म्हणितलें । तें हांसोनि येरें दिधलें । तेंचि सांगेन बोलिलें । काय कृष्णें ॥१४॥

श्रीभगवानुवाच ।

संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ ।

तयोस्तु कर्मसंन्यासात्कर्मयोगो विशिष्यते ॥२॥

तो म्हणे गा कुंतीसुता । हे संन्यासयोगु विचारितां । मोक्षकरु तत्त्वता । दोनीही होती ॥१५॥

तरी जाणां नेणां सकळां । हा कर्मयोगु कीर प्रांजळा । जैसी नाव स्त्रियां बाळां । तोयतरणी ॥१६॥

तैसें सारासार पाहिजे । तरी सोहपा हाचि देखिजे । येणें संन्यासफळ लाहिजे । अनायासें ॥१७॥

आतां याचिलागीं सांगेन । तुज संन्यासियाचें चिन्ह । मग सहजें हें अभिन्न । जाणसी तूं ॥१८॥

ज्ञेयः स नित्यसंन्यासी यो न द्वेष्टि न काङ्क्षति ।

निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बन्धात्प्रमुच्यते ॥३॥

तरी गेलियाची से न करी । न पवतां चाड न धरी । जो सुनिश्चळु अंतरीं । मेरु जैसा ॥१९॥

आणि मी माझें ऐसी आठवण । विसरलें जयाचें अंतःकरण । पार्था तो संन्यासी जाण । निरंतर ॥२०॥

जो मनें ऐसा जाहला । संगीं तोचि सांडिला । म्हणौनि सुखें सुख पावला । अखंडित ॥२१॥

आतां गृहादिक आघवें । तें कांहीं नलगे त्यजावें । जें घेतें जाहलें स्वभावें । निःसंगु म्हणौनि ॥२२॥

देखैं अग्नि विझोनि जाये । मग जे राखोंडी केवळु होये । तैं ते कापुसें गिंवसूं ये । जियापरी ॥२३॥

तैसा असतेनि उपाधी । नाकळिजे तो कर्मबंधीं । जयाचिये बुद्धी । संकल्पु नाहीं ॥२४॥

म्हणौनि कल्पना जैं सांडे । तैंचि गा संन्यासु घडे । इयें कारणें दोनी सांगडे । संन्यासयोगु ॥२५॥

सांख्ययोगौ पृथग्बालाः प्रवदन्ति न पण्डिताः ।

एकमप्यास्थितः सम्यगुभयोर्विन्दते फलम् ॥४॥

एऱ्हवीं तरी पार्था । जे मूर्ख होती सर्वथा । ते सांख्ययोगुसंस्था । जाणती केवीं ? ॥२६॥

सहजें ते अज्ञान । म्हणौनि म्हणती ते भिन्न । एऱ्हवीं दीपाप्रति काई आनान । प्रकाशु आहाती ? ॥२७॥

पैं सम्यक येणें अनुभवें । जिहीं देखिलें तत्त्व आघवें । तें दोहींतेंही ऐक्यभावें । मानिती गा ॥२८॥

यत्सांख्यैः प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते ।

एकं साख्यं च योगं च यः पश्यति स पश्चति ॥५॥

आणि सांख्यीं जें पाविजे । तेंचि योगीं गमिजे । म्हणौनि ऐक्य दोहींतें सहजें । इयापरी ॥२९॥

देखैं आकाशा आणि अवकाशा । भेदु नाहीं जैसा । तैसें ऐक्य योगसंन्यासा । वोळखे जो ॥३०॥

तयासीचि जगीं पाहलें । आपणपें तेणेंचि देखिलें । जया सांख्ययोग जाणवले । भेदेंविण ॥३१॥

संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः ।

योगयुक्तो मुनिर्बह्म न चिरेणाधिगच्छति ॥६॥

जो युक्तिपंथें पार्था । चढे मोक्षपर्वता । तो महासुखाचा निमथा । वहिला पावे ॥३२॥

येरा योगस्थिति जया सांडे । तो वायांचि गा हव्यासीं पडे । परि प्राप्ति कहीं न घडे । संन्यासाची ॥३३॥

योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः ।

सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते ॥७॥

जेणें भ्रांतीपासूनि हिरतलें । गुरुवाक्यें मन धुतलें । मग आत्मस्वरूपीं घातलें । हारौनियां ॥३४॥

जैसें समुद्रीं लवण न पडे । तंव वेगळें अल्प आवडे । मग होय सिंधूचि एवढें । मिळे तेव्हां ॥३५॥

तैसें संकल्पोनि काढिलें । जयाचें मनचि चैतन्य जाहलें । तेणें एकदेशियें परी व्यापिलें । लोकत्रय ॥३६॥

आतां कर्ता कर्म करावें । हें खुंटलें तया स्वभावें । आणि करी जऱ्ही आघवें । तऱ्ही अकर्ता तो ॥३७॥

नैव किंचित्करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् ।

पश्यञ्श्रृण्वन्स्पृशञ्जिघ्रन्नश्नन्गच्छन्स्वपन्श्वसन ॥८॥

प्रलपन्विसृजन्गृह्णन्नुन्मिषन्निमिषन्नपि ।

इंद्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन ॥९॥

जे पार्था तया देहीं । मी ऐसा आठऊ नाहीं । तरी कर्तृत्व कैचैं काई । उरे सांगैं ? ॥३८॥

ऐसें तनुत्यागेंवीण । अमूर्ताचे गुण । दिसती संपूर्ण । योगयुक्तां ॥३९॥

एऱ्हवीं आणिकांचिये परी । तोही एक शरीरी । अशेषाही व्यापारीं । वर्ततु दिसे ॥४०॥

तोही नेत्रीं पाहे । श्रवणीं ऐकतु आहे । परि तेथींचा सर्वथा नोहे । नवल देखें ॥४१॥

स्पर्शासि तरी जाणे । परिमळु सेवी घ्राणें । अवसरोचित बोलणें । तयाहि आथी ॥४२॥

आहारातें स्वीकारी । त्यजावें तें परिहरी । निद्रेचिया अवसरीं । निदिजे सुखें ॥४३॥

आपुलेनि इच्छावशें । तोही गा चालतु दिसे । पैं सकळ कर्म ऐसें । रहाटे कीर ॥४४॥

हें सांगों काई एकैक । देखें श्वासोच्छ्वासादिक । आणि निमिषोन्निमिष । आदिकरूनि ॥४५॥

पार्था तयाचे ठायीं । हें आघवेंचि आथि पाहीं । परी तो कर्ता नव्हे कांहीं । प्रतीतिबळें ॥४६॥

जैं भ्रांति सेजे सुतला । तैं स्वप्नसुखें भुतला । मग तो ज्ञानोदयीं चेइला । म्हणौनियां ॥४७॥

ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति यः ।

लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा ॥१०॥

आतां अधिष्ठानसंगती । अशेषाही इंद्रियवृत्ती । आपुलालिया अर्थीं । वर्तत आहाती ॥४८॥

दीपाचेनि प्रकाशें । गृहींचे व्यापार जैसे । देहीं कर्मजात तैसे । योगयुक्ता ॥४९॥

तो कर्में करी सकळें । परी कर्मबंधा नाकळे । जैसें न सिंपे जळीं जळें । पद्मपत्र ॥५०॥

कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि ।

योगिनः कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वात्मशुद्धये ॥११॥

देखैं बुद्धीची भाष नेणिजे । मनाचा अंकुर नुदैजे । ऐसा व्यापारु तो बोलिजे । शारीरु गा ॥५१॥

हेंच मराठे परियेशीं । तरी बाळकाची चेष्टा जैशी । योगिये कर्में करिती तैशीं । केवळा तनु ॥५२॥

मग पांचभौतिक संचलें । जेव्हां शरीर असे निदेलें । तेथ मनचि रहाटें एकलें । स्वप्नीं जेवीं ॥५३॥

नवल ऐकें धनुर्धरा । कैसा वासनेचा संसारा । देहा होऊं नेदी उजगरा । परी सुखदुःखें भोगी ॥५४॥

इंद्रियांच्या गांवीं नेणिजे । ऐसा व्यापारु जो निपजे । तो केवळु गा म्हणिजे । मानसाचा ॥५५॥

योगिये तोही करिती । परी कर्में तें न बंधिजती । जे सांडिली आहे संगती । अहंभावाची ॥५६॥

आतां जाहालिया भ्रमहत । जैसें पिशाचाचें चित्त । मग इंद्रियांचें चेष्टित । विकळु दिसे ॥५७॥

स्वरूप तरी देखे । आळविलें आइके । शब्दु बोले मुखें । परी ज्ञान नाहीं ॥५८॥

हें असो काजेंविण । जें जें कांहीं करण । तें केवळ कर्म जाण । इंद्रियांचें ॥५९॥

मग सर्वत्र जें जाणतें । ते बुद्धीचें कर्म निरुतें । ओळख अर्जुनातें । म्हणे हरी ॥६०॥

ते बुद्धी धुरे करुनी । कर्म करिती चित्त देऊनी । परी ते नैष्कर्म्यापासुनी । मुक्त दिसती ॥६१॥

जें बुद्धीचिये ठावूनि देही । तयां अहंकाराची सेचि नाहीं । म्हणौनि कर्म करितां पाहीं । चोखाळले ॥६२॥

अगा करितेनवीण कर्म । तेंचि तें नैष्कर्म्य । हें जाणती सुवर्म । गुरुगम्य जें ॥६३॥

आतां शांतरसाचें भरितें । सांडीत आहे पात्रातें । जें बोलणें बोलापरौतें । बोलवलें ॥६४॥

एथ इंद्रियांचा पांगु । जया फिटला आहे चांगु । तयासीचि आथि लागु । परिसावया ॥६५॥

हा असो अतिप्रसंगु । न संडी पां कथालागु । होईल श्लोकसंगति भंगु । म्हणौनियां ॥६६॥

जें मना आकळितां कुवाडें । घाघुसितां बुद्धी नातुडे । तें दैवाचेनि सुरवाडें । सांगवलें तुज ॥६७॥

जें शब्दातीत स्वभावें । तें बोलींचि जरी फावे । तरी आणिकें काय करावें । कथा सांगैं ॥६८॥

हा आर्तिविशेषु श्रोतयांचा । जाणोनि दास निवृत्तीचा । म्हणे संवादु दोघांचा । परिसोनि परिसा ॥६९॥

मग श्रीकृष्ण म्हणे पार्थातें । आतां प्राप्ताचें चिन्ह पुरतें । सांगेन तुज निरुतें । चित्त देईं ॥७०॥

युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् ।

अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते ॥१२॥

तरी आत्मयोगें आथिला । जो कर्मफळाशीं विटला । तो घर रिघोनि वरिला । शांति जगीं ॥७१॥

येरु कर्मबंधें किरीटी । अभिलाषाचिया गांठीं । कळासला खुंटी । फळभोगाच्या ॥७२॥

सर्वकर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी ।

नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन ॥१३॥

जैसा फळाचिये हांवें । तैसें कर्म करी आघवें । मग न कीजेचि येणें भावें । उपेक्षी जो ॥७३॥

तो जयाकडे वासु पाहे । तेउती सुखाची सृष्टि होये । तो म्हणे तेथ राहे । महाबोधु ॥७४॥

नवद्वारें देहीं । तो असतुचि परि नाहीं । करितुचि न करी कांहीं । फलत्यागी ॥७५॥

न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः ।

न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते ॥१४॥

जैसा कां सर्वेश्वरू । पाहिजे तंव निर्व्यापारु । परि तोचि रची विस्तारु । त्रिभुवनाचा ॥७६॥

आणि कर्ता ऐसें म्हणिपे । तरी कवणें कर्मीं न शिंपें । जे हातुपावो न लिंपे । उदासवृत्तीचा ॥७७॥

योगनिद्रा तरी न मोडे । अकर्तेपणा सळु न पडे । परी महाभूतांचें दळवाडें । उभारी भले ॥७८॥

जगाच्या जीवीं आहे । परी कवणाचा कहीं नोहे । जगचि हें होय जाये । तो शुद्धीहि नेणे ॥७९॥

नादत्ते कस्यचित्पापं न चैव सुकृतं विभुः ।

अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः ॥१५॥

पापपुण्यें अशेषें । पासींचि असतु न देखें । आणि साक्षीही होऊं न ठके । येरी गोठी कायसी ? ॥८०॥

पैं मूर्तीचेनि मेळें । तो मूर्तचि होऊनि खेळे । परि अमूर्तपण न मैळे । दादुलयाचें ॥८१॥

तो सृजी पाळी संहारी । ऐसें बोलती जे चराचरीं । तें अज्ञान गा अवधारीं । पंडुकुमरा ॥८२॥

ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः ।

तेषामादित्यवज्ञानं प्रकाशयति तत्परम् ॥१६॥

तें अज्ञान जैं समूळ तुटे । तै भ्रांतीचें मसैरें फिटे । मग अकर्तृत्व प्रगटे । मज ईश्वराचें ॥८३॥

एथ ईश्वरु एकु अकर्ता । ऐसें मानलें जरी चित्ता । तरी तोचि मी हें स्वभावता । आदीचि आहे ॥८४॥

ऐसेनि विवेकें उदो चित्तीं । तयासी भेदु कैंचा त्रिजगतीं । देखें आपुलिया प्रतीति । जगचि मुक्त ॥८५॥

जैशी पूर्वदिशेच्या राउळीं । उदया येतांचि सूर्य दिवाळी । कीं येरीही दिशां तियेचि काळीं । काळिमा नाहीं ॥८६॥

तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठातत्परायणः ।

गच्छन्त्यपुनरावृत्ति ज्ञाननिर्धूतकल्मषाः ॥१७॥

बुद्धिनिश्चयें आत्मज्ञान । ब्रह्मरूप भावी आपणा आपण । ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण । तत्परायण अहर्निशीं ॥८७॥

ऐसें व्यापक ज्ञान भलें । जयांचिया हृदया गिंवसित आलें । तयांची समता दृष्टि बोलें । विशेषूं काई ॥८८॥

एक आपणपांचि जैसें । ते देखतीं विश्व तैसें । हें बोलणें कायसें । नवलु एथ ॥८९॥

परी दैव जैसें कवतिकें । कहींचि दैन्य न देखे । कां विवेकु हा नोळखे । भ्रांतीतें जेवीं ॥९०॥

नातरी अंधकाराची वानी । जैसा सूर्यो न देखे स्वप्नीं । अमृत नायके कानीं । मृत्युकथा ॥९१॥

हें असो संतापु कैसा । चंद्रु न स्मरे जैसा । भूतीं भेदु नेणती तैसा । ज्ञानिये ते ॥९२॥

विद्याविनयसंपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि ।

शुनि चैव श्वपाके च पण्डिताः समदर्शिनः ॥१८॥

मग हा मशकु हा गजु । कीं हा श्वपचु हा द्विजु । पैल इतरु हा आत्मजु । हें उरेल कें ? ॥९३॥

ना तरी हे धेनु हें श्वान । एक गुरु एक हीन । हें असो कैचें स्वप्न । जागतया ॥९४॥

एथ भेदु तरी कीं देखावा । जरी अहंभाव उरला होआवा । तो आधींचि नाहीं आघवा । आतां विषमु काई ॥९५॥

इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः ।

निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद्ब्रह्मणि ते स्थिताः ॥१९॥

म्हणौनि सर्वत्र सदा सम । तें आपणचि अद्वय ब्रह्म । हें संपूर्ण जाणें वर्म । समदृष्टीचें ॥९६॥

जिहीं विषयसंगु न सांडितां । इंद्रियांतें न दंडितां । परी भोगिली निसंगता । कामनेविण ॥९७॥

जिहीं लोकांचेनि आधारें । लौकिकेंचि व्यापारें । परि सांडिलें निदसुरें । लौकिकु हें ॥९८॥

जैसा जनामाजि खेचरु । असतुचि जना नोहे गोचरु । तैसा शरीरीं परी संसारु । नोळखे तयांतें ॥९९॥

हें असो पवनाचेनि मेळें । जैसें जळींचि जळ लोळे । तें आणिकें म्हणती वेगळें । कल्लोळ हे ॥१००॥

तैसें नाम रूप तयाचें । एऱ्हवीं ब्रह्मचि तो साचें । मन साम्या आलें जयाचें । सर्वत्र गा ॥१०१॥

ऐसेनि समदृष्टी जो होये । तया पुरुषा लक्षणही आहे । अर्जुना संक्षेपें सांगेन पाहें । अच्युत म्हणे ॥१०२॥

न प्रहृष्योत्प्रियं प्राप्य नोद्विजेत्प्राप्य चाप्रियम् ।

स्थिरबुद्धिरसंमूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः ॥२०॥

तरी मृगजळाचेनि पूरें । जैसें न लोटिजे कां गिरिवरें । तैसा शुभाशुभीं न विकरे । पातलिया जो ॥१०३॥

तोचि तो निरुता । समदृष्टी तत्त्वतां । हरि म्हणे पंडुसुता । तोचि ब्रह्म ॥१०४॥

बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत्सुखम् ।

स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते ॥२१॥

जया आपणपें सांडूनि कहीं । इंद्रियग्रामावरी येणेंचि नाहीं । तो विषय न सेवी हें काई । विचित्र येथ ॥१०५॥

सहजें स्वसुखाचेनि अपारें । सुरवाडलेनि अंतरें । रचिला म्हणौनि बाहिरें । पाउल न घाली ॥१०६॥

सांगैं कुमुददळाचेनि ताटें । जो जेविला चंद्रकिरणें चोखटें । तो चकोरु काई वाळुवंटें । चुंबितु असे ? ॥१०७॥

तैसें आत्मसुख उपाइलें । जयासि आपणपेंचि फावलें । तया विषयो सहजें सांडवले । म्हणो काई ? ॥१०८॥

एऱ्हवीं तरी कौतुकें । विचारूनि पाहें पां निकें । या विषयांचेनि सुखें । झकविती कवण ॥१०९॥

ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते ।

आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः ॥२२॥

जिहीं आपणपें नाहीं देखिलें । तेचि इहीं इंद्रियार्थीं रंजले । जैसें रंकु कां आळुकैलें । तुषांतें सेवी ॥११०॥

नातरी मृगें तृषापीडितें । संभ्रमें विसरोनि जळांतें । मग तोयबुद्धी बरडीतें । ठाकूनि येती ॥१११॥

तैसें आपणपें नाहीं दिठे । जयातें स्वसुखाचे सदा खरांटे । तयासीचि विषय हे गोमटे । आवडती ॥११२॥

एऱ्हवीं विषयीं सुख आहे । हे बोलणेंचि सारिखें नोहे । तरी विद्युत्स्फुरणें कां न पाहे । जगामाजीं ॥११३॥

सांगैं वात वर्ष आतपु धरे । ऐसे अभ्रच्छायाचि जरी सरे । तरी त्रिमाळिकें धवळारें । करावीं कां ॥११४॥

म्हणौनि विषयसुख जें बोलिजे । तें नेणतां गा वायां जल्पिजे । जैसें महूर कां म्हणिजे । विषकंदातें ॥११५॥

नातरी भौमा नाम मंगळु । रोहिणीतें म्हणती जळु । तैसा सुखप्रवादु बरळु । विषयिकु हा ॥११६॥

हे असो आघवी बोली । सांग पां सर्पफणीचा साउली । ते शीतल होईल केतुली । मूषकासी ? ॥११७॥

जैसा आमिषकवळु पांडवा । मीनु न सेवी तंवचि बरवा । तैसा विषयसंगु आघवा । निभ्रांत जाणें ॥११८॥

हे विरक्तांचिये दिठी । जैं न्याहाळिजे किरीटी । तैं पांडुरोगाचिये पुष्टी । सारिखें दिसे ॥११९॥

म्हणौनि विषयभोगीं जें सुख । तें साद्यंतचि जाण दुःख । परि काय कीजे मूर्ख । न सेवितां न सरे ॥१२०॥

तें अंतर नेणती बापुडे । म्हणौनि अगत्य सेवणें घडे । सांगैं पूयपंकींचे किडे । काय चिळसी घेती ॥१२१॥

तयां दुःखियां दुःखचि जिव्हार । ते विषयकर्दमींचे दर्दुर । ते भोगजळींचे जळचर । सांडिती केवीं ॥१२२॥

आणि दुःखयोनि जिया आहाती । तिया निरर्थका तरी नव्हती । जरी विषयांवरी विरक्ती । धरिती जीव ॥१२३॥

नातरी गर्भवासादि संकट । कां जन्ममरणींचे कष्ट । हे विसांवेवीण वाट । वाहावी कवणें ॥१२४॥

जरी विषयीं विषयो सांडिजेल । तरी महादोषीं कें वसिजेल । आणि संसारु हा शब्दु नव्हेल । लटिका जगीं ? ॥१२५॥

म्हणौनि अविद्याजात नाथिलें । तें तिहींचि साच दाविलें । जिहीं सुखबुद्धी घेतलें । विषयदुःख ॥१२६॥

या कारणें गा सुभटा । हा विचारितां विषय वोखटा । तूं झणें कहीं या वाटा । विसरोनि जाशी ॥१२७॥

पैं यातें विरक्त पुरुष । त्यजिती कां जैसें विष । निराशा तयां दुःख । दाविलें नावडे ॥१२८॥

शक्नोतीहैव यः सोढुं प्राक्षरीरविमोक्षणात् ।

कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तः स सुखी नरः ॥२३॥

ज्ञानियांच्या हन ठायीं । याची मातुही कीर नाहीं । देहीं देहभावो जिहीं । स्ववश केले ॥१२९॥

जयांतें बाह्याची भाष । नेणिजेचि निःशेष । अंतरीं सुख । एक आथि ॥१३०॥

परि तें वेगळेपणें भोगिजे । जैसें पक्षियें फळ चुंबिजे । तैसें नव्हे तेथ विसरिजे । भोगितेपणही ॥१३१॥

भोगीं अवस्था एकी उठी । ते अहंकाराचा अंचळु लोटी । मग सुखेंसि घे आंटी । गाढेपणें ॥१३२॥

तिये आलिंगनमेळीं । होय आपेंआप कवळी । तेथ जळ जैसें जळीं । वेगळें न दिसे ॥१३३॥

कां आकाशीं वायु हारपे । तेथ दोन्ही हे भाष लोपे । तैसे सुखचि उरे स्वरूपें । सुरतीं तिये ॥१३४॥

ऐसी द्वैताची भाष जाय । मग म्हणों जरी एक होय । तरी तेथ साक्षी कवणु आहे । जाणते जें ॥१३५॥

योऽन्तःसुखोऽन्तरारामस्तथान्तर्ज्योतिरेव यः ।

स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति ॥२४॥

लभन्ते ब्रह्मनिर्वाणमृषयः क्षीणकल्मषाः ।

छिन्नद्वैधा यतात्मानः सर्वभूतहिते रताः ॥२५॥

म्हणौनि असो हें आघवें । एथ न बोलणें काय बोलावें । ते खुणाचि पावले स्वभावें । आत्माराम ॥१३६॥

जे ऐसेनि सुखें मातले । आपणपांचि आपण गुंतले । ते मी जाणें निखिळ वोतले । सामरस्याचे ॥१३७॥

ते आनंदाचे अनुकार । सुखाचे अंकुर । कीं महाबोधें विहार । केले जैसे ॥१३८॥

ते विवेकाचें गांव । कीं परब्रम्हींचे स्वभाव । नातरी अळंकारले अवयव । ब्रह्मविद्येचे ॥१३९॥

ते सत्त्वाचे सात्त्विक । कीं चैतन्याचे आंगिक । हें बहु असो एकैक । वानिसी काई ॥१४०॥

तूं संतस्तवनीं रतसी । तरी कथेची से न करिसी । कीं निराळीं बोल देखसी । सनागर ॥१४१॥

परि तो रसातिशयो मुकुळीं । मग ग्रंथार्थदीपु उजळीं । करी साधुहृदयराउळीं । मंगळउखा ॥१४२॥

ऐसा श्रीगुरूचा उवायिला । निवृत्तिदासासी पातला । मग तो म्हणे श्रीकृष्ण बोलिला । तेंचि आइका ॥१४३॥

अर्जुना अनंत सुखाच्या डोहीं । एकसरा तळुचि घेतला जिहीं । मग स्थिराऊनि तेही । तेंचि जाहले ॥१४४॥

अथवा आत्मप्रकाशें चोखें । जो आपणपेंचि विश्व देखे । तो देहेंचि परब्रह्म सुखें । मानूं येईल ॥१४५॥

जें साचोकारें परम । ना तें अक्षर निःसीम । जिये गांवींचे निष्काम । अधिकारिये ॥१४६॥

जे महर्षीं वाढले । विरक्तां भागा फिटलें । जे निःसंशया पिकलें । निरंतर ॥१४७॥

कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम् ।

अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम् ॥२६॥

जिहीं विषयांपासोनि हिरतलें । चित्त आपुलें आपण जिंतिलें । ते निश्चित जेथ सुतले । चेतीचिना ॥१४८ ॥

तें परब्रह्म निर्वाण । जें आत्मविदांचें कारण । तेंचि ते पुरुष जाण । पंडुकुमरा ॥१४९ ॥

ते ऐसे कैसेंनि जहाले । जे देहींचि ब्रह्मत्वा आले । हें पुससी तरी भलें । संक्षेपें सांगों ॥१५० ॥

स्पर्शान्कृत्वा बहिर्बाह्यांश्चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः ।

प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ ॥२७॥

यतेन्द्रियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः ।

विगतेच्छाभयक्रोधो यः सदा मुक्त एव सः ॥२८॥

तरी वैराग्याचेनि आधारें । जिहीं विषय दवडूनि बाहिरें । शरीरीं एकंदरें । केलें मन ॥१५१॥

सहजें तिहीं संधी भेटी । जेथ भ्रूपल्लवां पडे गांठी । तेथ पाठिमोरी दिठी । पारखोनियां ॥१५२॥

सांडूनि दक्षिण वाम । प्राणापानसम । चित्तेंसीं व्योम । गामिये करिती ॥१५३॥

तेथ जैसीं रथ्योदकें सकळें । घेऊनि गंगा समुद्रीं मिळे । मग एकेकु वेगळें । निवडूं नये ॥१५४॥

तैसी वासनांतराची विवंचना । मग आपैसी पारुखे अर्जुना । जे वेळीं गगनीं लयो मना । पवनें कीजे ॥१५५॥

जेथ हें संसारचित्र उमटे । तो मनोरूपु पटु फाटे । जैसें सरोवर आटे । मग प्रतिभा नाहीं ॥१५६॥

तैसें मन एथ मुद्दल जाय । मग अहंभावादिक कें आहे । म्हणौनि शरीरेंचि ब्रह्म होये । अनुभवी तो ॥१५७॥

भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरम् ।

सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति ॥२९॥

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे

श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मसंज्ञासयोगोनाम पंचमोऽध्यायः ॥५॥

आम्हीं मागां हन सांगितलें । जे देहींचि ब्रह्मत्व पावले । ते येणें मार्गें आले । म्हणौनियां ॥१५८॥

आणि यमनियमांचे डोंगर । अभ्यासाचे सागर । क्रमोनि हे पार । पातले ते ॥१५९॥

तिहीं आपणपें करूनि निर्लेप । प्रपंचाचें घेतलें माप । मग साचाचेंचि रूप । होऊनि ठेले ॥१६०॥

ऐसा योगयुक्तीचा उद्देशु । जेथ बोलिला हृषीकेशु । तेथ अर्जुनु सुदंशु । म्हणौनि चमत्कारला ॥१६१॥

तें देखिलिया कृष्णें जाणितलें । मग हांसोनि पार्थातें म्हणितलें । काई पां चित्त उवाइलें । इये बोलीं तुझें ? ॥१६२॥

तंव अर्जुन म्हणे देवो । परचित्तलक्षणांचा रावो । भला जाणितला जी भावो । मानसु माझा ॥१६३॥

म्यां जें कांहीं विवरोनि पुसावें । तें आधींचि जाणितलें देवें । तरी बोलिलें तेंचि सांगावें । विवळ करूनि ॥१६४॥

एऱ्हवीं तरी अवधारा । जो दाविला तुम्हीं अनुसारा । तो पव्हण्याहूनि पायउतारा । सोहपा जैसा ॥१६५॥

तैसा सांख्याहूनि प्रांजळा । परी आम्हांसारिखियां अभोळां । एथ आहाति परि कांहीं काळा । तो साहों ये वर ॥१६६॥

म्हणौनि एक वेळ देवा । तोचि पडताळा घेयावा । विस्तरेल तरी सांगावा । साद्यंतुचि ॥१६७॥

तंव श्रीकृष्ण म्हणती हो कां । तुज हा मार्गु गमला निका । तरी काय जाहलें आईकीजो कां । सुखें बोलों ॥१६८॥

अर्जुना तूं परिससी । परिसोनि अनुष्ठिसी । तरी आम्हांसीचि वानी कायसी । सांगावयाची ? ॥१६९॥

आधींचि चित्त मायेचें । वरी मिष जाहले पढियंतयाचें । आतां तें अद्भुतपण स्नेहाचें । कवण जाणे ॥१७०॥

तें म्हणो कारुण्यरसाची वृष्टि । कीं नवया स्नेहाची सृष्टि । हें असो नेणिजे दृष्टी । हरीची वानूं ॥१७१॥

जे अमृताची वोतली । कीं प्रेमचि पिऊनि मातली । म्हणौनि अर्जुनमोहें गुंतली । निघों नेणें ॥१७२॥

हें बहु जें जें जल्पिजेल । तेथें कथेसि फांकु होईल । परि तें स्नेहरूपा न येल । बोलवरी ॥१७३॥

म्हणौनि विसुरा काय येणें । तो ईश्वरु कवळावा कवणें । जो आपुलें मान नेणें । आपणचि ॥१७४॥

तरी मागीला ध्वनीआंतु । मज गमला सावियाचि मोहितु । जे बलात्कारें असे म्हणतु । परिस बापा ॥१७५॥

अर्जुना जेणें जेणें भेदें । तुझें कां चित्त बोधे । तैसें तैसें विनोदें । निरूपिजेल ॥१७६॥

तो काइसया नाम योगु । तयाचा कवण उपेगु । अथवा अधिकारप्रसंगु । कवणा येथ ॥१७७॥

ऐसें जें जें कांहीं । उक्त असे इये ठाईं । तें आघवेंचि पाहीं । सांगेन आतां ॥१७८॥

तूं चित्त देऊनि अवधारीं । ऐसें म्हणौनि श्रीहरी । बोलिजेल ते पुढारी । कथा आहे ॥१७९॥

श्रीकृष्ण अर्जुनासी संगु । न सांडोनि सांगेल योगु । तो व्यक्त करूं प्रसंगु । म्हणे निवृत्तिदासु ॥१८०॥

इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां पंचमोऽध्यायः ॥

N/A

References : N/A
Last Updated : June 30, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP